Thursday, July 30, 2020

काही आठवणी .. दिग्गज गायकांबरोबरच्या, प्यारेलालजींकडून ऐकलेल्या !!


महंमद रफी यांची एक खास आठवण. स्पेशल चहा लागायचा त्यांना. दूध आटवून अर्धं करायचं, मग त्यात सुक्यामेव्याची पूड घालायची आणि मग त्याचा चहा करायचा.  रफींना एकदा परदेशी जायचं होतं पण त्याआधी काम तर पूर्ण करायचंय मग काय एका दिवसात त्यांनी चक्क पाच गाणी रेकॉर्ड केली होती,  त्यातलं एक गाणं होतं लोफर या चित्रपटातलं – 'आज मौसम बडा बेईमान है '!

'पिया का घर' चित्रपटातलं 'ये जीवन है',  हे किशोरकुमार यांनी गायलेलं गाणं आपल्याला किती आवडतं पण या गाण्याचं रेकॉर्डिंग सुरू असताना दोन टेक्स झाले तरी पण गाणं काही भावत नव्हतं. बरं काही चुकतंय असंही नव्हतं. किशोरकुमार उत्तम गात होते, पण तरीही काहीतरी मिसिंग होतं. तेव्हा किशोरकुमार यांना जेव्हा हे सांगितलं तेव्हा ते दोन्ही हातांच्या ओंजळीत हनुवटी धरून बसले आणि थोड्या वेळाने तसंच अगदी मृदू आवाजात ते गाणं गायला लागले. त्याच वेळी लक्ष्मी प्यारे दोघेही त्यांना म्हणाले की अगदी असंच तलम हवंय. मग ते संपूर्ण गाणं किशोरकुमारांनी तसाच चेहरा हातांच्या ओंजळीत धरून म्हटलं ! 

सत्यम शिवम सुंदरमच्या शीर्षकगीताचं रेकॉर्डिंग सुरू होतं. प्रचंड मोठा वाद्यवृंद होता. पाच कंडक्टर्स होते. पण रिदम सेक्शन कंडक्ट करायला कुणी नव्हतं तर लता मंगेशकरांनी तो कंडक्ट केला आणि कंडक्ट करता करता इतकं अप्रतिम गायलं सुद्धा ! 

प्यारेलालजी नेहमी सांगतात, आमचं संगीत हे टीमवर्क आहे किंबहुना हे सगळं कामच टीमवर्कचं असतं. गाण्याचे बोल उत्तम असायला लागतात, त्याचं संगीत, त्याचं चित्रीकरण, दिग्दर्शकाची दृष्टी, अभिनेत्यांचं काम, वादकांचा सहभाग हे सगळं गाणं लोकप्रिय व्हायला कारणीभूत असतात आणि म्हणूनच त्यांच्या संपूर्ण सांगीतिक प्रवासाचं श्रेय ते या TEAMWORK ला देतात !!! 
इजाजत

एक चिरतरुण काव्य, कितीही वेळा बघितला तरी तितकाच आवडतो, जवळचा वाटतो आणि प्रत्येक वेळी काहीतरी नविन देवून जातो. सिनेमा पाहतांना 'पावसाच्या बरसणाऱ्या सरींच्या सोबत गुलजारजींची कविता त्यांच्याच आवाजात आपण ऐकतोय' असं वाटतं राहतं. या सिनेमाच्या प्रेमात पडल्यापासून असा एकही पावसाळा गेला नाही कि मी 'इजाजत' पाहिला नाही, इतकी जादू या सिनेमाने केली आहे मनावर. इजाजत म्हणजे महेंद्र,  माया आणि सुधा यांची एक अलवार प्रेमकहाणी. यांत नक्की कोण बरोबर किंवा कोण चूक याचा विचार न करता फक्त नजरेत आणि कानांत साठवून ठेवावी अशी हि निखळ प्रेमकविता !!

एकीकडे रेखा ,नसिरुद्दीन शहा, अनुराधा पटेल हे तीन जबरदस्त कलाकार तर दुसरीकडे गुलजार ,पंचम आणि आशाताई यांनी अजरामर करून ठेवलेली एक से बढकर एक जबरदस्त गाणी ! कधी गीतकार म्हणून तर कधी दिग्दर्शक म्हणून तर कधी संवाद लेखक म्हणून प्रत्येक भूमिकेत आपण प्रेमात पडतो गुलजारजींच्या. यातला प्रत्येक संवाद म्हणजे एक खास कविता आहे, मनाला भिडणारी, प्रत्येकाला आपली वाटणारी.. 'मेरी मानिये जिंदगी को लगाम मत डालिये, आपके मुड़ने से ये नहीं मुड़ेगी' किंवा 'देखिये जो सच है सही है वही कीजिये' तसंच 'आदते तो छुट जाती है पर अधिकार नहीं छुटते'.. काय अप्रतिम लिहिलंय ना !!

रेल्वे स्टेशन वर वेटिंग रूम मध्ये सुरु होणारा हा सिनेमा. योगायोगाने भेटणाऱ्या महेंद्र आणि सुधाची हि गोष्ट इथूनच भूतकाळात नेते आपल्याला. दोघांच्याही मनांत खूप काही आहे सांगायला. ती अबोल तगमग त्या संपूर्ण वातावरणांत भरून उरलीए. आयुष्यात दोघे बरेच पुढे निघून गेलेत, लग्न होऊन वेगळे झालेत, पण तरीही एकमेकांच्या आठवणींमध्ये अजूनही सोबत आहेत.

वेटिंग रूम मधल्या महेंद्र आणि सुधाच्या संभाषणातून आपण त्यांच्या गोष्टीकडे वळतो. "आप यहाँ कैसे ?" या तिच्या प्रश्नाला "दार्जिलिंग कैम्पेन के लिए गया था वापस जा रहा हूँ, घर " असं उत्तर देतो. यावर ती विचारते , "घर..  वहीं, वही रहते है आप" यावर,"हाँ वही, वही शेहेर है, वही गली है,वही घर, सबकुछss ... सबकुछ वही तो नहीं है, लेकिन है वही उसी जग़ह"... असं जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्यालाही अस्वस्थ करतो.

फ्लॅशबॅक मध्ये महेंद्र आणि सुधाच्या या गोष्टीमधल्या मायाची ओळख होते. आरशावर तिने महेंद्र करता लिहिलेल्या निरोपातून ती प्रथम भेटते आपल्याला." बिना बताये तुम जाते हो, जाकर बताऊ कैसे लगता है ?" आणि नंतर तिने लिहिलेल्या चिट्ठीतून "चलते चलते मेरा साया कभी कभी यूँ करता है, जमीं से उठकर यूँ हात पकड़कर केहेता है, अब की बार मै आगे आगे चलता हूँ और तू मेरा पीछा करके देख जरा क्या होता है"... तेव्हा माया नक्की काय आहे हे कुतूहल वाढतं. तिची मैत्रीण जेव्हा, "ढूँढने से नहीं मिलेगी, वो चीज ही कुछ ऐसी है'.. असं तिच्याबद्दल म्हणते तेव्हा समजतं माया नक्की काय आहे. ती बेधडक आहे , बिनधास्त आहे पण तरीही हळवी आहे, महेंनवर जिवापाड प्रेम करणारी आहे !

सुधा आणि महेंद्रच लग्न झाल्यावर सुधाला घरामध्ये सतत जाणवणारं मायाच अस्थित्व अतिशय अस्वस्थ करतं.  महेंद्र तिची समजुत घालतो. "बुरा मत मानो सुधा मै जानता हूँ माया बहोत ज्यादा बसी हुई थी इस घर मै, अब हर जगह से तो निकाल दिया है उसे, अब किसी कोने कुदरे मे बच गई हो, तो वहाँ से भी हट जाएगी," त्यावेळी तिचा बांध फुटतो, "सबकुछ ही बटा हुआ लग रहा है इस घर मैं।  जिस चीज को भी छूने जाती हूँ लगता है किसी और की चीज छू रही हूँ, पूरापूरा अपना कुछ भी नहीं लगता यहाँ।" ..पण नंतर हिच सुधा कपाटामध्ये दागिन्यांच्या डब्यांतले आपले दागिने काढून तेथे मायाची पत्रं ठेवते. "मैने अपने जेवर निकालकर आपके रख दिये ".. तेव्हा मात्र डोळ्यांत टचकन पाणी आल्याशिवाय राहात नाही.

महेंद्र प्रामाणिक आहे. लग्नाच्या आधी सुधाला मायाबद्दल सर्व काही सांगितलंय त्यानी पण त्याला थोडा वेळ हवा आहे, जे पसरलय ते सावरायला. तो जितका प्रयत्न करून माया पासून दूर जावू बघतोय तितकंच ते त्याच्यासाठी अवघड होत जातंय. तो सुधाची समजुत काढतो , "मै माया से प्यार करता था ये सच है और असे भूलने को कोशिश कर रहा हूँ ये सही है ", आणि तिला जाणीव पण करून देतो, 'मुझसे जादा वो तुम्हे याद रेहेती है' ...

महेंन वर निर्व्याज प्रेम करणारी माया. "मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है.. सावन के कुछ  भिगे भिगे दिन रक्खे है और मेरे एक खत मै लिपटी रात पडी है'..  अस लिहून तिच्या किती आठवणी मागे राहिल्या आहेत हे महेंनला सांगताना '११६ चाँद कि राते और एक तुम्हारे कांधे का तील , गिली मेहेंदी कि खुशबू, झूठ मूठ के शिकवे कूछ, झूठ मूठ के वादे सब', तू का पाठवले नाहीस हि गोड तक्रार सुद्धा करते. महेंन आणि मायाच हे नातं या गाण्यामधून अलगत उलगडतं. एकमेकांपासून दूर जाणं सुद्धा इतक्या रोमँटिक शब्दांत सांगता येतं हि जादुई कमाल हे गाणं करतं !

नात्यांचा हा हळुवार उलगडणारा पदर बघतांना आपण हरवून जातो. दुसरीकडे महेंद्र आणि सुधा यांच लग्नानंतर नव्यानं बहरणारं नातं "कतरा कतरा मिलती है कतरा कतरा जिने दो , जिंदगी है, बेहेने दो, प्यासी हूँ मै प्यासी रेहेने दो '... या गाण्यातून आपल्या पर्यंत पोहोचतं. सुधाचं महेंद्र करता व्याकुळ होणं "खाली हात शाम आई है खाली हात जाएगी, आज भी न आया कोई खाली लौट जाएगी".. संध्याकाळची कातरता आणि तिच्या मनाची तगमग यांची विलक्षण गुंफण आहे या गाण्यांत.

हा संपूर्ण सिनेमा म्हणजे गोष्ट आहे वेटिंग रूम मधल्या त्या रात्रीची, जी रात्र आठवणीत भिजून जाते आणि भिजवूनही. सकाळची चाहूल लागलीए, पाऊस थांबलाय, पाघोळ्यांवरून थेंब थेंब पडणाऱ्या पाण्याचा आवाज सगळं मळभ दूर झालंय याची ग्वाही देतोय. आपण मनातलं सगळं काही सांगितलं, आपणच बोलत राहिलो याची महेंद्रला जाणीव होते. "सारी रात मै ही केहता रहा तुमने कुछ नहीं कहा', या महेंद्रच्या वाक्यावर  "मेरे पास तो केहेने को था ही क्या", हे रितेपण सुधा बोलून दाखवते. मायाने केलेला आत्महत्येचा प्रयत्न सुधाला सांगताना महेंद्र कबूल करतो, "शायद मुझे तुम्हे सब कुछ बताना चाहिए था मगर मुझे समझ मे नहीं आ रहा था, डर गया था मै ,समझने की कोशिश कर ही रहा था तो वो भाग गई, तुम भी जा चुकी थी, उस दिन पेहेली बार दिल का दौरा पड़ा, तुम्हारा जाना बुरा लगा"...

समज गैरसमज यांच मळभ आता कुठे दूर होतंय. हातातून ते क्षण तर निसटून गेलेत पण नियतीने जे समोर आणलंय त्या क्षणांशी तरी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न आता हे दोघे करतायेत.सुधा त्याला सांगते, तिच्या मनातलं जे तिने त्याच्या आयुष्यातून निघून जातांना जाणलं होतं आणि पत्रातूनही जे व्यक्त केलं होतं. "सच तो ये है की आपकी ईमानदारी ने मोह लिया था, पेहेली बार जब हात छुड़ाने आये थे और दूसरी बार जब हात माँगने। माया इस दुनिया से बहोत अलग है, मै बहोत ही साधारण औरत हूँ, जिद्दी हूँ, जल भी जाती हूँ, पिघल भी जाती हूँ। दादू को मैने समझा दिया है।  आप माया से शादी कर लीजिये।  मै अपनी मरजी से जा रही हूँ।".. आपण या दोघांच्या मध्ये आलो हि सल तिला त्रास देते आणि म्हणूनच ती तो निर्णय घेते, निघून जाते.

"माया कैसी है  ?" या तिच्या प्रश्नाने महेंद्र कोलमडून जातो, एका अपघातात माया जाते हे सांगताना भावुक होतो. त्याला सुधाची माफी मागायची आहे. ' जो हुआ उसे कुछ बदला तो नहीं जा सकता, पछता सकता है माफी मांग सकता है'.. इतकं बोलून सुधाला पुढे काही तो विचारणार इतक्यात अनपेक्षित पणे येणारा तिचा नवरा पाहून महेंद्र परत एकदा नियती समोर हार मानतो. जाताना सुधा म्हणते, "मै चलूँ , पिछली बार बिना पूछे चली गई थी इस बार इजाजत दे दो,  पिछले साल मैंने शादी कर ली".. इथे इजाजत या शब्दाचा अर्थ खऱ्या अर्थाने स्पष्ट होतो.
"जीती रहो सुखी रहो खुश रहो.. बहोत अच्छे पति मिले है तुम्हे , बहोत प्यार करते है,  वो सब जो मै नहीं कर सका भगवान करे तुम्हे भरपूर मिले, हो सके तो एक बार मन से माफ़ कर दो "... सुधा त्याचा निरोप घेऊन निघणार इतक्यात तिचा नवरा येतो " अरे, पिछे क्या रेह गया भाई', आणि समजून जातॊ सुधा नक्की काय मागे सोडून त्याच्या सोबत निघालीए ..

सुधा तिच्या नवऱ्याबरोबर जाते आणि महेंद्र सुद्धा त्या वेटिंग रूम च्या बाहेर येतो.आजवर जीची वाट तो आतुरतेने पाहात होता ते वाट बघणंच आता संपून जातं. याच वळणावर महेंद्र सुधा आणि माया यांची हि हळूवार गोष्ट आपल्या मनांत खोल रुतून बसते..


-कविता सहस्रबुद्धे




#५०# गीत रामायण .. गदिमा आणि बाबूजी

'गीत रामायण’ हा एक चमत्कार आहे, संगीत आणि शब्दांचं सुंदर प्रारब्ध आहे ! चांगल्या अर्थानं असं म्हणावं लागेल की बाबुजी आणि गदिमांना झपाटलं होतं. ते झपाटणं कलात्मकेच्या अत्युच्च पातळीवर गेलं नसतं, तर ‘गीत रामायण’ झालंच नसतं. पन्नासहून अधिक गाणी, प्रसंगानुरूप, अर्थानुरूप करणं हे सोपं काम नाहीच. त्यात विषय आहे, तो काळ आहे, त्या काळाला अनुरूप असे शब्द निवडण्याचं कसब आहे आणि संपूर्ण कथेला प्रवाहीपण देताना सुश्राव्य चाली देणं ही परीक्षाही आहे. बरं हे व्यक्त करायला केवळ ध्वनी हे एकच माध्यम आहे. हे अवघड होतं. म्हणूनच ते दैवी आहे. यांत कौतुक आहे आकाशवाणी सारख्या माध्यमाचं सुद्धा, त्या काळी हे धाडस केलं आणि हा चमत्कार श्रोत्यांपर्यंत पोहोचवला.

साधारण 1953 साली पुणे आकाशवाणी हे केद्र सुरु झाले.श्री सीताकांत लाड नावाचे गदिमांचे मित्र कार्यक्रम नियोजक म्हणून पुण्याला आले होते नभोवाणीसाठी काहीतरी सातत्याने लिहावे, असा त्यांनी गदिमांना खूप आग्रह केला आणि एका महाकाव्याचा जन्म झाला.रामायणात वाल्मीकींनी 28000 श्लोकांत रामकथा लिहिली आहे.गदिमांनी तीच रामकथा एकूण 56 गीतांत शब्दबध्द केली आहे.गीत रामायण हा एकाच कवीने वर्षभर रचलेला, एकाच संगीतकाराने संगीतबद्ध केलेला, वर्षभर अखंडितपणे चाललेला आकाशवाणीच्या इतिहासातील एकमेव, अभूतपूर्व असा संगीत कार्यक्रम ठरला.1 एप्रिल 1955 ते 19 एप्रिल 1956 पर्यंत तो पुणे आकाशवाणीने प्रसारित केला.

