Tuesday, October 27, 2015

क्षितिजावरती रंग निळे हे,
मनास स्मरले काही 
तुला न कळली कधीच का रे,
मनातली हि गाणी

तुझ्याचसाठी सजली अवघी,
बकुळ फुलांनी वाट 
परि न कळली तुला अनामिक,
गंधामधली ओढ 

शुभ्र चांदणे नभी पसरले,
आतुर होई रात 
रजनीगंधा जणू बहरली 
कशी न कळली प्रीत  !!!


Saturday, October 24, 2015

                     निळी सावळी रात

मन अलगत हरवत जाते, बहरांत फुलांच्या रानी 
अलवार गीत हे सजले, या धुंद चांदण्या राती 

कधी उनाड होई वारा, या टिपूर निळ्या रातीत 
मग वेड़ लावूनी जाई, तो रातराणीचा गंध 

ती दवांत भिजुनी येई, मग अलगत गोड पहाट 
पारिजात शुभ्र हा नटला, घालून सडा दारांत 

क्षितिजावर हलके येई, मग स्वप्नामधुनी जाग 
मोगऱ्यात हरवून जाई, ती निळी सावळी रात !!!

Friday, October 23, 2015

अवेळीच सांजावल्या या दिशा रे,
             मैफिलीत रुसले तुझे गीत का रे 
मनातले काहूर कसे शांत व्हावे,
             काळजात रुतलेले तुजला कळावे  !!

Saturday, September 26, 2015

' प्राजक्ताच् झाड़ '

उमाकाकू आज जरा खुशीतच होत्या,कारणही तसंच होतं म्हणा. त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारा आनंद , आज बरच काही सांगत होता. काका गेल्यावर जवळपास दोन अडीच वर्षांनंतर मनमोकळ हसणाऱ्या उमाकाकू आज सर्वांनीच पाहिल्यादुध टाकणारा गोविंद, कचरा उचलणारा रामदिन, बाजूच्या सुलभा काकुंपासून अगदी कामवाल्या रेणू पर्यंत प्रत्येकाला जाणवल होत कि आज काहीतरी विशेष आहे, पण तरीही कोणीही समोरून काही विचारल नाही त्यांना.

उमा काकूंना तीन मुली, तिघिंचीही लग्न झाली. प्रत्येकीच आयुष्य छान मार्गी लागल्यावर आता थोडा वेळ आपल्यासाठी जगावं असा विचार मनाशी पक्का केला आणि दुर्दैवानं त्याच वेळी काकांनी साथ सोडली. जणू पत्त्यांचा बंगला क्षणांत कोसळावा तस झाल. यातून सावरून आपल्या मुलींकरता काकू परत आयुष्याकडे वळल्या होत्या.

स्वत:ला परत गुंतवून घेण्याकरता उमाकाकू जवळच्याच लायब्ररी मध्ये नुकत्याच चार तास जाऊ लागल्या होत्या. शाळेतून निवृत्त झाल्यावर तशा त्या घरीच असायच्या पण आता परत बाहेरच्या जगांत रमण्याचा प्रयत्न करत होत्या. जोड़ीला देवळातला ग्रुप , हास्य क्लब आणि पुस्तकं यांच्या सोबतीनं त्यांचा दिवस कसा जाई ते समजत नसे पण तिन्हीसांजा होताच एकटेपणा जाणवू लागे. शनिवार आणि रविवार मुली, जावई, नातवंड यांच्यात त्या अगदी रमून जात.

आज त्यांचा एकसष्टावा वाढदिवस होता आणि मुलींनी संध्याकाळी जेवायला बाहेर जाण्याचा बेत कालच रात्री फोन करून सांगितला होता आणि म्हणूनच उमाकाकु आज खुश होत्या. त्यांना ओढ लागली होती सांजवेळेची … ती ओढ व तो आनंद झिरपत होता त्यांच्या चेहऱ्यावरुन.

दिवसभराची काम संपवून नुकताच चहा झाला. मुलींनी आधीच आणून दिलेली नवीन साडी कपाटातून बाहेर काढून ठेवली. काकांनी, ते असताना वाढदिवसाला आणलेल्या मोत्याच्या कुड्या काकुनी घातल्या. तीच साडी नेसण्याचा मुलींचा आग्रह मानून उमाकाकू  तयार  झाल्या. 'सातचे ठोके पडले घड्याळात तरी अजून कस आल नाही कोणी', असा विचार करत त्या खिडकीपाशी गेल्या आणि दारावरची बेल वाजली. 'आले वाटत सगळे', असा विचार करत दार उघडल तर समोर अनिश आणि अतुल, दोघे लाडके जावई. जावई  म्हणणं योग्य होणार नाही, खरं तर मुलच. "हे काय ? तुम्ही दोघच ?" काकूंचा प्रश्न अपेक्षितच होता दोघांना. अतुल म्हणाला, "आई सगळे जण परस्पर येतायेत हॉटेल मध्ये, आम्ही तुम्हाला घ्यायला आलो आहोत, चला".  काकू म्हणाल्या, "अरे मी कधीपासून वाट पाहतेय सर्वांची , हे काय मी तयारच आहे, " असं म्हणत त्या निघाल्या. " संध्याकाळी घरात अंधार नको म्हणून एक दिवा चालू ठेव" अशी सूचना करून अनिशला त्यांनी कुलूप लावायला दिल. सर्वाना भेटण्याच्या ओढीने अनिश आणि अतुल बरोबर उमाकाकू गाडीतून निघाल्या.

