Monday, October 31, 2022

 

गुलाबी रंग .. प्रेमाचं, कोमल जाणिवांचं, स्नेहाचं, शांततेचं, तारुण्याचं,आनंदाचं, स्त्रीत्वाचं आणि स्वप्नांचं प्रतिक !

पावसाळा संपतो आणि थंडीची चाहूल लागते. धुक्याची शुभ्र चादर पसरता वाटतं पहाटे पहाटे थंडीचा गुलाबी शेला लपेटून घ्यावा..

'ही गुलाबी हवा, वेड लावी जीवा
हाय श्वासांतही ऐकू ये मारवा'..

आयुष्याच्या एका वळणावर गुलाबी रंगांचं खास आकर्षण असतं.. वाटतं या रंगात रंगून जाण्यासारखं सुख नाही. वास्तवाचं भान हरपून आयुष्याची स्वप्न रंगवण्यात हरवलेलं गुलाबी मन!

मला आठवतंय साधारण चौदा ते अठरा या वयामध्ये प्रत्येकाच्या आवडत्या गाण्यांच्या यादी मध्ये 'ए मेरे हमसफर, अकेले है तो क्या गम है, पेहेला नशा पेहेला खुमार, दिल है के मानता नहीं, हमने घर छोडा है, मेरे रंग में रंगने वाली परी हो या तुम, केहे दो के तुम हो मेरी वरना' आणि आशिकी मधली एक से एक गाणी होती. टेपरेकॉर्डर वर गाणी ऐकून ऐकून ती कॅसेट खराब व्हायची पण गाणी ऐकायची हौस काही फिटायची नाही. आजही ती गाणी ऐकतांना तेवढीच फ्रेश वाटतात, रोमँटिक वाटतात, पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात आणि गंमत म्हणजे हि गाणी परत एकदा आपल्याला तिथेच मागे घेऊन जातात. ज्या गाण्यांमध्ये कधी आपण स्वतःलाच पाहिलं होतं, कधी त्या आवाजात रमताना त्या शब्दांमध्ये मनातील पुसटसे भाव शोधले होते तर कधी प्रेमात न पडताही प्रेमात पडल्याची अनुभूती याच गाण्यांनी तर दिली होती.. या हर एक गाण्याशी जोडलेली प्रत्येकाची एक खास गोष्ट होती.   

'ऐ मेरे हमसफ़र, एक ज़रा इन्तज़ार,
सुन सदाएँ दे रही है, मंज़िल प्यार की'....

गाण्याची पहिलीच ओळ ओठांवर रेंगाळणारी. हे गाणं पाहतांना, ऐकतांना या गाण्याने प्रत्येकाला एक स्वप्न दाखवलं आणि प्रेमात पडणं खरंच किती गोड असतं असं वाटू लागलं.. 

'उसने बात की, कुछ ऐसे ढंग से, सपने दे गया वो हज़ारों रंग के, रेहे जाऊँ जैसे में हार के, और चूमे वो मुझे प्यार से.. पेहेला नशा, पेहेला खुमार'... जो जिता वही सिकंदर मधलं एक कमाल गाणं ! हे ऐकतांना, 'अनजाना अनदेखा आने लगा खयालों में ', असं काहीसं व्हायचं. स्क्रीन वर स्वतःला imagine करून, स्वेटर उडवून स्लो मोशन मध्ये गाणं म्हणणारा आमिर बघून सर्वाचा विसर पडायचा..  त्या गुलाबी रंगात मनसोक्त रंगून जावं असं वाटायचं. 

'हम तो मोहब्बत, करते हैं तुमसे, 
हमको है बस इतनी खबर,
तन्हाँ हमारा, मुश्क़िल था जीना, 
तुम जो न मिलते अगर.. 
बेताब साँसें, बेचैन आँखें,
केहेने लगीं, बस यहीं, 
दिल है कि मानता नहीं.. 
या गाण्यात लपलेली गुलाबी जादू आजूबाजूचं जग विसरायला लावायची. 

'अकेले हैं, तो क्या ग़म है, चाहें तो हमारे बस में क्या नहीं, बस इक ज़रा, साथ हो तेरा,तेरे तो हैं हम,कब से सनम, अकेले हैं'... और क्या चाहिये !

गुलाबी रंगामुळे आज परत एकदा या गाण्यांची आठवण झाली, वाटलं खरंच किती वेडे होतो आपण.आज काही क्षणांसाठी का होईना पण त्या आठवणी परत एकदा स्पर्शून गेल्या. या गाण्यांनी आपलं बोट धरून एक वेगळंच जग दाखवलं आपल्याला, काही वेळाकरता का होईना जगाचा विसरही पडला. आजही काळाच्या वेगात धावता धावता अधून मधून तो वेडेपणा आठवला कि हसायला येतं. आयुष्यातील इतक्या हळुवार टप्प्यावर ज्या गुलाबी गाण्यांनी साथ दिली ती गाणी आजही आपल्या सर्वांसाठी खास आहेत आणि कायमच राहतील. 

©कविता सहस्रबुद्धे

मोरपंखी रंग .. मोराच्या पिसाऱ्यात असणाऱ्या सगळ्या रंगांचं प्रतिक ! त्या विधात्याने मोराच्या पिसाऱ्यावर मुक्त हस्ताने रंगांची उधळण केली व त्यातूनच निळा आणि हिरव्या रंंगाच्या विविध छटा निर्माण झाल्या. हिरव्या रंगाची संपन्नता व निळ्या रंगाची स्थैर्यता मोरपिशी रंगात आढळते, हा रंग राधा कृष्णाचे अस्थित्व म्हणून ओळखला जातो. निळ्या रंगातला विश्वास, एकनिष्ठता, आत्मविश्वास, सचोटी तर हिरव्या रंगातली सृजनता, आरोग्यसंपन्नता, नावीन्य या रंगात सामावले असल्याने हा एक परिपूर्ण रंग आहे !


हा रंग अनेक कवींना भुरळ घालतो. मनाच्या अवस्था शब्द चित्रित करतांना हा रंग त्या अचूक टिपतो.
मोरपंखी चाहुलींचे सोबतीने चालणे
अंतरावर पसरलेले, टिपूरसे.. सुखाचे चांदणे !

कधी कधी आठवणींना आपण मोरपिशी आठवण म्हणतो..  मोरपिसाचा स्पर्श अनुभवला तरंच आठवणींना मोरपिसी आठवण म्हणण्यातला भाव समजू शकतो. मोरपंखी रंगाच्या साडीचं सौंदर्य प्रत्येक स्त्रीला खुणावत असतं.

माझ्यासाठी हा राधा कृष्णाच्या प्रेमाचा रंग आहे, हे प्रेम ज्याला समजलं त्याला या रंगांनं वेड लावलं ..

©कविता सहस्रबुद्धे

 

प्रभातीच्या केशराची
कुणि उधळली रास
आणि वाऱ्यावर रंगला
असा केशरी उल्हास!

इंदिरा बाईंच्या या शब्दांमधून एक सुरेख चित्र डोळ्यासमोर उभं राहतं, केशरी रंगाचं!
सकारात्मक ऊर्जा देणारा व मनाला उत्साही ठेवणारा, ऊर्जा आणि आनंदाची भावना प्रेरित करणारा हा रंग.
 
मंद सुगंधी प्राजक्ताच्या इवल्या फुलांमधून डोकावणारा, देवळाच्या कळसावर फडकणारा अगदी देवळातल्या हनुमानाचा रंग सुद्धा हाच! श्रद्धेला, विश्वासाला जोडणारा हा रंग. हा रंग अग्नीचा, साधू संतांच्या पेहेरावाचा. 

सुर्योदय व सुर्यास्ताला क्षितिजावर पसरणारा हा रंग, तो पाहून कवीला 'शाम रंगीन हुई है तेरे आंँचल की तरह' सारखी गाणी सुचतात. 

हा रंग बलिदानाचा, वैराग्याचा.

'तलवारों पे सर वार दिए
अंगारों में जिस्म जलाया है
तब जाके कहीं हमने सर पे
ये केसरी रंग सजाया है…
ए मेरी ज़मीं अफसोस नहीं
जो तेरे लिए सौ दर्द सहे
मेहफूज रहे तेरी आन सदा
चाहे जान मेरी ये रहे ना रहे'..

