Friday, April 29, 2022


कॅनव्हास वर रेखाटलेलं जग माझं सुंदर होतं
रुजलेली संस्कृती, बावनकशी सोनं होतं
माणसाला 'माणूस' हीच खरी ओळख होती
जातीपातीच्या विकृतीला इथे मुळी जागाच नव्हती

'भारतरत्न' अशीच त्यांची जूनी इथे ओळख होती
मनाच्या इवल्या कोंदणामध्ये जाणीव ती शाबूत होती
टक्क्यांचं राजकारण ते पार वेशीच्या बाहेर होतं
माणूस म्हणून प्रत्येकाला आत अढळ स्थान होतं

कलाकाराला जात नसते असं 'नाना'च म्हणायचे
'सैनिकाला आठव रे' कधी दरडावून बजावायचे
मिठी मारतांना टोपी, जानवं आड कधी आल नाही
केशरी हिरव्या रंगांची वाटणी कधी जमली नाही

शिदोरीमध्ये काय आहे हे पक्क ध्यानी होतं
शिवबा जिजाऊ करता, मन आतून ऋणी होतं
घरामध्ये सुरकुतलेले सैनिकाचे खंबीर हात होते
देशप्रेम दाखवायला 'ठरलेले' काही वार नव्हते

आता मात्र कॅनव्हासवरचं चित्र पार बदललंय
अनोळखी वाटावं इतकं सारं काही हरवलंय
रंगांची जादू आतां मनावरती पसरत नाही
कोणत्याच शब्दांमध्ये व्यथा काही मावत नाही...


Thursday, April 28, 2022

 पुस्तक प्रकाशन कार्यक्रमांत सुचलेलं काही .. 


पुस्तक काढणं हा इतका इमोशनल कारभार असतो हे नुकतंच अनुभवलंय, आम्ही सर्वांनी. हा कविता संग्रह प्रकाशित होत असतांना एक वेगळा आनंद आणि समाधान तर नक्कीच आहे पण त्याच बरोबर इथंवर कसे पोहचलो तो संपूर्ण प्रवास आज या निमित्ताने आठवतोय. 
खरं तर माझ्या नावातच 'कविता' आहे. माझ्या जन्मानंतर बाबांनी माझ्यावर एक छान 'कविता' केली आणि कौतुकाने माझं नाव ठेवलं, 'कविता'.  पहिलं अपत्य म्हणून त्यांना झालेला आनंद फक्त डोळ्यांमधूनच नाही तर त्यांच्या शब्दांमधून सुद्धा अगदी ओसंडून वाहिला. आज बाबा नसले तरी त्यांच्यासाठी माझ्या जन्माचा क्षण किती मौल्यवान होता ते आजही 'ती' कविता वाचतांना प्रत्येक शब्दांतून जाणवत राहतं. माझ्याशी जोडलेला तो धागा आईशी जोडणाऱ्या नाळे इतकाच अलवार होता आणि कायमच राहील ! कवितेशी झालेली माझी ती पहिली ओळख...
पुढे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर बाबांकडून मिळालेला लेखनाचा हा वारसा किती अमूल्य आहे याची जाणीव होत गेली. आपल्या भावनांना शब्दांत मांडून, व्यक्त होण्यातील आनंद आणि त्यातून मिळणारं समाधान किती विलक्षण असतं ते प्रत्यक्ष अनुभवता आलं. अगदी लहान असतांना, आई बाबांनी केलेल्या संस्कारांमधून, अंगाई गीत, बडबड गीतांमधून त्यांनी नवनवीन शब्दांच्या मोहक दुनियेत नेलं.  बाराखडीतील प्रत्येक अक्षर आणि त्या अक्षरापासून सुरु होणारे वेगवेगळे शब्द बोबड्या बोलात आईबरोबर म्हणताना मातृभाषेशी खऱ्या अर्थाने ओळख झाली. चांदोमामा, भोलानाथ या शब्दांमध्ये लपलेला गोडवा त्यांनीच तर दाखवला. 
पुढे भाषेची गोडी लावून, मायेनं बोट पकडून भाषा आणि आमच्यातील दरी मिटवून, साहित्याच्या जादुई दुनियेची सफर घडवली आपल्या शाळेतील शिक्षिका सौ. देव बाई  सौ. कानडे बाई यांनी. मराठी फक्त एक विषय म्हणून त्यांनी कधीच शिकवला नाही तर या भाषेची श्रीमंती जवळून दाखवली. एकीकडे भाषा समृद्ध होत असतांना दुसरीकडे एक चांगला माणूस म्हणून घडवलं रजनीताई, मंगलताई, लता कुलकर्णी बाई, देसाई सर,रजपूत सरांसारख्या शिक्षकांनी ! म्हणून तर अभिनव विद्यालय शाळेशी जोडणारा तो धागा आजही जपला आहे,आम्ही ! शाळेनं आमचं निरागस बालपण पाहिलं, किशोरावस्था पाहिली, आम्हाला घडतांना पाहिलं !
याच शाळेने दिलखुलास मैत्री करायला शिकवलं, आयुष्यभर सोबत राहील असा मित्र परिवार दिला. बाहेरच्या जगात मैत्रीचं नातं जोडायला शिकवलं. पुढे आयुष्यात मैत्री मधला निरपेक्ष भाव मनाच्या इतक्या जवळचा झाला की प्रत्येक नवीन कविता केवळ मैत्रीतच उलगडली आणि तिथे मिळालेली कौतुकाची थाप कायमच पुढे जाण्यास प्रेरित करत राहिली. आई बाबांनंतर कायम पाठीशी असणारे हात होते, माझ्या कुटुंबाचे. त्यांच्याकडून मिळणारं  प्रोत्साहन परिपूर्णतेचं समाधान देणारं होतं. 
वेगवेगळ्या मनस्थितीत जिने साथ दिली ती कविता. कधी सुचलं म्हणून तर कधी लिहिण्याचं निमित्त मिळालं म्हणून लिहिलेली कविता. अनेक नाती निभावतांना मनाशी जपलेलं एक अलवार नातं म्हणजे कविता.  ती कायमच माझ्या सोबत होती,  माझ्यापुरती होती. आता ती सर्वांची आहे.... 
 
मराठी भाषेतर अनेक शब्द माहिती जरी असले तरी रोजच्या आयुष्यात काही शब्द आपण फारसे वापरत नाही. पण मग कधीतरी 'कूल मॉम' बनून गप्पा मारताना काही शब्दांचे संदर्भ आपसूकच बोलण्यात येतात.काल संध्याकाळी मी आणि कांतेय स्कुटी मध्ये पेट्रोल भरण्याच्या कारणाने बाहेर पडलो होतोच मग जवळपास एक चक्कर मारायला गेलो. आजवर आम्ही दोघांनी कारपेक्षा जास्त मजा याच स्कुटी वरती केली आहे. तो लहान असतांना मी स्कुटी चालवतांना तो समोर उभा राहायचा. तेव्हा साहजिकच माझ्या गाडीचा स्पीड अगदी जेमतेम असायचा. कांतेय बोबड्या आवाजात म्हणायचा सुद्धा, 'आई  शायकलनी आपल्याला ओव्हलटेक केलं, जोलात चालव स्कुटी '.. म्हणजे कधी कधी सायकल वाला सुद्धा आमच्या पुढे जायचा पण आम्ही मात्र आरामात मस्त रमत गमत जायचो. 

गाडीवर पुढं उभं करतांना मी एका ओढणीने त्याला माझ्या पोटाशी बांधून उभं करायचे. त्यामागे खरं तर दोन कारणं होती. एकतर मला खूप सुरक्षित वाटायचं त्यामुळे, आणि दुसरं कारण होतं माझा पुतण्या. माझा पुतण्या अगदी लहान जेमतेम अडीच तीन वर्षाचा असताना गाडीवर समोर उभं करून कुठे जात असलो आणि जाताना वाटेत सिग्नलला गाडी थांबली कि खाली उतरून जायचा. 'गाडी थांबली कि उतरायचं' एवढं सोपं होतं त्याचं लॉजिक त्यामुळे आपले दोन्ही हात गाडीच्या हॅण्डल वरती असले तरी त्याखालून तो सहज उतरु शकायचा. ते पाहून मी कांतेयला ओढणीने माझ्याशी बांधून उभं करायचे जेणेकरून तो असं काही करणार नाही. ऑफिसला जातांना सकाळी त्याचा बाबा त्याला आजीकडे सोडायचा आणि संध्याकाळी ऑफिस मधून येतांना मी त्याला आजीकडून घेऊन यायचे. त्यामुळे रोज संध्याकाळी आमची स्कुटीवर चक्कर हि ठरलेली.  