आज जरा गारच होती हवा. खिडकीतून येणारा वारा क्षणांत त्यांना मागे घेऊन गेला.… मुलगा नाही म्हणून सहन केलेला त्रास कुठेतरी सलत होता आत. कोणालाही हेवा वाटावा अशा मुली, जावई, नातवंड अजून काय हवं, यापेक्षा वेगळी का असते आयुष्याची कमाई ? नवऱ्याच्या मागे राहिलेल्या स्त्रीला अवघड असतं एकट राहण पण याच खऱ्या कमाईमुळे आज आयुष्य अगदी हळुवार झालं होत. आकाशात रंगांची सूर्यास्ताला झालेली उधळण जणू आपलीशी वाटू लागली त्यांना… कारण त्या रंगांत आनंद, समाधान, अभिमान अशा कितीतरी छटा होत्या.

एका क्षणांत मागच आयुष्य सामोर आलं. नवीन लग्न झाल तेव्हा पाहिलेली स्वप्न केव्हांच मावळली. नवा  सासुरवास, घराला हातभार म्हणून सुरु केलेली शाळेतील नोकरी, मुलींच्या जन्मानंतर आई म्हणून आलेली  जबाबदारी, सासू सासऱ्यांच आजारपण, मुलींची लग्न, बाळंतपण , नवऱ्याच आजारपण यातच आयुष्य वाटल गेल. नको असलेला एकटेपणा आला आणि जणू जगण्याची उमेद संपली, असं वाटू लागल.  मुलींनी,  मैत्रिणींनी यातून बाहेर काढलं. आयुष्याकडे पहायला नवी दृष्टी दिली.

इतक्यात गाडीचा ब्रेक लागला आणि उमाकाकू दचकल्यां. "आई आलो आपण ", या वाक्याने त्यांची तंद्री मोडली आणि डोळयांच्या कडा टिपत हॉटेल आलं म्हणून ऊमाकाकू गाडीतून खाली उतरल्या अन् धक्काच बसला त्यांना, एक सुखद  आणि अविस्मरणीय !!!

गोखल्यांच्या गणेश सभागृहासमोर गाडी थांबली होती आणि समोर होत्या त्यांच्या लाडक्या लेकी… पैठणी, नथ, मोगऱ्याचे गजरे, दागिने अन् प्रत्येकीच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणार कौतुक. काहीही बोलण्या करता उमा काकुंच्या तोंडून शब्दच बाहेर पडेनात. आईचा हात धरून काकूंच्या मुली त्यांना आत घेवून जाऊ लागल्या. दोन्ही बाजूला काढलेल्या फुलांच्या सुंदर  रांगोळ्या आणि समोर दरवाज्यात आजीची वाट पहात उभी असलेली नातवंड.  चिमुरड्या हातांनी आजीसाठी फुलांच्या पायघड्या घालून केलेल ते स्वागत पाहून त्यांची आजी अगदी भारावून गेली. हॉलमध्ये पाऊल टाकताच उमा काकूंचा समोरच्या दृश्यावर विश्वासच  बसेना, आपण स्वप्नात तर नाही ना असा भयानक विचार मनाला शिवून गेला कारण समोर होत्या त्यांच्या बालपणीच्या व कॉलेजच्या मैत्रिणी, सोसायटी मधील जिवलग मैत्रिणी आणि हास्यक्लब चे सवंगडी. सारेजण उमा काकूंचा ६१ वा वाढदिवस साजरा करायला खूप कौतुकाने आले होते. त्यांची आयुष्य भराची पुंजी एका क्षणांत आज समोर एकवटली होती.

६१ दिवे लाऊन आईच औक्षण करताना मुलींचे डोळे भरून आले. आजवर वाढदिवस, कोजागिरी, श्रावणी शुक्रवार अशा कितीतरी प्रसंगी जीने त्यांना ओवाळल होत त्या आईला आज तिच्या मुली ओवाळत होत्या. एका क्षणांत खूप काही मिळाल होत, त्या माऊलीला आणि तिच्या मुलींनाही….नातवंडांच्या घोळक्यांत आजी आज अगदी भरून पावली होती. प्राजक्ताच झाड आज खऱ्या अर्थाने बहरले होते....






