Monday, May 23, 2022

 

असंख्य प्रश्नांनी फेर धरून नाचावं 
उत्तर कशाचंच मिळत नाही 
नकळत मग कागदावरती 
मनातली चित्र सहज उतरतात 
रंगी बेरंगी काही गडद निळी 
खोलवर रुतलेले काही क्षण 
खपली निघून ताजे होतात 
नात्यांचे वेगवेगळे रंग 
मग अक्षरांचा आधार घेत 
लयीमध्ये सामावून जातात
खोल गाभाऱ्यातील तरंग 
अलवार उमटत जातांना,
हृदयाची स्पंदन ठळक करत 
शब्दांना स्वतःचा अर्थ देतात ..
जगण्यासाठी शब्द कि 
शब्दांसाठी जगणं
नव्याने समोर प्रश्न येतो 
अन कवितेचा जुना प्रवास 
पुढच्या पानावर सुरु होतो ... 


Friday, May 20, 2022

 

कधी कधी काही दृश्य 
एकदम चित्रातली वाटतात 
असंच ​दिसलं एक.. 
​काल सकाळी​ सकाळी ​
गणेश मंदिराच्या समोर 
डौलदार बैलगाडी ​उभी होती 
गुलमोहराचा देखणा सडा 
चित्रांत रंग भरत होता 
बैलगाडीत भरलेल्या
मातीचा चुटुक रंग, 
त्यावर उठून दिसत होता 
सदरा धोतर फेटा​,​ शुभ्र पांढरा 
कपाळी माऊलीचा टिळा होता 
गळ्यात माळ घातलेला तो 
एक ​क्षण विसावला होता  
पाहून वाटलं त्याच्याकडे, 
चेहरा समाधानानं फुललाय  
सुरकुत्यांमध्ये त्याच्या 
एक खरेपणा दडलाय 
का कुणास ठाऊक​ ​पण वाटलं​,
माऊली​चं ​​ओठी ​नाव
काळजात वारीची आस ​असेल ​
सावळ्या विठूला भेटायला 
​मनात त्याच्या घाई असेल..  
चतुर्थी म्हणून हात जोडून 
समोर मंदिरात​ तो पाहत होता 
वारीतला एक वारकरी 
गणेशाच्या दारांत होता.. 
गाडीवरून मी पुढे जाता  
​​नजर ​​मात्र मागे वळली 
अन ​​श्रद्धेवरची श्रद्धा 
अजूनच दृढ झाली !

आजीचं गाव

​​बकुळीचे देखणे सडे आणि
बाजूचं दगडी प्रशस्त मंदिर 
कानावर येणारे घंटेचे ते मधुर स्वर 
जणू इतकी पवित्र, शांत 
दुसरी जागाच नाही !
ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी 
गतवैभवाची कहाणी सांगणारं 
ते टुमदार दुमजली कौलारू घर 
जुनी खोडं गेली तसं रिकामं होत गेलं,
साऱ्या खुणा मागे ठेवत परकं झालं. 
कधी तिथेच ओळख झाली होती 
आजीच्या मऊसूत गोधडीशी 
तिच्या नऊवारी पातळाची उब
सुरकुतल्या हातांनी
तिनेच पांघरली होती
कधी आमच्यावर ! 
मुलांनी भरलेलं गोकुळ 
चुलीवरचा तो उन उन भात 
मधेच ऐकू येणारं गाईचं हंबरण 
अबोली, कण्हेर, चाफ्याने सजलेलं
आठवणीतलं ते देवघर 
ओसरी, पडवी, उखळ, जातं 
फक्त आजीच्या घरी होतं 
जात्यावरचं सातूचं पीठ
फक्त तिनेच भरवलं होतं...
शेणाने सारवलेले अंगण,
ठिपक्यांची रांगोळी, काचेची झुंबरं  
परसातलं शेवग्याच झाड, दगडी विहीर
आता फक्त गोष्टीतच उरलीये..​​
चैत्र महिना आला कि आजही
आठवण येते चैत्रागौरीची, 
त्रिपुरी पौर्णिमेला उजळलेल्या 
देवळातल्या दिपमाळेची 
पालखीचं ते देखणं रूप 
अजूनही समोर येत कधी कधी 
मग वाटतं,
किती साधं आणि सुरेख होतं हे सगळं 
काळाच्या प्रवाहांत पुसट होत गेलं..
देवळातील तो गाभारा 
आजही देत असतो आशीर्वाद, 
डोळे मिटून त्याच्या समोर 
नतमस्तक झाल्यावर ....