गदिमा आणि बाबूजींच्या गाण्याविषयीच्या आठवणींमध्ये आज ‘सेतू बांधा रे सागरी’ या गीतरामायणातील एका गाण्याची खास आठवण…

आकाशवाणीवर जेव्हा गीतरामायणाचा कार्यक्रम सुरू झाला, तेव्हा रेडिओच्या इतिहासात न भूतो न भविष्यती, असा पत्रांचा पाऊस पडला. यावेळची ‘सेतू बांधा रे सागरी’ या गाण्याची विशेष आठवण आहे. या गाण्यासाठी जास्त वादकांची गरज होती आणि आकाशवाणीचा स्टुडिओ फार लहान होता. त्यामुळे या गाण्याचं रेकॉर्डिंग करत असताना वादकांना स्टुडिओचं दार उघडं ठेवून बाहेरच्या पॅसेजमध्ये बसवलं होतं. बाबूजींनी तालवाद्यांत ढील वगैरे सारखी परंपरागत वाद्य हवी होती, पण ती उपलब्ध नव्हती. तेव्हा त्यांनी साईड ड्रम, बेस ड्रम या पाश्चिमात्य वाद्यांचा वापर केला, पण त्यातून निर्माण होणार संगीत हे पारंपरिक (भारतीय ) वाटेल याकडे लक्ष दिल्याने म्युझिकचा उत्तम बॅलन्स साधला गेला आणि जन्मलं एक अप्रतिम संगीत !!!!
#४९# पंचम जादू 

सचिनदा आणि मीरादेव बर्मन यांचा हा सुपुत्र….आईच्या कुशीत संगीताची ओळख झालेली. संगीत त्याच्या रक्तात भिनलं होते. ब्रजेश विश्वास यांच्याकडे तबला तर उस्ताद अली अकबर खान यांच्याकडे सरोदचे शिक्षण त्यांनी घेतले. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी 'ए मेरी टोपी पलट के आ' ही धून त्यांनी बनवली जी सचिनदांनी 'फंटुश' चित्रपटात वापरली… 'सोलहवा साल' या चित्रपटातील “है अपना दिल तो आवारा” आणि दोस्ती मधील ”जानेवालो जरा" या गीतातील माऊथ ऑर्गन त्यांनी वाजविला आहे…खरं तर 'प्यारेलाल' आणि 'राहुलदेव बर्मन' अशी एक टीम झाली असती पण सचिनदाना ते मान्य नव्हते…आपल्या मुलाने स्वतंत्र संगीत द्यावे अशी त्यांची इच्छा होती…!!!

पाश्चिमात्य वाद्यमेळ आणि भारतीय संगीत यांचे फ्युजन करून नवनिर्मिती करण्याचे पंचमदांचे स्वप्न होते…१९७०च्या दशकात त्यांनी हिंदी चित्रपटात क्रांती घडविली.अनवट चाली,अनोखा वाद्यवृंद, नाविन्याचा ध्यास यांच्या मिश्रणाने पंचमच्या रचना सजल्या आणि लोकसंगीत, शास्त्रीय संगीत आणि पाश्चात्य वाद्यवृंद यात आपले सृजन मिसळून त्याने अलौकिक संगीत निर्मिले आणि त्या ठेक्याने, संगीताने रसिकांना भुरळ घातली.

'अमर प्रेम' हा त्यांच्या संगीताने अमर झालेला चित्रपट.  “रैना बीत जाये” अवीट गोडी लाभलेले गाणे .. “कुछ तो लोग कहेंगे” ही रचनाही अविस्मरणीय अशीच …!! याच्या मागोमाग  खुशबू आणि इजाजत हे त्यांच्या टॉप लिस्ट मधल्या सिनेमांमध्ये वरची बाजी मारणारे चित्रपट.. 

नेहमीच गाण्यात काहीतरी वेगळे करून दाखविण्याची उर्मी पंचम याना स्वस्थ बसू देत नसे. चित्रपटात एकच गाणे कथेच्या मागणीनुसार नायक,नायिका दोघांच्या तोंडी असते ,पण “कुदरत” या चित्रपटात त्यांनी “किशोर कुमार” ला दिलेले “हमे तुमसे प्यार कितना’ हे गाणे   साध्या ढंगात आहे , तर पूर्ण शास्त्रीय ढंगाने हेच गाणे “बेगम परवीन सुलताना” यांच्या कडूनही त्यांनी गाऊन घेतले आहे , जे आजही चिरतरुण आहे …!

एखाद्या गाण्याच्या बाबतीत तो किती वेगळा विचार करायचा ह्याचे किस्से अनेक आहेत- खुशबू ह्या गुलझारांच्या फिल्मच्या गाण्याचं रेकॉर्डिंग सुरु होतं.  गाणं होतं 'ओ माझी रे अपना किनारा'... अचानक पंचमने रेकॉर्डिंग थांबवलं आणि सोडा water च्या बाटल्या मागवल्या. स्टुडिओत खसखस पिकली की बाबूमोशायचा मूड आज वेगळ्याच गोष्टींचा आहे. पंचमने त्या बाटल्या आल्यावर रिकाम्या केल्या आणि त्या कमी जास्त पाण्याने भरल्या. सगळ्यांची उत्कंठता शिगेला पोचली आणि एकाच वेळी त्याने दोन्ही बाटल्यांत हवा फूंकून पाण्याच्या लाटेचा भास निर्माण केला, 'ओ माझी रे अपना किनारा' हे गाणं ऐकताना जो लाटांचा आवाज येतो तो आवाज असा निर्माण झाला आहे ... आता परत एकदा नक्की ऐका ते गाणं !
#४८# गीतकार योगेश

कहाँ तक ये मन को अंधेरे छलेंगे..
उदासी भरे दिन कभी तो ढलेंगे.. 

'बातों बातों में’ या चित्रपटामधील हे गीत, चाळीशी गाठूनही आजही आपल्या मनांत रुंजी घालणारं...

"कइ बार यूँ ही देखा है
ये जो मन की सीमा रेखा है
मन तोडने लगता है
अंजानी आस के पिछे"...
साध्या उत्कट शब्दांमधून व्यक्त होणारे गहन अर्थ हे त्यांच्या गाण्यांची खासियत.

रजनीगंधा फुल तुम्हारे, बडी सुनी सुनी है, जिंदगी कैसी है पहेली, कही दूर जब दिन ढल जाए, मैने कहा फुलो से अशी एक से एक बेहतरीन गाणी लिहिली योगेश यांनी. 'ते जणू मोरपीस घेऊन गीत लिहीतं', असं म्हटलं जायचं.

त्यांच्या 'रिमझिम गिरे सावन' या गाण्याची एक आठवण..

हे गीतकार योगेश यांनी लिहिलेलं एकचं गीत किशोर कुमार व लता मंगेशकर यांच्या आवाजात वेगवेगळ रेकॉर्ड होणार होते. किशोर कुमार यांच्या आवाजात ते गाणं रेकॉर्ड झालं आणि मग लताजींना बोलावण्यात आलं.जेव्हा त्या रेकॉर्डिंग स्टुडियोमध्ये आल्या तेव्हा त्यांनी या गाण्याचे शब्द ऐकून ते न आवडल्याने गाणे पुन्हा लिहायला गीतकार योगेश यांना सांगितले.त्यांच्यापेक्षा खूप ज्युनिअर असलेल्या गीतकार योगेश यांना हे अनपेक्षित होतं.. पण तरीही त्यांनी लगेच समोरच असलेल्या एका हॉटेलात जाऊन थोड्या वेळात आधीच्याच 'रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाये मन, भिगे आज इस मौसम में लगी कैसी ये अगन', या मुखड्यावर वेगळे अंतरा म्हणजे कड्व्यांसाठी नवे शब्द लिहून आणले. ते लताजींना आवडले आणि लगेच या गाण्याचे रेकॉर्डिंग पार पडले.. दोन्ही गाण्यांचे शब्द अप्रतिम तर आहेतच आणि दोघांनी ते गायलंय सुद्धा अतिशय दैवी आवाजात...  

चला तर मग आज नक्की ऐका एकच मुखडा असलेली ही दोन्ही अप्रतिम गाणी, गीतकार योगेश यांच्यासाठी .....
#४६# लग जा गले..एक आठवण, राजा मेहंदी अली खान

गीतकार राजा मेहंदी अली खान, फक्त ३८ वर्षे जगलेल्या या माणसानं खंडीभर गाणी लिहिली नाहीत पण जी लिहिली ती अजरामर होतील अशीच लिहिली... अगर मुझ से मुहब्बत हैं, आप की नजरोने समझा प्यार के काबिल मुझे, मेरा सुंदर सपना बीत गया, तू जहाँ जहाँ चलेगा मेरा साया साथ होगा, तेरे बीन सावन कैसे बिता, आप युंही अगर हमसे मिलते रहे, नयना बरसे रिमझिम, आप के पहलू में आकर रो दिये, तुम बिन जीवन कैसे बिता पुछो मेरे दिल से... 

'वो कौन थी' हा चित्रपट १९६४ मध्ये रिलीज झाला आणि दोन वर्षांतच १९६६ मध्ये या चित्रपटाचे गीतकार राजा मेहंदी अली खान यांचं निधन झालं. 'वो कौन थी' साठी लिहिलेलं 'लग जा गले..' हे अप्रतिम गाणं दिग्दर्शक राज खोसला यांनी आधी रिजेक्ट केलं होतं. हे गाणं नाकारल्याचं राजाजींना विलक्षण दुःख झालं जे त्यांनी संगीतकार मदन मोहन यांना बोलून दाखवलं. इतकं चांगलं अर्थपूर्ण गाणं नाकारल्यामुळे मदनजींनाही वाईट वाटलं व त्यांनी चित्रपटाचा नायक असलेल्या मनोजकुमार व राज खोसला यांना ते गाणं परत एकदा ऐकण्याचा आग्रह केला. 
दुसऱ्यांदा ते गाणं ऐकताच राज खोसला यांना ते गाणं अतिशय आवडलं व ते गाणं आपण आधी रिजेक्ट केल्याचं खुप वाईटही वाटलं. शेवटी ते गाणं चित्रपटांत घ्यायचं ठरलं. सिनेमा सुपरहिट झाला आणि ते गाणंही.. 

या चित्रपटातली सगळीच गाणी हिट झाली तरीही आपल्या ओठांवर येणारं गीत म्हणजे " लग जा गले के फिर ये हसी रात हो ना हो ''.. कारण काही गाणी मनावर कोरली जातात आणि हे त्यापैकीच एक !  या गाण्याचे शब्द, अर्थ खोलवर स्पर्शून जातो. हातून काहीतरी निसटतंय हि जाणीव एक आर्त आपल्यापर्यंत पोहचवते आणि जेव्हा या गाण्याच्या मागची पार्श्वभूमी समजते तेव्हा मात्र हे गाणं ऐकून डोळे पाणावतात .. 

हे गाणं म्हणजे गीतकार राजा मेहंदी अली खान आणि त्यांच्या बायकोमधला संवाद आहे.  ताहिरा हे राजा मेहंदी अली खान यांच्या पत्नीचं नाव. हे दोघंही उच्चशिक्षित घरातले होते. फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये न जाता ते भारतातच राहिले. त्यांना मुलबाळ नव्हतं त्यामुळे ताहिरा दुःखी असायच्या. राजासाहेब त्याचा उल्लेख कधी करत नसत. आपल्या बायकोवर त्यांच अतोनात प्रेम होतं. ताहिरांनी अपत्यप्राप्तीसाठी उपचार आणि चाचण्या सुरु केल्या, पण त्या दरम्यान एका परिचित डॉक्टरांनी त्यांना सावध केलं की त्यांना कर्करोग असू शकतो. या बातमीनं ताहिरा डगमगल्या नाहीत पण राजा मेहंदी अली खान मात्र पुरते कोसळले. ताहिराला तसं त्यांनी कधी दाखवलं नाही पण आतून ते खूप खचत गेले आणि त्यांच्या गीतांमधून तो दर्द झळकत राहिला. त्यांचा स्वभाव हळवा होता. पत्नीचा विरह ही कल्पनाच त्यांना सहन झाली नाही आणि ते आजारी पडले, त्यांनी हाय खाल्ली. पुढे काही वर्षात त्यांचे देहावसान झाले.  आश्चर्याची गोष्ट अशी की ताहिरांना कोणताच आजार नव्हता व त्या बऱ्याच वर्ष जगल्या. 

राजा मेहंदी अली खान यांच्या नितळ भावना व्यक्त करणारं 'लग जा गले के फिर ये हसी रात हो ना हो.. ' हे गीत त्यांनी आपल्या पत्नीचं आजारपण कळल्यानंतर लिहिलेलं गीत आहे ! राजाजी आणि ताहिरा यांच्याप्रेमाची गोष्ट उलगडणारं हे गीत आता परत एकदा नक्की ऐका !!
#४७# साधना 

वर्ष होतं १९५४, साधना १५ वर्षांची असतांना एका डान्स स्कूलमध्ये जात होती. तिथे एकदा सत्यनारायण नावाचे एक सहाय्यक नृत्य दिग्दर्शक आले. त्यांनी तिथल्या विद्यार्थ्यांच्या डान्स स्टेप्स बघितल्या आणि सांगितले की सुप्रसिद्ध अभिनेते - निर्माते राजकपूरना त्यांच्या आगामी चित्रपटांत काही गाण्यांवर समूह नृत्यांसाठी काही नृत्यकुशल मुलंमुली हवी आहेत. राजजींच्या सिनेमात संधी मिळणे ही तेंव्हा कारकिर्दीची सोनेरी संधी समजली जात होती. काही मुलींची अंतिम निवड झाली त्यात साधनाचा समावेश होता. सिनेमातल्या एका संपूर्ण गाण्यातील समूह नृत्यासाठी झालेल्या निवडीमुळे तिला आकाश ठेंगणे झाले. 

सिनेमातील त्या गाण्याच्या फायनल टेकपूर्वी खुप दिवस रिहर्सल झाली, साधना तिथल्या वातावरणावर रुळली. तिला तो माहोल खूप आवडला. स्वप्नात पाहिलेले दिग्गज लोक समोर होते, रोलिंग कॅमेरासमोर नाचतानाचे थ्रील तिला खूपच भावले. थोड्याच दिवसांत त्या गाण्याचे चित्रीकरण संपले.  साधना ज्या गाण्यात एक्स्ट्राच्या रोलमध्ये समुहात नाचली होती ते गाणे होते 'रमैया वस्तावैया,  मैने दिल तुझको दिया .....'

साधनाला सिनेमा प्रदर्शित होण्याच्या दिवसाचे वेध लागले. अखेर तो दिवस जवळ आला.तो सिनेमा प्रदर्शित होतोय याचा साधनाला फार आनंद झाला. प्रीमियरशोच्या वेळेस एक्स्ट्रा कलाकार आणि समूहनृत्यातील कलाकार व सहायक तंत्रज्ञ या लोकांना बोलावले जात नसे,  त्यामुळे साधनाने स्वतःच्या खर्चाने आपल्या सर्व मैत्रिणींना सिनेमा पाहण्यास नेले. आपण पडद्यावर कसे दिसतो याची तिलाही उत्सुकता होती. सिनेमा सुरु झाला, ते गाणंही सुरु झालं.....सर्व कडवी संपली...गाणंही संपलं...दर कडव्याला, ओळीला साधना तिच्या मैत्रीणीना सांगायची, 'इथे मी आहे बरं का ...'.तिच्या सर्व मैत्रिणी टक लावून पडद्याकडे पहायच्या पण गाणे संपले तरी पडद्यावर साधना काही दिसलीच नाही ! तेव्हा तिला light  camera action च्या पुढे editing पण असतं हे समजलं !!

सिनेमा संपला.. मैत्रिणींचे प्रश्न ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आले. तिच्या डबडबलेल्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहायला लागल्यावर मात्र तिच्या मैत्रिणीनी तिची समजूत घातली. रडवेली झालेली साधना हिरमुसल्या चेहऱ्याने घरी गेली अन हमसून हमसून रडली. तिने घरी सर्व हकीकत सांगितली. सगळ्यांनी तिला सिनेमाचा नाद सोडून द्यायला सांगितले पण त्याच दिवशी तिने निश्चय केला की एक ना एक दिवस आपण राजकपूर सोबत सिनेमात काम करायचंच !

काळ पुढे निघून गेला. साधनाने बॉलीवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आणि १९६४ मध्ये 'दुल्हादुल्हन' चित्रपटांत तिने हिरॉईन म्हणून काम केलं आणि ते ही चक्क राजकपूर सोबत !

बरोबर दहा वर्षांनी, राजकपूर सोबत काम करण्याचं तिचं ते गोड स्वप्न पूर्ण झालं !!! 
#४५# मेहबूबा मेहबूबा... 

'शोले' चित्रपटाची आठवण काढताच अनेक गोष्टी डोळयासमोर फ्लॅश होतात त्यातील एक म्हणजे मेहबुबा मेहबुबा हे गाणं.. या गाण्याची गोष्ट मोठी रंजक आहे. 

हेलनवर चित्रित केलेलं 'मेहबूबा मेहबूबा' हे अप्रतिम गाणं अफाट गाजलं. आरडींना हे गाणं आधी आशाजींकडून प्लेबॅक करून हवं होतं. आशाताईंनी या गाण्यासाठी होकारही दिला पण आरडींची एक अट होती, कि 'हे गाणं पन्नाशीत पोहोचलेल्या जिप्सी स्त्रीचा आवाज जसा उतरलेला असतो तशा काहीशा भसाडया आवाजात प्लेबॅक करून हवं' ही अट आरडींनी घातली होती. आशाजींना यावर निर्णय घ्यायला वेळ लागला कारण अशा स्वरात गाणं म्हटल्याने वोकल कॉर्डसना ताण पडू शकतो शिवाय त्यामुळे आवाज बसला तर प्लेबॅक सिंगींगच्या वेळापत्रकातील इतर गाण्यांवर परिणाम होऊ शकतो म्हणून त्यांनी विचारपूर्वक नकार दिला. आशाजींनी नकार दिल्यावर आरडी अगदी चकित झाले होते कारण आशाजी आणि हेलन असं कॉम्बिनेशन गृहीत धरून त्या हिशोबाने ते गाणं त्यांनी लिहून घेतलं होतं. आरडींनी आशाजींची मनधरणी करून पाहिली पण काही फरक पडला नाही.