प्रत्येकासाठी या रंगाचा अर्थ वेगळा, महत्व वेगळं पण तिरंग्यातील हा रंग पाहुन मनी उमटणारे भाव मात्र अगदी एक सारखे !

© कविता सहस्रबुद्धे

 

मराठीतला राखाडी रंग तर इंग्रजीतला ग्रे.. त्याचा उच्चार करतांनाच त्यातला deepness जाणवतो. थोडा नकारात्मक, थोडा उदासीचा, अनिश्चिततेचा तरी संतुलित, वास्तवाचा, परिवर्तनाची ताकत दर्शवणारा रंग !

आजीनं अंगाऱ्याचं बोट कपाळावर लावलं की त्या अंगाऱ्यात, स्वयंपाक घरातील चूल विझली की चुलीतील राखेत, मळभ दाटून आलं की आकाशात आणि मनावर पसरणारा हा रंग, तसा तटस्थ, निःपक्षपाती, परिपक्व, गडद व भावनांकडे झुकणारा ! 

माळरानात निष्पर्ण झालेली झाडे उदास वाटतात, ती याच रंगाची असतात. वयानुरूप येणारी विरक्ती किंवा कमी होत जाणारी आसक्ती दर्शवणारा हा रंग..

Gray refers to cleverness, intelligence, brains, and intellect.. मानवी मेंदूचा रंग आहे हा.

फॅशन,सजावट व ब्रँड ओळख यासाठी हा एक महत्वाचा रंग आहे. पेपर सॉल्ट लुक मधलं देखणेपण म्हणजे याच रंगाची तर जादू आहे.

एकटेपणा व विरह सामावून घेणारा, काही शब्दांमधून डोकावणारा हा रंग..
खाली हाथ शाम आयी है 
खाली हाथ जायेगी 
आज भी न आया कोई
खाली लौट जायेगी,
खाली हाथ शाम आयी है ..

©कविता सहस्रबुद्धे

हिरवा रंग 


मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुने 
सपने सुरीले सपने ...

गुलजार साहेबांनी आपल्या स्वप्नांना सात रंगांमध्ये रेखाटलं, प्रत्येक स्वप्न वेगळं ! 'रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा' म्हणणारा प्रत्येक रंग वेगळा म्हणून त्याच्याभोवती रेंगाळणाऱ्या आठवणी सुद्धा वेगळ्या.

लहानपणी मराठीच्या पुस्तकात 'हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणाच्या मखमालीचे' या ओळींत तर गवतफुला कवितेतील 'हिरवी नाजुक रेशिम पाती' मधला हिरवा रंग नंतर शांता बाईंच्या कवितेत चक्क हिरवा ऋतू झाला, 'ऋतू हिरवा, ऋतू बरवा पाचूचा मनी रुजवा'.

शंकर वैद्यांच्या एका कवितेत तर त्यांनी शांततेला हिरवा रंग दिला.
घराचे पाठीमागले दार उघडले
तेवढाच काय तो कडीचा आवाज
बाकी शांतता... हिरवी शांतता...
गार शांतता...

'निंबोणीच्या झाडामागे' हे अंगाई गीत ऐकतांना कल्पनेत पाहिलेलं निंबोणीचं झाड पण  हिरवं दिसायचं, ती छटा आईच्या स्पर्शाइतकी मुलायम वाटायची.

लहान असताना बोडणासाठी बोलावलं की हिरव्या रंगाचं परकर पोलक घालून आई सोबत जाणं, सुट्टीत झाडाच्या कच्च्या कैऱ्या पाडणं, श्रावणात आई बरोबर पत्री गोळा करणं, श्रावणी सोमवारी बेल, पूजेला विड्याची पानं तुळस आणणं, दारी आंब्याचा डहाळा लावणं.. हे करता करता हा रंग रोजच्या आयुष्याचा भाग बनला. 

'मेंदीच्या पानावर मन अजून झुलतंय ग' गुणगुणताना या रंगानं स्वप्न दाखवलं तर याच रंगाच्या चुड्यानं मेंदीने नटलेल्या हातांमध्ये वरमाला पाहिली. डोहाळ जेवणात याच रंगाच्या साडीत मातृत्वाची चाहूल अनुभवली. याच रंगाच्या पैठणी साडीत तिचं सौंदर्य तसूभर जास्त खुललं.. हा रंग सौभाग्याचं, चैतन्याचं, भरभराटीचं प्रतिक आहे म्हणूनच या रंगाला कायम विशेष महत्व दिलं.

समृद्धतेचं प्रतिक असणाऱ्या या रंगाला आपल्या तिरंग्यात मानाचं स्थान आहे. 

पृथ्वीवर निळ्या रंगासोबत अधिराज्य करणारा हा रंग. या रंगाची किमया कोणीतरी मुक्तहस्ते उधळण करावी तशी सर्वत्र पसरलेली दिसते. म्हणूनच वैशाख वणव्यानंतर या रंगाची चहूकडे पसरणारी जादू पाहण्यासाठी आपलं मन सुद्धा व्याकुळ होतं.

हरी हरी वसुंधरा पे
नीला नीला ये गगन
के जिस पे बादलों की
पालकी उड़ा रहा पवन 
ये कौन चित्रकार है,
ये कौन चित्रकार...

© कविता सहस्रबुद्धे

 पिवळा रंग


विविध रंगांमध्ये मिसळून गेलेले आपलं आयुष्य.. प्रत्येक रंग एक वेगळं नातं घेऊन समोर येतो हे हळूहळू उमगत जातं. पिवळा रंग आत्मविश्‍वास वाढवणारा, मनाला आनंदी आणि उत्साही ठेवणारा सौभाग्याचा, संपत्तीचा आणि वैभवाचा निदर्शक मानला जातो.

सणावारी दारावर शोभून दिसणारं झेंडूच तोरण याच रंगाचं, गावाकडे परसदारातलं श्रीमंती मिरवणारं सोनचाफ्याच्या झाडाचं फुल सुद्धा याच रंगाचं तर प्रवासात रस्त्याच्या दुतर्फा मधेच डोकावणारी सुर्यफुलं आणि डोंगरावरची रानफुलं सुद्धा याच रंगाची ! गर्द पिवळ्या रंगाचं मखमली बाभळीचं इवलं फुलं सुद्धा किती सुरेख दिसतं!

सूर्योदयाला क्षितिजावर डोकावणारा याच रंगाचा सूर्य रोज नवीन दिवसाची नवीन सुरवात करून देतो.. जगण्याची प्रेरणा देतो. लक्ष्मीचा आणि श्रीकृष्णाचा आवडता रंग सुद्धा पिवळा त्यामुळे हा रंग मांगल्याची अनुभूती देतो.

लग्नाच्या वेळी आंब्याच्या पानांनी लावलेल्या हळदीच्या याच रंगानं चेहऱ्यावर विलक्षण तेज येतं तर लग्नाच्या वेळी मामाने घेतलेल्या याच रंगाच्या जरीकाठी साडीवर उभं राहता या रंगाशी अनोखा बंध जोडला जातो, कायमचा..

कुंकवाआधी कायम मानाची जागा घेणाऱ्या हळदीचा हा पिवळा रंग कुंकवासोबत स्त्रीच्या कपाळावर शोभून दिसतो. शुभंकरोती म्हणताना दिव्याच्या ज्योतीचा हाच रंग मनाला शांत, प्रसन्न करतो. नैवेद्याच्या ताटात सुद्धा बहुमान मिळतो याच रंगाला जसं लिंबू, बटाट्याची भाजी, वरण, पुरण अशा विविध पदार्थांमधून तो खुणावत राहतो. 

शिशिर ऋतुमधे तर या रंगाच्या अनेक छटांची पानगळ आपलं लक्ष वेधून घेते. तेव्हा बोरकरांच्या कवितेतील काही ओळी आठवतात,

पिलांस फुटूनी पंख तयांची 
घरटी झाली कुठे कुठे
आता आपुली कांचनसंध्या
मेघडंबरी सोनपुटे..

