आजीचं गाव
बकुळीचे देखणे सडे आणि
बाजूचं दगडी प्रशस्त मंदिर
कानावर येणारे घंटेचे ते मधुर स्वर
जणू इतकी पवित्र, शांत
दुसरी जागाच नाही !
ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी
गतवैभवाची कहाणी सांगणारं
ते टुमदार दुमजली कौलारू घर
जुनी खोडं गेली तसं रिकामं होत गेलं,
साऱ्या खुणा मागे ठेवत परकं झालं.
कधी तिथेच ओळख झाली होती
आजीच्या मऊसूत गोधडीशी
तिच्या नऊवारी पातळाची उब
सुरकुतल्या हातांनी
तिनेच पांघरली होती
कधी आमच्यावर !
मुलांनी भरलेलं गोकुळ
चुलीवरचा तो उन उन भात
मधेच ऐकू येणारं गाईचं हंबरण
अबोली, कण्हेर, चाफ्याने सजलेलं
आठवणीतलं ते देवघर
ओसरी, पडवी, उखळ, जातं
फक्त आजीच्या घरी होतं
जात्यावरचं सातूचं पीठ
फक्त तिनेच भरवलं होतं...
शेणाने सारवलेले अंगण,
ठिपक्यांची रांगोळी, काचेची झुंबरं
परसातलं शेवग्याच झाड, दगडी विहीर
आता फक्त गोष्टीतच उरलीये..
चैत्र महिना आला कि आजही
आठवण येते चैत्रागौरीची,
त्रिपुरी पौर्णिमेला उजळलेल्या
देवळातल्या दिपमाळेची
पालखीचं ते देखणं रूप
अजूनही समोर येत कधी कधी
मग वाटतं,
किती साधं आणि सुरेख होतं हे सगळं
काळाच्या प्रवाहांत पुसट होत गेलं..
देवळातील तो गाभारा
आजही देत असतो आशीर्वाद,
डोळे मिटून त्याच्या समोर
नतमस्तक झाल्यावर ....
© कविता सहस्रबुद्धे
No comments:
Post a Comment