दोन तीन दिवस तसेच गेले. चौथ्या दिवशी त्यांचं आनंद बक्षींशी बोलणं झालं. 'मेहबूबा मेहबूबा' बक्षींनी लिहिलं होतं. आता आशाजींनी नकार दिल्यावर त्यात काही सुधारणा करून गाण्याचा मतितार्थ आणि ट्यून तीच ठेवून त्यांनी बक्षींकडे हेच गाणं मेल प्लेबॅकसाठी लिहून मागितलं. एकाच बैठकीत आनंद बक्षींनी गाणं लिहून दिलं आणि विचारलं की, " हेलनजी नही है क्या अब गाने मै ?" आरडींनी सगळी कथा ऐकवली त्या सरशी आनंद बक्षींनी विचारलं की, "आता कोण गाणार आहे हे गाणं ? " आरडी काही क्षण गप्प राहिले आणि उत्तरले "मीच गाणार आहे !" चकित होण्याची वेळ आता आनंद बक्षींची होती. गाणं हातात पडल्यावर ही गोष्ट आरडींनी जीपी सिप्पींच्या कानावर घातली. त्यांनी एकदा आरडींकडे वरपासून खालपर्यंत पाहिलं आणि घशाला हात लावत विचारलं, "ये काम करेगा क्या ?" आरडींनी उत्तर दिले "गाना तो मै ही गाऊंगा लेकीन आवाज मेरी नही होगी !" चकित होण्याची वेळ आता सिप्पींची होती. आरडींनी त्यांना समजावून सांगितले की मी चाळीशी पार केलेल्या एका भसाडया आवाजाच्या जिप्सी पुरुषाच्या स्वरात हे गाणं गाणार आहे, तो आवाज माझा आहे असं कोणालाच वाटणार नाही... " सिप्पींनी सांगितलं की, "तू जे काही करशील ते विचारपूर्वकच करशील याची मला खात्री आहे."

आणि हेलनवर चित्रित केलेलं 'मेहबूबा मेहबूबा' हे अप्रतिम गाणं अफाट गाजलं , लोकप्रिय झालं !!!!
#४४# नादिरा

हिंदी चित्रपटातील एके काळची आघाडीची साहाय्यक अभिनेत्री नादिरा ही मूळची बगदादची. फरहात इझिकेल नादिरा हिचा जन्म १९३२ साली बगदादमध्ये झाला. फरहात ही फ्लोरेन्स या नावाने अधिक ओळखली गेली. ‘मुड मुड के ना देख मुड मुड के गर्ल’ या लोकप्रिय नावाने ओळखल्या गेलेल्या नादिराने एकूण ६३ हिंदी चित्रपटांत भूमिका करून १९५० ते १९६० हे दशक गाजविलं. ज्यू कुटुंबात जन्मलेली ही मुलगी दिग्दर्शक मेहबूब खान यांची पत्नी सरदार बेगम हिची मत्रीण होती. तिच्याच आग्रहामुळे नादिरा मुंबईत वयाच्या १९व्या वर्षी दाखल झाली आणि मेहबूब खानांनी त्यांच्या ‘आन’ या चित्रपटात तिला साहाय्यक अभिनेत्रीची भूमिका दिली. ‘आन’मधील तिच्या भूमिकेनंतर तिच्यावर साहाय्यक खलनायिकेचा शिक्का बसला. ‘आन’, ‘श्री ४२०’, ‘पाकिजा’, ‘दिल अपना प्रीत पराई’, ‘ज्यूली’, ‘सागर’ या चित्रपटांतील तिच्या भूमिका अविस्मरणीय झाल्या. यापकी ‘श्री ४२०’, ‘पाकिजा’, ‘ज्यूली’ या चित्रपटांतील तिच्या भूमिकांमुळे तिला सर्वोत्तम साहाय्यक अभिनेत्रीचे फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. श्री ४२० मधील तिच्या ‘मुड मुड के ना देख मुड मुड के’ या गाण्याने आणि ‘ज्यूली’तील मार्गारेट ऊर्फ मॅगीच्या भुमिकेतून ती विशेष लक्षांत राहिली.. २००० साली प्रदर्शित झालेला ‘जोश’ हा नादिराचा अखेरचा चित्रपट. दोन वेळा लग्न करून घटस्फोट झालेल्या नादिराचे मुंबईतील सर्व नातेवाईक इस्रायलमध्ये स्थायिक झाल्याने म्हातारपणी ती एकटी होती. विविध विषयांच्या वाचनाची आवड असलेल्या नादिराच्या खासगी ग्रंथसंग्रहात शेक्सपियर, विवेकानंद, हिटलर,  ज्युडाईझम, दुसरे विश्वयुद्ध आणि तत्त्वज्ञानविषयक विपुल पुस्तके होती.हिंदी चित्रपटसृष्टीत त्या काळाच्या मानाने चांगला पैसा कमावलेली नादिरा ही स्वत:कडे रोल्सराइस असलेली त्या काळातील पहिली अभिनेत्री  !!
#४३# तुम इतना जो मुस्कुरा रहे हो .... 

शबानाच्या जन्मानंतर कैफी आजमी यांच्या पत्नी शौकत आजमी यांनी पृथ्वी थिएटरमध्ये अभिनयाची नोकरी केली. पृथ्वीराज कपूर यांनी रिहर्सलच्या वेळी शबानाच्या देखरेखीसाठी एका आयाची व्यवस्था केली. एकदा शौकत पृथ्वी थिएटरसोबत टूरवर जात होत्या आणि त्यांनी कैफी साहेबांना काही पैशांच्या बंदोबस्ताची विनंती केली. रेल्वे चालू झाल्यावर कैफी साहेबांनी त्यांच्या हातावर तीस रुपये ठेवले जी त्या काळात मोठी रक्कम होती. शौकत आश्चर्यचकित झाल्या कि एवढे पैसे त्यांनी कुठून आणले. टूरवरून परतल्यानंतर त्यांना कळाले की, कैफींनी पृथ्वीराज कपूर यांच्याकडून शौकतच्या पगाराची आधीच उचल केली होती. कैफींनी पैसे कोठून आणले हे सांगताच शौकतजींच्या चेहऱ्यावर हलकं स्मित उमटलं. मात्र त्याच वेळी दोघांचे डोळे निमिषार्धासाठी पाणावले. त्या वेळी ते दोघेही आर्थिक अडचणी हसत खेळत झेलत होतेच पण आपल्या पत्नीचेच पैसे उचल घेऊन तिलाच हातखर्चासाठी द्यावे लागले हे सांगतांना कैफ़ी साहेबांना अगतिकता काय आहे हे जाणवलं. 
खरं काय हे सांगितल्यावर पत्नीच्या चेहऱ्यावर उमटलेलं हसू आणि काळजातलं दुःख जे तिच्या डोळ्यांच्या कडा भिजवून गेलं ते विसरू शकले नाहीत. ती बोच, सल मनांत खोलवर रुतून बसली. दुसऱ्या दिवशी कैफीं आजमींनी आपल्या प्रिय पत्नीच्या भावना शब्दबद्ध करत एक नज़्म लिहिली, जी पुढे आपली मुलगी शबाना काम करत असलेल्या 'अर्थ' चित्रपटांत त्यांनी वापरली .....  

'तुम इतना जो मुस्करा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो...'
#४२# डॉक्टर जब्बार पटेल (२)

'सामना’ची कथा, पटकथा आणि संवाद सगळं तेंडुलकरांचं. एक तर सामना त्यांनी थेट पटकथेच्या रूपातच लिहिला होता. सामनाचा दिग्दर्शक म्हणून आलेला अनुभव सांगताना डॉ. जब्बार पटेल सांगतात,"खरं तर सामनाचं सर्व क्रेडिट तेंडुलकरांना; कारण सामना हे मी निवडलेलं कथानक नाही, खरं तर त्यांनीच मला निवडलं. त्याचबरोबर सामनातील प्रमुख कलाकार तेंडुलकरांनीच निवडलेले. तसंच, मी कथानकाला कुठेही वळण दिलेलं नाही; तेंडुलकरांचा त्यामागचा सोशिओ-पोलिटिकल विचार जास्तीत जास्त खोलवर पोहोचवण्याचं काम मला काटेकोरपणे करायचं होतं, इतकंच".. 

आता सर्व काही समोर होतं. पटकथा, कलाकार मग लक्ष दयायचं होतं तांत्रिक गोष्टींकडे. पण सिनेमाच्या तांत्रिक बाबी बारकाव्याने त्यांना त्या वेळी फारशा माहीत नव्हत्या. अशा वेळी समर नखाते हा त्यांचा मित्र त्यांच्या डोळ्यासमोर आला. त्याला त्यांनी सांगितलं की, ‘समर, मला लेन्स फारशा कळत नाहीत आणि शॉट डिव्हिजनचा कॉन्फिडन्स नाही. गड्या, तू मला मदत केली पाहिजेस.’’ ते तयार झाले व ती जबाबदारी त्यांनी प्रेमाने पार पाडली आणि म्हणूनच समर हाच माझा यातला पहिला गुरू असं डॉक्टर जब्बार पटेल आजसुद्धा अभिमानानं सांगतात. 

मग गोष्ट येते या चित्रपटातील संगीत आणि गाण्याची. 

चित्रपटात एका जागी मास्तरांच्या भटकंतीच्या पार्श्वभूमीवर एक गाणं हवं होत. मनासारखं काही जमत नव्हतं. अशातच एके दिवशी दौंडला जाताना रेल्वेस्टेशनवर जब्बार पटेलांना दिवाळी अंक आलेले दिसले. त्यांनी एक अंक घेतला. त्यात आरती प्रभूंची ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ ही कविता त्यांना दिसता क्षणीच आवडली. मग दोन, तीन वेळा ती कविता त्यांनी वाचली आणि चक्क गाडी सोडून दिली... पत्नीला कळवलं,"दोन तासांनी पुढची गाडी आहे, मग येतो." भास्कर चंदावरकरांना फोन केला,'जरा भेटू यांत'.त्यांना पण कविता आवडली. मग लगेच आरती प्रभूंना फोन केला... त्यांना सगळी कथा सांगितली. ते म्हणाले, ‘‘अरे वा! मला चालेल ना, तेंडुलकरांना विचारा आणि करा.’’ असं करून मग ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ हे सामनाचं शीर्षकगीत झालं... 

चित्रपटाच्या मुहूर्ताची तयारी झाली. मुहूर्ताच्या आदल्या दिवशी जब्बार पटेल भालजी पेंढारकर यांच्या (कोल्हापूर) स्टुडिओत गेले. त्यांची ती पहिली भेट. ते म्हणाले, ‘‘तुम्ही घाशीराम केलंय, तुमचं लोक खूप कौतुक करतायत. कोल्हापूरला एक दोनदा येऊन गेलंय तुमचं नाटक, पण पाहायचा योग आलेला नाही, असो. तुमच्या कामाबद्दल मात्र कौतुक ऐकलंय.मी येईन मुहूर्ताला." भालजींचे आभार मानून ते निघणार इतक्यात भालजी पेंढारकर म्हणाले, ‘‘अरे, लताला पण बोलवाना तुमच्या  उद्‌घाटनाला...’’लता (असं) म्हटल्यावर एक क्षण डॉक्टर थांबले , त्यांना कळेना नक्की काय म्हणतायेत ते. इतक्यात त्यांनी लताला आवाज दिला आणि म्हणाले ‘‘अरे, लता आलीय... दोन-तीन दिवस मुक्काम आहे. तिला निमंत्रण दे , ती येईल!’’ आणि साक्षात लता मंगेशकर बाहेर आल्या ! जब्बार पटेलांचा आपल्या डोळयांवर विश्वास बसेना. 

त्यांनी नमस्कार करून परिचय सांगितला त्यावर दीदी म्हणाल्या, ‘‘तुमच्याबद्दल ऐकलंय. बाळ(हृदयनाथ)सांगत असतो... मग त्यांनी दीदींना आमंत्रण दिलं.त्या म्हणाल्या, ‘‘मी येऊन काय करू?’’ तर भालजी बाबा म्हणाले, ‘‘अगं, तू कॅमेरा स्टार्ट कर.’’ दीदी तयार झाल्या. डॉक्टर अचंबित झाले. आपल्या पहिल्या सिनेमाच्या वेळी केवढे योगायोग घडत आहेत, असं त्यांना वाटून गेलं. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे बाबा व लतादीदी आले, मुहूर्त झाला. 

मुहूर्ताच्या दिवशी चित्रीकरण झाल्यावर व्हरांड्यात दीदी चहा पीत बसल्या होत्या. तेव्हा जब्बार पटेल यांनी हिम्मत केली आणि ते तिथे गेले. दीदींना नमस्कार केला. दीदी म्हणाल्या, "मुहूर्त छान झाला.’’ त्यावर ते म्हणाले ‘‘पण एक टेन्शन आहे.’’ त्या म्हणाल्या, ‘‘काय?’’ जब्बार साहेब म्हणाले, "आम्ही जगदीश खेबुडकरांकडून दोन गाणी लिहून घेतलीत. त्यातल्या एका गाण्यासाठी माझ्याकडे तुमच्याशिवाय दुसरा पर्यायच दिसत नाही. फार महत्त्वाचं गाणं आहे ते ’’.. त्या जब्बार पटेलांकडे बघायलाच लागल्या, एक नवखा माणूस गाणं मागतोय.

थोडं थांबून त्या म्हणाल्या, ‘‘बघू, काय गाणं लिहिलंय जगदीश खेबुडकरांनी...?’’ आणि चक्क जब्बार पटेलांनी ते गाणं त्यांना गाऊन दाखवलं. ते गाणं होतं, "सख्या रे, सख्या रेऽ, सख्या रेऽऽ घायाळ मी हरिणी" चाल दिली होती भास्कर चंदावरकर  यांनी. गाणं झालं आणि दीदींनी एक दीर्घ पॉज घेतला व म्हणाल्या, ‘‘जब्बार, मला आवडलंय हे गाणं... तारीख कोणती देता येईल हे बघावं लागेल.’’ त्या एकदम तयार झाल्या आणि जब्बार पटेल लताजींच्या या होकाराने प्रचंड आनंदित झाले.  

पुण्यात आल्यावर या गोष्टीवर कोणाचाच विश्वास बसत नव्हता, ना भास्कर चंदावरकर यांचा ना रामदास फुटाणे यांचा. शिवाय त्यागाण्याच्या मानधनाचं एक वेगळं टेन्शन कारण इकडून तिकडून पैसे गोळा करत सिनेमा बनत होता. 

दीदींनी तारीख दिली. रेकॉर्डिंग ची तयारी झाली. इतक्यात दीदींचा फोन आला. त्या म्हणाल्या, ‘‘आज जरा आवाज बरा नाही... पुन्हा तारीख देते. त्याप्रमाणे करू या...’’ हा फोन ऐकून भास्कर चंदावरकर म्हणाले, ‘‘मी म्हणालो होतो ना की, हे काही खरं नाही?’’ जब्बार पटेलांनी त्यांना समजावलं त्या नक्की गाणं गातील आपल्या चित्रपटासाठी. पुढे त्यांची परत तारीख मिळाली आणि पहिल्याच टेक मध्ये गाणं ओके झालं. तोवर मानधनाबद्दल काहीच बोलणं झालं नव्हतं. जब्बार पटेलांनी त्यांना विचारलं, ‘‘दीदी, आम्हाला मानधन किती घेणार ते सांगा..’’ त्या म्हणाल्या,  ‘‘हा तुमचा पहिलाच सिनेमा आहे. एक गुलाबाचं फूल घेईन मी,’’ सगळे जण आश्चर्यचकित झालो. हि आठवण सांगताना जब्बार पटेल म्हणाले होते, "यानिमित्ताने दीदींच्या मनाचा मोठेपणा सांगितला पाहिजे तो असा की, त्यांनी आजतागायत म्हणजे माझ्या ‘उंबरठा’ सिनेमापर्यंत एक पैसाही मानधन माझ्याकडून घेतलेलं नाही "... 

( क्रमशः)
#४१# डॉक्टर जब्बार पटेल 

डॉक्टरकीसाठी स्टेथास्कोप हाती धरलेल्या डॉ. जब्बार पटेल यांना त्यापेक्षा कॅमेरा अधिक खुणावत होता. त्यामुळे पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण घेतले तरी करीयर मात्र त्यांनी चित्रपट क्षेत्रातच केले. महाविद्यालयीन जिवनात त्यांनी लेखन, दिग्दर्शनात अनेक प्रयोग केले.अनेक एकांकिका, नाटकं बसवली.नाट्य स्पर्धा गाजवल्या.  शिक्षण डॉक्टरकीचं परंतु पिंड हा मुळातच कलावंतांचा. त्याच वेळी विजय तेंडुलकर त्यांच्या आयुष्यात आले. त्यांनी लिहिलेली काही नाटकं त्यांनी वाचली, काही बसवली, तर काहींमध्ये प्रत्यक्ष काम केलं. ‘अशी पाखरे येती’ हे अतिशय तरल नाटक त्यांनी राज्य नाट्यस्पर्धेसाठी केलं आणि ते नाटक खूप गाजलं. त्यानंतर ‘घाशीराम कोतवाल’ हे सुप्रसिद्ध नाटक दिग्दर्शित करण्याची संधी मिळाली. ‘घाशीराम’नं खऱ्या अर्थाने त्या दोघांना जवळ आणलं.

मेडिकलचं शिक्षण पूर्ण झालं आणि डॉक्टर जब्बार पटेल  पत्नीसोबत प्रॅक्टीससाठी पुण्याजवळील दौंड या गावी गेले. ते बालरोगतज्ज्ञ आणि पत्नी स्त्री-रोग तज्ज्ञ. प्रॅक्टिसमध्ये जम बसत होता. तरीही दिवसभर प्रॅक्टिस करून संध्याकाळी ‘घाशीराम’ नाटकाच्या तालमीसाठी ते पुण्यात जवळपास साडेतीन महिने रोज जात होते.. 
असं सगळं सुरू असताना एके दिवशी रामदास फुटाणे त्यांच्याकडे आले व त्यांनी  समोर ‘सामना’ची पटकथा ठेवली आणि म्हणाले, ‘‘आपल्याला ही फिल्म करायचीय.’’ जब्बार म्हणाले, ‘‘अरे मी फिल्म करू शकतो, हे तुला कसं काय वाटलं? मला अजून फिल्मची भाषा व तंत्रही कळत नाही.’’ रामदासजी म्हणाले, ‘‘त्याबाबत तेंडुलकरांशी चर्चा झालीय. त्यांनी तुमचं ‘घाशीराम’ पाहिलंय आणि आवडलंय त्यांना.’’ आपल्यासारख्या अतिशय नवख्या माणसासमोर असा प्रस्ताव आलेला पाहून त्यांना दडपण आलं.

ससूनमध्ये शिकाऊ डॉक्टर म्हणून काम करताना दारिद्र्य जवळून पाहिलं होतं; त्यात दौंडच्या अनुभवानं भर टाकली. चळवळी-आंदोलनं दुरून पण गांभीर्याने पाहिली होती. तरीही, या अनुभवाच्या शिदोरीवर चित्रपट करता येईल, असं त्यांना वाटत नव्हतं; पण चित्रपट करण्याचा मोह मात्र होता !