© कविता सहस्रबुद्धे

 निळा रंग


पिघले नीलम सा बेहता हुआ ये समांँ

नीली नीली सी खामोशियाँ  न कहीं है ज़मीन,न कहीं आसमान... 

समुद्र आणि आकाशाला सामावून घेणारा हा विलक्षण देखणा रंग !
हा रंग ज्ञानाचे प्रतिक मानला जातो त्याबरोबरच हा रंग प्रसन्नता, स्तब्धता, विश्वास, शांतता, स्थिरता या भावनाही निर्माण करतो.निसर्गाच्या अलौकीक शक्तीचा परिचय हा रंग, अव्याहतपणे आपल्याला देत असतो.मोरपिसातला हाच निळा रंग आपल्याला कृष्णाशी जोडतो.

कवी शायर लेखक यांना खुणावणारा, प्रेरित करणारा हा रंग.. 'निले निले अंबर पर चांँद जब आए', 'निला आसमाँ सो गया', 'निले गगन के तले धरती का प्यार पले'..सारख्या गाण्यांमधून आयुष्यात डोकावत राहतो !

ग्रेसांची एक कविता आहे 'निळाई' ..
असे रंग आणि ढगांच्या किनारी
निळे ऊन लागे मला साजणी
निळे घाटमाथे निळ्या राउळांचे
निळाईत माझी भिजे पापणी..

निळ्या रंगाची ग्रेसांनी दाखवलेली जादू तर फार विलक्षण आहे..

निळे सूर आणि निळी गीतशाळा
निळाईत आली सखीची सखी
निळ्या चांदण्याने निळ्या चंदनाची
भिजेना परी ही निळी पालखी...

निळाई सारखा इतका सुंदर शब्द मग फिरून फिरून समोर येत राहिला अगदी वादळाच्या वाटेवरती सुद्धा.. 
 
थोडी सागर निळाई, थोडे शंख नी शिंपले कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले 
कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात स्वप्नपाखरांचा थवा विसावला ओंजळीत.…

हाच निळा रंग कधी गोऱ्यापान निरासग गोड चेहेऱ्याच्या डोळ्यांमधून चमकून जातो. 
मला आठवतंय माझ्या भाच्याच्या जन्मानंतर हॉस्पिटल मध्ये निळ्या रंगात सजलेली ती खोली, तो पाळणा पाहून त्या निळ्या रंगाशी जोडला गेलेला धागा मातृत्वाच्या जवळ घेऊन गेला.

वीर सावरकरांची 'सागरा प्राण तळमळला' कविता वाचताना,ऐकतांना वाटतं ती तळमळ, ती ओढ हा रंग जणू सामावून घेतो आपल्यात !

©कविता सहस्रबुद्धे

लाल रंग 


लहानपणापासून कितीतरी वेळा कौतुकानं आईने केलेलं आपलं औक्षण ! जेव्हा काहीही कळत नव्हतं तेव्हा सुद्धा औक्षण करणाऱ्या आईला पाहून झालेला आनंद व पुढे कळायला लागल्यावर निरांजनाच्या शांत प्रकाशात दिसलेला आईचा समाधानी चेहेरा, आजही तसाच आहे.. आपल्या कपाळावर सर्वात प्रथम तिने लावलेलं कुंकवाचं बोट .. लाल रंगाशी झालेली ती बहुतेक आपली पहिली ओळख, पहिला स्पर्श !

मग तो रंग वेगवेगळ्या रूपांत आसपास कायमच दिसत राहिला. कधी रंगबिरंगी  खेळण्यांमधून, कधी जत्रेत हातात भरलेल्या बांगड्यांमधून तर कधी दुकानांतून डोकावणाऱ्या कपड्यांमधून, कायम खुणावत राहिला ! त्रंबकेश्वरच्या घरी फुललेला जास्वंदाचा लाल जर्द रंग अजूनही स्मरणात आहे. याच रंगाची जादू विड्याच्या आणि मेंदीच्या रंगण्यात अनुभवली आहे !

प्रत्येक वर्षी नवरात्रीत आई सोबत देवळांत गेल्यावर देवीच्या कपाळावरच्या ठसठशीत कुंकवानं सजलेलं तिचं रूप पाहून या रंगाची ताकत हळूहळू गडद होत गेली. सनईच्या मंगल सुरांच्या सोबतीनं लग्नात मंगळसूत्राच्या वाटीत भरलेलं कुंकू पाहून तर या रंगाशी नातं जोडलं गेलं ! 

या रंगानं यश राजची गाणी मनावर कोरली, याच रंगानं सुर्यास्ताला क्षितिजावर नजर खिळवून ठेवली, याच रंगांन दारातील रांगोळी सजवली, याच रंगानं साडीचं वेड लावलं...

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर या रंगाच्या वेगवेगळ्या छटा स्पर्शून गेल्या. आईच्या आजारपणात ब्लड बँकेत काऊंटर वर उभं असताना याच रंगांन कृतज्ञता शिकवली ..

शौर्याचं, पराक्रमाचं प्रतिक असणाऱ्या या रंगाचं आपल्या आयुष्यात असलेलं महत्व या निमित्तानं आज नव्यानं समोर आलं !

©कविता सहस्रबुद्धे


रंग​ - नवरात्र ​

रंग म्हटलं की रंगांच्या कितीतरी छटा नजरेसमोरून धावतात मग ते सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळचे आकाशातील रंग असोत  निसर्गातील किमया असो वा कॅनव्हासवरची जादू .. अगदी आपल्या कपड्यांपासून जेवणाच्या ताटात सुद्धा सामावलेली असते ही रंगांची दुनिया ! 

नवरात्री मध्ये तर प्रत्येक दिवस वेगवेगळ्या रंगामध्ये रंगून जातो. आजचा पहिला रंग, पांढरा !

श्रावणात सोमवारी शंकराच्या देवळांत जातांना परडीमध्ये आवर्जून गोळा केलेली फुलं पांढरी, बाप्पाला आवडतात म्हणून केलेले सुबक, देखणे मोदकही पांढरे ! चांदण्या रात्रीला गंधित करणारी रातराणी व गर्मीमध्ये सुखावणारा मोगरा तो ही शुभ्रच. 

आयुष्यात सदैव सोबत असणारे हे रंग काही वळणांवर मात्र त्यांची  ओळख नव्याने करून देतात.

"इश्क का रंग सफेद .. जिस रंग में सब रंग जावे कभी करे ना भेद, इश्क का रंग सफेद".. रेखा भारद्वाज यांच्या आवाजातील हे गाणं ऐकलं की वाटतं या गाण्यात दिसलेला, अनुभवलेला 'सफेद  रंग' खरंच 'इश्क का रंग' आहे !

"मै शाम को तुम्हे मिलना चाहता हूँ .. लेकीन मेरी चांँदनी बनकर आना, सफेद दुधीया रंग के कपडे पेहेनकर आना" ..
हा डायलॉग संपतो आणि दिसते गच्चीवर वाट बघणारी, शुभ्र कपड्यातली चांँदनी.. तिच्यावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव झाल्यावर त्या लाल गडद पाकळ्यांवर उभी असलेली 'चांँदनी', आजही डोळे मिटले तरी तशीच समोर येते ! 

'जय तिजोरी में काफी माल है, लगता है इस गाव के लोग सोना बहोत पेहेनते है'.. या डायलॉग च्या पार्श्वभूमीवर  दिसणारी पांढऱ्या साडीतील स्त्री .. नंतरच्या प्रसंगात चोरी करणाऱ्या जय वीरुला तिजोरीच्या किल्ता देतांना, 'ये लो तिजोरी की चाबी। इसमे मेरे वो गेहेने है जो मेरे लिए बेकार है, मुझे अब कभी उनकी जरुरत नहीं पडेगी'.. असं म्हणणारी, डोक्यावरून पदर घेतलेली, पांढऱ्या साडीतील ठाकूरची बहू .. तिच्या पेहेरावातला पांढरा रंग फार वेगळा आहे, करूण आहे ..

15 ऑगस्ट, 26 जानेवारीला हाच रंग चैतन्य, उत्साह आणि अभिमानाच रूप घेतो. तिरंग्यातील हा रंग प्रेरणा देतो !

