Monday, October 31, 2022

 १९४२ A love story ... या चित्रपटातील सगळीच गाणी खूप गाजली. नुसती गाजलीच नाही तर पंचमदांना त्यांच्या संगीतासाठी व जावेद अख्तर यांना गीतलेखनासाठी फिल्मफेअर अवॉर्ड सुद्धा मिळालं. एवढंच नाही तर कविता कृष्णमूर्ती यांना ' प्यार हुआ चुपके से' व कुमार सानू यांना 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा', या गाण्याकरता बेस्ट सिंगर फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं. 

दुर्दैव हे की, या चित्रपतटातली सगळी गाणी गाजली मात्र हे बघायला आरडी आपल्यात नव्हते.  

विधु विनोद चोप्रा यांनी या सिनेमाची तयारी सुरू केली तेव्हा गीतलेखक जावेद अख्तर यांच्याकडे गाण्यांची जबाबदारी दिली. चित्रपटाची कथा जरी प्रेमकथा असली तरीही तिला स्वातंत्र्यसंग्रामाची पार्श्वभूमी होती. स्क्रिप्टमध्ये गाण्यांच्या जागाही तयार केल्या गेल्या. जावेद साहेबांनी पटकथा ऐकली तेंव्हा त्यांना त्यात एका रोमॅंटिक, हळूवार गाण्याची जागा दिसली. त्यांनी विधु विनोद चोप्रा यांना सांगितलंही की एक गाणं यात चपखल बसू शकेल पण त्यांनी ते काही मनावर घेतलं नाही. जितकी आहेत तितकी गाणी पुरेशी आहेत असं त्याचं म्हणणं होतं. 

गाण्याच्या मिटींगसाठी जावेद अख्तर आणि विधु विनोद चोप्रा आरडींकडे गेले असता जावेद अख्तरनी सहज बोलता बोलता आरडींच्या कानावर ही गोष्ट घातली. विधू विनोद म्हणाले की ऐकवा गाणं. आता गंमत अशी की, गाण्याच्या बाबतीत जावेद साहेब आग्रही असले तरीही गाणं तयार नव्हतंच. गाणं ऐकवा म्हटल्यावर जावेद साहेबांकडे लिखित बोल नव्हतेच.

त्यांनी सजच वर्णन केल्यासारखी एक ओळ समोर केली,'एक लडकी को देखा तो ऐसा लगा'.. ही ओळ ऐकून आरडी लगेचंच उत्सुक झाले. यावर उत्तम गाणं बनू शकेल असं त्यांना वाटलं. विधु विनोद चोप्रा यांनाही आता वाटू लागलं की गाणं घालणं योग्य होईल. या गाण्यामुळे सिनेमाला एक छानशी गती, र्‍हिदम येतोय. त्यांनी जावेद साहेबांना म्हणलं द्या गाणं.

त्यांनी तिथल्या तिथे सुनावलं,”लेना हि नहीं था तो मैं गाना लिखू क्यू”? आरडी मधे पडत म्हणाले की, ठीक आहे. नसेल लिहिलं तर आता लिहा. जावेद अख्तर म्हणाले आधी तुम्ही धून बनवा मी त्यावर शब्द रचतो.यावर आरडींनी कुरघोडी करत सांगितलं की ठीक आहे पण अंतर्‍यामधे या सुंदर लडकीसाठी सगळ्या उपमा आल्या पाहिजेत. जावेद साहेब तयार झाले मात्र आधी धून यावर अडून राहिले.आरडी म्हणाले की अरे धून बनाओ क्या? समझो बन चुकी आणि हार्मोनियम पुढ्यात ओढून त्यांनी त्यावर सुरावटी छेडायला सुरवातही केली. हार मानतील ते जावेदसाहेब कसले? शिवाय त्या काळात जावेद अख्तर हे अक्षरश: अर्ध्या तासात गीत लिहिण्यासाठी ओळखले जात असत. बसल्या बैठकीत गाणी लिहिण्यात त्यांचा हातखंडा होता.

या गाण्याच्या अनुभवाबाबत नंतर एकेठिकाणी बोलताना जावेद अख्तर म्हणाले की, "आरडी यांच्या मेंदूत विचार नाही तर सतत संगीत वाजत असायचं. अक्षरश: अर्ध्या अर्ध्या मिनिटात ते एखादी भन्नाट धून बनवून टाकायचे. आपल्याला अंतरा सूचेपर्यंत त्यांचा मुखडा तयार असायचा. हे माहित असूनही मी त्यांना हे आव्हान का दिलं असेल? हा प्रश्न मला आजही पडलेला आहे".. तर बॉल पुन्हा जावेद अख्तर यांच्याकडे टोलवला गेला. साक्षात सरस्वती जिथे वास्तव्याला तिथे शब्दांची काय कमतरता? जावेदसाहेबांनी हे आव्हान स्विकारलं आणि तिथल्या तिथे धडाधड उपमा सुचवल्या.मात्र या उपमा शोधतानाही त्या सोज्वळ असल्या पाहिजेत असा जावेद अख्तर यांचा आग्रह होता. दारू, नशा असे शब्द त्यांना अजिबात नको होते. कशा बशा दोन अंतर्‍या इतक्या उपमा शोधत त्यांनी ते गाणं अर्धं मुर्धं पूर्ण केलं मात्र तिसर्‍या अंतर्‍यापर्यंत ते थकून गेले.त्यांनी या दोघांकडे थोडी सवलत मागितली. शुध्द, सात्विक, सोज्वळ गाण्याच्या मिटरमधे बसणार्‍या उपमा शोधण्यासाठी त्यांना दोन दिवस लागले. मात्र यानंतर जे गाणं तयार झालं ते हिंदी चित्रपट संगीतात अजरामर झालं.एक दोन नाही तर तब्बल २१ उपमा वापरून हे तरल गाणं बनलं. या गाण्यासाठी गायक कुमार सानूला, गीतलेखनासाठी जावेद अख्तर यांना आणि संगीतासाठी आरडी यांना पुरस्कार लाभला. अर्थात हा पुरस्कार या गाण्याचा वाजवी हक्कच होता हे शंभर टक्के !

No comments:

Post a Comment