Friday, September 11, 2015

' गोड बातमी '

'अभी ना जाओ छोडकर, ये दिल अभी भरा नही' रेडीओवरती गाण चालू होतं. गाण ऐकतां ऐकतां नकळत सावनीच लक्ष आजोबांकडे गेलं. डोळे मिटून आरामखुर्चीत बसून गाण ऐकता ऐकता, डोळ्यांमधून वाहणारे अश्रू पाहून तिला खूप वाईट वाटले. त्या गाण्याने जणू त्यांना परत त्याच वळणावर नेऊन ठेवले होते. आजीला जाऊन जेमतेम दोन महिने झाले होते. थोडा बदल होईल म्हणून आदित्य सावनी नुकतेच आजोबांना इथे पुण्याला घेऊन आले होते. ५0 वर्षांची आजीची सोबत आतां फक्त आठवण होऊन त्यांच्या बरोबर होती. आजोबा म्हणायचे, ' हि पैज जिंकली तुझी आजी, माझ्या आधी जायची आणि जातांना मला मात्र अगदी एकट करून गेली.' 

खरंच, अवती भोवती सारेजण असूनही आजोबा एकटे होते. प्रत्येकाला काही न काही व्याप होते, आयुष्य होते पण आजोबांच काय ?  अगदी रित रित झाल होत त्यांच आयुष्य. आजीचा फोटो उशाशी घेऊन झोपायचे, जुनी गाणी ऐकतांना हळवे व्हायचे. एके काळी काय रुबाब होतां आजोबांचा, आदित्य सांगायचा ना सावनीला. त्यांची कडक शिस्त, वेळ पाळण्याची सवय, रोखठोक स्वभाव, आदरयुक्त भीती वाटायची. आतां मात्र त्यांच्याकडे पाहून केवळ  सहानभूती वाटायची. आजी बरोबर आदित्य चे आजोबा सुधा हरवले होते जणू. 

माणूस आपल्या आयुष्यात अनेक नाती जोडतो. या अनेक नात्यांत आई वडील, बायको, मुलं हि नातीच खरं तर त्याच आयुष्य बनतं आणि शेवटी आलेलं हे असं रिकामपण अगदी मोडून टाकत त्याला. आजोबा हि असेच मोडले होते, 'आतून' पण तरीही 'मी ठीक आहे', असं दाखवत होते जगाला. कोणावरती अवलंबून नको राहायला म्हणून आपण आपली सगळी काम स्वत: करायचे. पेपर वाचणे , फिरायला जाणे इतकच काय पण T.V. सुधा आजकाल पाहायला लागले होते, नाहीतर TV हे एक कारण असे आजी आजोबांच्या लुटुपुटू च्या भांडणाचे. पण आजकाल म्हणायचे, ' हिला कस समजणार, पुढे काय झाल ते म्हणून पाहतो मी सिरियल आणि झोपेत तिला सांगतो, ' असं म्हणून आजी पहायची त्या सर्व सिरियल पहायचे आजोबा. 

सावनी आणि आदित्य खूप जपायचे आजोबांना. दोन वर्षांपूर्वी लग्न झाल दोघांच आणि नोकरी करता पुण्यात स्थाईक झाले दोघे. ऑफिस मधून आल्यावर आजोबांबरोबर चहा पिताना गप्पा आणि रात्री जेवण झाल्यावर सोसायटीत आजोबांना घेऊन चक्कर मारणे, हा जणू रोजचाच पायंडा पडला होता.  आजीची जागा आपण नाही घेऊ शकणार पण आजोबांना एकट वाटू नये, याकरता दोघांची धडपड सुरु असायची. 

आज सकाळ पासून सावनी झोपूनच होती, जरा बरं वाटत नव्हतं तिला. आदित्य सुधा घरीच होता. आजोबा थोडेसे अस्वस्थ होते. ' तुम्हा मुलांना तब्येतीची काही काळजी घेता येत नाही. वेळेवारी खाण नाही, दुध प्यायला नको. एकसारख कॉम्पुटर समोर बसून काय ते काम आणि काय ती कॉफी सारखी', आजोबा आपल्या परीने बोलत होते. आदित्य म्हणाला, ' काय हे. कशाचा कशाशी संबंध जोडताय आजोबा. मी सांगीतल ना तुम्ही काळजी करू नका, डॉक्टरकडे जातोय ना आम्ही. बर वाटेल औषध घेऊन.' असं बोलून आदित्य सावनी ला घेऊन गेला हि डॉक्टरांकडे आणि इकडे आजोबा मात्र येरझाऱ्या घालू लागले. दोन तीन वेळा भास झाला म्हणून दार सुधा उघडून झालं, तास दिड तास झाला होता त्या दोघांना जावून. आता मात्र आजोबा थकून आराम खुर्चीत बसले आणि त्या fan च्या गार वाऱ्यांत त्यांचा डोळा लागला.