हि आठवण सांगताना आजही डॉक्टर म्हणतात, "तेंडुलकर नावाच्या माणसाचा मोठेपण इथे दिसतो. ‘सामना’सारखी अत्यंत गंभीर विषयावरची पटकथा त्यांनी चित्रपटातील माझ्यासारख्या नवख्या माणसाच्या हाती विश्वासाने दिली. सामनाच्या यशाचं खरं श्रेय तेंडुलकरांचं आहे. माझा रंगमंचावरून ‘सामना’ पर्यंतचा हा प्रवास तेंडुलकरांच्या सोबतीनेच झाला"... 
स्वयंपाकघर म्हणजे आईचं राज्य.. रुचकर, स्वादिष्ट,चमचमीत, पारंपारिक पदार्थ करण्यात तिचा हात कोणीच धरू शकत नाही मग ती आई माझी असो वा तुमची. ' आई ' या नावातच ती जादू आहे. आपण लहान होतो तेव्हा भूक लागली कि 'काहीतरी खायला दे' हि भुणभुण केली कि आई वाटीत काहीतरी खाऊ द्यायची आणि ती वाटी हातांत घेऊन चेहऱ्यावरचं हसू सांभाळत आपण धूम ठोकायचो. आतां वाटी देणारे आणि घेणारे हात बदलले, विशेषण बदलली, 'काहीतरी' ची जागा 'Yummy' ने घेतली.. मग काय त्यातून डिमांड करणारे 'टिन' असले, अहो म्हणजे टीनएजर हो , मग काय बघायलाच नको. साऊथ इंडियन, नॉर्थ इंडियन आणि महाराष्ट्रीयन या परिघाच्या बाहेर जावंच लागतं. इटालियन, मेक्सिकन, चायनीज अशी सफारी अधूनमधून करावी लागते.

लॉकडाउन, वर्क फ्रॉम होम, झूम Classes अशा वातावरणांत वेगळ्याच ग्रहावर राहायला आल्यासारखं वावरत असतांना मुलांकरता मात्र वाईट वाटतं. कॉलेज, क्लास, मित्र मैत्रिणी, खेळ ,भटकणं ,दंगा मस्ती हे सगळं मिस करतायेत ते, तेच तर जग आहे त्यांच, अहो अभ्यास खूप नंतर येतो आणि हे सगळं एकदा मिळालं ना कि  अभ्यासाकरता आपसूकच टॉनिक मिळतं. पण सध्या मात्र ती शहाण्यासारखी एक जबाबदार भूमिका घरी राहून पार पाडत आहेत तेव्हा वाटतं आपणही आपल्या आईसारखी त्यांच्या मनांत एक 'यम्मी' जागा तयार करावी ..
मग काय 'मौका भी है और दस्तूर भी'.. करूयात मॅक्सिकन tacos ..

स्टफिंग करता दोन वाटी राजमा सात ते आठ तास भिजत ठेवून नंतर कुकरमध्ये छान मऊसर शिजवून घ्यावा. शिजवताना त्यात आवडीनुसार मीठ घालावं. शिजवून झाल्यावर त्याला स्मॅश करून घ्यावं. आमचूर पावडर, जिरा पावडर, मिरपूड, चाट मसाला घालून छान मिक्स करावं. मीठ आपण शिजवताना घातलं होत म्हणून आता लागणार नाही.

मॅक्सिकन साल्सा करता दोन मध्यम आकाराचे टोमॅटो व कांदा चिरून घ्यावेत. दोन मिरच्या बारीक चिरून, थोडी कोथिंबीर, एक चमचा तेल,अर्ध लिंबू , चवीप्रमाणे मीठ व जिरा पावडर असं सर्व साहित्य मिक्सर च्या भांड्यांत टाकुन थोडं ब्लेंड करून घ्यावं, एकदम बारीक नको.

एक ते दीड वाटी दही मलमल च्या कापडात अर्धा तास बांधून ठेवावं, त्यातील पाणी पूर्णपणे निघून गेलं कि बाउल मध्ये काढून घ्यावं.

आता tortilla wraps करता एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मक्याचं पीठ, त्यात थोडं मीठ टाकुन गरम पाण्यात भिजवून घ्यायचं. दहा मिनिटांनी पोळीपेक्षा किंचित जाड पोळी लाटून घ्यावी. गोल वाटीने त्याचे पुरीच्या आकाराचे एकसारखे गोल कापून घ्यावे. ते तव्यावर तेल लावून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यावेत.

इतकी तयारी होत आली कि इतका वेळ स्वयंपाकघरांत आई काय करते आहे हे पाहायला online क्लास संपवून आपला 'टिन friend' आला कि त्याच्या चेहऱ्यावर त्याच्या आवडीची डिश बनते आहे हे पाहून पसरलेला आनंद आपलाच उत्साह अजून वाढवतो. मग काय त्याला मदतीला घेऊन आता सर्विंगची तयारी सुरु करायची.

प्लेट मधे प्रथम tortilla wraps घेऊन मधोमध hung curd लावून त्यावर राजमा वापरून बनवलेलं stuffing घालून त्यावर थोडा मेक्सिकन साल्सा घालावा. त्यावर थोडी मिरपूड, कोथिंबीर घालून वरून आवडीप्रमाणे चीज किसून टाकावं. सगळे wraps असे छान सजून तयार झाले कि फोल्ड करून प्लेट मध्ये सजवून एक फोटो क्लिक करत दुसऱ्या हाताने टेस्ट घेत, " आहाssss ..." म्हणत या डिश सारखीच मुलाबरोबर रंगणारी यम्मी friendship एन्जॉय करावी ....


#४०# साहिर , ग. दी. माडगुळकर आणि पु. ल. देशपांडे

१९७६ साली कराडला साहित्य संमेलन झाले त्याचे मावळते अध्यक्ष होते पु ल.देशपांडे.

त्यावेळी साहिर लुधियानवी आले होते. मंचावर आल्यावर ते म्हणाले -

" अभी मै जो हिंदी कविता सुनाने जा रहा हु उसका कोई मराठी तर्जुमा जरा बताए ”

पुलंनी समोरच बसलेल्या माडगुळकरांना वर बोलावले आणि म्हणाले - " साहीरजींनी आत्ता काय सांगितले ते तर तुम्ही ऐकलच आहे.पण ह्या रूपांतरात माझी एक अट आहे. ह्या रूपांतरात एक असा मराठी शब्द हवा ज्याला भारताच्या कोणत्याही भाषेत प्रतिशब्द नाही"..

मग सहिरजींनी ती कविता ऐकवली-

" एक बात कहु राजा किसीसे न कहिओ जी,
एक बात कहु राजा किसीसे न कहिओ जी,
रातभर रहियो सवेरे चले जइयो जी।

सेजियो पे दिया जलना हराम है,
खुशियों में जलनेवालो का क्या काम है?

अँधेरे में रहकर जड़ाओ, मजा पियो जी,
रातभर रहियो सवेरे चले जइयो जी।”

आणि साहिरजींचा 'जी' पूर्ण होईपर्यंत इकडे माडगूळकरांच पूर्ण मराठी भाषांतर तयार होतं.

ते असं,

एक अर्ज सुना दिलवरा, मनीच मनी ठेवा जी,
एक अर्ज सुना दिलवरा, मनीच मनी ठेवा जी,
ओ रातभर तुम्ही राव्हा झुंझुरता तुम्ही जावा जी

सेजेशी समई मी लावू कशाला?
जुळत्या जिवालागी जळती कशाला

अंधा-या राती इश्काची मजा घ्यावी जी,
रातभर तुम्ही राव्हा झुंझुरता तुम्ही जावा जी

ह्यातील 'झुंझुरता' या शब्दाला इतर कोणत्याही भाषेत प्रतिशब्द नाही.

आणि हो, हा किस्सा इथेच संपत नाही याच्याही वरची कड़ी म्हणजे पुलंनी त्याचवेळी तिथे पेटी मागवली आणि तिथल्या तिथे कवितेला चाल लावून गाऊन सुद्धा दाखवली.....












#३९# पद्मभूषण खय्याम (३)

साठच्या दशकात खय्याम आणि साहिर लुधियानवी यांची मैत्री छान बहरली, मित्र म्हणून ते एकमेकांच्या खूप जवळ होते. १९५८ मध्ये जेव्हा रमेश सेहेगल राजकपूर बरोबर 'फिर सुबह होगी' हा चित्रपट करत होते तेव्हा त्यांनी साहिर यांना गीतकार म्हणून घेतलं. साहिर यांनी खय्याम यांचं नाव संगीतकार म्हणून सुचवलं पण रमेश सेहेगल यांना माहित होतं कि राजकपूर शंकर जयकिशन शिवाय दुसऱ्या कोणत्याही  संगीतकारासाठी तयार होणार नाहीत. झालंही तसंच पण काही करून राज कपूरला एकदा खय्यामला भेटण्यासाठी तयार केलं गेलं. 

खय्याम आले तेव्हा राजकपूर यांनी एक तानपुरा खय्याम यांना दिला आणि सांगितलं हा तानपुरा लता दीदींनी दिला आहे आणि अजून कधीच वापरला नाहीये. तो वापरून काही धून ऐकवा. खय्याम साहेबांनी तिथेच त्या बैठकीत तानपुरा घेतला आणि काही धून तयार करून  ऐकवल्या. राजकपूरला त्या आवडल्या आणि ते काम खय्याम यांना मिळालं. तो सिनेमा ती गाणी खूप गाजली. 

खय्याम यांनी लता मंगेशकर, आशा भोसले, किशोरकुमार, मुकेश, शमशाद बेगम, रफी साहेब असा बेहतरीन गायकांबरोबर काम केलं. ते आशाताई आणि लतादीदींबद्दल म्हणायचे, "मैं इन दो बहनों के लिए कहूंगा कि एक संगीत की पटरानी हैं तो दूसरी महारानी".. 

खय्याम म्हटलं कि आठवतात हि गाणी .. 'फिर छिडी रात बात फुलोंकी', 'शाम ए गम कि कसम', 'ए दिले नादान' , 'दिल चीज क्या है आप मेरी', 'आँखो में हमने आपके सपने सजाये है',' कभी कभी मेरे दिल में खयाल आता है '...  

मागच्या वर्षी खय्याम साहेब गेले. जातांना त्यांनी आपली सगळी इस्टेट अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या एका ट्रस्टला दिली आणि संगीताची हि अनमोल देणगी , ठेवा ते आपल्याला देऊन गेले ... 



#३८#पद्मभूषण खय्याम (२)

'रझिया सुलतान' १९८३ साली रिलीज झाला पण गाण्याचं रेकॉर्डिंग १९७६ सालीच झालेलं होतं. या रेकॉर्डिंग नंतर 'ए दिले नादान' ची किर्ती वणव्यासारखी बॉलिवूडमध्ये पसरली.अमिताभ तेंव्हा यश चोप्रांसोबत 'कभी कभी' साठी काम करत होते. यश चोप्रांनी खय्यामला निश्चित केलं आणि कभी कभीच्या गाण्यांनी इतिहास घडवला. याच गाण्यांसाठी त्यांना त्या वर्षीचा सर्वश्रेष्ठ संगीतकार म्हणून फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यानंतर मग त्रिशूल, नुरी या सिनेमांसाठी सुद्धा खय्यामने संगीत दिलं. यशजींच्या पुढच्या सिनेमाला 'कथा आवडली नाही' म्हणून खय्यामने नकार दिला आणि हा "सिलसिला" इथेच थांबला. 

खय्यामने लताजींपेक्षा आशा ताईंसोबत अधिक काम केलं याबद्दल त्यांना एका मुलाखतीत विचारलं तेव्हा ते म्हणाले, "क्या करे, उन दिनो लताजी कि डेट्स मिलना बहोत मुश्किल था." खय्याम सांगतात, १९८१ साली मुझफ्फर अलींच्या 'उमराव जान' साठी काम करतांना त्यांना खूप टेन्शन आलं होतं कारण 'पाकिजा' सारखी हिट फिल्म आणि त्यातील गुलाम मोहम्मद यांचं संगीत ऐकल्यानंतर ते स्वाभाविक होतं. त्यांनी खूप मेहनत घेतली. आपल्या गाण्यांसाठी आशाताईं शिवाय दुसरं कोणतच नाव त्यांच्या समोर नव्हतं. खय्यामजींनी  आशाताईंना पहिल्याच मिटिंग मध्ये सांगितलं, "हमे आशा नही, उमराव जान चाहिये". आशाताईंचा तेंव्हा कठीण काळ होता पण "उमराव जान" ने त्यांना सावरलं. पडद्यावर साक्षात रेखा आणि आशाताईंच्या आवाजातील बहारदार गाणी यामुळे सिनेमा सुपरहिट ठरला. सर्वश्रेष्ठ संगीतकार हा राष्ट्रीय फ़िल्म पुरस्कार त्यांना याच चित्रपटाने दिला. ख़य्याम म्हणायचे, "रेखा ने मेरे संगीत में जान डाल दी,  उनके अभिनय को देखकर लगता है कि रेखा पिछले जन्म में उमराव जान ही थी"...  त्यानंतर बाजार, दर्द, थोडी सी बेवफाई या सिनेमांना सुद्धा खय्यामजींनी आपला खास असा जादुई टच दिला. त्याच एक उदाहरण म्हणजे, 'ठेहरीये होश में आ लू तो चले जाइयेगा, हूँ हूँ'... रफी साहेब यांच्या ओळींनंतर सुमन कल्याणपूर म्हणतात ते 'हूँ हूँ' खास खय्याम टच, प्रेमात पाडतं आपल्याला ...
  
एक खास गोष्ट म्हणजे शगुन चित्रपटातील 'तुम अपना रंजो गम अपनी परेशानी मुझे दे दो', उमराव जान मधील 'काहे को ब्याही बिदेस', बाजार मधील 'चले आओ सईंया रंगीले मैं वारी' आणि 'देख लो आज हमको जी भर के' ही गाणी कोणी म्हटली आहेत माहिती आहे का ? त्यांच्या पत्नी जगजीत कौर यांनी.. 


#३७# पद्मभूषण खय्याम

१९५३ साली अन्वर हुसेन (नर्गीसचा भाऊ) संगीतकार खय्यामला घेऊन दिग्दर्शक झिया सरहद्दीकडे आला. सिनेमा होता 'फुटपाथ' आणि पडदयावर होते ट्रॅजेडी किंग दिलीपकुमार आणि ट्रॅजेडी क्वीन मीनाकुमारी. पहिल्याच रेकॉर्डिंगला कुठलंही रिदम Instrument न वापरता खय्यामने फक्त पियानो, गिटार आणि सोलो वोक्सचा अप्रतिम वापर करत तलतच्या आवाजात 'शाम-ए-गम कि कसम, आज गमगीं है हम', हि पहिली गझल रेकॉर्ड केली. सिनेमा पडला. दिलीपकुमार निगेटिव्ह रोल मध्ये असल्याने लोकांना कदाचित आवडलं नसावं पण तलतच्या नावावर "शाम-ए-गम कि कसम" या अप्रतिम मास्टरपीसची नोंद झाली.

मोहमंद जहूर खय्याम हाश्मी असं लांबलचक नाव असलेले खय्याम म्हणजे एकदम उसुलवाला बंदा! आपल्या ६० वर्षाच्या कारकिर्दीत या माणसाने मोजून ५५ सिनेमांना संगीत दिलं म्हणजे हिशोब लावला तर वर्षाला जेमतेम एक सिनेमा.' मेरा संगीत मेरी इबादत है', म्हणणाऱ्या खय्यामनी फक्त अशा सिनेमांना संगीत दिलं ज्यांत गीतांचा दर्जा खुप वरचा होता. अर्थातच, या निर्णयाचे व्यावहारिक हाल त्यांनी आयुष्यभर सोसले.

'शगुन' सिनेमांतील गाणी ऐकून फिदा झालेला कमाल अमरोही खय्यामकडे 'रझिया सुलतान' च स्क्रिप्ट घेऊन आला. रझिया सुलतान म्हणजे बाराव्या शतकातील ऐतिहासिक ड्रामा होता. खय्यामने सहा महिने कथेचा नीट अभ्यास केल्यावर लतादीदींना रेकॉर्डिंग साठी बोलावलं आणि सांगितलं, "लताजी, रझिया एक सम्राज्ञी आहे पण तिचा एका गुलामावर जीव जडलाय.रझियाची अवस्था मोठी विचित्र आहे. राणीपणाचा आब राखायचा आहे आणि त्याचवेळी विरहाने मन आर्त झाले आहे. ती कशिश गाण्यात उतरली पाहिजे". लतादीदींनी त्यांच म्हणणं शांतपणे ऐकलं आणि एकाच टेक मध्ये "ए दिले नादान" हे सुपरक्लास गाणं दिलं. "मी हे गाणं गाऊन बाहेर आले पण नंतर दिवसभर ते गाणं माझ्या मनांत निनादत होतं. जणू काही मी ते गाणं माझ्या सोबतच घेऊन घरी आले होते", असं एका मुलाखतीत या गाण्याविषयी लतादीदींनी सांगितलं होतं. 

या गाण्याचं वैशिष्टय म्हणजे या गाण्यात घेतलेले पॉजेस. "जिंदगी जैसी खोयी खोयी है हैरान हैरान है ... (पॉज) ... ये जमी चुप है (पॉज) ... आसमा चूप है!  हे पॉज वाळवंटात एकट्या भटकणाऱ्या रझियाची घालमेल गडद करतात. "पॉज कि आयडिया तो अमरोही साब की थी", हे खय्याम साहेब  प्रांजळपणे सांगतात हा त्यांचा मोठेपणा !!!




#३६# पद्मश्री साहिर लुधियानवी (४)

आपल्याच रुतब्यात साहिर जगला. त्याचा स्वत:च्या शब्दांवर प्रचंड विश्वास होता व हेच आपल्या जीवनाचं सूत्र बनवत तो जगला, ‘पोंछकर अश्क अपनी आँखों से, मुस्कुराओ तो कोई बात बने, सर झुकानेसे कुछ नही होता, सर उठाओ तो कोई बात बने'... 