कोथरूड पासून घरापर्यंत तेव्हा वाटेत जेमतेम चार सिग्नल लागायचे. मग सिग्नल का असतात, त्याचे वेगवेगळे रंगीत दिवे आपल्याला नक्की काय सांगतात हे मी त्याला शिकवायचे. मग काय प्रत्येक सिग्नल आला कि Green says go, Orange says slow and Red says stop याची उजळणी व्हायची. सिग्नलला थांबलं कि मग किती जण सिग्नल तोडून गेले हे आम्ही मोजायचो. रस्त्याच्या बाजूला कोणती झाडं आहेत, कोणत्या रंगांची फुलं त्यावर येतात हे बघता बघता गुलमोहर, बहावा सारख्या झाडांची फुलं त्याला आवडू लागली. मग कधी बाजूने जाणाऱ्या वेगवेगळ्या रंगीत गाड्या कोणत्या आहेत हे ओळखताना गाड्या आणि त्यांचे ब्रॅण्ड्स याची हळूहळू त्याला ओळख झाली. वाटेत फळं भाज्या विकत घेतांना पुस्तकातील त्यांची चित्र आणि दुकानांत ठेवलेली खरी खुरी फळं भाज्या पाहून त्याला वेगळी मजा यायची. एकूण काय तर रोज वेगवेगळे विषय असायचे आम्हाला स्कुटीवर बोलायला. आजही तीच परंपरा चालू आहे पण सध्या विषय मात्र फार फार वेगळे असतात बरं का , पण ती रंगत मात्र आजही कायम आहे. आता केव्हातरी Starbucks ची कॉफी ती रंगत अजून वाढवते इतकंच !

काल अशीच चक्कर मारून आम्ही दोघ घरी येत होतो. घराजवळ कोपऱ्यावर आलो आणि आठवलं सासूबाईंना एका ठराविक रंगाचं दोऱ्याचं रीळ हवंय ते. मग काय गाडी थांबवून ते आणायला मी कांतेयला दुकानांत पाठवलं आणि मी मात्र स्कुटीवर बसून त्याची वाट बघत होते. इतक्यात एक गाडी समोरून आली आणि अगदी बाजूला येऊन थांबली. कोणी अशी जवळ येऊन गाडी थांबवली म्हणून आत पाहिलं तर तेजस आणि त्याची मैत्रीण. नुकतंच लग्न ठरलंय दोघांचं आणि याच महिन्यात साखरपुडा आहे. 'अब मुझे रात दिन तुम्हारा ही खयाल है, क्या कहूँ प्यार में दिवानो जैसा हाल है'.. अशा रोमँटिक जगांत वावरणाऱ्या त्या CUTE जोडीला पाहून  मी म्हटलं 'अरे वाह, आज जोडीनं आणि असा अचानक का थांबलास', तर म्हणाला,' अग आईने सांगितलं मला, कविता ताई म्हणत होती तेजस नी अजून ओळख नाही करून दिली म्हणून थांबलो तुला पाहून'....... " हाहाहा ... अरे आता घरी ये घेऊन हिला, रस्त्याच्या मधोमध करून दिलेली हि ओळख काही खरी नाही '..असं मी म्हणताच दोघंही 'हो,नक्की येतो, असं म्हणून गेले सुद्धा .. फार फार गोड दिवस असतात नाही हे !

इतक्यात दोऱ्याचं रीळ घेऊन कांतेय दुकानातून आला. मला म्हणाला "कोण होतं ? " मी म्हटलं, "अरे तेजस दादा आणि त्याची गर्ल फ्रेंड"..."OK आणि आई, गर्ल फ्रेंड काय म्हणतेस ? दादाचा आता साखरपुडा होणार आहे ना मग Fiancee म्हण".. 'hahaha .. Fiancee...OK .. Fiancee म्हणते "... मला तर एकदम मजा आली कांतेयचे हे वाक्य ऐकून. मग काय घरी आल्यावर पार्किंग मध्ये गाडी पार्क करून लगेच  काकूंच्या घराची बेल वाजवली. काकूंनी दार उघडताच 'काकू, तुमची सून भेटली होती आता रस्त्यात, finally पाहिलं बरका मी तिला', हे तोंडावर आलेले शब्द गिळून टाकले मी आणि म्हटलं ,"काकू, तेजस आणि त्याची Fiancee भेटले आत्ता वाटेत , खूप गोड आहे हं ती"....हे ऐकून त्या Fiancee शब्दांतील जादू काकूंच्या चेहऱ्यावर सुद्धा एक छानसं smile देऊन गेली  !!!!

सिने में जलन आँखो में तुफान सा क्यो है ...

कधी कधी गाण्याची एकच ओळ मनातलं सारं काही सामावून घेणारी आणि मनांत नक्की काय चालू आहे ते व्यक्त करणारी असते. खरं तर वरवर दिसायला छोटं असलेले कारण पण जुन्या खपल्या ताज्या करून जातं. मनाचा ठाव लागत नाही. वाईट नक्की कशाचं वाटलंय हे सांगताच येत नाही. ते सारं काही डोळयांतून आपोआप ओघळून जातं.....  

चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो.. ये रात ये चाँदनी फिर कहाँ सुन जा दिलकी दासता.... हम आपकी आँखों में इस दिलको बसा दे तो... जो बात तुझमें है तेरी तसवीर में नहीं... मै जिंदगी का साथ निभाता चला गया.. तुम आ गए हो नूर आ गया है ... जब भी ये दिल उदास होता है... बीती ना बिताई रैना .. मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है .... तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हूँ मै.... ए ज़िंदगी गले लगा ले...  

Play list  मधली हि काही गाणी कितीही वेळा ऐकली तरी मन भरत नाही, अशी चिरतरुण आहेत. या गाण्यांवर आपण प्रेम करतो, आपल्या आधीच्या पिढीनं सुद्धा केलं कदाचित या गाण्यांतच जगली ती पिढी. पण पुढची पिढी करेल का या गाण्यांवर प्रेम असा प्रश्न मला नेहमीच पडतो.  

दिवसभरात हि गाणी ऐकली नाहीत असं होत नाही. रोज ऑफिस ला जाताना, येताना बसमध्ये हिच गाणी तर सोबत असतात. सध्या मात्र मिळणारा मोकळा वेळ केवळ याच गाण्यांसाठी असतो. प्रत्येक गीतकाराची जादू वेगळी. हो, जादूच कारण इतकी वर्ष झाली तरी ओठांवर हीच गाणी आहेत. सलग तीस तीस चाळीस चाळीस वर्ष या क्षेत्रांत काम करून या लोकांनी जे काही अद्भुत करून ठेवलंय ना, तो खरंच खजिना आहे, आपल्यासाठी.

आपल्या आयुष्यात कधी सूर हरवला तर हाच सूर साथ देतो. 'गमों का दौर भी आये तो मुस्कुराके जियो', हि ऊर्जा देतो. 'जाने क्या मैने कहीं, जाने क्या तुने सुनी, बात तो बन हि गयी' सारखं चुटकीत मनातलं समोरच्या पर्यंत पोहचवायची खुबी सांगतो. भूतकाळाच्या आठवणी मनांत रुतल्या असतील तर चिंब सरींमध्ये ' जिंदगी भर नहीं भुलेगी वो बरसात कि रात ' हे गाणं आपल्यासाठी गातो आणि 'हाए जिस रात मेरे दिल ने धड़कना सीखा', या ओळीवर हृदयाची धडधड वाढवतो. ' किसी के मनाने में लज्जत वो पायी की फिर रूठ जाने को जी चाहता है ' म्हणत आपल्याला शायरी शिकवतो तर कधी आयुष्यात पडणाऱ्या प्रश्नांकडॆ पाहून ,' तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हूँ मै'... असं गुणगुणायला. कोणाची आठवण आली तर,' बीती हुई बतियाँ कोई दोहराये, भूले हुए नामों से कोई तो बुलाए,' या ओळींवर रेंगाळण सुद्धा शिकवतो.

हे सगळं लिहायचं कारण म्हणजे आज एक गोष्ट घडली... ' अजीब दासता है ये , कहाँ शुरू कहाँ ख़तम '  हे गाणं मी ऐकत होते. कांतेय बाजूलाच त्याच काही काम करत होता. गाणं संपलं आणि त्या निवेदकाने 'साहिर '.. असं म्हणताच मी pause करून कांतेय ला विचारलं कांतेय तुला साहिर कोण माहिती आहे ? तो एका क्षणांत म्हणाला,' साहिर लुधियानवी,एक मोठे LYRICIST'.. सुखद धक्का होता माझ्यासाठी. खरंच त्याच्या नावातील जादू ( साहिर म्हणजे जादूगार) आजही कायम आहे.  पुढच्या गाण्याच्या आधी 'संपूर्ण सिंग कालेरा' असं त्या निवेदकाने म्हणताच मी फक्त कांतेयकडे पाहिलं आणि तो म्हणाला, 'आई गुलजार .. मला माहिती आहे ग '.. आणि गाण्याचा ओळी सुरु झाल्या , 'तुम आ गये हो , नूर आ गया है'... आज हि गाणी ऐकतांना मला अजूनच गोड वाटली  !!!