'अहो, झोपलात का, बसल्या बसल्या?' आजीचा आवाज ऐकून आजोबा जागे झाले. 'नाही गं, थोडा पडलो होतो इतकच. मुलांची वाट पाहतोय'. आजी म्हणाली, ' मी काय म्हणते, नका काळजी करु. गोड बातमी घेऊन येतील पहा आपले अदु आणि सावनी'. ' गोड बातमी'? आजोबा जरां गडबडले. आजी नेहमीच्या सवयीने म्हणाली,'अहो, अस काय करताय ? गोड बातमी हो, गोडSSs बातमी ….'. हे ऐकताच आजोबांचा चेहरा एकदम खुलला, ' हं… हं समजल, समजल मला. अरे माझ्या लक्षातच नाही आलं. उगीच ओरडलो सकाळी मुलांना, तू पणजी आणि मी पणजोबा …हा हा हा '. आजी हे ऐकून गालातच हसली. त्या सुरकुतल्या चेहऱ्यावरती खळ्या अजूनच खुलून दिसत होत्या. समजुतीच्या स्वरात आजी म्हणाली , ' आतां तुम्हालाच काळजी घ्यायला हवी मुलांची, थोडी मदत करायला हवी घरात त्यांना , मी असते तर …. ' 'हो गं , करीन मी मदत, तू नको काळजी करू,' आजोबा बोलून गेले आणि इतक्यात दारावरची बेल वाजली. एकदा … दोनदा … तिसर्यांदा… आजोबा दचकून जागे झाले. 'आलो रे आलो ', म्हणत दरवाज्यापाशी गेले, कधी एकदा दार उघडीन असं झाल होतं त्यांना. 

दारात सावनी आणि आदित्य ला पाहून म्हणाले, 'काय झाल बाळा, काय म्हणाले डॉक्टर ?' आदित्य म्हणाला , 'काही नाही आजोबा, सगळ ठीक आहे. आजोबांचे कान काहीतरी वेगळं ऐकण्यासाठी आतूर होते. ' अरे बोल राजा, आनंदाची बातमी आहे ना, ते सांग ना आधी.' आजोबांच्या या वाक्याने दोघेंही गडबडले. आदित्य म्हणाला, 'आजोबा तुम्हाला कसं माहित ?' हे ऐकून आजोबा अजूनच खुश झाले, 'म्हणजे खर आहे तर…वा वा वा, अरे हेच तर ऐकायच होत मला. आताच हि सांगून गेली मला कि मी पणजोबा होणार आहे '  आणि असं  म्हणत आजोबांनी आदित्यचा हात हातांत घेतला. डोळ्यांच्याकडा नकळत ओल्या झाल्या होत्या, त्या पुसत म्हणाले ' सावनी आदित्य, खुश राहा बेटां'.  अस म्हणून ते देवघराकडे गेले. 

आजीचा आनंदी चेहरा सारखा समोर येत होता. देवाचे मनापासून आतून आभार मानायचे होते त्यांना कारण पुढे चालण्याकरता एक आशेचा किरण दिला होता त्यानी, येणाऱ्या चिमुकल्या पिलाच्या ओढीने जगायला नवीन उमेद मिळाली होती. कालपर्यंत जगण्याची इच्छा नसलेले आजोबा आज मात्र उद्याच्या स्वप्नांत केव्हांच हरवून गेले होते …. 



Friday, August 28, 2015

' जोशी काकु '

आज काही केल्या घड्याळाचे काटे पुढे सरकतच नव्हते. 'आपल्याला हवं तेव्हा वेळ थांबत नाही' आणि 'वेळ थांबू नये असं वाटत तेव्हा ती जात नाही', या समीकरणाचा प्रत्यय येत होता आज, या डायलिसिस सेंटर च्या Waiting Area मध्ये बसून. आईला नुकतंच आत नेल होत आणि आतां पाच ते सहा तास असच बसायच होत.. हो डॉक्टर आताच सांगून गेले होते तसं. 'डायलिसिस म्हणजे नक्की काय करणार', हा केविलवाणा प्रश्न मनातच रेंगाळला कारण आता कशाचीच माहिती करून घेण्याची मनाची तयारीच नव्हती. मागच्या महिन्याभरांत बऱ्याच गोष्टींची झालेली अर्धवट,पूर्ण माहितीच पुरेशी होती. आता अजून नवीन काही नको होते.

खिडकीतुन बाहेर पाहिलं तर गणपतीच देऊळ दिसत होत, हॉस्पिटलच्याच आवारातल. मी रोज येतां जातां बाहेरूनच ते देऊळ पाहत होते आणि आश्चर्य म्हणजे तरीही देव मला रोज भेटत होता…वेगवेगळ्या डॉक्टरांच्या रुपात. प्रत्येकावर तेवढाच विश्वास होता आणि अपेक्षाही. फरक इतकाच होता कि मंदिरात मिळते तशी शांतता, नव्हती इथे मनाला…  होती फक्त भीती !!!

इतक्यात अचानक एक बाई समोर आल्या. अगदी सोज्वळ आणि सात्विक रूप. पिवळ्या रंगाची लाल काठाची साडी, डोक्यात घातलेले पिवळ चाफ्याच फुल, हातभर भरलेल्या हिरव्या बांगड्या, त्यात चमकणाऱ्या पाटल्या, मणी मंगळसूत्र आणि कपाळावर लावलेल कोरड ठसठशीत कुंकू… एकदम लाघवी सौंदर्य. मी काही बोलायच्या आधीच त्या म्हणाल्या, ' हि तीळ गुळाची वडी घे, चिक्कीच्या गुळाची आहे. घरी बनवलेली. तिळगुळ घे आणि गोड बोल'. काही बोलण्याच्या आधीच हातावर वडी ठेवून त्या गेल्यासुधा. खूप वेळ मी त्या वडीकडे एकटक पाहत राहिले.या वर्षी संक्रांत अशी भेटली मला, इथे .