'हॉस्पिटलच्या खिडकीतून मला देवळाचा कळस रोज दिसायचा पण 'तो' मात्र मला इथे भेटायचा हॉस्पिटलमध्ये' .. असं म्हणणाऱ्या पेशंट करता या रंगांचं महत्व, दैवी आहे !

गरमियों की रात जो पुरवाईयाँ चलें 
ठंडी सफ़ेद चादरों पे जागें देर तक 
तारों को देखते रहें छत पर पड़े हुए 
दिल ढूँढता है 
फिर वही फ़ुरसत के रात दिन...

गुलजार .. ज्यांच्या लेखनात कितीतरी अनोखे, वेड लावणारे, जादुई रंग सामावले आहेत ते गुलजार साहेब स्वतः मात्र कायम पांढरे शुभ्र कपडे घालतात.. त्यांच्या संपूर्ण प्रवासाबद्दल वाचलं की वाटतं त्या शांत, समाधानी शुभ्र पेहेरावामागे त्यांनी आपला भूतकाळ सांभाळून ठेवला आहे .. 'जैसे लगता है गुलज़ार कभी अपने माज़ी के गाँव दीना की गलियों से बाहर आए ही नहीं'..

© कविता सहस्रबुद्धे

गृहिणी-मित्र ...एक हजार पाकक्रिया

दिवाळी जवळ आली कि ऑफिसमध्ये लंच टाइमला गप्पांचा विषय आपोआप पदार्थांकडे वळतो. उद्यापासून सुट्टी त्यामुळे कोण कोण काय काय पदार्थ करणार यावर खरपूस चर्चा रंगली होती. प्रत्येक दिवाळीत सणाचा माहोल जसजसा बनत जातो तशी आईची अजूनच आठवण येते. तिने बनवलेल्या फराळाच्या पदार्थांची चव आजही डोळे बंद करून आठवावीशी वाटते... प्रत्येक पदार्थ उत्तम चवीचा आणि त्याच देखण्या रूपाचा बनवायचं वरदान बहुतेक आपल्या प्रत्येकाच्याच आईला मिळालं होतं.आपणही तोच प्रयत्न अगदी मनापासून करतो, आपल्या मुलांकरता.

 YouTube, Cooking Apps, cooking shows, मधुराज रेसिपी च्या जमान्यात पाकशास्त्रातील पुस्तकं काही अंशी मागे पडली कि काय असं वाटत असलं तरी आईनी, सासूबाईंनी आपलं नवीन लग्न झालेलं असतांना दिलेली रुचिरा, अन्नपूर्णा सारखी पुस्तकं आपण आजही आवर्जून वापरतो. काही वर्षांपूर्वी 'गुलाबजाम' नावाची एक देखणी फूड फिल्म आली होती. त्यात एक वाक्य होतं, 'मी तुम्ही केलेल्या डब्यातले पदार्थ चाखले आणि मन आईपाशी गेलं'.. खरंच आपल्या मनातली ती ठराविक चव शोधत असतो आपण प्रत्येक पदार्थात !

आज योगायोगाने पाकशास्त्रावरील ११२ वर्षांपूर्वी प्रकाशित झालेलं लक्ष्मीबाई धुरंधर लिखित ‘गृहिणी-मित्र .. एक हजार पाकक्रिया’ हे पुस्तक हाती लागलं, १९१० मध्ये प्रकाशित झालेलं हे पुस्तक. लक्ष्मीबाई धुरंधर या क्षेत्रातल्या अनुभवी, कर्तबगार व्यक्ती तर होत्याच शिवाय तपशीलवार,सूक्ष्म बारकाव्यासहित नेमकेपणाने आपला विषय मांडणाऱ्या पाककला विदुषी होत्या. मराठीबरोबरच इंग्रजी, गुजराती, उर्दू या भाषा त्यांना अवगत होत्या. या पुस्तकाच्या तेराव्या आवृत्ती नंतरच्या पुढील चार आवृत्त्या त्यांच्या कन्या मंजुळाबाई गोरक्षकर यांनी काही पाककृतींची भर घालून अद्ययावत केल्या. 

या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीच्या एक हजार प्रति तर पुढच्या बारा आवृत्तीच्या दोन हजार प्रति त्या काळी काढल्या गेल्या इतकंच नाही तर या पुस्तकाचे हिंदी व उर्दू मध्ये भाषांतर सुद्धा झाले. तेराव्या आवृत्तीची किंमत तेव्हा पाच रुपये होती. त्या काळी 'राजाश्रय' ही नेहमीच वरदान ठरलेली गोष्ट असे. इंदूरच्या महाराणी इंदिराबाई होळकर यांना पुस्तक आवडल्याचे तसंच दुसरी आवृत्ती काढल्याबद्दल कौतुकाचे पत्र, तसेच महाराणी चंद्रावतीबाई होळकर यांनी पहिल्या आवृत्तीला शंभर रुपये बक्षीस जाहीर केल्याची नोंदही या पुस्तकात सापडते. दोन डझन प्रतींच्या मागणीबरोबरच सयाजीराव महाराजांकडून आलेला टिपरी, पायली या प्रमाणांऐवजी तोळे, मासे यांचे कोष्टक वापरण्याचा अभिप्राय बोलका आहे जो पुढच्या आवृत्तीमध्ये लक्ष्मीबाईंनी पाळला.१९९७ मध्ये विसावी आवृत्ती प्रकाशित झाली तीच शेवटची..

हे पुस्तक पाच विभागांत विभागलं गेलं आहे. पहिला भाग शाकाहारी पदार्थांचा, दुसऱ्या भागात आहेत माशांचे प्रकार, तिसऱ्यात मटण, अंडी वगैरेंचे प्रकार, चौथ्या भागात केक, पेस्ट्री, आइस्क्रीमच्या पाककृती, तर पाचव्या भागात आजारी माणसांसाठी पथ्य पाकक्रिया दिल्या आहेत. या पुस्तकात गुजराती, पारशी, मद्रासी, तामिळी, पारशी, चिनी, इराणी, इटालियन, जपानी पाककृती सुद्धा दिल्या आहेत. २०व्या शतकाच्या आरंभी सेलरी, अस्परॅगस, मश्रूमसारख्या भाज्यांच्या पाककृती देऊन लेखिकेने आधुनिकतेचा वारसा जपला आहे.

पुस्तकातील काही पाककृतींची नावे 'ज्याचे श्रेय त्याला द्यावे' या वृत्तीची आहेत. जसं अहिल्याबाई किर्लोस्करांचे हैदराबादी चकले, काशीताई किर्लोस्करांचे चिरोटे, रमाबाई भक्तांचे आंब्यांचे रायते, नाचणीचे चकले, कमलाबाई बालासुब्रह्मण्यम कडून अय्यर लोकांचे चकले अशी नावं पाककृतींना दिली आहेत. आदान-प्रदान हे पाककृती साहित्याचे वैशिष्टय़ इथे खऱ्या अर्थाने अधोरेखित होते. 

पुस्तकातील केक व पुडिंग या पाककृतींची नावं विशेष आहेत. इंदिरा, गुलाब, गंगा, सुधा, कमला, लीला, लक्ष्मी, शेवंती, केतकी, मधु, वामन, दिग्विजया, वामन, ईश्वर, क्षिप्रसाधन ही काही केकची, तर मनोरमा, दुर्गा, स्नेहलता ही काही बिस्किटांची नावं आहेत. शेवंता, इंद्रायणी, चंपा, ब्रिजबिहारी ही पुडिंगची नावं, तर रासबिहारी काँग्रेस पुडिंग, ठाकरसी हलवा, काजूचा खरवस नावानेही पदार्थ आहेत. काश्मिरी नेहरू मटण, नेहरूपसंत हैदराबादी शिकार आणि विश्वामित्री खिचडी फक्त इथेच मिळेल. 