 

वाणिज्य शाखेतील पदवी मिळवलेल्या मला सखोल तांत्रिक ज्ञान नसल्याची खंत अधूनमधून डोकावत असते. दर वर्षी, ऍडमिशन सोहळा सुरु झाला कि माझ्या सोबत मुलाखतीच्या पॅनल वर कायम Technically strong expert असतो, to balance असं म्हणू शकतो हवं तर. मग त्याने aspirants ला विचारलेले प्रश्न मी मनातल्या मनात स्वतःला विचारात असते. दर वर्षी स्वतःची अशी एक परीक्षा कळत नकळत parallel mode वर चालू असते माझी. score काय होतो हा वेगळा विषय आहे, ते हि विचार करायला लावणारा.. 
तर आज जेवतांना काय झालं, एका पॅनल वर आलेल्या इंडस्ट्री मधील एका सिनियर एक्स्पर्टचं मनापासून कौतुक माझा एक प्राध्यापक सहकारी करत होता. जसं वेगवेगळ्या क्षेत्रातील त्यांच ज्ञान, अनुभव कितीतरी दांडगा आहे, केवढी चौफेर माहिती आहे त्यांना वगैरे वगैरे.. जे अगदी खरं आहे आणि जे मी पण अनुभवलंय, बरेचदा त्यांच्याशी बोलतांना. अगदी थक्क व्हायला होईल इतकं व्यापक ज्ञान आहे त्यांच्याकडे. कोणत्याही विषयावर ते अभ्यासपूर्ण बोलू शकतात. तर झालं असं, त्यांची तारीफ करतांना त्याने एक इंग्रजी वाक्य वापरलं, 'his knowledge spectrum is very very wide'...हे शब्द ऐकतांना मी विचार केला 'असं माझ्याबद्दल कोणी कधीच म्हणू नाही शकणार यार'.. आणि नकळत माझ्या तोंडून एक वाक्य बाहेर पडलं, एकदम उत्स्फुर्त प्रतिक्रिया होती ती माझी, ' my knowledge spectrum is too limited, but it's too deep ha' .. याची प्रचिती अनेकदा अनुभवलेला माझा सहकारी या वाक्यावर खळखळून हसला व म्हणाला 'या वाक्याचं पेटंट करून ठेव'... 
एकूण काय तर कधीकधी इंग्रजी भाषेतून पण समजतं आपला knowledge spectrum काय आहे ते !

 'आमच्या वेळचं पुणे नाही राहिलं आता' .. असं म्हणायला सत्तरी पार करण्याची काहीच गरज नाहीये, चाळीशी पार केलेले आपण पण बोलू शकतो हे वाक्य, इतका चेहरा मोहरा पार बदललाय आपल्या पुण्याचा. 'जुनं ते सोनं म्हणायचं कि नवीन ते प्लॅटिनम' हेच कळत नाही आता. शाळेत असतांना जो कर्वे रस्ता होता तो अजूनही आठवत राहतो, डोळ्यासमोरून जात नाही. कोथरूड वरून निघालं कि मृत्युंजयेश्वर मंदिर मग मारुती मंदिर मग दशभुजा गणपती मंदिर आणि नंतर यायची शाळा. शांत रस्ते,भरपूर झाडी, ना कोलाहल ना ट्रॅफिकचा कल्लोळ.. पण आता तर सारं चित्रच पालटून गेलंय.मेट्रो काय आली, तिने तर 'पुरे घर का रंग हि बदल डाला'. बरं, हि तक्रार अजिबातच नाही पण आजूबाजूचं सारं काही ज्या वेगानं बदलत आहे ना ते पाहून आठवण येते आपल्या जुन्या पुण्याची इतकंच. 


नुसतंच रस्त्याचं रूप नाही बदललं तर इथली माणसं सुद्धा बदलली आहेत. सतत कशाच्या तरी मागे धावतायेत असं वाटतं. सिग्नलच भान नाही, गाडी चालवतांना सुद्धा मोबाईल लागतो आणि कानांत हॅन्ड्स फ्री. कुठेतरी पोहचायचं एवढंच ध्येय घेऊन बाहेर पडलेली आणि त्यासाठी गाडीवरून धावणारी असंख्य मंडळी आजूबाजूला दिसत राहतात. समजा श्रीमंत पेशवे आज परत आले शनिवारवाड्यावर तर येताना त्यांना सुद्धा प्रश्न पडेल कि 'हे आपलंच पुणे आहे का' ? इतक्या झपाटयाने सारं काही बदलतंय. 

आपल्याच आजूबाजूला होणारा हा बदल बघताना मला नेहमी गंमत वाटते, ती गाडी चालवताना मान वाकडी करून कान आणि खांद्याच्या मध्ये मोबाईल ठेवून त्यावर गप्पा मारत गाडी चालवणाऱ्या दादा मंडळींची. त्यांना पाहिलं की खूप मोह होतो त्यांना थांबून विचारावं, की दादा कोणाशी बोलताय तुम्ही ? आणि काल माझं हे स्वप्न पूर्ण झालं, दादा नाही पण एक ताई भेटल्या, ज्या मला कधीच विसरणार नाहीत. त्या भेटल्या, भर चौकात ते पण अशा जिथे आठही दिशांकडून येणारी वाहनं मुक्तपणे विहरत असतात.बरं लांबून दिसेल एवढ मोठं सर्कल पण बनवलं आहे त्या चौकात, ज्यात शोभेची झाडं लावली आहेत. बरं, हे सगळं नाही दिसलं तर तिथे डॉ. आंबेडकरांचा पुतळा पण बसवला आहे, जेणेकरून त्यांना पाहून तरी सुजाण नागरिक असल्याची प्रचिती येऊन थोडं तरी चित्र बदलेलं, पण नाही.. काल काय झालं याच चौकात ऑफीसच्या बसमधून उतरल्यावर मी रस्ता क्रॉस करत होते. अलीकडे पलीकडे रस्त्यावर व्यवस्थित पांढरे पट्टे मारलेले असूनही त्याचा काही उपयोग होण्याची चिन्ह तर नव्हतीच त्यामुळे मी जमेल तसा रस्ता क्रॉस करत होते. वाटलं हातात एक बोर्ड घ्यावा, 'कृपया जरा थांबा, मला रस्ता ओलांडू द्या'.. इतक्यात एक ताई समोरच्या लेन मधून आल्या व सर्कलच्या बाजूने चुकीच्या दिशेला वळू लागल्या. त्यांचा फोन कान आणि खांद्याच्या मध्ये स्थानापन्न होता त्यामुळे साहजिकच त्यांची मान तिरकी होती व त्यात त्या तिरक्या वळत होत्या. काहीतरी गडबड झाली ज्यामुळे फोन सरकला व गाडीही. त्यांना समजेना, काय करावं आणि त्या आहेत त्या स्थितीत statue झाल्या. या अचानक आलेल्या 'झुळकीने' काही सेकंदात दोन ट्रक, एक pmt बस व अनेक दोन व चार चाकी गाड्या रस्त्यामध्येच अचानक पणे थांबल्या. 'झगामगा मला बघा' म्हणत कोण मधेच कडमडलं हे सर्वांना समजेपर्यंत मी झटपट action mode वर गेले. कधी कधी काहीतरी भन्नाट सुचतं मग काय त्या गिचमिडीतून वाट काढत त्या मुलीच्या scooty पर्यंत पोचले. अरे ही केवढीशी, हातांत scooty, कानात मोबाईल आणि एवढं ट्राफिक थांबवण्याची तिची कुवत पाहून मी अगदी भारावून गेले. पुढं सरसावून मी म्हटलं, 'ताई मी मोबाईल पकडते तुम्ही scooty सांभाळा, केवढा महत्वाचा फोन सुरू आहे नाही तुमचा, नका काळजी करू, हे थांबतील सगळे'... असं म्हणताना मी एक काळजी घेतली की अतिशय नम्रपणे तर बोलायचं पण सर्वांना ऐकू जाईल असं बोलायचं. मग काय माझं वाक्य पूर्ण होत नाही तर एकच हशा पिकला. ताई अजूनच बावरल्या. त्यांची धडपडणारी scooty एकाने पकडली तर दुसरीकडे मी फोन धरला होताच. त्यांची मान एकदम सरळ झाली. आता काय करायचं त्यांना काहीच सुधरेना, कशा बशा स्वतःला सावरत scooty वर बसल्या, 'ताई, तुमचा फोन' असं म्हणत मी फोन समोर करताच त्यावर झडप घालून समोरच्या डिकीत तो कसाबसा ठेवून त्या पसार झाल्या.. हे दृश्य नजरेत व माझी वाक्य कानांत गोळा करून आजूबाजूच्या मंडळींनी त्यावर comments ची आतषबाजी सुरू केली. आणि मी तो नजारा डोळयांत साठवून 'काय मज्जा आली' असं स्वतःशीच हसत त्या पूर्व पदावर येणाऱ्या ट्रॅफिक मधून माझा रस्ता शोधत बाहेर पडले..