काउंटर वरच्या काकांच्या आवाजामुळे मी दचकले आणि पाहिले तर त्याच काकू त्यांना तिळगुळ देत होत्या, 'तुमच्यासाठी मुद्दाम मऊ वडी आणली आहे.'  काका म्हणाले ' का ? माझे दात तर अजून शाबूत आहेत, ती चिक्कीची वडी द्या मला '. ' घ्या हो', अस म्हणून त्यांनी दोन्ही वड्य़ा काकांना दिल्या. त्या नंतर येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला, डॉक्टर्स ना , सिस्टर्स ना, तिथे बसलेल्या पेशंटच्या सर्व नातेवाईकांना त्यांनी तिळगुळ वाटला. शेवटी 'झाल माझ हळदी कुंकू ' असं म्हणत समाधानाने अगदी समोरच बसल्या.  इतका वेळ चालू असणारा त्यांचा तोंडाचा पट्टा आता तरी थांबेल, अस वाटत असतानाच बाजूला बसलेल्या इतर चार चौघींबरोबर गुळाची पोळी व वड्यांची रेसिपी, साड्यांचा सेल पासून सुरु झालेली त्यांची चर्चा आता इतर पेशंटच्या चौकशी पर्यंत येउन पोचली होती.

मला खरं तर खूप त्रास होत होता या सर्वाचा. आपण कोठे आहोत आणि हे काय चालू आहे ? वाटत होत, त्यांना सांगाव कि, 'प्लीज थोड गप्प बसा हो, खूप त्रास होतोय', पण काहीच बोलू शकले नाही. मुक्याने सर्व पाहत राहिले …  जणू काही दिवसांपासून मुक्यानेच जगायला शिकले होते.

इतक्यांत समोरून येणाऱ्या डॉक्टरांना पाहून थोडा धीर आला. त्या वातावरणाची सवय त्यांना होती पण माझ काय ? माझा चेहरा पाहून त्यांना अंदाज आला असावा. ' अग बसं , बसं ' अस म्हणंत बाजूलाच बसले ते. त्यांना पाहून त्या काकू परत आल्या आणि डॉक्टरांना तिळगुळ देवून त्यांचीच चौकशी करून गेल्या.

आता मात्र मी खूपच अस्वस्थ झाले. माझी ती अवस्था पाहून डॉक्टर म्हणाले, 'या जोशी काकू. मागच्या जवळपास दोन अडीच वर्षांपासून दर दोन दिवसाआड इथे येतात, काकांना घेऊन. पाच ते सहा तास मग इथेच असतात. बाकी सर्वांची पण परिस्थिती काही वेगळी नाही, कोणी मागचे सहा महिने कोणी वर्षभर कोणी दोन वर्षांपासून येताएत इथे आपापल्या पेशंटना घेऊन … गणपती , दसरा , दिवाळी , राखी सगळे सण इथेच होतात त्यांचे. किती दिवस भांडतील त्या वरच्याशी. शेवटी आपापला आनंद शोधलाय त्यांनी , परिस्थितीशी जुळवून घेतलंय. आम्हीच राखीला भाऊ होतो त्यांचे, तर दिवाळीतील पहिला फराळ सुधा इथेच करतात हे, आम्हा सर्वांबरोबर. इथे येणारा प्रत्येक जण ओळखतो या जोशी काकुंना, सध्याच्या सिनियर पेशंट रिलेटीव आहेत त्या.' हे ऐकून मी थक्कच झाले. त्या इतक्या सहजपणे वावरणाऱ्या चेहऱ्यामागे इतक काही दाटलं होत आणि मला मात्र स्वत:च दुःख कुरवाळताना समोरच जग दिसतच नव्हत. परिस्थिती माणसाला बदलवते आणि इथे तर या सर्वांनी त्यांच्या प्रयत्नांनी परिस्थितीच बदलवली होती पण हार नव्हती मानली. कोणाचे किती क्षण उरलेत याचा हिशोब न मांडता हे सगळे लोक आल्या क्षणाला आनंदाने सामोरे जात होते. 

इतक्यात डॉक्टर माझा निरोप घेऊन गेले हि आणि मी मात्र  …. 

Wednesday, August 26, 2015

' सांजवेळ '

संध्याकाळचे सहा, मोबाईल वर वेळ पाहिली. नुकतीच पडून गेलेली पावसाची एक सर, समोर दिसणारा एकाकी ओला रस्ता, रस्त्याच्या दोन्ही बाजूला हलणारी हिरवीगार झाड, हवेतील बोचरा गारवा .. एकूणच काय एकदम रोमॅंटिक वातावरण आणि कानावर पड़णाऱ्या गाण्याच्या ओळी, 'इशारो इशारो में दिल लेने वाले, बता ये हुनर तूने सीखा हा से '..