आपल्या काव्यक्षेत्रातील योगदानाबाबत साहिर यांनी एका शेराद्वारे अत्यंत प्रांजळपणे म्हटलं होतं, ‘दुनिया ने तजुर्बातो-हवादिस की शक्ल में जो कुछ मुझे दिया है, लौटा रहा हूँ मैं.. ( तजुर्बातो-हवादिस की शक्ल मतलब  In the form of experience )

साहिरनं अनेक स्वप्नं बघितली पण ती पूर्ण होऊ शकली नाहीत. ती हुरहूर, सल त्याच्या कवितांमध्ये सतत डोकावत राहिली, " मैने ने चाँद और सितारों की तमन्ना की थी , मुझ को रातों की सियाही के सिवा कुछ न मिला’.. 

जावेद अख्तर एक आठवण सांगतात. ते या क्षेत्रांत नवीन होते तेव्हा अनेकदा साहिरकडे जात, साहिर त्यांच्या वडिलांचे आणि मामाचे मित्र होते. अर्थात वयाचा अडसर त्यांच्या नात्यात कधीच नव्हता कारण शेरोशायरी, काव्य, नज्म़ , गझ़ल असे अनेक धागे होते ज्यामुळे ते एकत्र जोडले गेले होते. एकदा साहिर यांची जावेद अख्तर यांना १०० रुपये दिले. त्याकाळी त्याला खूप किंमत होती त्यामुळे असं ठरलं कि जावेदजी ते पैसे जमतील तेव्हा परत करतील. पुढे 'गीतकार' जावेद अख्तर झाल्यावर सुद्धा त्यांनी ते पैसे परत केले नाहीत त्यामुळे तो विषय त्या दोघांमधला एक गोड नोकझोक करण्याचा असायचा. साहिर जावेदजींना नेहमी चिडवायचे ,"मैं १०० रुपये तुम से निकलवा लूंगा बेटा"…!

आई गेल्यावर साहिर एकटे पडले. एकदा ते आपल्या मित्राच्या डॉक्टर कपुर यांच्या  घरी त्यांची तब्येत पाहायला गेले होते कारण डॉक्टर आजारी होते. डॉक्टरांना पाहायला डॉक्टर सेठ येणार होते. ते येईपर्यंत डॉक्टर कपूर यांचा वेळ जावा म्हणून ते पत्ते खेळू लागले. अचानक साहिर यांना त्रास होऊ लागला व हृदयविकाराचा तीव्र झटका आला. डॉक्टर सेठ पोहोचले पण काही उपयोग झाला नाही. डॉक्टरांनी जावेद अख्तरला बोलावून घेतले, ते पोचेपर्यंत साहिर गेले होते. काही वेळाने जावेद अख्तर टॅक्सीने त्यांचे शव घेऊन साहिरजींच्या 'परछाइयाँ' या बंगल्यावर पोहोचले. रात्रीचा एक वाजला होता. टॅक्सीवाल्याच्या मदतीने त्यांनी साहिरजीना घरांत आणलं आणि त्यांचा अश्रूंचा बांध फुटला... सकाळ होता होता आजूबाजूला बातमी पसरली, लोक जमू लागले. पुढचे विधी करायला, तयारी करायला जावेदजी बाहेर पडले तर तो रात्रीचा टॅक्सीवाला अजून तिथेच उभा होता, घराच्या बाहेर. त्याला पाहून जावेदजी त्याचाकडे गेले, 'अरे मैने पैसे नही दिये आपको?' असं म्हणत पाकीट काढू लागले पण तो  टॅक्सीवाला पैसे घ्यायला तयार होईना. तो म्हणाला, मी पैशासाठी नाही थांबलो साहेब. तेव्हा जावेदजींनी १०० रुपयाची नोट काढून त्याच्या हातांत जबरदस्तीने ठेवली आणि भरून आलेल्या डोळ्यांनी म्हणाले “ये लो सौ रुपए, इसे रख लो, मर के भी निकलवा लिये उसने अपने रुपये” .. 

मुझसे पहले कितने शायर आए और आकर चले गये

कुछ आँहें भर कर लौट गए कुछ नग़मे गाकर चले गये

वो भी एक पल का क़िस्सा था मैं भी एक पल का क़िस्सा हूँ

कल तुमसे जुदा हो जाऊँगा वो आज तुम्हारा हिस्सा हूँ, 

मैं पल दो पल का शायर हूँ.... 

कल और आएँगे नग़मों की खिलती कलियाँ चुनने वाले 

मुझसे बेहतर कहने वाले तुमसे बेहतर सुनने वाले 

कल कोई मुझको याद करे क्यूँ कोई मुझको याद करे 

मशरूम ज़माना मेरे लिये क्यूँ वक़्त अपना बरबाद करे, 

मैं पल दो पल का शायर हूँ... 


या ओळी ऐकल्या कि वाटत...  साहिर, अजूनही आम्ही तुमची रोज आठवण काढतो. आयुष्यातील प्रत्येक वळणावर तुमचीच गाणी सोबत असतात. तुमच्या गाण्यांमधून अजूनही तुम्ही आमच्याच सोबत आहात, साहिर .. आमच्याच सोबत !



#३५# साहिर (३)

सचिन देव ऊर्फ एस.डी.बर्मन दूर गेल्यानंतर साहिर आणि ओ.पी. नय्यर ही जोडी जमली. या जोडीने ‘नया दौर’, ‘तुमसा नही देखा’ असे अनेक चित्रपट केले.१९५७ मध्ये दिलीप कुमार, वैजयंती माला यांच्यावर चित्रित झालेल्या 'माँग के साथ तुम्हारा मैने माँग लिया संसार'….. या गीतातील शब्दांनी तरुणाईला भारून टाकलं.संगीतकार खय्याम यांच्यासोबत साहिर यांनी चित्रपटसृष्टीला अनेक अजरामर गीते दिली. 'कभी कभी' चित्रपटासाठी साहिर यांनी लिहिलेले ‘मै पल दो पल का शायर’.. या शब्दांनी अनेकांना हेलावून सोडलं. 

हम दोनो चित्रपटातील ‘अल्लाह तेरो नाम…’, ‘कभी खुद पे कभी हालात पे…’ तसंच, ‘मै जिंदगी का साथ निभाता चला गया‘.. सगळीच सुपरहिट गाणी. 'अभी ना जाओ छोड कर…’ यातील आर्तता शब्दांत पकडणे फक्त साहिरनाच शक्य होते.

साहिर यांचे चित्रलेखा चित्रपटातील, संगीतकार रोशन यांनी ‘यमन’ रागात बसविलेल्या आणि मोहम्मद रफी यांनी गायकीने एका वेगळ्याच उंचीवर नेलेलं गीत म्हणजे ‘मन रे तू काहे ना धीर धरे’ ..अतिशय गाजलं.  

आर. डी. बर्मन यांच्यासाठीही साहिर यांनी गीतलेखन केले. 'आ गले लग जा' मधील त्यांच्या ‘तेरा मुझसे है पहले का नाता कोई…’ तील शब्दांनी अनेकांना भुरळ घातली तर जोशिला मधील ‘किसका रस्ता देखें ऐ दिल ऐ सौदाई' या शब्दांनी वेड लावलं..

साहिर यांच त्यांच्या आईवर जीवापाड प्रेम होतं. लहानपणी ज्या परिस्थितीमधून ते गेले त्याची जखम त्यांच्या मनावर कायम ताजीच राहिली. ते कोणताही दौरा असला तरी आईला सोबत नेत. स्वतःला फकीर अस संबोधून ते आईला सांगत,' फकीर को ऐसा लगा तो उसने ये लिख दिया,' आणि आई जेव्हा त्याचं कौतुक करत असे, तेव्हाच त्यांना खरं समाधान मिळत असे. असं म्हणतात त्रिशूल चित्रपटातलं 'तू मेरे साथ रहेगा मुन्ने', हे गाणं म्हणजे त्यांनी आपल्याच आईच्या व्यक्त केलेल्या भावना आहेत.

१९६० मध्ये शायर कैफि आझमी यांनी साहिरबद्दल लिहिलं होतं, 'मै साहिर से पेहेली बार मिला था तो  शायर थे, गालीबन आखिरी बार मिलूँगा उस वक्त़ भी शायर ही रहेंगे'.. त्यांच म्हणणं असं होतं की,'प्रोड्युसरी और डायरेक्टरी में इतनी ताकत कहा जो साहिर को समा सके'..

अगदी खरं.. 'औरत ने जनम दिया मर्दो को, मर्दो ने उसे बाजार दिया' किंवा ' दो कलियाँँ गुलशन की, एक सेहेरे के बीच बुंधी और मन ही मन इतराए, दुजी अर्थी भेट चढे और घुली में मिट जाए, किस को मुजरीम समझें कोई किसको दोष लगाए'.. या ओळींमधून साहिर समजू लागतो. 

ताजमहाल प्रत्यक्ष न बघता 'ताजमहाल' ही नज्म़ लिहिणारा साहिर (असं म्हटलं जातं की यापेक्षा सुंदर वर्णन असूच शकत नाही ताजमहालचं) हे कसं शक्य आहे या कोड्यात टाकतो. 

चलो एक बार फिरसे 
अजनबी बन जाए हम दोनो
मैं तुमसे कोई उम्मीद रखूँ, 
दिलनवाज़ी की 
न तुम मेरी तरफ़ देखो 
गलत अंदाज़ नज़रों से
न मेरे दिल की धड़कन
लड़खड़ाये मेरी बातों में 
न ज़ाहिर हो तुम्हारी 
कश्मकश का राज़ नज़रों से
चलो इक बार फिर से 
अजनबी बन जाएं हम दोनों....



आपल्या तुटलेल्या नात्याबद्दल इतक्या सुरेख ओळीं लिहिणारा फक्त साहिरच असू शकतो !!!
#३४# साहिर(२)

साहिरच्या शायरीमुळे तो हळूहळू प्रसिद्ध होत होता. १९४३ मध्ये तल्ख़ियाँ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला आणि साहिरला वारेमाप प्रसिद्धी मिळाली. ‘आजादी की राह पर' सिनेमात गाणी लिहिण्याचं काम मिळालं. साहिर त्याचा मित्र हमीद अख्तर बरोबर मुंबईला आला. मुंबईत साहिरचा परिचय मजरूह सुलतानपुरी, कैफी आज़मी, मजाज लखनवी अशा अनेक थोर शायर मंडळींशी झाला. 

मंडळी १९५२ ला एक सिनेमा आला ‘नौजवान’. याची गीतं चालीवर लिहिण्याचं काम मजाज लखनवीकडे देण्यात आलं. पण हे काम न जमल्याने त्याने ते साहिरला दिलं. ‘ठंडी हवाएँ, लहराके आएँ, रुत है जवाँ, तुमको यहाँ कैसे बुलाएँ?’ हे गाणं खुप गाजलं आणि नौजवान ने साहिरसाठी पायघड्या घातल्या.पाठोपाठ ‘सजा’, ‘जाल’, ‘बाजी’, ‘सी.आय्.डी’. अशी अनेक शिखरं साहिरने पादाक्रांत केली.अभिनेते, दिग्दर्शक गुरुदत्तच्या ‘बाजी’ या प्रथमच दिग्दर्शित केलेल्या चित्रपटासाठी साहिर यांनी लिहिलेले ‘तदबीर से बिगडी हुई तकदीर बना ले…’ या गीताने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. अभिनेते देव आनंद यांच्या म्हणण्यानुसार हे एक गाणे ऐकण्यासाठी त्यावेळी लोक जोधपूरच्या हवाई दलाच्या केंद्रावर तुफान गर्दी करायचे.
प्रेमातले गहिरेपण दाखवण्यासाठी साहिर त्यांच्या अनेक गाण्यांमध्ये निसर्गातील वेगवेगळ्या प्रतिमांचा अचूक वापर करायचे हे त्यांच वैशिष्ट्य ज्यामुळे त्यांच्या गाण्याचा कॅनव्हास खूप मोठा व्हायचा.

गुरुदत्तचा ‘प्यासा’ हा चित्रपट म्हणजे साहिर - एस.डी. बर्मन जोडीच्या यशस्वी कारकिर्दीतील कळस होता. साहिरचं ‘तल्ख़ियाँ’ वाचून प्रभावित झालेल्या गुरुदत्तला प्यासा हिच एका कवीच्या जीवनाची शोकांतिका सुचली आणि या सिनेमात त्याने याच काव्यसंग्रहातली अनेक कविता वापरल्या. मात्र, ‘प्यासा’ चे यश हे फक्त त्यातील गीतरचनांमुळे आहे, संगीतामुळे नव्हे, असे साहिर यांचे म्हणणे होते आणि ते बर्मनदांच्या जिव्हारी लागले आणि ही जोडी तुटली. पण प्यासा तील त्यांच्या कलाकृती अजरामर ठरल्या.१९५७ ला ‘प्यासा’ मिनर्व्हाला प्रदर्शित झाला. पडद्यावर गुरूदत्त जेव्हा ‘यहाँ पीर भी आ चुके है, जवान भी आया’ गाऊ लागे तेव्हा थिएटरमधे तमाम प्रेक्षक उभं राहून टाळ्या वाजवंत.

प्यासा चित्रपटावर काम करत असताना गुरुदत्त व कॅमेरामन व्हि.के.मूर्ती वेश्यावस्तीत काही दिवस जावून फिरून आलेले. दिलीप कुमारने नायकाच्या रोलला नाही म्हणतांना गुरुदत्तलाच 'इतनी डिटेल्ड स्टडीके बाद मुझसेभी ज्यादा तूही ये किरदार बखुबी निभाएगा, व्हाय डोण्ट यू डू इट ?' असं म्हणत त्यालाच बोहल्यावर उभा केला. मुहूर्ताच्या शॉटला साहिरने एन्ट्री घेत गुरुदत्तला ओळी ऐकवल्या, "ये गलियाँ, ये बदनाम बाज़ार, ये गुमनाम राही, ये सिक्कोंकी झनकार, ये किस्मत के सौदे, ये सौदोंपे तकरार.. जिन्हें नाज़ है हिंदपर वो कहाँ है? ये फूलों के गज़रे, ये पीकों के छींटे, ये बेबाक नजरें ये गुस्ताख़ फिकरे, ये ढलके बदन और ये बीमार चेहरे , जिन्हें नाज़ है हिंदपर वो कहाँ है?ज्या सिच्युएशनसाठी, शॉटस् व शूटिंग योजना ठरवण्यासाठी ५-६ दिवस रेडलाईट एरियात गुरुदत्त व मूर्ती वणवण भटकले होते त्याचं मर्म कुठेहि न जाता साहिरने ते आठ ओळीत उभं केलं होतं . मला सांगा, साहिर का नाही हो म्हणणार की प्यासा साहिरमुळे चालला ? 



साहिर बेफिकिरीत जगला. करिअरच्या अगदी सुरुवातीला लता मंगेशकरशी भांडला. परिणामी हाती असलेल्या ११ पैकी ९ चित्रपट हातातून गेले. पण त्याने कुणाची तमा—फिकीर बाळगली नाहि, त्याच बेफिकिरीचं त्याने गाणं केलं.....
#३३# साहिर ..

ऑल इन्डिया रेडिओला 'गीतकाराचे नांव तुम्ही सांगायलाच हवे' हा आग्रह करून तो मान्य करायला लावणारा, एस डी बर्मन बरोबर आयुष्यातील परमोच्च यशाचा काळ उपभोगणारा, अमृता प्रीतम वर जीवापाड प्रेम करणारा, गुरुदत्तच्या प्यासामधील अजरामर गीते रचणारा, आपल्या आजूबाजूच्या लोकांवर निस्सीम प्रेम असलेला, एक से बढकर एक गीते लिहिणारा,शायरी वर नितांत प्रेम करणारा, मद्यपान व धूम्रपान यात आयुष्य फेकून देणारा आणि यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोचल्यानंतर 'लता मंगेशकरांनी' घेतलेल्या मानधनापेक्षा एक रुपया कायम जास्त मानधन घेणारा...साहिर !

पंजाबमधील लुधियानात एका जहागीरदाराच्या घरी त्याचा जन्म झाला. त्याच्या वडिलांनी बारा लग्न केली होती आणि हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता, अब्दुल. त्याच्या वडिलांच्या अय्याशीला कंटाळून आईने तलाख घेतला. न्यायाधीशांनी जेंव्हा लहानग्या अब्दुलला विचारलं की तू कुणाबरोबर राहू इच्छितोस, तेव्हा अब्दुलने शांतपणे आईकडे बोट दाखवलं आणि तो आईसोबत मामाकडे राहू लागला. 

लहानपणापासून कवी मनाच्या अब्दुलला शेरोशायरी मध्ये खूप रस वाटे. त्याकाळचे सुप्रसिद्ध शायर रहमत यांची सगळी शायरी त्याला मुखोद्गत होती. उर्दू भाषा व साहित्याची ओळख करून देणारे शाळेतील शिक्षक फैय्याज़ हे अब्दुलचे आद्य गुरू होते. एकदम फोटोजेनीक मेमरी असलेला अब्दुल, एकदा वाचलेलं सहज लक्षात ठेवी. मॅट्रिकच्या परिक्षेची तयारी करताना त्याने एक नज़्म वाचली जी त्याला खूप आवडली. त्यात एक ओळ होती,

इस चमन में होंगे पैदा बुलबुल-ए-शीरीज भी,सैकडों साहिर भी होगें..

यातला साहिर (म्हणजे जादुगार) हा शब्द त्याला इतका आवडला की त्याने आपलं नांव अब्दुल ऐवजी साहिर ठेवलं आणि पुढे आपल्या जन्मगावाचं नांव लावलं ‘लुधियानवी’, साहिर लुधियानवी आणि याच नावानं तो लिहू लागला...