© कविता सहस्रबुद्धे

जानेवारी २०१९ मध्ये झालेल्या 'वसंतोत्सव' या कार्यक्रमांत सादर झालेल्या 'मी वसंतराव' या चित्रपटांतील काही गाण्यांमुळे तसंच त्या गाण्यांमागच्या गोष्टींमुळे खरं तर या चित्रपटाची उत्सुकता,उत्कंठा शिगेला पोहोचली होती. पण कोरोनाच्या लाटेत चित्रपट प्रदर्शित व्हायचा मुहूर्त लांबला आणि एका ​दीर्घ प्रतिक्षेनंतर या महिन्यात तो प्रदर्शित झाला. चित्रपट यायच्या आधीनंतरही या चित्रपटाबद्दल खूप ऐकलं, वाचलं होतं. कौतुक करणारे जसे होते तसेच चित्रपट कुठे कसा कमी पडला यावर भाष्य करणारी मंडळी सुद्धा होती.पण वाटलं,संघर्षातून तावून सुलाखून बाहेर पडलेल्या एका दिग्गज गायकाच्या आयुष्यातील हळवी गोष्ट सांगणारी हि कलाकृती म्हणून पाहावं याकडे, जसं एका संघर्षाचा सांगीतिक प्रवास !


पंडित वसंतराव देशपांडे... हे नाव घेताच ऐकू येतो,लहान असतांना वाड्यातल्या घरात रेडिओवर, टेपरेकॉर्डरवर ऐकलेला तो जबरदस्त आवाज; घेई छंद मकरंद, तेजोनिधी लोह गोल, सुरत पिया कि, या भवनातील गीत पुराणे, शतजन्म शोधिताना, मृगनयना रसिक मोहिनी, मधु मिलनात या , बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात, राहिले ओठातल्या ओठांत वेडे शब्द माझे...खरं तर गाण्यातलं तेव्हा काहीही समजत नसताना कानावर पडत असलेली ती गाणी. आज विचार केला तर वाटतं, जणू त्याच गाण्यांच्या संस्कारांमधून कान तयार झाले. तेव्हा परिस्थिती साधारण असली तरी या बाबतीतली श्रीमंती मोठी होती कारण जे सर्वोत्कृष्ट होतं तेच कानी पडत होतं, फक्त बाबांमुळे ! पंडित वसंतराव देशपांडे यांच्या आवाजाशी झालेली ती पहिली ओळख.पण त्या आवाजात काय तपश्चर्या सामावलेली आहे हे तेव्हाही कळलं नाही, ना त्यानंतर कधी. पण हि संधी दिली 'मी वसंतराव' या चित्रपटाने ज्यामुळे त्यांच्या नाविन्यपूर्ण आक्रमक गायकी मागे लपलेल्या संघर्षाचे पैलू समजून घेता आले.काही गोष्टी सारं काही विसरून दूर त्या क्षितिजापल्याड घेऊन जातात.. हेच काम हा चित्रपट करतो!

एका कलाकाराच्या आयुष्यात त्याला साथ देणारी माणसं किती महत्वाची असतात हे चित्रपट पाहतांना राहून राहून जाणवत राहतं.या बाबतीत पंडितजी खरंच नशीबवान. एकीकडे आईची भक्कम साथ तर दुसरीकडे शंकरराव सप्रे, मास्टर दिनानाथ मंगेशकर, खाँ साहेबांसारखे गुरु. नागपूर पुणे लाहोर प्रवास करावा लागूनही आपलं गाणं त्यांना जपता आलं. वसंतरावांना मास्टर दीनानाथ मंगेशकर यांनी गाणं तर शिकवलंच पण सोबत जीवनातील कटू वास्तव पण दाखवलं. आर्थिक दारिद्रय सोसत असताना ओळख करून दिली जगातील सर्वात मोठया दारिद्र्याशी, ते म्हणजे 'आपल्याला गायचं असणं पण, समोरच्याला ते ऐकायचं नसणं'.. ज्याची अनुभूती काळाच्या ओघात वसंतरावांना आली. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या शब्दांनी त्यांना दुःख पचवण्याची ताकत दिली.तेच दुःख,ती आर्तता त्यांच्या आवाजात आरपार उतरली. 

हा चित्रपट म्हणजे गोष्ट आहे अनेक नात्यांची .. आई मुलगा, गुरु शिष्य आणि निखळ निःस्वार्थ मैत्रीच्या धाग्याची ! या नात्यांची श्रीमंती कायम त्यांच्या सोबत होती शिवाय साथ होती बायकोची म्हणून तर हातातून निसटू पाहणारं आपलं स्वप्न ते पूर्ण करू शकले.पण या सर्व प्रवासांत हरवलेले एक नातं होतं,वडिलांचं तो मान त्यांनी दिला, संगीताला. यावरून संगीताचं त्यांच्या आयुष्यात असलेलं स्थान खऱ्या अर्थानं अधोरेखित होतं. 

चित्रपटांत वसंतराव व मास्टर दीनानाथ यांचे माळरानावरील संभाषण, खाँ साहेबांनी शिकवलेला ‘मारवा’ आणि  बेगम अख्तर यांच्या घरातील प्रसंग मनावर गेहेरी छाप पाडतात. सांसारिक जबाबदाऱ्या निभावताना निर्माण होणारे वसंतरावांचे आंतरिक द्वंद्व आपल्याला सुद्धा कासावीस करतं. वसंतराव व त्यांच्या आईच टांग्यातील संभाषण, देव न मानणाऱ्या आईनं सोळा सोमवारचे व्रत करणं हे प्रसंग अस्वस्थ करतात.नोकरी सोडल्यावर त्यांना करावा लागणारा संघर्ष त्यांच्याबरोबर आपल्यालाही हळवं करतो.

चित्रपटातील बावीस गाणी हे या चित्रपटाचं अजून एक वैशिष्ट्य ! प्रत्येक गाण्याची वेगळी खासियत. 'ललना' सारखं खट्याळ गाणं एकीकडे हसवतं तर  'ऐसे निकली हैं आह दिल से नई,जैसे मेहफिल से उठ के जाँ जाए'... सारखं गाणं ऐकताना डोळे पाणावतात. गाण्याबद्दल बोलताना आवर्जून उल्लेख करायला हवा तो सर्वांत देखण्या गाण्याचा,' पुनव रातीचा लखलखता'... आक्काची भेट व त्यानंतर येणार हे गाणं, सर्व बाजूनी प्रभावी असणारं आणि दिसणारं. आक्कांचं घर, तिथलं वातावरण, कंदीलाचा तो प्रकाश, गाण्याचे बोल व त्यावर आक्का आणि वसंतरावांचा अभिनय ! या गाण्यातील प्रकाश योजनेचा उत्कृष्ट वापर फार प्रभावीपणे त्यांची परिस्थिती आपल्यापर्यंत पोहचवतो. त्यांच्या गाण्यातील ताकत किती जबरदस्त होती याची प्रचिती येते. उपेक्षित असूनही जराही खंत नसणारी आक्का एका अनपेक्षित वळणावर भेटते. आक्काची ती भेट, तो प्रसंग खुप काही देऊन जातो .. वसंतरावांना आणि आपल्यालाही या संपूर्ण प्रसंगातील राहुल देशपांडे यांचा अभिनय केवळ निःशब्द करून जातोआजोबांवर जीवापाड प्रेम करणारे राहुल देशपांडे आजोबांची भूमिका साकारताना त्यांच्या व्यक्तिरेखेतील हरेक पैलू नजाकतीने उलगडतात, त्यांच्या भावना बखुबी आपल्यापर्यंत पोहोचवतात जणू आजोबांसोबत तो हर एक क्षण ते सुद्धा जगलेत की काय असं वाटावं ..

पडद्यावर आपली भूमिका समर्थपणे साकारणारे कलाकार, नेमका भाव खोलवर उमटवणारे गाण्यातील शब्द, त्या शब्दांना स्वरसाज चढवणारा आवाज, त्या काळात घेऊन जाणारं मधुर संगीत, प्रकाशाचा उत्तम वापर करून नेमकं परिणाम साधणारं छायाचित्रण, निपुण धर्माधिकारी यांचं दिग्दर्शन व राहुल देशपांडे यांनी साकारलेले पंडित वसंतराव पाहतांना वाटतं ही मैफिल कधी संपूच नये आणि त्याच वेळी कानांवर शब्द पडतात,'कंठात आर्त ओळी, डोळ्यांत प्राण आले..आता समेवरी हे, कैवल्यगान आले'.. गाणं संपतं आणि प्रेक्षागृहातील निःशब्द शांतता पाहून वाटतं मास्टर दीनानाथ मंगेशकरांना अपेक्षित असलेली भान हरपून स्वतःला विसरून पसरलेली शांतता हीच कलाकाराला मिळालेली खरी दाद आहे.... 

© कविता सहस्रबुद्धे

Friday, April 22, 2022

 Lunana: A Yak in the Classroom


९४ व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी नामांकन मिळालेला हा चित्रपट. चित्रपटाच्या नावामुळे हा चित्रपट बघण्याची खूप उत्सुकता होती. खरं तर भूतानच्या प्रेमात असलेल्या प्रत्येकाला खुणावणारा हा चित्रपट, पावो चोयनिंग दोरजीच्या नजरेतून पाहताना फार जवळचा वाटतो. 