गरम मसाला, करीचा मसाला,करीचा ओला मसाला, पंचामृताचा मसाला, मद्रासी मसाला, सिंधी मसाला, जैनांचा मसाला, गुर्जरांचा मसाला, गुजराथी सांबारयाचा मसाला, इंग्रजी मसाला, दौरोपयोगी करी मसाला अशी मसाल्याची विविधता आहे. या पुस्तकात चिवडा ‘छबिना’ नावाने आला आहे, त्यातही विलासी आणि कुंजविहारी असे दोन प्रकार आहेत. नॅशनल मराठा आर्मीचा छबिना, बटाटय़ाचा तसंच साबुदाण्याचाही छबिना आपल्याला विस्तृत कृतीसह दिला आहे. 

पुस्तकातील शब्दांचे स्पष्टीकरण जुन्या काळात घेऊन जातं जसं कासला (पेला), शिंगडय़ा(करंज्या), कवड (अर्धा नारळ), सोय (खवलेला नारळ), टोप (पातेले), खोडवे (पंचपात्री), क्यारवेसीड (गोड जिरे),कापट्या (फोडी). अंडी ताजी ठेवण्याकरता सोडियम सिलिकेट किंवा वॉटर स्लस्स् वापरावा हे सुद्धा इथे सांगितले आहे

आधी उल्लेख केलेला 'गुलाबजाम' चित्रपट रिलीज झाला २०१८ मध्ये ज्यात फूड डिझायनींग करता वेगळी टीम होती. चित्रपटाच्या श्रेयनामावलीत आपण ते पहिल्यांदा पाहिलं होतं. पण  आश्चर्याची गोष्ट म्हणजे १९१० मध्ये लिहिलेल्या या पुस्तकांत 'पदार्थश्रृंगार' नावाने उत्तम टिपण आहे. यात टेबलावर नेण्यासाठी पाककृतीचे सादरीकरण कसे करावे यावर आजही उपयुक्त ठरेल अशी माहिती आहे. 

'सार्वभौम रसना महाराणी होणे असल्यास हे पुस्तक संग्रही ठेवा' असं सांगणारं हे पुस्तक नुसतं चाळलं पण समाधान काही झालं नाही. काल गप्पांच्या ओघात काही संदर्भ निघाले म्हणून माझ्या सहकाऱ्याने आम्हाला आवर्जून दाखवण्याकरता आपल्या आजीचं जपून ठेवलेलं हे पुस्तक आज ऑफिस मध्ये आणलं. पुस्तकाचं सुरकुतलेपण पाहूनच त्याच्या वयाचा अंदाज आला आणि ते वाचतांना त्यातील पदार्थ नजाकतीनं करणारी त्या काळातील आपली आजी पण दिसली !

©कविता सहस्रबुद्धे

 गाण्यामागची गोष्ट 

१९६० च्या दशकात सफेद धोतर आणि शर्ट अशा पेहेरावातला एक उंच बंगाली माणूस मर्सिडीज चालवत मुंबईत फिरत असे. तो गाणी गात असे, गाण्यांना संगीत देई व चित्रपट निर्मिती सुद्धा करत असे.. ती व्यक्ती म्हणजेच हेमंत मुखोपाध्याय अर्थात हेमंतकुमार !

गुलजार साहेब त्यांची एक आठवण आवर्जून सांगतात. 'बिमल रॉय अचानक गेले तेव्हा आम्ही बिमलदांची मुलं अनाथ झालो अशा वेळी हेमंतदा पुढे आले. त्यांच्या हृदयात औदार्य, प्रेम काठोकाठ भरलं होतं. त्यांनी प्रत्येकाच्या कामाची व्यवस्था केली. मुकुल दत्त या बिमलदांच्या सेक्रेटरीला त्याच्यातील कवीचे गुण ओळखून बंगाली गाणी लिहिण्याचं तर मला स्वतःच्या चित्रपट निर्मिती संस्थेत हिंदी चित्रपटाची गाणी व पटकथा लिहिण्याचं काम त्यांनी दिलं'.

'दीप ज्वेले जाई' हा असित सेन यांचा बंगाली चित्रपट हिंदीत करण्याची इच्छा हेमंतदांनी असित सेनकडे व्यक्त केली व त्यावर काम सुरू केलं, तो चित्रपट म्हणजे 'खामोशी'. या चित्रपटाकरता गीत लेखनाचं काम होतं गुलजार साहेबांकडे. 'हमने देखी है इन आँखो की मेहेकती खुशबू'.. प्रियकर आपल्या प्रेयसीकडे पाहून हे गीत म्हणतो अशा situation वरती गुलजार साहेबांनी लिहिलेलं हे गीत.

हेमंतदांनी अतिशय सुरेख चाल लावली या गीताला व 'हे गीत लता गाईल'असं जाहीरपणे सांगून टाकलं. यावर गुलजारजींनी प्रयत्न केला समजावण्याचा की एका तरुणाच्या अभिव्यक्तीचं हे गीत एक तरुणी गाते आहे हे कसं वाटेल. पण हेमंतदा आपला निर्णय बदलायला काही तयार नव्हते. शेवटी, हे गाणं रेडिओवर एक तरुणी गाते आहे असं दाखवायचं ठरलं. गाणं रेकॉर्ड झालं, चित्रित झालं आणि गाजलं सुद्धा ! लताजींच्या आवाजातील हे गाणं ऐकतांना असं कधी वाटलंच नाही की हे मूळ गाणं स्त्रीच्या आवाजात रेकॉर्ड करण्यासाठी लिहिलंच नव्हतं. 

असं म्हणतात हेमंतदांच्या संगीताची जादू, त्यांची शैली, त्यांची विख्यात गायकी, कुठलंही अवडंबर नसलेली प्रतिमा, निरागस हळवं मन आणि उत्तम विचारसरणी हे एक फार दुर्मिळ आणि 'रॉयल कॉम्बिनेशन' होतं !

© कविता सहस्रबुद्धे

 गाण्यामागची गोष्ट


शबानाजींच्या जन्मानंतर कैफ़ी आज़मी यांच्या पत्नी शौकत आज़मी पृथ्वी थिएटरमध्ये नोकरी करत होत्या. पृथ्वीराज कपूर यांनी तालमीच्या वेळी छोट्या शबानाच्या देखरेखीसाठी एका आयाची व्यवस्था केली होती. एकदा शौकतजी पृथ्वी थिएटर सोबत टूरवर जाणार होत्या. त्यांनी कैफ़ी साहेबांना लागणाऱ्या पैशाच्या बंदोबस्ताची विनंती केली.संध्याकाळी स्टेशन वर ट्रेन निघायच्या वेळी कैफ़ी साहेबांनी त्यांच्या हातावर तीस रुपये ठेवले जी त्या काळात मोठी रक्कम होती. शौकतजी आश्चर्यचकित झाल्या कि एवढे पैसे त्यांनी कुठून आणले. टूरवरून परत आल्यानंतर त्यांना कळले की, कैफ़ीजींनी पृथ्वीराज कपूर यांच्याकडून शौकतजींच्या पगाराची आधीच उचल घेतली होती. कैफ़ीजींनी पैसे कोठून आणले हे सांगताच शौकतजींच्या चेहऱ्यावर एक हलकं स्मित उमटलं व पुढच्याच क्षणी दोघांचे डोळे निमिषार्धासाठी पाणावले. त्या वेळी ते दोघेही आर्थिक अडचणी हसत खेळत झेलत होते. आपल्या पत्नीचेच पैसे उचल घेऊन तिलाच हातखर्चासाठी द्यावे लागले, यातील अगतिकता कैफ़ी साहेबांना बोचत होती. 

खरं काय हे सांगितल्यावर पत्नीच्या चेहऱ्यावर उमटलेलं ते हलकं हास्य व काळजातलं दुःख जे तिच्या डोळ्यांच्या कडा भिजवून गेलं हे ते कधीच विसरू शकले नाहीत. ती बोच, ती सल त्यांच्या मनांत खोलवर रुतून बसली. दुसऱ्या दिवशी कैफ़ी आज़मींनी आपल्या प्रिय पत्नीच्या भावना शब्दबद्ध करत एक नज़्म लिहिली, जी नंतर त्यांनी आपली मुलगी शबाना काम करत असलेल्या 'अर्थ' चित्रपटांत वापरली.... 'तुम इतना जो मुस्करा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो...'