आणि अशा या मस्त माहोल मधे मी मात्र गाडीत बसून वाट पहात होते त्याची. खिड़कीची काच खाली करुन त्यावर रेलून ठेवलेला हात आणि त्यावर विसावलेली माझी मान ..बहुदा थोड्या मोठ्या आवाजातच चालू होत ते गाण आणि समोर दिसत होता मला 'कश्मीर की कली' चा गाण्यातला तो सीन..

इतक्यात बाजूने एक आजी आजोबा थोड़े सावकाश चालत गेले. थोड़ पुढे गेल्यावर जरा थांबले व परत मागे जावून जरासे घुटमळले. मी साइड मिरर मधे पाहिलं तर एकमेकांशी काही बोलत होते. काही अंदाज आला नाही व राहवल पण नाही, म्हणून मी विचारल, 'आजोबा काय झालं '?आजोबांना बहुदा माझा प्रश्न थोडा अनपेक्षित होता. ते म्हणाले 'काही नाही,काही नाही '.त्या दोघांची उडालेली ती गड़बड़ आणि तो संकोच मला खूप काहीतरी सांगत होता पण नक्की काय ते समजत नव्हतं. मी परत विचारल, 'काही हरवलय का ' ? माझ्या या प्रश्नाने ते दोघं जरा अजूनच गड़बडले.

मग माझा प्रश्नाचा मोर्चा मी आजींकड़े वळवला. काठापदराची नीटनेटकी साडी, गळ्यांत मंगळसुत्राबरोबर घातलेली मोत्यांची माळ, कानातील मोत्यांच्या कुड्या आणि डोक्यात माळलेला जुईचा गजरा, हे सर्व क्षणार्धात टीपून मी विचारल ' काय झाल आजी ?' आता मात्र आजी एकदम हसल्या आणि मी मात्र गड़बडले..

तेवढ्यात आजी म्हणाल्या 'अग दिसायला माझ्या नाती एवढी नाहीस, थोड़ी मोठी आहेस पण नातीसारखीच आहेस, सांगते. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता जणू त्याला वाहण्याकरतां एक रस्ता हवा होता...

आजोबा म्हणाले 'काही नाही, काही नाही, वेळ जात नाही हिचा बाकी काय ',  त्यांच वाक्य तोडत आजी म्हणाल्या 'तुम्ही थांबा हो, मला बोलू दे. सांगू दे ना , काय हरकत आहे.' त्यांचा हा गोड संवाद ऐकून माझी उत्सुकता अजुनच वाढली.  'अग तू जे गाण ऐकत आहेस नाते आम्ही कॉलेज मधे असतांना एकत्र म्हटल होत ट्रिपला गेलो होतो ना तेव्हा ..' आजींनी असं म्हणताच त्या सुरकुतल्या चेहऱ्यावरही मला लाजून चढलेला गुलाबी रंग स्पष्ट दिसू लागला आणि आजोबांचा चेहरा जरा अजूनच गोंधळला.

सहज चौकशी करता करता आजी आजोबांच्या अचानक समोर आलेल्या त्या रोमॅंटिक आठवणीने मला एक सुखद धक्काच मिळाला.

आजी एकदमच आठवणीत रमल्या, 'अग तेव्हा आजच्यासारख नव्हतं, त्यामुळे अशाच आठवणी असतं ग मनाजवळच्या .. काय म्हणतात ना अगदी SPECIAL तशामी एकदम बोलूंन गेले 'HOW SWEET'
मग मात्र आजोबा एकदम सहजपणे बोलून गेले 'तुझ्या या गाण्याने क्षणांत मागे जाऊन पोचलो आम्ही. अग काय हरवलंय विचारत होतीस ना, बहुतेक या आठवणीच हरवल्या होत्या '.  मी म्हणाले 'आजोबा आता या आठवणीत तुमची संध्याकाळ छान जाईल'. आजोबा एकदम हळवे झाले,  'हो , खरं आहे. चल आता येतो आम्ही, उशीर झालाय, अंधार पड़ायच्या आधी घरी जायला हव.' आणि माझा निरोप घेऊन ते दोघे जाऊ लागले.


गाडीतील ते गाण केव्हाच् संपल होत आणि त्या गाण्यातील शम्मीकपूर आणि शर्मीला समोर जात होते ....

Monday, August 24, 2015

तुझ्या आठवांनी, नवे होत जावे 
जपले क्षण ते, फिरुनी हसावे 

ऋतूंचा बहर तो, अलवार यावा 

तुला भेटण्याचा, बहाणा मिळावा 

मनातले ओठांवर, अलगत सरावे 

कळी उमलण्याचे उगा भास व्हावे  !!