© कविता सहस्रबुद्धे


असं म्हणतात,
मुलीसाठी तिचा बाबा हिरो असतो, 
माझाही होता ..
'ए बाबा' नाही पण 'अहो बाबा', 
फरक इतकाच होता !
चारचाकी गाडी
सुखदुःखाच्या चौकटीत
तेव्हा आसपासही नव्हती
सायकलवरून त्याच्या
चक्कर मारण्यातली मौज 
सर्वात भारी होती !
हट्ट तेव्हाही असायचा,
खमंग फुटाण्याचा,
बागेतल्या ओल्या भेळेचा..
संध्याकाळी पायरीवर बसून
त्याची वाट बघणं,
रोजचा सोहळा असायचा
नेव्ही ऑफिसर शिस्तीचा 
आईवर कविता करायचा
भावंडांसाठी,घरासाठी
हळवा होऊन जायचा
अलीकडे आजोबा म्हणून
तसूभर जास्त देखणा दिसायचा
दुधावरच्या साईला जीवापाड जपायचा !
सुरकुतला हात हातांत घेतला त्याचा
की काळजात चर्रर्र व्हायचं
तरुणपणीचं रूप त्याचं
मग उगा आठवत राहायचं...
लहानपणी बरं नसलं की
उशाशी बसून असायचा
मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या 
मऊ मायेनं बदलायचा.
'दूर देशी गेला बाबा' 
गुणगुणताना हल्ली
मुठीमधून हरवलेलं बोट,
हळूच डोळ्याकडे जातं
निरोप न घेता त्याचं जाणं
रात्रभर आठवत राहतं
मग मीच प्रयत्न करते,
तेव्हा दिसतो तो आजूबाजूला..
अगदी माझ्याच घरांत
'आजोबा हवेत' म्हणून
रडणाऱ्या भाचरांत,
दुरून ऐकू येणाऱ्या रामरक्षेत
स्वामींच्या पोथीत, तर कधी
गाभाऱ्यातील पवित्र शांततेत.
तिन्हीसांजा देव्हाऱ्यात,
कधी क्षितिजावर
मावळतीच्या दरबारात,
कधी देवळातून ऐकू येणाऱ्या 
माऊलीच्या अभंगात;
तर कधी वसंतरावांच्या
'दाटून कंठ येतो' गाण्यात..
आजकाल असाच भेटत असतो 
तो मला, शांत सावलीसारखा...

©कविता सहस्रबुद्धे 

 पेट पुराण


काय भारी नाव आहे वेबसिरीजचं. या नावाची वेबसिरीज आत्ता आली पण त्याआधी बहुतेक घरांत टीनएज मध्ये मुलं गेली कि सुरु होतं हे 'पेट पुराण'. 'आई आपण एक कुत्रा पाळू यात का, छोटासा'?'अजिबात नाही, तो काय छोटाच राहणार आहे का कायम ? आणि कोण सांभाळेल त्याला?'... काही वर्षांपूर्वी असा सुरु होणारा आमच्या घरातला संवाद. खरं तर संवाद म्हणून सुरु होऊन भुणभुण म्हणता येईल असा पुढे चालू राहायचा. 'एकतर कुत्रा घरात राहील नाहीतर मी', असं शेवटचं शस्त्र मी काढलं कि भुणभुण करण्याला फुलस्टॉप लागायचा, पुढे नो comments, पण काही वेळा करता. मग बाबा आणि मुलगा आंँखो हि आंँखो में इशारा करत पुन्हा परत ते discussion सुरु करायचे. कुत्रा कसा खेळकर असतो, प्रामाणिक असतो, जीव लावतो, प्रेम करतो वगैरे वगैरे .. मी त्यावर म्हणायचे, 'आपण आहोत ना तिघे जीव लावायला, प्रेम करायला एकमेकांना आता अजून तो डॉगी कशाला मध्ये'.. पण नाही, अधून मधून टीनएज मधले हट्टाचे वारे बरेचदा वाहायचेच. 