© कविता सहस्रबुद्धे

 गाण्यामागची गोष्ट 


नैसर्गिक व संवेदनशील अभिनय, मोहक रूप आणि निखळ हास्याची व्याख्या म्हणजे अभिनेत्री स्मिता पाटील ! आपल्या सशक्त अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या स्मिता यांची चित्रपट कारकीर्द केवळ दहा वर्षांची असली तरी अविस्मरणीय राहिली. एका दशकात जवळपास ८० चित्रपटात त्यांनी काम केलं. मराठी, हिंदी, पंजाबी, बंगाली, गुजराती,कन्नड,मल्याळम आणि तेलगू अशा एकूण आठ भाषांतील चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या. अल्पायुषी ठरलेल्या स्मिता पाटील यांनी विविध व्यक्तिरेखांच्या संवेदना व त्यांचं व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावीपणे आणि सूक्ष्म  बारकाव्यांसह अभिव्यक्त केलं व आपल्या अप्रतिम अभिनयाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचं वेगळ स्थान निर्माण केलं. 'जैत रे जैत' व 'उंबरठा' या दोन चित्रपटांतील त्यांची भूमिका आजही विशेष लक्षात राहणारी ! 

'जैत रे जैत' हि गो. नी. दांडेकर यांची अनोखी कलाकृती,कादंबरी.. ठाकर लोकांच्या जीवनातली गोष्ट सांगणारी. या गोष्टीतील नायक नाग्या भगत व त्याची प्रेयसी चिंधी यांची उत्कट प्रेमकथा. निसर्ग व माणसाचं नातं उलगडणारी, मनास भुरळ घालणारी, 'जैत रे जैत' म्हणजे झालेला विजय, तो क्षण येण्यासाठी घेतलेले कष्ट अधोरेखित करणारी गोष्ट ! या चित्रपटातील सर्वच गाणी गाजली. दिदींच्या आग्रहाखातर ना.धो. महानोरांनी तब्बल 16 गाणी या चित्रपटासाठी लिहिली त्यापैकी 'मी रात टाकली' हे एकमेव गाणं दीदींनी गायलं.

आशाताईंच्या आवाजातील..'नभं उतरू आलं, चिंब थरथर वलं, अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात'.. या गाण्याची नुसती आठवण जरी झाली तरी डोळ्यांसमोर ढगांनी गच्च भरलेलं सावळं आभाळ उभं राहतं. सर्व मंगेशकर भावंडांचा एखाद्या चित्रपटाच्या संगीतात एकत्रित सहभाग असणारा हा चित्रपट.  
'नभ उतरु आलं' या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी कोरसमधील एक गायिका अनुपस्थित होती. त्यावेळी लतादिदी यांच्या भगिनी मीना खडीकर या कोरसमध्ये गायला उभ्या राहिल्या.

हृदयनाथजींनी या चित्रपटाची, या गाण्याची एक आठवण एका कार्यक्रमात सांगितली होती. डॉक्टर जब्बार पटेल यांनी 'जैत रे जैत' साठी होकार दिल्यावर बऱ्याच बैठका, चर्चा झाल्या व हा चित्रपट सांगीतिक असावा असं ठरलं. त्याक्षणी हृदयनाथजींना आपल्या आजोळची आठवण झाली, खानदेशची. तिथली लोकगीतं , गाणी लहानपणी ऐकली होती त्यामुळे साहजिकच पुढचा रस्ता माहित होता, गीतकार म्हणून ना.धो. महानोर यांचं नाव मनातं आलं. एका ठिकाणी गाण्याची सिच्युएशन जब्बार साहेबांनी सांगितली पण मनासारखी चाल काही सुचत नव्हती. अखेरीस चाल सुचली आणि महानोरांनी दिलेल्या मीटर मध्ये गीत लिहिलं, तब्बल अठ्ठावीस अक्षरांचं धृवपद ! 
हृदयनाथजी म्हणतात महानोरांची गाणी चालीसकटच जन्म घेतात. चिरतारुण्याचं आशिष घेऊन जन्मलेली आहेत हि गाणी !

© कविता सहस्रबुद्धे

 डॉन


​'जुनं ते सोनं' या म्हणीला सार्थ ठरवत १९७८ मध्ये प्रदर्शित झालेला 'डॉन' चित्रपट The Chase Begins Again म्हणत २००६ मध्ये तर The King Is Back म्हणत २०११ मध्ये sequel पॅटर्न मध्ये रिलीज झाला. ते दोन्हीही चित्रपट थिएटर मध्ये बघितले आणि 'ओरिजिनल डॉन' थिएटर मध्ये पाहता न आल्याचं दुःख प्रकर्षानं झालं. असं म्हणतात 'अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है '.. बिलकुल खरं असावं हे कारण PVR मध्ये मागच्या चार दिवस सुरु असलेल्या फिल्म फेस्टिवल मुळे हा योग जुळून आला. तिथे चित्रपट पाहायला आलेल्या हौशी प्रेक्षकांना पाहून वाटलं, पिढीतलं अंतर पुसलं या माणसानं ! त्याच्या प्रत्येक एंट्रीला शिट्या, त्याच्या प्रत्येक डायलॉगवर टाळ्या आणि प्रत्येक गाण्यावर वय विसरून नाचणारे, ठेका धरणारे दर्दी रसिक प्रेक्षक पाहून त्याच्यावर प्रेम करणारी 'वेडी माणसं' दिसली त्या दिवशी. 

सिंबायोसिस मध्ये काम करतांना मागच्या सतरा वर्षांत अनेक मोठ मोठ्या लोकांना भेटण्याचा, जवळून पाहण्याचा, ऐकण्याचा योग जुळून आला. वेगवेगळ्या क्षेत्रात आपलं मोठेपण जपलेल्या अनेक नामवंत व्यक्तिमत्वांमध्ये जसं म्हणतात ना 'ते आले आणि त्यांनी जिंकलं' असा माहोल मी बघितला एकतर आपले पंतप्रधान आदरणीय मोदीजी आले होते तेव्हा आणि दुसरं नाव म्हणजे साक्षात अमिताभ बच्चन ! 

२०१० व २०१४ मध्ये त्यांना प्रत्यक्ष जवळून बघण्याचा, ऐकण्याचा योग आला तर २०२० मध्ये त्यांनी विद्यार्थ्यांशी online संवाद साधला. आमच्या विद्यापीठात 'मानद प्रोफेसर' असणाऱ्या त्यांना प्रत्यक्ष ऐकणं हा एक विलक्षण सोहळा होता, आमच्यासाठी !

बाबुजी आणि त्यांच्या कविता याबद्दल विचारलं असता ते म्हणाले होते, "कोणत्याही कवितेत जेव्हा आपण स्वतःला बघू शकतो तेव्हाच ती कविता महान होते". 'है अंधेरी रात पर दिवा जलाना कब मना है' या स्वर्गीय हरिवंशराय बच्चन यांच्या काव्यपंक्ती मागील भावना उलगडतांना ते म्हणाले, "जो उजडा हुआ है, बिखरा हुआ है उसको फिर से वापस लाना कब मना है, आजूबाजूला अंधकार असतांना आपण आपला रस्ता शोधायला हवा. हि कविता लिहितांना त्यांच्या मनात नक्की काय होतं हे माहित नाही पण त्यांच आत्मचरित्र वाचल्यावर या कवितेच्या ओळी लिहितांना त्यांच्या मनांत काय असेल हा अंदाज मी बांधला. माझ्या वडिलांच्या पहिल्या बायकोचे लग्नानंतर एका वर्षातच अतिशय वेदनादायी आजारानंतर निधन झाले. त्यांना टीबी झाला होता. वडील तेव्हा शिकवणी घ्यायचे. ४ / ५ मैल चालत जाऊन त्या शिकवणीतून महिना कधी २५ तर कधी जास्तीत जास्त १०० रुपये त्यांना मिळायचे. या दुःखद घटनेनंतर त्यांनी खूप दुःखी कविता लिहिल्या. पुढील तीन चार वर्ष त्यांनी प्रचंड औदासिन्य वातावरणांत घालवली. पुढे एका जवळच्या मित्राच्या घरी ते आईला पहिल्यांदा भेटले, तिच्याशी त्यांची तिथे ओळख झाली, जिथे त्यांनी तिला पहिल्यांदाच पाहिलं होतं. मला वाटतं त्या वेळी त्यांच्या त्या मानसिक स्थितीमध्ये आईचं असं भेटणं त्यांच्यासाठी एक हळुवार घटना होती, जणू आजूबाजूला पसरलेल्या अंधःकारात त्यांच्यासाठी तोच एक दिवा होता, प्रेरणा होती"... हे ऐकून ती कविता परत वाचली !