Wednesday, August 19, 2015

तू नसतां आज कळला, 
             अर्थ नवा 'असण्याचा '
नियती कुणा टळेना इथे, 
             निर्माल्य हसे फुलाला … 

Thursday, August 6, 2015

तुझ्या आठवांचा, सोहळा सजावा 
पाऊस वेडा, झोकात यावा 

अशांत, अधीर 
कधी
      उनाड व्हावा, 
मृद्गंधात न्हाऊन, 
      अल्लड हसावा 
पाऊस वेडा, झोकात यावा 

रोमांचित, रिमझिम 

       कधी बेधुंद व्हावा 
नि:शब्द राहून, 
        बरसून जावा 
पाऊस वेडा, झोकात यावा 

रंग नभी उमलतांच, तुझा भास व्हावा  

पाऊस वेडा, झोकात यावा …… 
ओंजळीत दिले सारे, क्षण ते वेचून 
 मनामध्ये मागे उरे,रिते रिते पान 

शब्द सारे झाले तूझे,

            मुके माझे गीत 
डोळ्यांतूनी बोलतांना, 
            चिंब होई मन 

नभांगणी पसरले,

              मोरपिसी रंग 
तिन्हीसांजा आज होई, 
            मन हे व्याकूळ 

ओंजळीत दिले सारे, 
क्षण ते वेचून
 मनामध्ये मागे उरे,रिते रिते पान .... 
            

Tuesday, July 21, 2015

' पाऊस '

आसमंत चिंब ओले, भिजे दवांत पहाट 
गंधाळून सारे जाई, कसे रान या धुक्यांत 

येई झुळूक लाजरी, जशी बकुळ नाजूक 
होई हळवे जरासे, मग सावळे आकाश 

स्मरे भेट तुझी माझी, अशा धुंद पावसांत 
रितेपण मग जाई, आठवणींनी ते भरून  !!!

Sunday, June 28, 2015

' पहिला पाऊस '

हिरव्या ऋतूत पहिल्या सरींत
मन चिंब ओले,
गंधाळल्या रोमांचित अवघ्या
क्षणांत भिजले 

थेंबात बरसले मोती अवखळ
शुभ्र सरींचे,
अलवार दाटले मनात सोहळे
आज स्मृतींचे 

निळ्या सावळ्या अवकाशी मग
कान्हा आला,
सतरंगांचा शेला मागे
ठेवून गेला …

Monday, June 15, 2015

' कृष्ण किनारा '

ती सांज निळाई ल्याली,
तो कृष्ण किनारी आलां
या कातरवेळी अवचित,
तो स्पर्श शहारून गेलां

बासरीत हरवून गेले,
क्षितिजावर क्षण ते काही
नि:शब्द सावळ्या राती,
डोळ्यांत दाटले पाणी

मी उरले ना मग माझी,
त्याचीच होवूनी गेले
रंगात रंगुनी त्याच्या,
रितेपण संपून गेले

काठावर कालिंदीच्या,
ती सरून गेली रात
डोळ्यांत ठेवूनी गेला,
सावळा रंग तो शाम …

Tuesday, May 12, 2015

' गुलमोहर '

तू असतां मोहरले असते, चांदण्यातले स्वप्नं निळे ते 
सावळ्या वाटेवर अलगत, सोबत असती चार पावले … 

मोहक धुंद पहाट जागी, सुचले असते गीत नवे 
ग्रीष्मात बहरला असतां, गुलमोहर तो पुन्हां नव्याने !!!

'मोहरले स्वप्नं माझे 
निळ्या चांदणराती 
दरवळे मोगरा हां 
धुंद तुझ्याचसाठी '…. 

'धुंद पायवाट ओली ,
दवांत भिजती रानफुले
आकाशी या रंग नाचती
डोळ्यांत हसले स्वप्नं नवे'…. 

Wednesday, April 1, 2015

' पोरकेपण  '

कधी कधी प्रश्न पडतो कि आपलंच गणित का चुकतं,
मोठी स्वप्नं पाहतां पाहतां, का इवलं सुद्धा तुटून जातं 

खूप काही नको असतं, जग आपलं छोटंच असतं,
ओंजळभर सुखं मागतां मागतां, झोळीभरून दुःखं मिळतं

डोळ्यांमधील आसवांसोबत सारं सारं वाहून जातं,
मोकळा श्वास घेण्यासाठी, हे आभाळही कमी पडतं

आपलं आपलं म्हणतां म्हणतां, हे जग क्षणांत परकं बनतं 
तिन्ही सांजा होता होतां, फक्त पोरकेपण मागे उरतं ….

Monday, March 23, 2015

' चैत्र पालवी '

सोनेरी स्पर्शात न्हाऊनी,
     पहाट सजली नवचैत्राची
कोवळी पालवी हळूच हासतां,
     मोगऱ्यातं फुलली स्वप्नं उद्याची… 

Tuesday, March 17, 2015

' अस्त '
मावळतीला तो असतांना,
     आज वेगळ्या वाटा झाल्या 
संपले क्षणांत सारे तेव्हां,
     डोळ्यांत मोकळा पाऊस झाला …. 