#३२# शैलेंद्र (३)

एक दिवस फणीश्वरनाथ रेणू यांची 'मारे गए गुलफाम' ही कादंबरी शैलेंद्रजींनी वाचली. त्यांना ती कथा खूप आवडली व  त्यावर चित्रपट निर्माण करण्याचे त्यांनी ठरवलं. सगळ्या जवळच्या मित्रांनी शक्य त्या मदतीची हमी दिली.पुढे या ना त्या कारणाने चित्रपट लांबत गेला. वर्षभरात बनणारा चित्रपट पाच वर्ष लांबला. बजेट तिपटी चौपटीने वाढले. त्यांचे सगळेच ठोकताळे चुकले. शैलेंद्रजींना निराशेने ग्रासले. तब्येत ढासळली. कसाबसा चित्रपट पूर्ण झाला पण चित्रपटाच्या प्रिमीअरला सुद्धा ते जाऊ शकले नाहीत. उत्तम कथा, अभिनय, उत्तम दिग्दर्शन,  एकापेक्षा एक सुंदर गाणी. पण तो चित्रपट फारसा चालत नाही हे पाहून त्यांना अत्यंत निराशेने ग्रासले. त्याच सुमारास देव आनंदने 'ज्वेलथिफ' ची गाणी लिहिण्या साठी विचारले होते. शैलेंद्रजींनी फक्त 'रुलाके गया सपना मेरा', हे गीत लिहिले. नंतर "अब मुझसे नहीं होगा" असा निरोप दिला. 

शैलेंद्रजींनी 'जीना यहां मरना यहाँ', या गाण्याचा फक्त अंतरा लिहिलेला होता. हॉस्पीटल मध्ये जाताना शैलेंद्रजी राजजींना म्हणाले, 'गाणे आल्यावर पूर्ण करतो'... पण ते परत आलेच नाहीत ... (त्यांच्या पश्चात पुढे त्यांचा मोठा मुलगा शैली शैलेंद्रने अंतरे पूर्ण केले)

१४ डिसेंबर १९६६ रोजी अवघ्या ४३व्या वर्षी त्यांनी या दुनियेचा निरोप घेतला. हा तोच दिवस, ज्याच्या बरोबर कामाला सुरवात केली, ज्याच्यासाठी उत्तमोत्तम गाणी लिहिली, जो त्यांना लाडाने पुष्किन म्हणायचा त्या राज कपूर चा वाढदिवस...

शैलेंद्रजींचे निधन झाले आणि या चित्रपटाला "राष्ट्रपती सुवर्ण पदक" मिळाले. पुढे हा चित्रपट तूफान चालला, गाजला...


#३१# शैलेंद्र (२)

त्यानंतर 'आवारा' चित्रपटाची तयारी सुरु होती. राजजी शैलेंद्रजींना घेऊन पटकथा लेखक के ए अब्बास यांच्याकडे गेले, ओळख करुन दिली.  ह्या साध्या सामान्य दिसणाऱ्या, शर्टवर वेल्डींगचे डाग असणाऱ्या माणसाकडे अब्बास साहेबांनी फारसे लक्ष दिले नाही. स्टोरी सेशन झाल्यावर अब्बास साहेबांनी शैलेंद्रजींना विचारलं "कवीराज कैसी लगी कहानी?"  शैलेंद्रजी म्हणाले, "अच्छी लगी"!  तेव्हा त्यांनी पुन्हा विचारलं, "कुछ समझमें आया?" शैलेंद्रजी पटकन म्हणाले," गर्दिश में था, आसमानका तारा था, आवारा था !" अब्बासजी अवाक झाले. ते म्हणाले माझ्या दोन अडीच तासाच्या गोष्टीच सार याने एका ओळीतच सांगितलं ! "आवारा हूँ" हेच शेवटी चित्रपटाचे शिर्षक गीत झाले.

५० ते ६० चे दशक आणि पुढची ३/४ वर्षे शैलेंद्र जींनी उत्तमोत्तम अशी सुमारे ८०० गाणी दिली. त्यावेळचे ते Highest paid गीतकार होते. त्यांनी सर्वात जास्त गाणी शंकर जयकिशन बरोबर केली नंतर सलिलदा आणि मग सचिन देव बर्मन. १९६३ मध्ये साहिरजींना त्या सालचा 'फिल्म फेअर' पुरस्कार केवळ या कारणासाठी नाकारला की त्यावर्षी शैलेंद्रंचे 'बंदिनी'मधले गाणं पुरस्कारासाठी जास्त लायक आहे असं त्यांना वाटलं.आपल्या समकालीन गीतकारासंबंधी असलेला केवढा हा आदर ...









#३०# गीतकार शैलेंद्र

शैलेंद्रजींचे खरे नाव शंकर केसरीलाल. त्यांचा जन्म ३०.०८.१९२३ रोजी रावळपिंडी येथे झाला. तसे मूळचे हे कुटुंब बिहारचे. नंतर मथुरा येथे वास्तव्य होते.घरची परिस्थिती बेताची होती. शाळेत असल्या पासून त्यांना कविता करण्याची आवड होती. जेमतेम शिक्षण झालं, रेल्वेची परीक्षा दिली, नोकरी मिळाली व पहिली पोस्टींग झाली झाशी येथे. नंतर मुंबईला बदली झाली व रेल्वेच्या माटुंगा यार्डात वेल्डर म्हणून काम सुरू झालं. तरीही त्या रुक्ष जागी सुद्धा त्यांना कविता सुचायची हे विशेष !

नोकरी चालू असतांना त्यांचे कवीमन स्वस्थ बसले नव्हते.'इप्टाच्या 'सर्व मुशायऱ्यांंना ते हजर रहायचे. एकदा एका मुशायऱ्यात राजकपूर यांनी शेलेंद्रजींची 'जलता है पंजाब' ही कविता ऐकली. त्यावेळेस त्यांनी शैलेंद्रजींना भेटून 'आग' चित्रपटासाठी गीत लेखन करणार का, असं विचारलं. शैलेंद्रजींनी सांगितलं मी एक साधा सुधा वेल्डर, सिनेमासाठी कशी गाणी लिहीणारं, मला गीतलेखन जमणार नाही. राजजी म्हणाले ठीक आहे पण जेव्हा केव्हा तुझी इच्छा होईल तेव्हा माझ्याकडे नक्की ये.

काही दिवसांनंतर शैलेंद्रजींना बायकोला बाळंतपणासाठी झाशीला पाठवायचे होते. पैशाची निकड होती. तेव्हा ते राजजींच्या ऑफिस मधे गेले. राजजींनी 500 रुपये दिले. शैलेंद्रजी तीन महिन्यांनी पैसे परत करायला गेले असता राजजींनी ते घेतले नाहीत पण त्यांच्या 'बरसात' चित्रपटासाठी गाणी लिहिण्यासंबंधी विचारले. तेव्हा 'बरसात' ची फक्त दोन गाणी लिहायची होती. बाकीची हसरतजींनी लिहिली होती. शैलेंद्रजीनी होकार दिला आणि गाणी लिहिली, 'बरसातमें हमसे मिले तुम सजन', आणि "पतली कमर है तिरछी नजर है'... दोन्ही गाणी हिट झाली आणि त्यांची गीतकार शैलेंद्र अशी नवीन ओळख निर्माण झाली !





#२९# मदन मोहन (2)

मनांत एक स्वप्न घेऊन ते घर सोडून बाहेर पडले एका खडतर वाटेवर. कधी मित्राच्या घरी तर कधी रस्त्यावर सुद्धा राहिले. धडपड करत असताना सिनेमांत मिळालेला एखादा लहानसा रोल केला, कधी गाणं म्हटलं पण बस्तान काही बसलं नाही. त्याच वेळी बर्मनदा यांनी त्यांना समजावलं, 'तुला नक्की काय काम करायचंय ते ठरव'.. तेव्हा मदनमोहन यांनी त्यांच्याकडे सहायक म्हणून काम सुरु केलं.  

अनेक संकटे व मानहानीला तोंड दिल्यावर देवेंद्र गोयल या नवीन निर्मात्याने त्यांना आपला पहिला चित्रपट ‘आँखे’ (१९५०) साठी संगीत देण्याचे स्वतंत्र काम दिले. आपल्या पहिल्या चित्रपटाचे काम पाहण्यासाठी त्यांनी आपल्या वडिलांना थिएटरमध्ये येण्याचे निमंत्रण दिले. चित्रपटातील संगीत पाहून रायबहादूर यांच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या. ते मदनमोहन यांना म्हणाले, ‘तू योग्य मार्गावर आहेस बाळा, माझं चुकलं'..आणि  पिता-पुत्रांतील वाद संपला. दोघे एकत्र आले, पण थोड्याच काळात त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला व मदनमोहन पुन्हा एकदा एकाकी पडले. 

पुढे लता मंगेशकर यांच्यासारखी बहीण, राजेंद्र कृष्ण व राजा मेहंदी अलीखॉं यांच्या सारखे मित्र, देवेंद्र गोयल, चेतन आनंद,  राज खोसला यांच्या सारखे मार्गदर्शक मिळाले व शामसुंदर, एस.बी. बर्मन, नौशाद यांच्यासारखे प्रशंसक संगीतकार त्यांनी मिळवले. संगीतकार खय्याम त्यांना 'संगीत के बेताज बादशहा' म्हणायचे तर लतादीदी 'गझलोंका शेहेजादा'. बेगम अख्तर यांच्या गझल गायनाचा त्यांच्यावर प्रभाव होता. बेगम अख्तर हा त्यांचा विक पॉईंट. त्यांच्या गझला आणि भारतीय वाद्ये त्यांच्या नसानसात भिनलेले होते. मुशायरात म्हटली जाणारी गझल व नज्म त्यांनी चित्रपटात आणली, तेथून ती प्रेक्षकाच्या घरात व हृदयात पोहचली. याचे श्रेय संगीतातील सर्वच दिग्गज संगीतकार खुल्या मनाने मदनमोहन यानां देतात. मौसम चित्रपटाच्या वेळी गुलजार साहेबांनी त्यांच्या याच खुबीमुळे त्यांना ते काम दिलं कारण चित्रपटातील गाणी त्याच ढंगातली होती.'दिल ढुंढता है फिर वही' या गाण्यासाठी त्यांनी तब्बल १० चाली बनवल्या होत्या. 'रुके रुके से कदम रुक् के बार बार चले'...  हे त्याच चित्रपटातील गीत आजसुद्धा तेवढंच लोकप्रिय आहे !

चेतन आनंद निर्मित 'हकीकत' या चित्रपटांत चित्रपट संपताना एका युद्धाच्या पार्श्वभुमीवर  एक गीत होतं ज्याबद्दल थोडी साशंकता होती कि चित्रपट संपताना गाणं आहे तर प्रेक्षक ते किती बघतील, पसंत करतील. पण त्या गाण्याने प्रेक्षकांना बांधून ठेवलं, रडायला लावलं. ते गीत होतं. " कर चले हम फिदा जा ओ तन साथीयो अब तुम्हारे हवाले वतन साथीयो"... 

मदनमोहन म्हटलं कि एका गाण्याची आठवण नक्की येते ते म्हणजे, " लग जा गले के फिर ये हसी रात हो ना हो "... या लाजवाब गाण्यामागे एक गोष्ट आहे. या गाण्याचे रेकॉर्डिंग होतं त्या दिवशी लताजी आजारी पडल्या व त्यामुळे ते गाणं रेकॉर्ड होऊ शकलं नाही पण सर्व युनिट शूटिंग करता तर गेलं होत. मग काय मदन मोहन यांनी स्वतःच्या आवाजात ते रेकॉर्ड केलं आणि पाठवलं. शूटिंग करताना युनिट मधली माणसं confuse होती आवाज एका गायकाचा आणि त्या आवाजावर शूटिंग होतं आहे साधनाजींचं !  

मदनमोहन यांची १९५० पासून सुरू झालेली सांगितीक कारकीर्द १९७५ पर्यंत सुरु होती. एक खास गोष्ट म्हणजे २००६ मध्ये आलेल्या 'वीर जारा' या चित्रपटासाठी मदन मोहन यांचा मुलगा संजीव कोहली यांनी मदन मोहन यांनी तयार केलेल्या ३० चाली यश चोप्रा यांना दिल्या ज्यातील आठ चाली त्यांनी या चित्रपटांत वापरल्या ज्यावर जावेद अख्तर यांनी गाणी लिहिली !!

जवळपास १०० चित्रपटानां संगीत दिलेल्या मदनमोहन यांना पुरस्कार मात्र कमीच मिळाले. १९७० मधील “दस्तक” चित्रपटातील “बैयाँ ना धरो ओ बलमा " या गाण्याने त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. ‘आप की नजरो ने समझा' (अनपढ) आणि ‘लग जा गले के फिर ये'(वह कौन थी?) या दोन गाण्यांना फिल्म फेअर नॉमिनेशन मिळाले पण पुरस्कार नाही मिळाला. आपल्या संगीतावर फिल्मफेअर ऍवार्डची मोहोर उमटवता आली नाही ही खंत मात्र उभ्या आयुष्यभर त्यांना होती.... 


#२८# मदनमोहन

मदनमोहन यांचे वडील रायबहादूर चुनीलाल कोहली हे इराक सरकारच्या कुर्दिस्तान पेशमर्ग फोर्समध्ये अकाऊंटंट जनरल या पदावर काम करीत होते. तेथेच इरबील शहरात मदनमोहन यांचा जन्म झाला. इराक स्वतंत्र झाल्यावर ते हिंदुस्थानात परत आले. मदनमोहन यांचे बालपण इराक, चकवाल-पंजाब, लाहोर व मुंबईमध्ये गेले. लहानपणापासून त्यांना संगीताची आवड होती. आजोबा डॉक्टर, आई कवयित्री व संगीत प्रेमी असल्याने घरात सुसंस्कृतपणा व संगीताची आवड होती. त्याचा परिणाम मदनमोहन यांचे संगीतप्रेम वाढण्यावर झाला. 

१९३२ मध्ये रायबहादूर चुन्नीलाल मुंबईत आले व नंतर सिनेमा व्यवसायतील एक मोठे प्रस्थ बनले. बॉम्बे टॉकीज व फिल्मीस्तान या त्याकाळच्या नावाजलेल्या सिनेनिर्मितीच्या संस्थेत भागीदार झाले. 

मुंबईत आल्यावर मदनमोहन शाळेतील कार्यक्रमात भाग घेत व गाणी म्हणत. तेथील ऑल इंडिया रेडिओवरील लहान मुलांच्या कार्यक्रमासाठी मुलांना आकाशवाणीवर बोलावण्यात येई, त्यातही मदन मोहन यांचा सहभाग असे. सुप्रसिद्ध गायिका व अभिनेत्री सुरय्या, राज कपूर यांचा परिचय मदनमोहन यांच्याशी आकाशवाणीवर झाला. मदनमोहन यांनी आपल्या वडिलांच्या आग्रहामुळे डेहराडून येथे मिलिटरी स्कूलमध्ये प्रवेश घेऊन खडतर सैनिकी प्रशिक्षण पूर्ण केले होते व सेकंड लेफ्टनंट म्हणून ते सैन्यात भरती सुद्धा झाले. पण रमले नाहीत. काही काळातच त्यांनी वडिलांना न सांगता संगीत साधनेसाठी सैन्यातील नोकरी सोडली आणि लखनौ येथे ऑल इंडिया रेडिओवर प्रोग्राम असिस्टंट म्हणून रुजू झाले. 

तेथे त्यांचा परिचय उस्ताद उस्ताद फैय्याजखान, उस्ताद अली अकबर खान, बेगम अख्तर, तलत महमूद या दिग्गज गायकांशी झाला व त्यांच्या संगीत विषयक ज्ञानात भर पडून त्यांना शास्त्रीय संगीताबाबत प्रेम वाटू लागले. त्याचवेळी संगीतकार रोशन देखील रेडिओ स्टेशनवर कामाला होते. लखनौ, दिल्ली येथील आकाशवाणी केंद्रात काम करून ते मुंबईत परतले. आपल्या वडिलांच्या सहाय्याने आपण मुंबईतील हिंदी चित्रपट सृष्टीत प्रवेश करू, हा त्यांचा अंदाज चुकला. 

सैन्यातील मानाची नोकरी सोडून बेभरवशाच्या चित्रपट व्यवसायात येण्याचे स्वप्न मदनमोहन पाहात होते. या क्षेत्रांत येण्याबद्दल त्यांच्या वडिलांचा त्यांना विरोध होता. हा विरोध इतका जास्त होता की ते ऐकत नाहीत म्हणताच त्यांच्या वडिलांनी त्यांना आपल्या घराचे दरवाजे बंद केले.



तिथूनच मग सुरु झाला मदनमोहन यांचा स्वतःला सिद्ध करण्याचा संघर्ष .... 
#२७# लक्ष्मीकांत - प्यारेलाल

'तिन्हीसांजा सखे मिळाल्या', या भा. रा. तांब्यांच्या कवितेला चाल लावली तेव्हा हृदयनाथ मंगेशकरांचं वय होतं केवळ १७ वर्षं तर या गाण्याची अरेंजमेंट ज्यांनी केली होती त्या प्यारेलाल शर्मांचं वय होतं केवळ १४ वर्षं ! हे गाणं आपण अनेकदा ऐकलंय. पण या माहितीच्या पार्श्वभूमीवर आता परत एकदा हे गाणं ऐका.. केवळ थक्क व्हायला होतं !

हे प्यारेलाल शर्मा म्हणजेच लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतले प्यारेलाल. प्यारेलाल ११ वर्षांचे होते तेव्हा त्यांची हृदयनाथ मंगेशकर ह्यांच्याशी मैत्री झाली. त्याच काळात कॉलेजजवळ क्रिकेट खेळताना त्यांची लक्ष्मीकांत ह्यांच्याशी देखील मैत्री झाली आणि त्यांनी सर्वानी मिळून “सुरेल बाल कला केंद्र” ह्या नावाने एक वाद्यवृंद स्थापन केला व लहान वयातच अनेक कार्यक्रम केले.