'पेट पुराण' इतकं रंगायचं कि शेजारच्या काकुंना, शाळेच्या  गेटवरच्या काकांना, सोसायटीच्या वॉचमन काकांना सर्वांना विचारून झालं होतं कि 'मी शाळेत जाईन तेव्हा तुम्ही सांभाळाल का आमच्या पिल्लाला' ? इतकंच काय तर वाढदिवसाला गिफ्ट म्हणून मावशीकडे कुत्र्याचं पिल्लू  सुद्धा मागून झालं. शाळेचे व्हॅनकाका कुत्र्याचं पिल्लू शाळेत न्यायचं असेल तर त्याचे वेगळे पैसे घेतील का अशी चौकशी पण झाली व्हॅन काकांकडे. आणि जेव्हा या सर्वांनी मला विचारलं 'तुम्ही कुत्रा घेताय का' ? तेव्हा समजलं सारं. पण या पुराणातला कुत्रा घरी काही आला नाही.  

खरं तर मला कुत्रा आवडत नाही असं अजिबातच नाही पण त्याचं सगळं व्यवस्थित करता आलं पाहिजे, तेवढा वेळ पाहिजे आणि त्याच्याकडे घरांत लक्ष द्यायला कोणीतरी हवं सारखं. ऑफिसला गेल्यावर कोण बघणार त्याच्याकडे म्हणून मला वाटायचं नको. तो जीव नीट सांभाळण्याची कसरत जमायला हवी. मग काय, 'मी मोठा झालो कि आणीन पिल्लू', यावर मांडवली झाली. हुश्श .. पटलं तर एकदाचं ! मग काय शाळा संपली , जुनियर कॉलेज संपलं आणि पुढचं शिक्षण सुरु झालं बंगलोर ला ! मला वाटलं संपलं आता पेट पुराण.

पण नाही कहानी में ट्विस्ट अभी बाकी था ! ही पेट पुराण वेब सिरीज काय आली त्याच तिकिटावर तोच शो परत सुरु झाला. फरक इतकाच होता कि मुलाची जागा आता बाबानी घेतली. गोल्डन रिट्रिव्हर आणू यांत का आपण ? असा समोरून सलग दोन दिवस येणारा प्रश्न ऐकून शेवटी मी विचारलं, " are you serious ?"  उत्तर चक्क 'हो' आलं आणि काय सांग, मी निःशब्द झाले ! 

पेट पुराण मध्ये 'व्यंकू' नावाचं इतकं गोड पिल्लू आहे कि कोणालाही आवडेल ते पण म्हणून काही लगेच तसंच आणायचं ? मग लक्षांत आलं यार 'आ बैल मुझे मार' हा वेडेपणा मीच तर केला होता.  Ruby , Dogs way home , Benji, पेट पुराण असे movies बघत असते मी आणि व्यंकू आणायचा हट्ट करतो हा. काल बंगलोर ला फोन केला तर तोही तेच विचारतोय ,''आई हो म्हण ना बाबाला, आणू यात ना व्यंकू.'' म्हणजे तिथं पर्यंत बातमी पोचली होती तर. मग मी म्हटलं, 'अरे बाबाला हो तर कधीच म्हटलं मी , होतील चोवीस वर्ष आता. आणि हो,व्यंकू ना आणू यात कि, सोबत बकु पण आणू'.. 

आता बकु कोण ? असं विचारू नका .. त्यासाठी पाहा , सोनी लिव्ह वर 'पेट पुराण'!