हि गोष्ट आहे, भूतान या आर्थिकदृष्ट्या गरीब तर आशियातील सर्वात आनंदी देशातील थिम्पू या शहरात आपल्या आजी सोबत राहणाऱ्या उग्येनची. संगीत हे त्याचं जग आहे, ऑस्ट्रेलियाला जायचं स्वप्न उराशी बाळगून सरकारी नियमाप्रमाणे अनिवार्य असलेल्या पाच वर्षांच्या सेवेत तो अडकला आहे. कराराप्रमाणे अजून एक वर्ष नोकरी बाकी असतांना लुनाना येथील डोंगराळ व अतिशय दुर्गम भागातील एका छोट्याशा गावातील शाळेत त्याची शिक्षक म्हणून नियुक्ती होते. एकीकडे गायक बनण्याचं त्याच स्वप्न त्याला खुणावत असतं तर दुसरीकडे गायक बनण्यासाठी हातातली सरकारी नोकरी सोडून परदेशी जाऊ नकोस असं समजावणारी आजी असते. शेवटी अनिच्छेने का होईना पण ती टर्म पूर्ण करण्यासाठी, काही महिन्यांकरता तो लुनाना येथे जायचं ठरवतो.. आणि त्याच्याबरोबर आपलाही प्रवास सुरु होतो !  
 
वाटेत गासा पर्यंत बस ने पोहोचल्यावर त्याला भेटतो मिशेन. लुनाना गावातून मुखिया नी त्याला आवर्जून पाठवलेलं असतं, नवीन टिचरला सुरक्षित पणे घेऊन येण्याकरता. मग ती रात्र ते गासा  मध्येच थांबतात. मिशेन सोबत असलेला सिंगिये टिचरला लागणाऱ्या गरजेच्या वस्तू घेऊन सकाळी पोहोचतो आणि मग ते सर्वजण पुढच्या प्रवासाला निघतात ... पायी !उग्येन, मिशेन, सिंगिये आणि सामान नेणारी तीन खेचरं. 

'सहा दिवस नदीच्या सोबत चालायचं आणि मग थोडी चढण पार केली कि मग आपण पोहचू. विश्वास ठेवा, हा संपूर्ण प्रवास तुम्हाला इतका आवडेल कि तो कधी संपूच नये असं वाटेल'.. मिशेन एकीकडे त्याला प्रोत्साहन देत असतो पण दुसरीकडे ५६ लोकसंख्येचं गाव आणि तिथे जायला लागणारे तब्बल आठ दिवस आणि ते हि चालत, हे उग्येन करता एक मोठं आव्हान असतं. दिवसभर चालून, डोंगर चढून तो थकतो. हेडफोन ची बॅटरी संपते तेव्हा त्याचं लक्ष जातं आजूबाजूच्या निसर्गाकडे, वातावरणातील नाद, पक्षांचा नाजूक आवाज त्याला ऐकू येतो. लोकगीतं म्हणणाऱ्या सोबत्यांकडे पाहून त्याला पटतं संगीत हा त्यांच्या आयुष्याचा महत्वाचा भाग आहे. मग पुढचा प्रवास अनेक अनुभवांमधून त्याला आयुष्याची जवळून खरी ओळख करून देतो. आपला प्रवास सुरक्षित व्हावा म्हणून पहाडांची पूजा करणारे, सन्मान करणारे , पहाडांवर विश्वास ठेवणारे, ग्लोबल वॉर्मिंग सारखी गोष्ट माहित नसणारे सोबती पाहून तो अचंभित होतो. आपल्या मुलांचं भविष्य उज्ज्वल करू पाहणाऱ्या नवीन टिचरचं स्वागत करायला दोन तास चालून आलेले गावकरी पाहून तो हरखून जातो. पण त्याचा हा आनंद, फार काळ टिकत नाही. लुनाना येथे पोहचल्यावर शाळेचं रूप पाहून, बाजूला असणारी त्याची राहण्याची खोली पाहून त्याला वाटतं, आपला निर्णय चुकला व तो परत जायचं ठरवतो. गावचा मुखिया आशा त्याला 'थोडे दिवस आराम करून मग जा, थकला असाल'.. असा सल्ला देतो. वीज नसलेल्या त्या गावात, त्या घरात, त्या रात्री, त्या काळोखात मग सोबत उरते कंदिलाचा प्रकाश आणि त्या जीवघेण्या थंडीची ! 

सकाळी ८.३० वाजता शाळा भरते पण ९ वाजले तरी टीचर आले नाहीत म्हणून टिचरला उठवणारी, गोड हसणारी आणि दिसणारी क्लास कॅप्टन पेम झाम, टीचरची आतुरतेने वाट पाहणारी वर्गातील मुलं, 'शिक्षकाकडे भविष्याची किल्ली असते' हा विश्वास असणारा व म्हणून मोठेपणी शिक्षक बनायचं आहे असं सांगणारा विद्यार्थी, नवीन टिचर आले म्हणून शेजारच्या गावातून आपल्या नातीला शाळेत घेऊन आलेली म्हातारी आजी, प्रेमानं तांदूळ लोणी आणि पनीर पाठवणारे गावकरी, गावासाठी पर्वतांसाठी पक्षांसाठी आणि प्राण्यांसाठी गाणं गाणारी सॅल्डन पाहून तो थक्क होतो. परत जायचा त्याचा निर्णय अलगत गळून पडतो.
 
थिम्पू वरून शाळेसाठी, आपल्या मुलांसाठी तो सामान मागवतो. शिकण्याची ओढ असणारी त्याच्या वर्गातील मुलं; ज्यांनी 'ब्लॅकबोर्ड' हा शब्द सुद्धा कधी ऐकलेला नसतो कारण वर्गाची भिंतच त्यांच्यासाठी फळा असते. मुलांना इंग्रजी शिकवताना त्याला C फॉर CAR नाही तर C फॉर Cow शिकवावं लागतं कारण त्यांनी कधी कार पाहिलेली नसते. पण तरीही ते सगळे आनंदी असतात, खुप समाधानी असतात. भविष्याला स्पर्श करण्यासाठी त्यांना एक हात हवा असतो, टिचरचा जो त्यांना त्यांच्या स्वप्नापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवेल. यावरून त्याला समजतं, सर्वांसाठी तो काय आहे , एक टिचर असण्याचं महत्व काय आहे ! मुखिया त्याला मागच्या जन्मी तू याक असशील आणि म्हणून तर इतकं पवित्र काम करायला तू इथे आला आहेस असं गौरवतो तर गावातील सॅल्डन चक्क त्याला आपला सर्वात आवडता याक नॉर्बू (इच्छा पूर्ण करणारा रत्न) भेट देते. 

खरं तर तो तिथे रमलाय, तिथलं जगणं त्याने आपलंस केलंय, मुलांचा लाडका टिचर ही झालाय, तिथे मनापासून रुळलाय ... पण जवळ आलेला थंडीचा मौसम त्याला आठवण करून देतो, परत निघण्याची. गावचा मुखिया त्याला पुढच्या वर्षी परत येण्याची विनंती करतो आणि मग त्याला कळतं, तो तर कायमचा ऑस्ट्रेलियाला जाणार आहे त्यामुळे तो कधीच परत येणार नाही. तेव्हा, जगातला सर्वात आनंदी देश असूनही तुमच्यासारखी शिकलेली, या देशाची सेवा करु शकणारी, इथे उज्वल भविष्य असणारी मुलं आनंदाच्या शोधात दुसरीकडे का जातात ? हा त्याचा प्रश्न उग्येनला भावुक करतो. 

'वर्गातल्या प्रत्येकाचं तुमच्यावर खूप प्रेम आहे, तुम्ही आमचे सर्वात लाडके टीचर आहात, आमच्यासाठी नॉर्बुसाठी परत या' असं मुलांनी लिहिलेलं पत्र वाचून त्याची पावलं अडखळतात. पवित्र याक खूप सारा आनंद घेऊन नक्की परत येईल या विश्वासानं मुखियानी गायलेल्या गाण्याचे बोल जेव्हा त्याच्या कानी पडतात तेव्हा त्या आवाजातील कशीष, त्यातील भाव त्याची वाट अडवू शकतात की नाही यासाठी हा चित्रपट नक्की पहायला हवा !

निसर्गातील सौंदर्यासोबत हा चित्रपट तरल नितळ भाव भावनांच सौंदर्य त्यातील खरेपणा आणि आनंदाची खरी व्याख्या नजाकतीने बखूबी सादर करतो !

© कविता सहस्रबुद्धे

Tuesday, April 19, 2022

 'दिया तले अंधेरा' असं कधीकधी आपल्यालाच लागू होतं.ऑफिस मध्ये मेरिट लिस्ट लागली की सर्व मुलांना कॉलेजची फी ऑनलाइन भरायची असं सांगणारी मी, मला मात्र online transactions करायची फार भीती वाटते. कसं असतं, काही गोष्टी अवघड नसल्या तरी जमेल का, चुकणार तर नाही ना या भीतीने केल्या जात नाहीत, इतकंच.  