१९७५ मधला अँग्री यंग मॅन ते ब्लॅक, पा, पिंक, चिनी कम, पिकू पर्यंत झालेलं ते सहज परिवर्तन आणि या यशामागील गुपित जाणून घेतांना ते म्हणाले, "माध्यमं सतत बदलत राहिली अखंडपणे.. तो माझ्यातील बदल नव्हता. अँग्री यंग मॅन मी नव्हतो तर ती एक व्यक्तिरेखा होती, दिग्दर्शकाने साकारलेली. लेखकाने गोष्ट लिहिली, संवाद लिहिले, त्याने त्याच्या गोष्टीतील जागा सुचवली, त्याच्या गोष्टीतील माणसं कशी आहेत हे सांगितलं. आम्ही दिग्दर्शकाचं फक्त ऐकलं, चेहऱ्यावर कोणते भाव हवेत हे पण त्यानेच सांगितलं त्यामुळे हे सर्व श्रेय त्यांच आहे. वयाप्रमाणे येणाऱ्या भूमिका बदलत गेल्या इतकंच. आजही KBC चा भाग बघतांना मी टिपत असतो, माझं काय चुकलंय, काय सुधारणा करायला हवी. तरंच माझं सर्वोत्कृष्ट मी देऊ शकतो, जो प्रयत्न मी करतो"... ऐकून थक्क व्हायला झालं !

आपल्या भूमिकांपैकी त्यांनी दोन व्यक्तीरेखांचा आवर्जून उल्लेख केला, Black चित्रपटातील शिक्षक. एका दिव्यांग मुलीची गोष्ट पडद्यावर साकारताना तिचा शिक्षक तिला प्रेरित करतो. त्या शिक्षकानं तिच्यात जागा केलेला आत्मविश्वास तिचं आयुष्य संपूर्णतः बदलून टाकतो. या चित्रपटाची गोष्ट सांगताना ते म्हणाले "शिक्षकाचं ते रूप साकारणं हा एक हृदयस्पर्शी अनुभव होता. दुसरा अनुभव पिंक चित्रपटातील वकील साकारतानाचा. JUST ONE WORD, TWO ALPHABATES.. ‘NO’.. BUT SO POWERFUL हे अनुभवणं आणि पोहचवणं अजिबात सोपं नव्हतं. मी खूपदा मोडून पडलो, व्यथित झालो.. शेवटच्या सीन मध्ये एक लेडी पोलीस ऑफिसर माझ्याशी हस्तांदोलन करते हा माझ्यासाठी सर्वात भावुक क्षण होता. असे अनेक अनुभव मला समृद्ध बनवत गेले"... 

आपल्या चाहत्यांकरता त्यांच्या हृदयात एक खास जागा आहे, 'My extended family' असं त्यांना संबोधताना कुली चित्रपटाच्या अपघातानंतर चाहत्यांचं मिळालेलं प्रेम हे त्यांच्याकरता अमूल्य आहे. दर रविवारी त्यांची एक झलक पाहायला त्यांच्या घरासमोर एकत्र जमणारा चाहतावर्ग हेच त्यांचं वैभव आहे. 

तुमच्या आयुष्यातील कोणता क्षण तुम्हाला परत जगावासा वाटेल असं विचारता 'हेच आयुष्य परत जगायला आवडेल' असं म्हणतांना भावुक झालेला तो चेहेरा आणि आवाज अजूनही स्मरणात आहे !

डॉक्टर भास्कर बॅनर्जी, इन्स्पेक्टर विजय खन्ना, शेखर, सुबीरकुमार, अमित, जय, राज मल्होत्रा, विकी कपूर, इकबाल , विजय दीनानाथ चौहान, प्रोफेसर सुकुमार सिन्हा,विजय वर्मा, सिकंदर , अँथोनी, बादशहा खान, देबराज सहाय, बुद्धदेव गुप्ता, ऑरो, शेहेनशाह ... अशा कितीतरी भूमिकेतून तो आपल्याला भेटत राहिला आणि आपण त्याच्यावर प्रेम करत राहिलो !

"नीला आसमाँ सो गया" असो  किंवा "मै और मेरी तनहाई, अक्सर ये बाते करते हैं ".. त्याच्या आवाजात डोळे बंद करून कितीही वेळा ऐकलं तरी मन कधीच भरलं नाही. त्या आवाजात सामावलेली गेहेराई, आर्तता प्रत्येक वेळी नव्याने जाणवत राहिली.

"हादसा बनके कोई ख्वाब बिखर जाए तो क्या हो. वक्त जझबात को तब्दील नहीं कर सकता. दूर हो जाने से एहसास नही मरता, ये मोहोब्बत हें दिलोंका रिश्ता .. ऐसा रिश्ता जो सरहदों में कभी तक्सीम नहीं हो सकता.. तू किसी और की रातों का हसीं चाँद सही, मेरे हर रंग में शामिल तू है .. तुझसे रोशन है मेरे ख्वाब मेरी उम्मीदे.. तू किसी भी राह से गुजरे मेरी मंझिल तू हें ".... त्याच्या आवाजातील ही कविता कायम खुणावत राहिली !

छू कर मेरे मन को किया तुने क्या इशारा, रिमझिम गिरे सावन, दो लफ्जों की है दिल कि कहानी या है मोहोब्बत या है जवानी , दिलबर मेरे कब तक मुझे ऐसे हि तड़पाओगे, कसमें वादे निभायेंगे हम, मित ना मिला रे मन का, तेरे मेरे मिलन कि ये रैना, मैं प्यासा तुम सावन, आए तुम याद मुझे गाने लगी हर धडकन, कभी कभी मेरे दिल में खयाल आता हें आणि मै और मेरी तनहाई सारखी रोमँटिक गाणी फक्त त्याच्यासाठीच लिहिली गेली..

गोविंदा बरोबर 'बडे मियाँ छोटे मियाँ' मध्ये तर कधी अभिषेक बरोबर 'कजरारे कजरारे' करताना त्याने आपल्याला सुद्धा ठेका धरायला लावला. डॉन २ पाहतांना त्याची सर याला नाही म्हणत प्रत्येक फ्रेम मध्ये तो अजूनच आठवत गेला. पिंक, पिकू , वजीर,  अशा प्रत्येक नवीन भूमिकेत एक वेगळी छाप पाडून गेला.

"ये तुम्हारे बाप का घर नहीं पोलीस स्टेशन हें, सिधी तरहा खडे रहो', म्हणणारा जंजीर मधील इन्स्पेक्टर विजय खन्ना , "जाओ पेहेले उस आदमी का साइन लेके आओ जिसने मेरे बाप को चोर कहां था", म्हणणारा विजय वर्मा , "मुछे हो तो नत्थुलाल जैसी वरना ना हो ", म्हणणारा विकी कपूर. " जिस तरह गोबी का फुल फुल होकार भी फुल नहीं होता वैसे गेंदे का फुल फुल होकर भी फुल नहीं होतां", म्हणणारा प्रोफेसर सुकुमार .. प्रत्येक भूमिकेत बहरत गेला.

"पीटर तुम लोग मुझे वहांँ ढुंढ रहे थे और मैं तुम्हारा यहाँ इंतजार कर रहा था".. दिवार मधला हा डायलॉग जितका लक्षांत राहिला तेवढाच तो म्हणतांना खुर्चीवर पाय पसरून बसलेला अन् तोंडात बिडी असलेला निळ्या शर्ट मधला विजय वर्मा सुद्धा .." मैं जानता हूँ के तू गैर हैं मगर यूंँ हि ", म्हणणारा कभी कभी मध्ये त्या पांढऱ्या कोट मधे जितका आवडला तेवढाच "तेरी रब ने बना दि जोडी तेरी रब ने ", म्हणतं भांगडा करतांना. कधी तो  हैदराबादी जाफ्रानी पुलाव करणारा बुद्धदेव म्हणून आवडला तर कधी "माय नेम इज अँथोनी गोन्साल्विस" म्हणणारा  .. याराना मध्ये "तेरे जैसा यार कहाँ, कहाँ ऐसा याराना", म्हणतं त्याने आपल्याही डोळ्यांत पाणी आणलं. मुकद्दर का सिकंदर, सुहाग, सिलसिला, त्रिशूल , शराबी, दिवार , शोले याची किती पारायणं केली ते कधी मोजलच नाही. प्रत्येकाने भरभरून प्रेम केलं त्याच्यावर ..