वेबसिरीज बघून झाली असली तरी घरांतलं 'पेट पुराण' सुरू आहे अजून 😄 


© कविता सहस्रबुद्धे

Friday, May 13, 2022

 


शाबासकीची थाप 

कधी कधी आपल्या आयुष्यात इतक्या चांगल्या गोष्टी अनपेक्षित पणे घडतात कि विश्वासच बसत नाही ! भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी नुकतीच आमच्या विद्यापीठाला भेट दिली. सिंबायोसिस स्थापनेचा सुवर्ण महोत्सव साक्षात नरेंद्र मोदीजींच्या उपस्थितीत साजरा करण्याचे भाग्य आम्हाला मिळालं. या कार्यक्रमादरम्यान घडलेल्या एका छोट्याशा घटनेने प्रेरित होऊन मी 'सोनेरी क्षण' हा लेख लिहिला. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमचे कुलपती डॉ मुजुमदार सर व्यासपीठावर उपस्थित असताना त्या कार्यक्रमांत मी जे अनुभवलं, जे बघितलं ते शब्दांत मांडण्याचा एक छोटा प्रयत्न केला. डॉक्टर विद्या येरवडेकर( डॉ मुजुमदार सरांची मुलगी) आणि डॉक्टर मुजुमदार सर यांच्या पर्यंत माझा तो लेख कधी पोहचेल असं मुळीच वाटलं नव्हतं. तरी स्वप्नवत वाटाव्यात अशा काही गोष्टी आयुष्यात घडत असतात, हे नक्की !

एक दिवस सकाळी सकाळी डॉक्टर विद्या मॅडमचा फोन आला. खरं तर आदल्या दिवशीच सुवर्ण महोत्सवाचा कार्यक्रम अतिशय सुरेख संपन्न झाला म्हणून एका खास कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. कार्यक्रमाची जबाबदारी सर्वांनी उत्तम रित्या पार पाडली म्हणून खूप कौतुक झालं, स्नेहभोजन झालं त्यामुळे आत्ता आलेला फोन काहीसा 'वेगळ्या' कारणासाठी असणार ह्याची खात्री होती. त्यामुळे सुवर्णमहोत्सवाच्या कार्यक्रमात काय deviation झालेलं असू शकतं ज्याकरता स्वतः मॅडमनी मला फोन केला असावा, याचा विचार करताना होणारी धडपड सांभाळता सांभाळता मी फोन घेतला. 'हॅलो' म्हणताच पलिकडून आलेल्या आवाजाने, त्यांच्या बोलण्याने मी पुरती भारावून गेले. त्यांनी इतक्या प्रेमाने माझं कौतुक केलं कि त्यावर मी आता काय बोलू,असं झालं मला. what's app ची कमालच म्हणून तो लेख नागपूर वरून कोणी आवर्जून मॅडमना पाठवतं काय व त्यांच्यामुळे सरांपर्यंत तो लेख पोचतो काय आणि प्रत्यक्ष फोन करून त्यांच्याकडून कौतुकाची थाप मिळते काय ! सारंच कमाल ! 'किती सुंदर लिहिलं आहेस, अगदी नेमक्या शब्दात मनातलं मांडलं आहेस..मला, दादांना माहिती आहेच तुझी संस्थेशी किती attachment आहे.लेख वाचतांना ती तुझ्या प्रत्येक शब्दांतून दिसते, जाणवते.सिंबायोसिसच्या सुवर्ण महोत्सवाची आठवण म्हणून तुझा लेख कायम जपला जाईल'..  असं त्यांनी म्हणणं माझ्यासाठी खुप मोठी गोष्ट होती ! 

या आनंदात असतांना पुढच्याच आठवड्यात अजून एक सुखद धक्का बसला जेव्हा आमच्या विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर शां.ब.मुजुमदार सरांनी मला भेटायला बोलावलं.  सरांनी भेटायला बोलावणं हिच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने विभूषित डॉक्टर मुजुमदार सर आमच्यासाठी एक प्रेरणास्थान आहेत. इतके वेळा सरांना कामानिमित्त या आधी भेटले आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं आहे पण आज सरांना भेटण्याचं कारण वेगळं होतं, माझ्यासाठी खास होतं. 