त्या दिवशी काय झालं, सकाळी सकाळी बापलेकानी मिळून ऑनलाइन व्यवहार मला जमलाच पाहिजे असा काहीतरी कट रचला असावा कारण ऑफिसला निघताना केयूर म्हणाला, 'ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करून कॉलेजच्या ऍडमिशनच काम करून टाका आज, घरीच आहात ना दोघं '... 'अरे सुट्टी घेतली म्हणजे काम केलंच पाहिजे का, तू घरी आला कि कर ना संध्याकाळी please', असं मी म्हटलं खरं पण काही उपयोग झाला नाही. 'अग सोपं असतं जमेल तुला',असं गोड बोलून माझ्यावर डाव टाकून दोन गनीम एक झाले होते. मग काय सोबत कांतेय असल्यामुळे बुडत्याला ओंडक्याचा आधार वगैरे असं काहीसं वाटलं. एकदाचा मुहूर्त पण ठरला, सगळं आवरून अकरा वाजता बसलो, चला करून टाकू ऍडमिशन. एकतर बारावीची परीक्षा, मग entrance exams, interviews असे सर्व सोपस्कार करून ती मेरिट लिस्ट लागली होती आणि आता एक लाख रुपये भरून सीट कन्फर्म करायचं होतं. मग काय, कॉम्पुटर सुरु केलं आणि बसलो दोघं त्याच्या पुढ्यात. 

वेबसाईट वर जाऊन सगळी दारं पार करून payment पर्यंत गेलो. बँक डिटेल्स हाताशी होतेच मग काय सर्व तपशील भरले आणि pay च बटन दाबलं आणि हुश्श केलं कि झालं रे बाबा आता सगळं, तर काय, error. अरेच्चा, आता काय झालं. सगळं काही दोन दोनदा तपासून व्यवस्थित भरलं होतं,तरी गोंधळ झालाच.  कांतेय म्हणाला थांब, मी बघतो. पुन्हा सगळं काही भरून झालं तरी transaction पूर्ण होईना. आता काय, बँकेत फोन करण्यावाचून पर्याय नव्हता. बरं, ऑफिस मुळे बँकेत दोन चार जण छान ओळखीचे होते त्यामुळे दडपण नव्हतं. फोन केला तर त्यांनी सांगितलं कि अजून एक option आहे, बँकेचं मोबाइल ऍपते डाउनलोड करा म्हणजे त्याच्यावरून करता येईल. म्हटलं ठीक आहे, करते.  मग काय ते ऍप डाउनलोड केलं, त्यांनी सांगितलं होतं त्या प्रमाणे सर्व काही केलं पण पैसे काही जायला तयारच नव्हते. आता आली का पंचाईत. कांतेय म्हणाला, 'आई पैसे आहेत ना या अकाउंट मध्ये '.. 'गप रे , पैसे आहेत काय ? आहेत पैसे. आणि माझा नाही, हा बँकेचा प्रॉब्लेम आहे'.. परत फोन करावा म्हणून मी फोन घेतला तर म्हणतो, 'अग जाऊ दे , बाबाला सांगतो, तो करेल'. आता मात्र इज्जत का सवाल होता. 'थांब रे जरा तू '... असं म्हणून मी बँकेत फोन लावला. तो ऑफिसर पण जरा चक्रावला, अकाउंटला बॅलन्स तर आहे पण मग का होत नाहीये transaction पूर्ण ? 'बघतो main branch ला जाऊन' असं म्हणून त्याने फोन ठेवला. इकडे मी मात्र तो सेनापती बापट रस्त्यावरून कर्वे रोड ब्रांच ला कधी पोचेल, काय प्रॉब्लेम आहे तो शोधून कधी फोन करेल याची वाट पाहत बसले. तेवढयात सगळे पैसे एकदम जात नाहीयेत तर पन्नास च्या दोन instalments मध्ये तरी जातायेत का हे पण बघून झालं पण काही फायदा झाला नाही. कांतेय पण बघत होता मी काय काय करते आहे म्हणजे कसं आई सर्व प्रयत्न करते आहे हे त्याला दिसत होतं. 

शेवटी एकदाचा फोन आला त्या ऑफिसरचा. मी म्हटलं, 'अहो काय झालं ? काय प्रॉब्लेम आहे ?' तर म्हणाला ' मॅडम तुम्ही पंचवीस हजाराचं ब्रॅकेट घातलं आहे त्यामुळे त्या पेक्षा जास्त रकमेचा व्यवहार करता नाही येणार तुम्हाला तुमच्या खात्यावरून'.. पंचवीस हजार म्हणताच माझी ट्यूब पेटली. आठवलं,ओह.. मग काय सोपं तर आहे, मी म्हटलं, 'अहो मग काढून टाका ना ते ब्रॅकेट'.. यावर त्याला बहुदा घाम फुटला असावा कारण तो म्हणाला,'अहो मॅडम आम्हाला असं काढून नाही टाकता येणार,तुम्हाला इथे यावं लागेल , एक फॉर्म भरावा लागेल मग ती प्रोसेस पूर्ण झाली कि तुम्ही मोठं transaction करू शकाल'...  'अरे बापरे, इतकं सगळं करायचं ? बरं . पण मी आता आले तर होईल का आजच्या आज '? असं मी विचारताच तो चक्क नाही म्हणाला, 'लगेच नाही होणार'? .. ' अरे, मग काय उपयोग ? मला आता पैसे भरायचे आहेत आणि माझ्या अकाउंटला पैसे असून मी भरू शकत नाही, हे बरोबर आहे का'? त्याच्याकडे या प्रश्नाचं उत्तर काही नव्हतं मग काय 'ठीक आहे, बघते मी ', असं म्हणून इतक्या उन्हातान्हात तुम्हाला मेन ब्रांच या यावं लागलं म्हणून त्याचे आभार मानून मी फोन ठेवला. असं होतं , या ऑनलाईन मध्ये. आता घरांत बसून मला घाम फुटला. 

एकंदरीत काय कितीही इच्छा असूनसुद्धा मला आज हे काम करता येणार नव्हतं. यावर सुद्धा कांतेयचा प्रश्न होताच ' पण तू पंचवीस हजाराच ब्रॅकेट का घातलं आहेस ?' बरोबर अगदी पॉईंट शोधून काढला. मी म्हटलं, 'अरे समजा कोणी काही fraud केला आणि माझे पैसे काढून घेतले तर म्हणून'.. 'अग आई असं कोण करतं का'...'हो, करतं कि, सिनेमात नाही का दाखवत ?आणि आज नाही काही, वीस वर्षांपूर्वी टाकलं होतं ते ब्रॅकेट, तेव्हा खूप होते पंचवीस हजार, तुला नाही कळणार'...

एकंदरीत काय तर सलग चार दिवस पंचवीस पंचवीस हजार भरून फी भरण काही शक्य नव्हतं, दुसऱ्या दिवशी ऑफिसला सुट्टी घेऊन बँकेत जाण्याचा उत्साह तर अजिबातच नव्हता मग काय संध्याकाळी सगळा वृत्तांत सविस्तर सांगितला कि झालं, फी आपोआप भरली जाणार होती. आता आज हे सगळं आठवायचं कारण म्हणजे जून महिना जवळ येतोय, परत फी भरायची आहे आणि अजूनही अकाउंटच braket पंचवीस हजाराचंच आहे  

©कविता सहस्रबुद्धे

 

वाळवंटात हरवले 
तरी जगण्याची जिद्द उरात आहे  
डाव जुना मांडलेला अजूनही बाकी आहे ... 

अर्ध्या वाटेत सुटले हात 
सावल्या तेवढ्या सोबत आहेत 
कितीही नाही म्हटलं तरी सल बोचरी मनी आहे .. 

आपलं कोण, परकं कोण उत्तरंही तीच आहेत 
वाळवंटात असले म्हणून काय झालं
डोळ्यात अजूनही पाणी आहे !


अस्वस्थतेचा तळ गाठता गाठता मन सैरभैर होतं 
शब्द.. स्वप्न.. हसू.. हरवता सारं काही धूसर होतं 
हातातून काहीतरी सुटतंय ... काय ते उमजत नाही  
भरून उरलेलं रितेपण उजाडलं तरी मिटत नाही 
जगण्याचं कॅनव्हास तरीही दूरुनच खुणावत असतं 
बहरलेलं प्राजक्ताच झाड अजूनही तिथेच असतं 
अंगण दिसत असलं तरी वाट मुळी सापडत नाही 
गाणं ओळखीचं वाटतं तरी शब्द काही आठवत नाहीत 
माझं माझं म्हणता म्हणता जग सारं अनोळखी होतं 
तळव्यावरच्या रेषांमधलं नेमकं सुख गायब होतं 
कितीही ओढलं तरी आडातलं पोहऱ्यात काही येत नाही   
दिस मावळतीला झुकला कि सोबत कुणी उरत नाही ... 

Thursday, April 14, 2022


शब्द सुद्धा पेलू शकत नाहीत मनातलं कधीकधी, 
तेव्हा मूकपणे वाहून जातं सारं, पागोळीतील पाण्यासारखं .. 

कौतुक करायला हक्काचे मायबाप नसतात ना तेव्हा,
सलत राहतं, गर्दीत मागे उरलेलं पोरकेपण, निष्पर्ण बाभळीसारखं ..

कितीही आव आणला, उसनं हसू गोळा केलं तरी  
मुखवट्या मागचा चेहरा समोर येतो,आरशातल्या प्रतिबिंबासारखा..  