या जोडीचा पहिला चित्रपट पारसमणी. पण त्याच्या कितीतरी आधीपासून हे दोघे कल्याणजी-आनंदजी, शंकर-जयकिशन, एस. डी. बर्मन अशा संगीतकारांचे सहायक म्हणून काम करत होते. त्यावेळी त्यांचे नाव सहाय्यक संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल असे झळकत असे. त्यावेळी लक्ष्मीकांत त्यांना आपण हे नाव कायम ठेवून एकत्र काम करू असं म्हणत आणि पुढे नेमकं  घडलं सुद्धा तसंच.

हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीतकारांची सर्वाधिक यशस्वी जोडी म्हणून लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे नाव घेतले जाते. पारसमणी पासून त्यांनी सुरुवात केली तेव्हा प्यारेलाल केवळ २३ वर्षांचे होते आणि लक्ष्मीकांत हे २६ चे होते. या चित्रपटांतील  गाणी प्रचंड गाजली आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल ही जोडी संगीतकारांची जोडी म्हणून चित्रपटसृष्टीत प्रस्थापित झाली.

त्यांनी जवळजवळ ६०० हुन अधिक चित्रपटांना संगीत दिलं, त्यांना ७ वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. ' हम ' हा त्यांचा अखेरचा गाजलेला चित्रपट.  ४० हून अधिक वर्षं या जोडीनं बरोबर काम केलं. लक्ष्मीकांत गेल्यावरही प्यारेलालजींनी त्यांचं नाव आपल्याबरोबर लावणं बंद केलेलं नाही. योगायोग म्हणजे दोघांचा रक्तगट सुद्धा एकच होता, बी पॉझिटीव्ह. 

या दोघांच्या नावावर एक विक्रम सुद्धा आहे, एकावेळी ४३ चित्रपटांचं काम होतं या जोडीकडे.. विश्वास नाही ना बसत !
#२६# रफी़ साहेब..

१९६५ मध्ये 'दोस्ती' चित्रपट आला चाहूँगा मैं तुझे सांज सवेरे, राही मनवा दुखकी चिंता क्यूं सताती है, कोई जब राह न पाए मेरे संग आए ...अशी एक से एक रफीजींची अप्रतिम गाणी होती या चित्रपटांत ! 'चाहूंगा मैं तुझे'.या गाण्यासाठी त्यांना ३ रे फिल्म फेअर मिळाले.

याच सुमारास "कल्याणजी आनंदजी" पण जम बसवत होते. त्यांनी सुध्दा रफीजींना एक से एक बेहेतरीन गाणी दिली आहेत. जब जब फूल खिले, तील "परदेसियोंसेना अखियां मिलाना" आणि "एक था गुल और एक थी बुलबुल" ही गाणी तर तेव्हा लोकप्रियतेच्या शिखरावर होती. 

१९६६ सालच्या सूरज, चित्रपटातलं 'बहारो फूल बरसा ओ', हे पण असेच सुंदर गाणे, ज्याला ४ थे फिल्मफेअर मिळाले.

१९६८ सालच्या ब्रह्मचारी, मध्ये पण रफीजींची चक्के में चक्का चक्के में गाडी, मैं गाऊ तुम सो जाओ, दिलके झरोकेमें तुझको बिठाकर, आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबानपर अशी बेहतरीन गाणी होती! "दिल के झरोकेमे" साठी त्यांना पाचवे फिल्म फेअर मिळाले.

१९६९ साली आराधना हा चित्रपट आला. सचिनदांचे संगीत ! गुनगुना रहे है भंवरे खिल रही है कली कली आणि बागोमें बहार है, ही  गाणी रफीजींनी लताजीं बरोबर म्हटली. सचिनदा त्यावेळी आजारी होते त्यामुळे इतर गाण्यांची जबाबदारी आर डी बर्मन यांच्यावर होती. त्याच वेळेला रफीजींना "हज"ला जाण्याची संधी आली त्यामुळे , कोरा कागज था ये मन मेरा आणि मेरे सपनोंकी रानी ही गाणी पंचमनी किशोर कुमार कडून गाऊन घेतली. ही दोनही गाणी हीट झाली आणि पुन्हा समीकरणं बदलली. 

राजेश खन्नाला किशोरदांचा आवाज चपखल बसला आणि मग पहिली पसंती किशोरदांना मिळू लागली. 

१९७७ साली आलेल्या हम किसीसे कम नहीं, मधील क्या हुआ तेरा वादा, या गाण्यासाठी त्यांना शेवटचे म्हणजे ६ वे फिल्मफेअर मिळाले.

असं सांगतात १९६० च्या सुमारास त्यांचा रॉयल्टी वरुन लताजींशी वाद झाला होता. लताजींचे म्हणणे होते संगीतकारांप्रमाणेच रॉयल्टीचा काही हिस्सा गायकांना ही हवा तर रफीजींना वाटत होते कि एकदा गाण्याचे मानधन घेतल्यावर त्याची पुन्हा रॉयल्टी घेणे योग्य नाही. वाद झाले आणि लताजींनी रफीजींच्या बरोबर गायचे बंद केले. पुढे नर्गिसजींनी समझौता करुन त्यांच्यात समेट घडवला त्यानंतर सहा सात वर्षांनी 'ज्वेल थिफ' या चित्रपटात त्यांनी पुन्हा एकत्र गाणे म्हटलं, ते होते, 'दिल पुकारे आरे आरे आरे अभी ना जा मेरे साथी'!



३० जुलै १९८० हाच तो दिवस! जे ओमप्रकाश यांच्या 'आस पास' ह्या चित्रपटाच्या गाण्याचे रेकॉर्डींग होते. संध्याकाळ झाली. सगळे म्हणाले उरलेले उद्या करु. शेवटच्या चारच ओळी राहिल्या होत्या. रफीजींना काय वाटले कुणास ठाऊक? खाली उतरलेले रफीजी पुन्हा वर आले. रेकार्डिंग पूर्ण करुया म्हणाले. त्यानंतर रफीजी घरी गेले. रात्री झोपले ते परत न उठण्यासाठी. एक प्रेमळ सह्रदय व्यक्ती, एक यशस्वी गायक, एक बुलंद आवाजाचा बादशहा गेला, आपला आवाज मागे ठेवून ...
#२५# रफी़ साहेब आणि लक्ष्मीप्यारेजी

१९५० ते १९७० हा काळ रफीजींनी 
अक्षरशः गाजवला. प्रत्येक नायकाला वाटे आपलं गाणं रफीजींनीच गावं.

१९६० मधे आलेल्या 'चौदहवी का चाँद' मधे "चौदहवी का चाँद हो या आफताब हो" या सुंदर गाण्यासाठी त्यांना पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. संगीत रवी यांच होतं. हे गाणं ऐकताना रफीजींचे मधाळ स्वर कानात साठवायचे की वहिदाजींचे निरागस सौंदर्य न्याहाळायचं हा प्रश्न आपल्याला कायमच पडतो.

त्यानंतर जंगली, काजल , दो बदन, कश्मीर की कली, प्रोफेसर, आरजू, ससुराल, अशा अनेक चित्रपटातील त्यांची गाणी प्रचंड गाजू लागली. रफीजींना ससुराल या चित्रपटातल्या 'तेरी प्यारी प्यारी सूरत को किसिकी नजर ना लगे चश्मेबद्दूर', या गाण्यासाठी दुसरे फिल्मफेअर  मिळाले. 

१९६३ मधे लक्ष्मीकांत प्यारेलालजी यांची सुरुवातच 'पारसमणी' या चित्रपटाच्या 'वो जब याद आहे बहोत याद आए',  या लतादीदी व रफीजींच्या अप्रतिम गाण्याने झाली. रफीजी अतिशय सह्रदयी होते. ते ऐकून होते की ही जोडी अतिशय खडतर परिस्थितीतून संघर्ष करुन इथवर आली आहे. लक्ष्मीजी व प्यारेंलाल यांनी जेव्हा रेकॉर्डिंग नंतर रफीजींच्या हातावर १०००/- रुपये मानधन ठेवले तेव्हा रफीजींनी खिशातून अजून २ रुपये काढले आणि दोघांच्या हातात ५०१/५०१ रुपये पुढच्या वाटचाली साठी आशिर्वाद म्हणून दिले !! 

हि आठवण खुद्द प्यारेलालजीं कडून ऐकतांना त्यांचे पाणावलेले डोळे दिसले आणि वाटलं किती लाखमोलाची माणसं होती आणि आहेत ही  !!!

( मागच्या वर्षी Symbiosis मध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाला प्यारेलालजी आले होते, तेव्हा त्यांनी ही आठवण सांगितली होती)



#24# रफी़ साहेब आणि नौशादजी

रफी साहेब अब्दुल हमीद यांच्या बरोबर मुंबईत येऊन भेंडी बाजार येथे छोटीशी खोली घेऊन राहू लागले. 
'शहाजहान' चित्रपटाच्या गाण्यांचे रेकोर्डिंग चालू होते. रफीसाहेबांना त्यात कोरस मध्ये गाण्याची संधी मिळाली. काही कारणाने एके दिवशी रेकॉर्डिंग रहीत झाले. सगळे जण आपआपल्या घरी निघाले. संगीतकार नौशाद यांनी पाहिले एक मुलगा खाली पायरीवर बसून आहे. नौशादजींनी घरी कां नाही गेलास असे विचारले असता तो म्हणाला माझ्याकडे परत जायला पैसे नाहीत. एक रुपया होता तो येताना खर्च झाला. रेकॉर्डिंग झाले असते तर पैसे मिळाले असते. नौशादजींनी त्याला १ रुपया देऊ केला पण तो मानी मुलगा म्हणाला जर मी कामच नाही केले तर मी हे पैसे कसे घेऊ ? पण नौशाद साहेबांनी त्याला समजावून तो रुपया जबरदस्तीने दिला व घरी जायला सांगितले. त्यानंतर मध्ये बराच काळ लोटला. रफीजी गायक म्हणून नावारुपाला आले. 



एक दिवस नौशादजी रफीजींच्या घरी आले असता त्यांना भिंतीवर एक रुपयाचे नाणे फ्रेम मधे चिकटवलेले दिसले. नौशादजींनी त्याबद्दल विचारले असता रफीजींनी ती जुनी आठवण सांगितली व ते म्हणाले, 'तुम्हाला आठवतो ना तो मुलगा ज्याच्याकडे भाड्यासाठी रुपया पण नव्हता. तेव्हा तुम्ही ज्याला मदत केलीत तो मीच! मला त्या कठीण दिवसांचा विसर पडू नये म्हणून मी त्या दिवशी चालत आलो आणि ते नाणे जपून ठेवले. जेव्हा चार पैसे हातात येतील तेव्हा सुद्धा तुमच्या सारख्या सह्रदय माणसाची कायम स्वरुपी आठवण रहावी म्हणून मी ती फ्रेम करुन लावलेआहे' !

#23# मोहम्मद रफी़

अमृतसर जवळ कोटला सुलतानपूर या छोट्याशा प्रांतात रोज एक फकीर फार सुंदर आवाजात एकताऱ्यावर पंजाबी भजनं म्हणत गावामध्ये फिरत असे. त्याच्या मागे मागे एक सात आठ वर्षाचा मुलगा रोज जात असे. जी जी गाणी तो फकीर म्हणे तसं अगदी हुबेहूब तो मुलगा आपल्या गोड आवाजात ते गाणं पुन्हा म्हणे. गावातल्या लोकांनाही त्याचे गाणे आवडू लागले. त्या फकिराने सुद्धा एक दिवस त्या मुलाला आशिर्वाद दिला, 'एक दिन बडा गायक बनोगे'.. हा छोटा मुलगा म्हणजेच बुलंद आवाजाचा बादशहा मोहमद रफी !!

काही दिवसांनी हे कुटुंब लाहोरला गेले. त्यावेळी साधारण तेरा चौदा वर्षांचं वय असेल रफीजींच! त्यांनी बडे गुलाम अली खाँ, वाहीद खाँ, पंडीत जीवनलाल मट्टू आणि फिरोज निजाम यांच्याकडे शास्त्रीय संगीताची तालीम घेतली. 
एकदा रफीजींच्या भावाचे मित्र अब्दुल हमीद त्यांना ऑल इंडिया रेडियो येथे के एल सैगल यांच्या कार्यक्रमाला घेऊन गेले. दुर्दैवाने तिथली वीज गेल्यामुळे सैगल यांचा कार्यक्रम वेळेत सुरू झाला नाही. 
प्रेक्षक केव्हाचे येऊन बसलेले. थोड्या वेळाने प्रेक्षागृहात चुळबुळ सुरु झाली म्हणुन हमीद यांनी वीज येई पर्यंत रफीजींना गाऊ द्यावे अशी व्यवस्थापकांना विनंती केली. प्रेक्षकांनी गोंधळ घालू नये म्हणून त्यांनी पण ती मान्य केली. आणि रफीजींना आपली गायन प्रतिभा पहिल्यांदा दाखविण्याची संधी मिळाली. तेव्हा प्रेक्षकांमधे संगीतकार श्यामसुंदर पण होते. त्यांना रफीजींचे गाणे खूपच भावले. त्यांनी रफीजींचा वकूब जाणला आणि त्यांना मुंबईला  बोलावले. नंतर रफी साहेब मुंबईला पोहोचले आणि सुरू झाली एक अनोखी सफर !!!

#22# मुघल- ए - आझम १९६० -  मुघल- ए - आझम २००४ 

या चित्रपटातील ‘मोहे पनघटपे’ आणि ‘प्यार किया तो डरन क्या' हि दोन गाणी रंगीत शूट झाली.  नंतर चित्रपटाची ट्रायल बघताना ८५ % कृष्णधवल व १५ % रंगीत असं पाहून असिफ़ना पूर्ण चित्रपट रंगीत असावा असं वाटलं. परंतु १२ वर्ष ज्यावर काम केलं तो पूर्ण चित्रपट रिशूट करणं म्हणजे पैशाचा वेळेचा अपव्यय कारण त्या काळी १० लाखांत संपूर्ण सिनेमा तयार व्हायचा तिथे के असिफ यांनी हा सिनेमा पूर्ण करतांना दोन कोटी रुपये खर्च केले होते. ( त्या काळी या चित्रपटाने ५.५० कोटीचा धंदा करून रेकॉर्ड केलं जे पुढे शोले चित्रपटाने मोडलं) चित्रपटाच्या प्रीमियरला शापूरजींना असिफ यांच म्हणणं पटलं व त्यांनी असिफला हा रंगीत चित्रपट करायचं आश्वासन दिलं(आश्चर्य म्हणजे चित्रपटाच्या प्रीलियरला मधुबाला आणि दिलीपकुमार दोघेही नव्हते).


१९६० मध्ये दिलेलं ते वचन पाळून २००४ मध्ये शापूरजींच्या नातवाने स्टर्लिंग इन्व्हेस्टमेंट बॅनरखाली १० कोटी रुपये खर्च करून रंगीत मुघल- ए- आझम ची निर्मिती केली. पण हा रंगीत चित्रपट पाहायला ना शापूरजी होते, ना के असिफ ना मधुबाला ... होते फक्त दिलीपकुमार ! 
#21# मुघल- ए - आझम .. प्यार किया तो डरना क्या  

आपल्या चित्रपटाने प्रेक्षकांचे डोळे दिपून जावेत या स्वप्नासाठी के. असिफनी एका शीशमहलचा सेट उभारायचं ठरवलं. यासाठी अंधेरीच्या मोहन स्टुडिओमध्ये शेकडो कारागीर दोन वर्ष अहोरात्र राबवले. कलादिग्दर्शक एम.के. सईद यांनी मुंबईतल्या नावाजलेल्या आर्किटेक्ट व इंटिरिअर डिझायनरची मदत घेतली. इटालिअन टाईल्सचं फ्लोअरींग, इराणी गालीचे, संस्थानिकांकडून आणलेले हंड्या-झुंबर, काळानुरूप नक्षीदार खिडक्या व भिंतींच्या कमानी, संगमरवरी भासणार्‍या प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती. काचेचं नक्षीकाम करणारे तज्ज्ञ आगा सिराझीला शीशमहल सजवण्याचं काम देण्यात आलं. विशिष्ट रंगाच्या काचा आणि आरसे बेल्जियमवरुन मागवण्यात आले. अशा तर्‍हेने ३५ लाख रुपये खर्च करून उभा राहिला तो शीशमहलचा सेट, ३५ फूट उंच, ८० फूट रुंद आणि १५० फूट लांब. .. 

या सेटवर अनारकलीचं सप्तरंगांतलं नृत्य चित्रीत करायचं ठरलं होतं. कृष्णधवल छायाचित्रणातले कसबी सिनेमॅटोग्राफर आर.डी. माथूर यांनी ट्रायलसाठी मोठमोठे दिवे प्रकाशित केले. पण असंख्य आरशांमुळे परावर्तीत झालेल्या प्रकाशामुळे एक्सपोझ झालेली फिल्म जळून पांढरीफटक पडली. तमाम कसबी तंत्रज्ञांनी इतक्या प्रखर प्रकाशात कॅमेर्‍याच्या लेन्सेस काम करूच शकणार नाहीत, असं छातीठोकपणे सांगितलं. 

तेव्हा प्रचंड मानसिक तणावाखाली असलेले शापूरजी तडक त्याकाळच्या ज्येष्ठ दिग्दर्शक सोहराब मोदींकडे गेले. मोदींनी प्रत्यक्ष सेट पाहिल्यावर प्रेक्षकांचे डोळे दिपवण्याच्या नादात असीफ स्वत:सकट सगळ्यांसाठी खड्डा खणतोय असा निर्वाळा दिला. यामुळे शापूरजींनी झालं तेवढं बास झालं आता इथून पुढे सोहराब मोदी दिग्दर्शनाचं काम पाहतील, असे असिफला सुनावले. त्यावर त्यांचा बांध तुटला आणि ते म्हणाले, ‘तुमचे पैसेच खर्च झालेत, पण माझ्यासकट शेकडो लोकांनी या चित्रपटासाठी रक्ताचं पाणी केलंय. या सेटवर अकबर, जोधाबाई, सलीमसमोर अनारकली नाचणार आहे. माझ्या स्वप्नपूर्तीच्या या परमोच्चक्षणी मी कुणाचीही लुडबुड खपवून घेणार नाही..’ असीफचा हा आवेश पाहता शापूरजींनी थोडं नमतं घेतलं. पण या दृश्यानंतरच काम मोदी पाहतील असे त्यांनी स्पष्ट केले. हे सगळं ऐकत इतका वेळ उभी असलेली मधुबाला आपल्या शांत पण दृढनिश्चयी स्वरात म्हणाली की, माझा करार असिफसोबत झाला आहे. त्यामुळे असिफने दिग्दर्शन केले नाही तर मी या चित्रपटातच काम करणार नाही.