सरांना भेटायला जाताना नेहमी दडपण येतं, ते स्वाभाविक आहे परंतु एकदा का सरांशी बोलायला लागलं कि ते दडपण पूर्णतः नाहीस होतं हा अनुभव आहे. मग काय खूप उत्सुकतेने सरांना भेटायला गेले. हे माहित होतं, सर जे काही बोलतील ते मला कानांत साठवायचं आहे. मी आत जाताच, 'कविता ये बस . मी तुझा सोनेरी क्षण हा लेख वाचला. काय सुरेख लिहिलं आहेस. शब्दांची नेमकी निवड, मनातला भाव कागदावर नेमका उतरवण्यातली तुझी खुबी, सुरेख ! मला खरंच भावलं तुझं लेखन. खूप खूप कौतुक आहे तुझं, अशीच लिहीत राहा'... सरांच्या या वाक्यांनी डोळे पाणावले, काय बोलू हे सुचेना. सरांनी मला बसायला सांगितलं व म्हणाले, तु इतकं छान लिहिते हे ओळखायला इतकी वर्ष लागली बघ, कामामध्ये या गोष्टी मागे पडतात, हेच खरं.. त्यानंतर सरांशी खूप गप्पा झाल्या. मी कोणत्या शाळेत शिकले, कोणत्या कॉलेज मध्ये होते, घरी कोण कोण असतं , आई बाबा काय करतात, भावंडं किती , मुलगा कुठे असतो, मी कुठे राहते, रोज ऑफिसला कशी येते, लेखनाची आवड कशी निर्माण झाली, काय काय लिहिते, आजवर जे लेखन केलं ते कुठे प्रसिद्ध केलं अशा अनेक प्रश्नांमधून त्यांनी माझ्या विषयी आवर्जून माहिती करून घेतली. लेखनाचा गुण माझ्या बाबांकडून माझ्याकडे आला असं सांगताच त्यांनी माझ्या बाबांची चौकशी केली. ते काय करायचे, काय लिहायचे ते जाणून घेतलं. 'किती वर्ष झाली तुला इथे' असं त्यांनी विचारताच मी सांगितलं 'सर , १६ वर्ष पूर्ण झाली', तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक हलकं हसू पसरलं, समाधानाचं. साहजिकच आहे, आपल्या इथे काम करणाऱ्या प्रत्येकाची ते काळजी घेतात मग तो ड्राइव्हर असो अथवा इतर उच्च पदस्थ ! इथे काम करणारा प्रत्येक जण आनंदी आणि समाधानी असावा हा त्यांचा प्रयत्न असतो, कायमच.  १८, २०, २५ वर्ष इथे नोकरी करत ​समाधानाने वावरणारे माझ्यासारखे ​अनेक जण आहेत इथे ज्यांना पाहिल्यावर सरांच्या चेहऱ्यावरचं समाधान ​अगदी ​आनंदाने झळकतं ​ ! मला आठवतंय, कांतेय चार वर्षाचा असतांना घडलेली ऑफिस मधली एक गोष्ट. मी रात्री नऊच्या सुमारास ऑफिस मधून निघत होते आणि नेमकी त्याच सुमारास डॉ मुजुमदार सरांची अँबॅसिटर ऑफिसच्या गेट मधून आत येत होती. मला पाहून सरांनी गाडी थांबवायला सांगितली आणि विचारलं,'किती वाजले आहेत तुझ्या घड्याळात' ? मी जरा बावरले , गोंधळले, घड्याळ बघितलं आणि म्हणाले 'नऊ वाजलेत'. यावर सर म्हणाले, 'आज इतक्या वेळ ऑफिस मध्ये ?  घरी कोणी रागवत नाही का उशीर झाला तर ? मुलगा केवढा आहे तुझा ? मग तरी इतक्या उशिरा पर्यंत थांबून काम करायची काय गरज आहे ? उद्यापासून इतक्या उशिरा पर्यंत थांबून काम केलेलं मला चालणार नाही'. आजवर जवळपास २५ वर्ष नोकरी केली पण उशिरा थांबून काम केलं म्हणून मला हक्काने रागवणारे, समजावणारे, माझ्या सारख्या प्रत्येकाच्या सोबत नोकरीच्या बरोबरीने असलेल्या आमच्या घरच्या जबाबदारीची जाणीव ठेवणारे फक्त आणि फक्त सर आहेत. 