कितीही उन्हाळे पावसाळे बघितले तरी आजही 
उन्हाचा चटका तसाच भासतो, वैशाखातील वणव्यासारखा..

Tuesday, April 12, 2022

पंख फुटून आपलं पिल्लू शिकण्याकरता बाहेर गेलं कि घर फार रिकामं रिकामं वाटायला लागतं, empty nest. मग काय, घरट्यात आता फक्त दोघंच,​ ​एकमेकांचे सोबती. त्यामुळे जे काय रागवायचं आहे, भांडायचं आहे, लाड करायचे आहेत ते करायला हक्काचं एकच माणूस आता समोर असतं, ते म्हणजे पिल्लाचे बाबा. cool या शब्दाचं जर काही synonym असेल तर ते फक्त बाबा असायला हवं असं कायमच वाटतं. सर्वात सुखी प्राणी असतो तो... 'उशीर झालाय अजून घरी आला नाहीये, आज फोन पण केला नाही, मी केला होता मगाशी फोन तर उचलला नाही, असा कसा रे हा वेंधळा' अशी आपली काळजीने बडबड सुरु असली तरी त्याला त्याचा ढिम्म फरक पडत नाही. मधूनच चष्म्यातून आपल्याकडे पाहून 'येईल ग , फोन ऐकू आला नसेल, गेला असेल मित्रां बरोबर', असं लॅपटॉप वर काम करता करता मुलाची बाजू घेत, शांतपणे react होऊन वातावरण कूल करण्याचा प्रयत्न करण्याचं कसब त्याच्याकडेच असतं.

बरं, मुलगा आणि बाबा एका नाण्याच्या दोन बाजू वाटाव्यात इतके सारखे वागतात. इतके दिवस त्याला म्हणायचे अगदी बाबावर गेला आहेस आता याला कसं म्हणणार मुलावर गेला आहेस. एकूण काय तर बडे मियाँ सुभानल्ला !

शाळेतून, क्लास मधून किंवा खेळून यायला उशीर झाला कि कांतेय एक से एक कारणं सांगायचा जसं मित्राच्या सायकल मध्ये हवा कमी होती म्हणून त्याच्या बरोबर सायकल हातात धरून चालत आलो, मित्राच्या घरी त्याच्या कुत्र्याशी खेळायला गेलो होतो, अग आज इतका भारी शॉट मिळालाय ना fan throated lizard चा कि बस .. म्हणून तर फोन बंद ठेवला होता, अग वाटेत एक भारी पिल्लू दिसलं मग त्याच्याशी जरा खेळत बसलो, वगैरे वगैरे..  त्यामुळे ही कारणं ऐकता ऐकता मधेच एखाद पिल्लू सॅक मधून बाहेर येतं कि काय अशी भीती वाटत राहायची. 'शिकून मोठा झाला, नोकरी करायला लागलास कि काय घेशील रे मला, असं मी एकदाच खूप कौतुकानं विचारलं होतं त्याला तर म्हणाला 'पहिल्या पगारातून कुत्र्याचं पिल्लू घेणार आहे '.. काय बोलणार यावर. 

सध्या काय होतं माहितीये,'आज उशीर का झाला' हा प्रश्न जरी तोच असला तरी तो बाबासाठी असतो. मग कारण काय हवं तर ऑफिस मध्ये काम होतं, मिटिंग होती असं काहीतरी ना पण नाही. 'अग गाडी पार्क केली आणि शैलेश भेटला खाली म्हणून गप्पा मारत होतो'.. 'पार्किंगमध्ये ? इतक्या वेळ ?' असं आपण म्हटलं तर 'मग काय झालं ' असे भाव असतात चेहऱ्यावर. अरे मी फोन केला तेव्हा 'हे काय पार्किंग मध्येच आहे', असं म्हणालास ना, मग चहा ठेवला मी. इतका वेळ आला नाहीस मग वाटलं बहुतेक तुझ्या कॉलेजच्या पार्किंग मध्ये होतास की काय'.. 
आता कालची गंमत पहा. संध्याकाळी साडेसात वाजता घरी आला. का उशीर झाला असं विचारावं की नाही अशा विचारात असताना तो म्हणाला 'आज का उशीर झाला माहियीये, मी सकाळी बस miss होईल म्हणून गाडी घेऊन गेलो आणि पार्क केली डहाणूकर जवळ. आता येतांना गाडी काढणार तर एक कुत्रा दिसला, बरणीत तोंड अडकलं होतं त्याचं'.. 'काय' असं मी एकदम spontaneous reaction दिली तर म्हणाला 'अग हो, दुकानात असतात ना तशा transperent बरणीत त्याचं तोंड अडकलं होतं. म्हणजे त्याला सर्व दिसत होतं त्यामुळे मी त्याला मदत करायला गेलो हे तर त्याला समजलं पण तो घाबरला होता. मी प्रयत्न करत होतो त्याच डोकं त्यातून बाहेर काढायचा पण तो पळून जायचा, मग परत पकडून त्याला मी मदत करतोय हे पाहून अजून एक दोन जण थांबले. शेवटी आजूबाजूला पाहिलं कोणतं घर आहे, काही मागून आणावं का घरातून जेणेकरून त्याच्या मदतीने याच डोकं निघेल. मग कोपऱ्यावर एक बंगला आहे तिथे गेलो, एक काका होते आणि त्यांच्याघरी कुत्रा होता. मग त्यांनी पण आनंदाने मदत केली आणि finally निघालं रे बाबा त्याचं डोकं त्या बरणीतून. मग काकांनी पाणी दिलं त्याला प्यायला, जीभ बाहेर आली होती तहान लागून लागून बिचाऱ्याची. ते पाणी पिऊन मग गेला तो पळून, एकदम हुश्श वाटलं ! आणि मग आलो मी'...  
हे सांगताना सगळ चित्र उभं राहिलं समोर आणि एक मोठ्ठा प्रश्न उभा राहिला चेहऱ्यावर, 'अरे कांतेय सांगायचा तशीच कारणं हा कशी काय सांगतो, उशीर होण्याची, कमाल आहे'...

© कविता सहस्रबुद्धे

मोबाईल मधले वेगवेगळे App वापरतांना फार मजा येते, असंच एक आहे true caller. आता तुम्ही म्हणाल त्यांत काय एवढं .. पण गंमत काय आहे सांगू का , ऍडमिशनच्या काळांत इतके फोन येतात तेव्हा एकदम भारी वाटतं , कोण बोलतंय ते आधीच कळतं शिवाय कुठून बोलतंय ते पण समजतं.  जसं अरुणिमा बासु Kolkata India .. काही वर्षांनी चेहरा पण दिसला तर अजूनच भारी वाटेल. कोण कुठून बोलतंय आणि कसं दिसतंय एकदम सगळी कुंडली समोर येईल. सध्या नवीन पोट्टे कुठून कुठून येणार त्याची झलक मला अशी आधीच मिळते आहे. 

झालं काय मागचा महिना इतका गोंधळ होता कि निवांत श्वास घ्यायला पण उसंत नव्हती. ऑफिस मध्ये नेहमी सारखं काही तरी पेटलेलं असतंच शिवाय मी आठवडाभर सुट्टी वर .. त्याच वेळी पुस्तकाचं काम पण सुरु होतं आणि जोडीला सतत बडबडणारी दहावीची गॅंग होती. बरं कसं होतं माहिती आहे का , नातेवाईकांचे १०० मेसेज बुडले तरी चालेल पण इथला एक पण बुडवायचा नाही असं आपलं तत्व त्यामुळे ऑनलाईन अपडेट ठेवता ठेवता आणि सोबत बोलता बोलता दमायला होतं कधी कधी.  
बरं सांगत काय होते तर हां .. या सगळ्या गोंधळात योगायोग पहा कसा असतो, एकच फोन सतत मिस होत होता, धनराज CALLING . बरं असं नाव कोणाचं असतं का सध्याच्या जगात त्यामुळे प्रश्न पडायचा कोण यार हा धनराज ? आणि मी मिस कॉल मध्ये हे नाव वाचलं ना कि मला 'कयामत से कयामत तक' मधला धनराज हे Character आठवायचं.  'मै तुमसे कुछ पूछ रहा हूँ राज , अगर ये मुलाकात अंजाने में हुई है तो मै माफ कर सकता हूँ'... 'आज के बाद तुम इस लडकी से कोई वास्ता नही रखोगे '..  'सरोज यही बात हम राज से सुनना चाहेंगे' .. 'अर्थी तो निकलेगी लेकिन एक नहीं दो'...   असे डायलॉग म्हणणारा हातात मोठी बंदूक घेतलेला दलीप ताहील आठवायचा. 