पाण्यासारखा पैसा खर्च झालेल्या चित्रपटातून मधुबाला बाहेर पडली तर आपण कुठे जाऊन पोहचू हे ओळखता येण्याइतपत चाणाक्ष व व्यावसायीक असलेले शापूरजी पालनजी हे सोहराब मोदींसोबत एकही शब्द न बोलता सेटवरून निघून गेले. पाणावलेल्या डोळ्यांनी मधुबालाकडं पाहात असीफने जणू  तो हा प्रसंग आयुष्यभर विसरणार नसल्याचं तिला सांगितल असावं. 

शीशमहलच्या शेकडो आरशांवरून प्रकाश किरण परावर्तीत होऊन फिल्म कोरीच राहू लागली. शेवटी आर.डी. माथूरनं डायरेक्ट लाईट ऐवजी सर्व दिव्यांवर उलटे रिफ्लेक्टर्स बसवले व इनडायरेक्ट लाईटमधे शूटिंग करून पाहिलं. ज्यामुळे आरशांत हजारो प्रतिमा स्पष्ट दिसल्या आणि ही कल्पना यशस्वी झाली . आजकाल जे स्टिल व लाईव्ह फोटोग्राफीचं तंत्र वापरतात, त्याचा उगम इथूनच झाला.



'प्यार किया तो डरना क्या', अशा भव्य गाण्याचं स्वप्न बघणारा दिग्दर्शक के. असीफ, या एका गाण्यासाठी त्याने बनवलेला शीशमहल , असीफसाठी चित्रपट सोडण्याची तयारी दाखवणारी मधुबाला, अत्यंत कल्पकतेने शीशमहालातदेखील शूटिंग करणं शक्य करून दाखवलेला आर.डी. माथूरसारखा कॅमेरामन आणि या सगळ्याच दडपण मनावर असणारे शकील बदायुनी .. त्यांनी आपली सारी प्रतिभा पणाला लावून या शीशमहलमधील गाण्याचे पंचवीस एक मुखडे तयार केले. पण नौशादच्या पसंतीस ते उतरेनात. बरंच विचारमंथन झालं आणि मध्यरात्रीच्या सुमारास नौशादला ओळी सुचल्या.  गीत सुरु होण्यापूर्वीची दोन ओळीतील आर्त तत्वज्ञान ज्या धाडसाने दरबारांत अनारकली अकबर बादशहाला ऐकवते, त्याच तोलामोलाचे बोल शकीलजींनी  लिहिले, नौशादजींनी संगीताचं कोंदण चढवलं आणि लताजींनी ते अमर केलं (या गाण्यातील आवाज घुमण्यामागे echo रेकॉर्डिंग तेव्हा प्रगत नसल्याने स्टुडिओ च्या बाथरूम मध्ये रेकॉर्ड केलं गेलं होतं) ‘इन्सान किसीसे दुनियामें इकबार मुहोब्बत करता है इस दर्दको लेकर जीता है , इस दर्द को लेकर मरता है…जब प्यार किया तो डरना क्या ...  ’ 
#२०# मुघल-ए-आझम आणि Perfectionist के. असिफ 

'माझी अनारकली कोटींमध्ये एक आहे जी सर्वांवर भारी पडेल'... के. असिफ यांनी हे स्वप्न पाहिलं होतं.

चित्रपटात लढाईवरुन विजयी होऊन परतणार्‍या सलीमला एक संगमरवरी पुतळा भेट देण्याचं अकबर ठरवतो. पण शिल्पकाराकडून मुदतीत पुतळा पूर्ण न झाल्यानं तो शिल्पकार एका अनुपम लावण्यवतीला पुतळा म्हणून उभं करतो. ती लावण्यवती म्हणजेच 'अनारकली'.

हा प्रसंग वास्तववादी दिसण्यासाठी मधुबालाच्या चेहऱ्यावर संगमरवरी लेप देण्यात आला होता. तिला पापण्याही हलवता येत नव्हत्या. मुंबईची दमट हवा आणि आर्कलाईटचा प्रखर झोत, शिवाय पुतळ्यावर म्हणजेच मधुबालावर पारदर्शक कापडाचं आवरण होते. मधुबाला हुबेहुब संगमरवराची मूर्ती भासावी म्हणून मधुबालाला रबर शीट यार्डपासून बनवलेला ड्रेस घालण्यात आला. पण त्याला अजिबात हवा आत जाण्याची सोय नसल्याने प्रचंड उष्णतेने ती गुदमरू लागली. तेव्हा तो ड्रेस उतरवून त्याला मागच्या बाजूने, हवा खेळती राहण्यासाठी लहान लहान भोकं पाडण्यात आली. हा ड्रेस घालून आणि त्यावर पारदर्शक कापडाचं आवरण घालून चित्रीकरण करण्यात आलं. सिनेमात हा पुतळा पाहून मुर्तीकाराची तारीफ करणार्‍या अकबराला सलाम करायला मधुबाला पुढे येते तेव्हा अक्षरश: संगमरवराचा पुतळाच सजीव होतोय असं वाटतं व एक रम्य कवी कल्पना प्रत्यक्षात उतरते. 

गाण्याच्या चित्रिकरणात मधुबालाच्या हातापायात खरे लोखंडी साखळदंड अडकवून अनेक रिटेकसह चित्रिकरण करण्यात आलं होतं. यामुळे तिच्या नितळ आणि मुलायम कांतीवर काळेनिळे डाग पडले. आपल्या मुलीच्या शरीरावरचे ते डाग पाहून तिचे वडील अताउल्ला खूप चिडले. कलादिग्दर्शक कचकड्याचे रंगवलेले साखळदंड लोखंडी साखळदंड असल्याचा आभास सहज निर्माण करु शकतील असा पर्यायही त्यांनी सुचवला पण वास्तववादाचं वेड रक्तात भिनलेले आसिफ भाई आपल्या कार्यपध्दतीवर ठाम राहिले आणि खास गोष्ट म्हणजे खुद्द मधुबालानेही के. आसिफना याबाबत पाठिंबा दिला.

अनारकलीला ज्या भिंतीत मारण्याची शिक्षा अकबर देतो, त्या शॉटसाठी असिफभाईंनी शापूरजींकडे ( निर्माते) ५० हजार रुपये मागितले. स्वत: मोठे बिल्डर असल्याने १९५५-५६ च्या काळात अशा भिंतीला ५ हजार खर्च येतो याची खात्री असल्याने शापूरजींनी यावर स्पष्टीकरण मागितलं. तेव्हा असिफभाई म्हणाले की या भिंतीसाठी जबलपूर येथील संगमरवराचा दगड असेल आणि त्याचा कारागीरही तिकडचाच असेल, तेव्हाच हे दृश्य वास्तवदर्शी वाटेल. असिफचे हे स्पष्टिकरण ऐकून शापूरजींनी त्याला ५० हजार रुपये दिले.



के.असिफ यांच्या वेडाचं अजून एक उदाहरण म्हणजे फक्त एका गाण्याच्या शूटिंग करता उभा केलेला 'शिशमहाल' चा सेट आणि त्या सेट वरील 'प्यार किया तो डरना क्या' या गाण्याचं शूट ... याबद्दल उद्या ..
#१९# मुगल-ए-आझम आणि बडे गुलाम अली खाँ साहेब

अनारकली सलिमला भेटायला जाते तेव्हा महालातले दिवे उजळायला लागलेले असतात आणि बादशहाच्या दरबारातून येतं असतो तानसेनचा स्वर. एकीकडे दिलीप कुमार आणि मधुबालाचा तो सुप्रसिद्ध रोमॅन्टिक सीन (चेहर्‍यावरुन पिस फिरवताना ) आणि दुसरीकडे शेजारच्या महालातून ऐकू येणारं तानसेनचं गाणं.
या सीन करता तानसेनच्या आवाजाच्या तोडीची आलापी हवी म्हणून के. असीफ यांनी नौशादला सांगताच असा आवाज असलेलं संगीतरत्न म्हणजे बडे गुलाम अली खाँ साहेब असं नौशादजींनी सुचवलं. गुणवत्तेशी कुठलीही तडजोड मान्य नसलेले के. असीफ बडे गुलाम अली खाँ साहेबांकडे पोहोचले. 'चित्रपटासाठी मी गात नाही', असं सांगत खाँ साहेबांनी हा प्रस्ताव नाकारला. असीफसाहेबांनी पण चिकाटी न सोडता आग्रह चालू ठेवला तेंव्हा त्यांना टाळण्यासाठी आपल्या तीन तासांच्या महफिलीची मानधनाची रक्कम म्हणजे पंचवीस हजार एका गाण्याचे घेईन असे खाँ साहेबांनी के. असिफला सांगितलं. अहो त्या काळात लताजी रफीसाहेब यांसारखी मंडळी एका गाण्याचे ४००० रूपये मानधन घेत, त्या काळात एका गाण्याला पंचवीस हजार ? असीफ साहेबांनी खिशातून दहा हजारांचं बंडल काढून खाँसाहेबापुढे ठेवत म्हटलं, “बस्स एवढेच? खाँसाहेब आपण बेशकीमती आहात आणि आपल्या आवाजासाठी पैसा किती हा मुद्दाच गौण आहे. हि पेशगी आहे, बाकी रक्कम उद्या रेकॉर्डिंगच्या वेळी मिळेल".. 
असीफजींच्या वेडाने आणि दानतीने अवाक् झालेले खाँ साहेब दुसर्‍या दिवशी त्यांच्या तबलानवाझ निजामुद्दीन खाँ ना घेऊन स्टुडिओत पोहोचले आणि नौशादजींनी सोहनी रागात बांधलेली 'प्रेम जोगन बन जा' हि ठुमरी गाऊन ध्वनीमुद्रित केली. पण ती ऐकल्यावर असीफजी अस्वस्थ झाले. सलीम-अनारकलीच्या त्या प्रणय प्रसंगाला साजेशी मुलायम आलापीवाली नजाकतभरी ठुमरी हवी  आहे, अशी नाही. कल्पना करा , काय प्रसंग घडला असेल .. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातल्या मेरुमणी असलेल्या खाँ साहेबांना एक डायरेक्टर सांगतो की ठुमरी कशी हवी ? भडकलेल्या खाँ साहेबांनी चिडून के. असीफला सांगितलं मला तो प्रसंग पडद्यावर दाखवा, ‘फिर हम तय करेंगे’ ..  झालं, तो प्रसंग खाँ साहेबांसमोर प्रोजेक्ट केला गेला . त्यातला मधुबालाचा अभिनय बघून खाँसाहेब हरखून गेले व म्हणाले, “अमा निजामुद्दीन मियाँ क्या खूबसूरती है, जैसे आसमानसे परी उतर आयी हो। असीफ सही केह गया, इसके लिए आलापी वाकई मलमलसी मुलायम होनी चाहिये।  नौशादभाई चलो फिरसे गातें हैं हम” आणि खाँ साहेबांनी परत नव्याने तब्येतीत गायलेली ही ठुमरी पुन्हा ध्वनीमुद्रित करण्यात आली. तो सीन अजरामर करण्यामागे बडे गुलाम अली खाँ साहेबांच्या गाण्याची पण जादू आहे !!!
#18# मुघल- ए - आझम आणि मधुबाला 


खरं तर मुघल- ए - आझम म्हटलं तरी मधुबाला समोर येते किंवा मधुबाला म्हटलं तरी मुघल- ए - आझम चित्रपट समोर येतो, इतकी एकरूप आहेत हि नावं. १९५३ मध्ये हीच कथा असलेला अनारकली चित्रपट आला होता प्रदीप कुमार आणि बिना रॉय यांची भूमिका असलेला. परंतु मुघल- ए - आझम चित्रपटांत हि प्रेमकथा ज्या अंदाजात, ज्या नजाकतीने बखुबी पेश केली गेली ती कमाल होती आणि म्हणूनच आज ६० वर्षांनंतर सुद्धा हा चित्रपट आपण विसरू शकत नाही.

मधुबालाच्या जीवनातला हा सर्वोत्कृष्ट चित्रपट. पण या भूमिकेसाठी तिची निवड कशी झाली त्या मागे एक गोष्ट आहे. या भूमिकेसाठी ६५०० अर्जातून ५०० तरुणींची प्राथमिक निवड करण्यात आली होती. दिल्लीच्या शीला दलाया या कॉलेज कुमारीची निवड करण्यात आली परंतु काही प्रसंगांचं शूट केलं गेलं आणि समजलं तिची देहबोली , चेहऱ्यावरील भाव जुळत नाहीयेत. त्याच सुमारास नावारूपाला आलेल्या नूतन यांचं नाव मग पुढे आलं. तेव्हा नूतन यांनी त्यास नकार दिला व सांगितलं हि भूमिका सर्वार्थाने निभावणारी एकचं अभिनेत्री आहे आणि ती म्हणजे 'मधुबाला'.. काय कमाल आहे नाही !!


#17# मधुमती

'Masterpiece of Indian Cinema' असं ज्या सिनेमाचं वर्णन केलं जातं तो हा सिनेमा. आज इतक्या वर्षांनंतर सुद्धा हा चित्रपट अभ्यासला जातो, या क्षेत्रांत काम करण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना आवर्जून शिकवला जातॊ यावरूनच या चित्रपटाबद्दल असलेली उत्सुकता नक्कीच वाढते.  

एकीकडे पडद्यावर वैजयंतीमाला आणि दिलीपकुमार, शैलेंद्र यांनी लिहिलेली एक से बढकर एक गाणी, सलील चौधरींनी दिलेलं संगीत व मुकेश लताजी मन्ना डे रफीसाहेब आशा भोसले यांच्या आवाजातील गाणी आणि दुसरीकडे बिमल रॉय अशा लाजवाब कॉम्बिनेशनची हि एक अनोखी कलाकृती.    

१९५५ मध्ये दिलीपकुमार आणि वैजयंतीमाला यांच्या बरोबर बिमलदांनी देवदास केला होता. २००५ मध्ये इंडिया टाइम्स मुवीज नी या चित्रपटाला बॉलीवूड मधल्या टॉप २५ चित्रपटांत स्थान दिलं. एक क्लासिक चित्रपट म्हणून आपण आजही या सिनेमाकडे  पाहत असलो तरी तेव्हा मात्र तो चित्रपट फारसा चालला नव्हता. त्यामुळे एका हिट चित्रपटाची बिमलदांना खूप गरज होती आणि त्याच वेळी रित्विक घटक यांनी 'मधुमती' ची गोष्ट त्यांना ऐकवली आणि मग घडला एक इतिहास !

या चित्रपटाने तब्बल ९ फिल्मफेअर पुरस्कार मिळवले होते जे एक रेकॉर्ड होतं आणि ते मोडायला पुढे ३७ वर्ष लागली, 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' चित्रपटाला १० फिल्मफेअर पुरस्कार मिळाले तेव्हा. 

Bimal Roy's Madhumati  - untold stories from behind the scenes हे त्यांच्या मुलीने लिहिलेलं पुस्तक २०१४ साली रिलीज झालं तेव्हा 'मधुमती' घडत असतांना पडद्यामागील घडलेल्या अनेक छान गोष्टी समोर आल्या. जसं या चित्रपटांतील गोष्ट उत्तरेकडील पहाडी भागांतील आहे पण यातील ८०% शूटिंग महाराष्ट्रात झालं होतं. सिनेमाच्या सुरवातीचा शॉट पहाडी भागातला वाटतो पण शूटिंग झालंय खोपोली पुणे महामार्गावर. यातील एक गाणं विश्वास बसणार नाही पण रायगड जिल्यातील एका गावांत शूट केलं गेलं होतं.  नैनितालला शूट चालू असतांना बंद पडलेली साऊंड रेकॉर्डिंग सिस्टिम तिथल्या एका रेडिओ दुकानदाराने रात्रीच्या थंडीत रात्रभर काम करून ठीक केली होती. या पुस्तकावर काम करताना रिंकी रॉय यांना समजलं कि या चित्रपटाचं ६०% एडिटिंग दासबाबूंनी केलं होतं कारण हृषीकेश मुखर्जी दुसऱ्या चित्रपटांत व्यस्त होते तरीही चित्रपटाच्या क्रेडिट मध्ये संपूर्ण क्रेडिट फक्त हृषीदांना दिलं गेलं. यावरून दासबाबूंना किती वाईट वाटलं असेल असा विचार करून त्या भेटायला गेल्या तेव्हा त्यांनी या बद्दल काहीच उल्लेख न करता हा चित्रपट पाहिलाच नाही असं सांगितलं. तेव्हा त्यांना त्यांच्या डोळ्यांमध्ये दिसला बिमलदांबद्दल असलेला आदर आणि फक्त आदर !! 

एक कॅमेरामॅन म्हणून बिमलदांनी आपलं करियर सुरु केलं होतं. चित्रांमधून बोलणारा, आपला कॅमेरा एखाद्या पेंट ब्रश सारखा वापरणारा डायरेक्टर हि त्यांच्या कॅमेऱ्याची जादू होती. फिल्म पत्रकार बुर्जोर खुर्शीद त्यांना 'सायलेंट थंडर' म्हणायचे. रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेलं 'जन गण मन' हे आपलं राष्ट्रगीत होण्याअगोदर बिमलदांनी ते गीत हमराही (१९४५) या चित्रपटांत घेतलं होतं. ' Bimal Roy  - The man who spoke in picture', त्यांची मुलगी रिंकी रॉय यांनी लिहिलेलं हे पुस्तक ज्यावर १९८० पासून त्या काम करत होत्या जे २०१७ मध्ये प्रकाशित झालं ते सध्या वाचते आहे ..  !

बिमलदा किती ग्रेट होते हे परत एकदा मधुमती पाहून एन्जॉय करते आहे... तुम्ही पण नक्की पहा !!