आजही त्याचा उत्साह, स्वतःला कामात झोकून देण्याची वृत्ती, नवनवीन प्रयोग करण्याची तयारी, तो हसरा चेहेरा, कानांत साठवून ठेवावा असा आवाज ऐकून वाटतं त्याच्याकरता Age is just a number ! म्हणून तर अजूनही सहस्त्रचंद्रदर्शनाच्या वयाकडे तो झुकलाय असं अजिबात वाटत नाही!

'Walking into the 80th' म्हणत gracefully वयाची ऐंशी वर्ष पूर्ण करणाऱ्या 
आपल्या सर्वांच्या लाडक्या सुपरस्टारला, अमितजींना अनेकानेक शुभेच्छा !

©कविता सहस्रबुद्धे

कुछ कहानियाँ कुछ कवितायें आपके अकेलेपन में साथ होती है 

उस वक्त़ जब आप भीड़ से परे अपने साथ होते है ...

किसीके दूर जाने से पता चलता है पास होने का सही अर्थ,

तब तब वो कविता कहानियाँ उस पुरे खालीपन को भर देती है…. 

मेरे लिए वो कविता, कहानी, वो नज़्म और गझ़ल कुछ खास है 

क्यो की उसमें छिपी मासुमियत किसी के होने का सबूत है...

लोग केहेते है गझल में दिल की बात छिपी होती है, 

मेरी छोटी सी ये नज़्म जिंदगी की खुबसुरती बयाँ करती है !!

-Kavita

 १९४२ A love story ... या चित्रपटातील सगळीच गाणी खूप गाजली. नुसती गाजलीच नाही तर पंचमदांना त्यांच्या संगीतासाठी व जावेद अख्तर यांना गीतलेखनासाठी फिल्मफेअर अवॉर्ड सुद्धा मिळालं. एवढंच नाही तर कविता कृष्णमूर्ती यांना ' प्यार हुआ चुपके से' व कुमार सानू यांना 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा', या गाण्याकरता बेस्ट सिंगर फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं. 

दुर्दैव हे की, या चित्रपतटातली सगळी गाणी गाजली मात्र हे बघायला आरडी आपल्यात नव्हते.  

विधु विनोद चोप्रा यांनी या सिनेमाची तयारी सुरू केली तेव्हा गीतलेखक जावेद अख्तर यांच्याकडे गाण्यांची जबाबदारी दिली. चित्रपटाची कथा जरी प्रेमकथा असली तरीही तिला स्वातंत्र्यसंग्रामाची पार्श्वभूमी होती. स्क्रिप्टमध्ये गाण्यांच्या जागाही तयार केल्या गेल्या. जावेद साहेबांनी पटकथा ऐकली तेंव्हा त्यांना त्यात एका रोमॅंटिक, हळूवार गाण्याची जागा दिसली. त्यांनी विधु विनोद चोप्रा यांना सांगितलंही की एक गाणं यात चपखल बसू शकेल पण त्यांनी ते काही मनावर घेतलं नाही. जितकी आहेत तितकी गाणी पुरेशी आहेत असं त्याचं म्हणणं होतं. 

गाण्याच्या मिटींगसाठी जावेद अख्तर आणि विधु विनोद चोप्रा आरडींकडे गेले असता जावेद अख्तरनी सहज बोलता बोलता आरडींच्या कानावर ही गोष्ट घातली. विधू विनोद म्हणाले की ऐकवा गाणं. आता गंमत अशी की, गाण्याच्या बाबतीत जावेद साहेब आग्रही असले तरीही गाणं तयार नव्हतंच. गाणं ऐकवा म्हटल्यावर जावेद साहेबांकडे लिखित बोल नव्हतेच.

त्यांनी सजच वर्णन केल्यासारखी एक ओळ समोर केली,'एक लडकी को देखा तो ऐसा लगा'.. ही ओळ ऐकून आरडी लगेचंच उत्सुक झाले. यावर उत्तम गाणं बनू शकेल असं त्यांना वाटलं. विधु विनोद चोप्रा यांनाही आता वाटू लागलं की गाणं घालणं योग्य होईल. या गाण्यामुळे सिनेमाला एक छानशी गती, र्‍हिदम येतोय. त्यांनी जावेद साहेबांना म्हणलं द्या गाणं.

त्यांनी तिथल्या तिथे सुनावलं,”लेना हि नहीं था तो मैं गाना लिखू क्यू”? आरडी मधे पडत म्हणाले की, ठीक आहे. नसेल लिहिलं तर आता लिहा. जावेद अख्तर म्हणाले आधी तुम्ही धून बनवा मी त्यावर शब्द रचतो.यावर आरडींनी कुरघोडी करत सांगितलं की ठीक आहे पण अंतर्‍यामधे या सुंदर लडकीसाठी सगळ्या उपमा आल्या पाहिजेत. जावेद साहेब तयार झाले मात्र आधी धून यावर अडून राहिले.आरडी म्हणाले की अरे धून बनाओ क्या? समझो बन चुकी आणि हार्मोनियम पुढ्यात ओढून त्यांनी त्यावर सुरावटी छेडायला सुरवातही केली. हार मानतील ते जावेदसाहेब कसले? शिवाय त्या काळात जावेद अख्तर हे अक्षरश: अर्ध्या तासात गीत लिहिण्यासाठी ओळखले जात असत. बसल्या बैठकीत गाणी लिहिण्यात त्यांचा हातखंडा होता.

या गाण्याच्या अनुभवाबाबत नंतर एकेठिकाणी बोलताना जावेद अख्तर म्हणाले की, "आरडी यांच्या मेंदूत विचार नाही तर सतत संगीत वाजत असायचं. अक्षरश: अर्ध्या अर्ध्या मिनिटात ते एखादी भन्नाट धून बनवून टाकायचे. आपल्याला अंतरा सूचेपर्यंत त्यांचा मुखडा तयार असायचा. हे माहित असूनही मी त्यांना हे आव्हान का दिलं असेल? हा प्रश्न मला आजही पडलेला आहे".. तर बॉल पुन्हा जावेद अख्तर यांच्याकडे टोलवला गेला. साक्षात सरस्वती जिथे वास्तव्याला तिथे शब्दांची काय कमतरता? जावेदसाहेबांनी हे आव्हान स्विकारलं आणि तिथल्या तिथे धडाधड उपमा सुचवल्या.मात्र या उपमा शोधतानाही त्या सोज्वळ असल्या पाहिजेत असा जावेद अख्तर यांचा आग्रह होता. दारू, नशा असे शब्द त्यांना अजिबात नको होते. कशा बशा दोन अंतर्‍या इतक्या उपमा शोधत त्यांनी ते गाणं अर्धं मुर्धं पूर्ण केलं मात्र तिसर्‍या अंतर्‍यापर्यंत ते थकून गेले.त्यांनी या दोघांकडे थोडी सवलत मागितली. शुध्द, सात्विक, सोज्वळ गाण्याच्या मिटरमधे बसणार्‍या उपमा शोधण्यासाठी त्यांना दोन दिवस लागले. मात्र यानंतर जे गाणं तयार झालं ते हिंदी चित्रपट संगीतात अजरामर झालं.एक दोन नाही तर तब्बल २१ उपमा वापरून हे तरल गाणं बनलं. या गाण्यासाठी गायक कुमार सानूला, गीतलेखनासाठी जावेद अख्तर यांना आणि संगीतासाठी आरडी यांना पुरस्कार लाभला. अर्थात हा पुरस्कार या गाण्याचा वाजवी हक्कच होता हे शंभर टक्के !