Thursday, March 12, 2015

' आठवण '

क्षितिजावर अस्ताला,

तो जातो, अन् ती येते
हुरहुरत्या सांजेला, धुंद 
मोगऱ्यासारखी दरवळते
आठवण तुझी अशी, 
अगदी हळुवार येते..
आणि येतां जातां डोळ्यांत,
मागे पाणी ठेऊन जाते . … 

नसूनही मग तू असतोस,

इथल्या प्रत्येक क्षणांत
अन् निसटलेले गवसतांत,
चार क्षण परत मलाच
मिळालेले ते क्षण सारे,  
मुक्तपणे मी जगून घेते 
हात तुझा हाती घेऊन,
स्वप्नांमधे हरवून जाते… 

कधीतरी मग पहाटवारा,

प्राजक्ताशी येऊन थांबतो 
गडद काळा अंधारही,
अलगतपणे सरू लागतो  
आकाशातील केशरी सडा,  
हलकेच काही चाहूल देतो 
क्षितिजावरती त्याचा पुन्हां, 
खेळ नव्याने रंगून जातो … 

अन् वाट पाहण्याचा जुनाच प्रवास 

परत नव्याने सुरु होतो ……. 























Wednesday, March 11, 2015

'कातरवेळी अडखळले,
पाऊल का कळेना
थरथरला प्राजक्त सारां,
अशी अवचित तू जातानां ' …. 

Tuesday, March 10, 2015

' सोबत '

मागे वळून बघतांना वाटतं,
     ती सोबत अगदी खरी होती 
काही क्षणांची का होईना,
     पण फक्त तुझी माझी होती  !!

Monday, March 9, 2015

' बालपण '

दूर निसटलं ते बालपण, 
आतां आठवणीत शोधावं 
क्षणभर सारं विसरून,
थोडं परत मागे फिरावं 

लहानपणीची ती भातुकली,
नव्याने परत मांडावी 
लुटूपुटूच्या भांडणातील, 
तशीच मजा लुटावी 

चिमुकले इवले हात धरून,
'ती' चार पावलं चालावं 
ताई बनून त्याच्याशी,
अगदी तसंच खेळाव

खिडकीत थांबून बाबांची ,
तशीच वाट पहावी
अवघड गणिते पुन्हा एकदा,
त्यांच्यासोबत सोडवावी 

आई बाबांच्या पंखांखाली,
घरट्यात थोडं निजावं 
निरागस ते क्षण सारे,
थोडं उधार मागून जगावं 

आठवणींच्या या रंगांमध्ये,
खरंच वेगळी मजा आहे 
कितीही मोठे झालो तरी,
बालपण मात्र तसंच आहे  !!!



Thursday, February 26, 2015


' धुंद रेशमी धुके '

निळ्या नभी कोर हि, आज का हासली

हात तू हातांत घेतां, रातराणी लाजली …. 

सावळी रात हि, सोबती चांदवा

शब्द होतां मुके, उमलती पाकळ्या …

साथ हि कालची, आज वाटे नवी
ओंजळीत दाटली, स्वप्नं चांदण्यातली…. 

स्पंदने थांबली अन् हरवले भान हे 

सभोवती दाटले, धुंद रेशमी धुके …. 













Sunday, February 22, 2015

' शब्द '

भेटतील तुला कधी शब्द माझे,
त्या बकुळ फुलापरी जपलेले
तू नसतां या ओठांवरती,
तुझ्याच करतां सूचलेले …

उमजेल का तू सांग तेव्हा,
मनातले ते तुझ्या तूला
मन पाखरू होऊन क्षणभर,
सांग हरवेल का पून्हां पून्हां …

आज निसटले क्षण सारे ते,
श्वासातं उरली हुरहूर ती
जातां जातां तुजला दिधली,
मी सोबत शब्दांची नवी  !!



Thursday, February 12, 2015

' अस्तित्व '

'अस्तित्व' म्हणजे काय ?
खरं सांगू , ' तुझ असणं हेच अस्तित्व ', असं वाटायचं.

पण 'शरीराचं असणं' म्हणजेच असतं का अस्तित्व ? कां ' मनाने जवळ असणं ' महत्वाचं, 
खरचं माहित नाही.…

पण आता वाटतं, नसण्याच्या पलीकडे सुधा, असतच कि एक ' अस्तित्व ' ,
शांत… नि:शब्द … स्तब्ध… अबोल… 

आता फरक इतकाच, ' कालच्या असण्यावरून आजच्या नसण्याचा ' … 
पण म्हणून काही 'तुझं अस्तित्व' नाही बदललं, 

तू गेलीस पण तुझं असणं, इथेच ठेवलसं,  मागे

घराच्या प्रत्येक कोपऱ्यांत, तुळशीत, देवघरांत, अंगणात …

रिकाम वाटलं तरी तुझ्या अशा असण्यानी, घर अगदी भरून गेलंय …

या आठवणी आणि आभासांनी,

पण तरीही वाटतं कधीतरी, हे श्वास अजूनही खोळंबलेत, तुला पाहण्यासाठी…
या कानांना अजूनही आस आहे, तुझ्या आवाजाची…

तुझ्या जाण्याचा पुरावा नाही माझ्याकडे पण तू असण्याचा आहे,
कित्येक क्षणांत, कित्येक जागी, या मनांत , डोळ्यांत , स्वप्नांत ….  

शेवटी आपल्या मानण्यावरच असतं ना हे ' अस्तित्व ' ,
जसं  माझं तुझ्यासाठी अन् तुझं माझ्यासाठी ….