अगदी मोकळेपणाने सरांशी बोलतांना खूप भारी वाटलं. गप्पांच्या ओघात मग सिंबायोसिसच्या सुवर्ण महोत्सव कार्यक्रमाचा विषय निघाला. आपले पंतप्रधान इतक्या मोठ्या पदावर असूनही किती साधे आहेत याची अनुभूती घेतलेले आम्ही दोघे त्यांच्या बद्दल भरभरून बोललो. सर म्हणाले, मोदीजींना आपल्या कॅम्पस वर आणण्याचं माझं स्वप्न पूर्ण झालं. गप्पांच्या ओघात मी सांगितलं सरांना कि पंतप्रधानांना प्रत्यक्ष बघायला मिळालं म्हणून आमचा मित्रपरिवार, आमच्या घरचे सर्वजण आम्हाला नशीबवान म्हणत होते. आणि हे शक्य झालं, फक्त तुमच्यामुळे. मग सरांना मी एक किस्सा सांगितला. 'सर,आपल्याकडे कार्यक्रम झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या मैत्रिणीचा फोन आला. ती म्हणाली, काल रात्री आईला फोन केला तर ती देवाचं म्हणतं होती. मी विचारलं, या वेळी का देवाचं म्हणते आहेस तर ती म्हणाली, अग मोदीजी आले होते ना आपल्या पुण्यात, सर्व कार्यक्रम छान पार पडले, आणि ते सुखरूप घरी पोहचले म्हणून देवाचे आभार मानत होते'.. सर म्हणाले 'किती मनापासून प्रेम करतात सगळे त्यांच्यावर,अजून काय हवं'. 

​बोलता बोलता सरांनी फोन लावला, श्री. विठ्ठल मणियार यांना. सर म्हणाले, 'अग ​त्या दिवशी ​खूप कौतुक करत होते ते तुझं,​आता त्यांना सांगतो तू समोर आहेस तर प्रत्यक्ष बोल तिच्याशी'. सरांचे मित्र इतकीच मला असलेली त्यांची ओळख, पण बाहेरच्या जगात त्यांचं किती ​मोठं ​नाव आहे हे ​त्या क्षणी ​मला माहित नव्हतं. 'त्या दिवशी प्रत्यक्ष येऊ शकलो नाही मोदीजींच्या कार्यक्रमाला पण तुझ्या लेखातून सारं चित्र डोळ्यासमोर उभं केलंस तू'  हि त्यांच्याकडून मिळालेली दाद खूप काही देऊन गेली कारण ते खुप उत्कृष्ट लिहितात हे मला माहित होतं. नंतर आठवणीने माझ्यासाठी त्यांनी एक पुस्तक बक्षिस म्हणून पाठवलं ते वेगळं. ते पुढे म्हणाले 'अग मी तो लेख  नंतर पवार साहेबांना पण पाठवला होता WA वर, त्यांनी सुद्धा तुझं कौतुक केलं आणि विचारलं मला फोन करून, हे कोणी लिहिलं आहे' ? हे ऐकून मी खरोखर निःशब्द झाले. डॉ मुजुमदार सरांनी मला सांगितलं पवार साहेब म्हणजे शरद पवार. जे काही घडत होतं ते खरं आहे कि स्वप्न असं वाटू लागलं. 

'किती घेशील दो कराने' असं काहीसं झालं होतं माझं. तासभर इतक्या साऱ्या आठवणी गोळा करून मी निघाले, सरांना नमस्कार करायला वाकणार इतक्यात सर म्हणाले, 'थांब बूट काढू दे' .. मग मी सुद्धा चप्पल काढून सरांना नमस्कार केला. सरांना निघतांना मी इतकंच म्हटलं, 'खूप जणांनी कौतुक केलं मी जे लिहिलं होतं त्या लेखाचं पण साक्षात तुमच्या कडून मिळालेली ही शाबासकी माझ्यासाठी लाख मोलाची आहे कारण ती घरची आहे !!!

©कविता सहस्रबुद्धे


विस्तीर्ण मनाच्या काठी 
सुचते मजला चाल 
देखण्या निळ्या सांजेला
क्षितिजावर काहूर 
फाटते मौन शब्दांचे 
कवितेचा उमटतो सूर  
डोळ्यांमध्ये दाटे 
मृग नक्षत्राची रेघ 
मळभ बरसता सारे 
होती मोकळे श्वास 
डोळे मिटून घेता 
उमटे देहाशी ओंकार .. उमटे देहाशी ओंकार