मग ठरवलं कॉल बॅक करावं आणि बोलावं, पाहावं कोण आहे हा धनराज. मग मी स्वतःशी थोडं धीरगंभीर आवाज काढून 'बोलो धनराज , क्या काम है' ? असं म्हणायची प्रॅक्टिस पण केली आणि लावला फोन. समोरुन कोणता आवाज येतोय हे काही सेकंदांच् वाट पाहणं म्हणजे त्या धनराज चा चेहरा रंगवून तो कसा असेल हे इमॅजिन करणं होतं. पण काय सांगू समोरून आलेला आवाज ऐकून मी चाट पडले. "अग इंदू तू आहेस ? खरंच का (इंदू, माझी वकील मैत्रीण )..  खरंच तूच आहेस का ? ohh my god .. मग हा धनराज कोण ? ohh म्हणजे तुझ्या प्रोफेशन मध्ये तुला असं करावं लागतं तर .. I see '...  म्हणजे कामासाठी मी तिच्या दुसऱ्यानंबर वर जर कधी फोन केला ना कि ती म्हणायची अगं मी केला होत फोन जो मला कधी समजायचाच नाही कि तिचा होता कारण missed कॉल मध्ये धनराज नाव यायचं ... ohh अच्छा असं होतं तर ... मी इतकं सगळं इमॅजिन करून माझं बोलून पूर्ण होईपर्यंत इंदूला प्रश्न पडला 'हि नक्की काय बोलते आहे आणि ते पण स्वतःशीच, मला चान्स देतच नाहीए'....... कारण तेव्हा तिला माहितच नव्हतं एका धनराज calling वरून मी किती मोठं चित्र रंगवलं होतं ते !

 पॉकेटमनी 


'स्कुटी मध्ये पेट्रोल भरायला हवं, एकदम खडखडाट होईल आता', असं मनाशीच बोलले. जाऊ दे उद्या परवा सुट्टी आहे सोमवारी भरू असा विचार करून ऑफिस मधून येतांना कंटाळा केला. मग काय सोमवारी नाईलाज होता, पेट्रोल भरावंच लागणार होतं. ऑफिसच्या बसमधून निघाले खरं पण मनात पुढच्या कामांचा विचार होता. 'अरे आज २८ तारीख, एक तारखेला  भरायचं होतं पेट्रोल, पण हे आधीच कसं संपलं, आता गाडी काही चालणार नाही एक तारखेपर्यंत', अशी उगाच मनांत जरा चीड चीड पण झाली.  मग विचार केला, या एक तारखेचं काय खूळ डोक्यात आहे कि एक तारखेला पेट्रोल भरायचं म्हणून ? बरं पॉकेटमनी संपलाय, पैसे नाहीत असं पण नाही; आणि आता कोणी देत पण नाही पॉकेट मनी. कॉलेज मध्ये असतांना आई तेवढी द्यायची. पुढे बारावी नंतर नोकरी करायला लागल्यावर पॉकेटमनी हि संकल्पनाच संपली, आयुष्यातली. तेव्हा आई म्हणायची  'हवे असतील तेवढे पैसे ठेव स्वतःजवळ आणि बाकीचे बँकेत भर',असं म्हणून तिने पैसे वाचवायची सवय लावली. पार्ट टाइम नोकरी करून मिळणाऱ्या तीनशे रुपयांचं सुद्धा केवढं  तरी अप्रूप वाटायचं त्या वेळी. कोथरूडच्या विद्या सहकारी बँकेत उघडलेले पहिलं  बँक खातं, अजूनही आठवतंय. आता तर काय, मलाच पॉकेटमनी द्यावा लागतो, मग मला आता कोण देणार ?

केदार माझ्याहून लहान , लहान भाऊ म्हटल्यावर त्याला कसं मागणार, तो जर मोठा असता ना माझ्यापेक्षा तर हक्कानं मागितलाच असता. आणि नवरा तो तर म्हणतो 'तुझा आख्खा पगार आहे ना तुझा पॉकेटमनी मग अजून मी कशाला देऊ. तो सगळा संपेपर्यंत शॉपिंग केलंस तर देईन'.. आणि तेवढी तर हिम्मत नाहीच आहे माझी हे त्याला पण माहितीये. एक तर त्याला ना कळतंच नाही मला काय म्हणायचं आहे ते, पैसे म्हणजे कॅश, नोटा हातात ठेवण्यात काय मजा येते.. घेणाऱ्याला !  बहुतेक boys या कॅटेगरीला समजतच नाही पॉकेटमनी देतांना काय भारी वाटतं ते.. एकदा काय झालं, शाळेतला एक मित्र आहे आमचा, नुकताच ग्लोबल डायरेक्टर झाला. आता एवढी मोठी पोस्ट मग पगार तर किती असणार ना , मग काय त्याच्या तोंडावरच खूप अंदाज बांधले त्याच्या पगाराचे आणि म्हटलं त्याला 'अरे तुझा पगार खूप वाढला आहे आता, तर तू आम्हाला म्हणजे मी,वैशाली आणि अर्चनाला जरा पॉकेटमनी देत जा प्रत्येक महिन्याला, जास्त नको पण निदान महिन्याची कॉफीची बिलं तरी त्यात भागतील एवढा दे' .. इतका वेडेपणा पॉकेटमनी साठी करून झालाय तरी सुद्धा पॉकेटमनी मात्र कोणी देत नाही याचं दुःख आहे.

तर काय सांगत होते, हां .. पेट्रोल भरायचं होतं मग काय ऑफिसच्या बसमधुन उतरले, कोपऱ्यावर लावलेली स्कुटी घेतली आणि गेले पेट्रोल पंपावर. पेट्रोल खरंच महाग झालं आहे बहुतेक, कारण फारशी गर्दी नव्हती पंपावर, नेहमीपेक्षा कमी होती. माझा नंबर येईपर्यंत गाडीची डिकी उघडली. पर्समधून पाचशे रुपये काढून ठेवले. तेव्हाच ललितनी WA वर पाठवलेला एक जोक आठवला, पेट्रोल ची टाकी फुल करणाऱ्यांच्या मागे इडी लागणार असा काहीतरी.. तो आठवून हसले पण हळूच. मास्क असल्याने एक बरं असतं , कुठे काहीही आठवून हसायला आलं तरी समोरच्याला काहीही समजत नाही. एकदाचा माझा नंबर आला, 'टाकी फुल करा' असं म्हणून त्यालाच टाकीच झाकण घट्ट आहे तर तुम्हीच उघडा असं सांगून मी आरामात इकडे तिकडे बघत होते. त्याने शांतपणे गाडीच्या पेट्रोलच्या टाकीचं झाकण उघडलं आणि मला म्हणाला, 'कुठे भरू पेट्रोल' ?.. मी म्हटलं 'कुठे काय' ? गाडीत भरा'..  तर परत तेच, 'अहो कुठे भरू पेट्रोल, टाकी फुल्ल आहे मॅडम'.. मी जरा गोंधळले, असं काय म्हणतोय हा. 'काय ? फुल्ल आहे , कसं काय'? असं म्हणत बघते तर काय काठोकाठ पेट्रोलने भरलेली ती टाकी गालातल्या गालात माझ्याकडे पाहून हसत होती. आजूबाजूची मंडळी उत्सुकतेने आता मी काय प्रतिक्रिया देते याची प्रतीक्षा करत होती.. साहजिकच आहे म्हणा इतक्या मोठ्यांदा तो पेट्रोल पंप वाला बोलला होता कि सर्वांनी ऐकलं होतं. मग काय, 'अरेच्चा, हो कि .. खरंच, पण असं कसं झालं' असं काहीतरी मी  बडबडले आणि चेहऱ्यावरचे भाव सांभाळत गाडी पुढे घेतली. 'अरे यार काय हे, मला कसं कळलं नाही गाडीत पेट्रोल आहे ते '? अशी चिडचिड झाली. मग काय इकडे तिकडे न बघता गाडी स्टार्ट केली आणि निघाले घरी. मला समजेना, गाडीतून पेट्रोल चोरी होतं पण रिकाम्या गाडीत पेट्रोल कोणी भरून ठेवलं असेल... विचार करत करत घरी आले. 

घरी पोहचले तोवर केयूर पण आला होता. मी म्हटलं 'अरे आत्ता काय झालं माहितीये, मी पेट्रोल भरायला गेले होते तर' .. माझं वाक्य पूर्ण होण्याच्या आधीच तो म्हणाला, ' अग मी कालच भरलं, सकाळी कोपऱ्यापर्यंतच जायचं होतं तर स्कुटीनी गेलो, तेव्हाच पाहिलं खूप कमी होतं पेट्रोल मग भरून आलो'.. 'अरे एक तर तू माझी स्कुटी कधी वापरत नाहीस मग मला कसं समजेल आणि सांगितलं का नाहीस, पेट्रोल भरलं ते, किती घोळ घातला मी यार '? .. 'अग पण समोर काटा असतो ना गाडी वर जो दाखवतो पेट्रोल फुल्ल आहे ते , तो नाही का पाहिलास'?  .. आता काय बोलणार.. गप्प बसले..  मग टराटरा गाडी फिरवून पेट्रोल संपवून रिकामी गाडी उभी करून ठेवणारे नवरे आणि मुलं यावर नॉनस्टॉप बोलणाऱ्या मैत्रिणी आल्या डोळ्यासमोर.... मग वाटलं, हुश्श पेट्रोल संपलं की न सांगता पेट्रोल भरून मिळतंय हे काय कमी आहे, असा पॉकेटमनी पण चालेल की ​...​

© कविता सहस्रबुद्धे