Sunday, November 28, 2021

मोहम्मद रफी

मी हे नाव पहिल्यांदा ऐकलं तेव्हा मी खूप लहान होते. माझ्या आत्याच्या घरी एका भिंतीवर त्यांचा एक खूप छान फोटो होता. तो फोटो पाहून ते कुणीतरी खूप मोठे आहेत एवढच काय ते समजल होत त्या वेळी. पण ते नक्की किती मोठे आहेत हे कळायला पुढे खूप वेळ जावा लागला. मुळात आधी गाण समजणं, त्यातला दर्द काळजाला भिडणं आणि आवाजातील आर्तता हृदयापर्यंत पोहोचण्याची समज पुढे एका वयानंतर आली.

तेव्हा देवानंद आवडायचा त्यामुळे गाईड, हम दोनो या सिनेमांची पारायण केली होती आणि या सिनेमातील गाण्यांनी तर वेड लावलं होत. वहिदाजी आणि देव साहेबांवरच 'तेरे मेरे सपने अब एक रंग हें, जहाँ भी ले जाए राहें हम संग हें'.. हे गाणं ऐकुन वाटायचं प्रेमात पडल्यावर भावना बहुदा इतक्याच बोलक्या होतात. 'लाख मनाले दुनिया साथ न अब छुटेगा आके मेरे हातों में , अब साथ ना ये छुटेगा'..  हे ऐकून तर त्या आवाजाच्या प्रेमात पडावं इतका आश्वासक आणि रोमँटिक भाव त्या सीन मधेच नाही तर त्या आवाजातही जाणवायचा. 

"दिन ढल जाए हाए रात ना जाए, तू तो न आए तेरी याद सताये " या गाण्यात शैलेंद्रचे शब्द जणू जीव ओतून गायलेत रफी साहेब. कित्येक वेळा हे गाणं ऐकलंय आणि प्रत्येक वेळी डोळ्यांचे काठ मनसोक्त वाहिलेत...

'मैं जिंदगी का साथ निभाता चला गया' हे गाणं लक्षात राहीलं ते त्यातील लायटरची धून व रफी साहेबांकरताच.
'अभी ना जावो छोडकर के दिलsss  अभी भरा नहीं ' हे अजून एक अप्रतिम गाणं. यातील हवा जरा मेहेक तो ले किंवा नशे के घूट पी तो लू म्हणतांना रफी साहेबांची अदा एकदम क्लासिक !

"चौदहवी का चाँद हो या आफताब हो , जो भी हो तुम खुदा कि कसम लाजवाब हो ", असो किंवा ' मैने पुछा चाँद से के देखा हें कही, मेरे यार सा हसीन ?चाँद ने कहां , चांदनी कि कसम, नही..नही.. नही '... तसंच, 'तेरी बिंदिया
रे, आए हाए' किंवा 'झिलमिल सितारों का आंगन होगा ', " सौ साल पेहेले मुझे तुमसे प्यार था " .. या इतक्या गोड गाण्यांना आवाजाच्या जादूने सजवलयं  ते फक्त रफी साहेबांनी.

"ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या हें "या प्यासा मधील साहिरच्या शब्दांना रफीजींनी आपल्या अफाट जादूई आवाजाने चार चाँद लावलेत. तो हि एक काळ होता जेव्हा हिरोईन साठी लता मंगेशकर आणि हिरो साठी रफी साहेबांचा आवाज हे एक समीकरण झालं होतं. 

'मांग के साथ तुम्हारा मैने मांग लिया संसार ' म्हणताना दिलीपकुमार काय आवडलाय. 'अगर तुम भूला न दोगे सपने ये सच हि होंगे, हम तुम ...' हे गाणं असो किंवा 'तू इस तरह से मेरी जिंदगी में शामिल हें ', असो, एकदा ऐकून समाधान होतच नाही या गाण्यांचं. परत परत ऐकत राहावं ...

मध्यंतरी माझ्या वाचनात आल कि एकदा ओ. पी . नय्यर म्हणाले होते ,' मोहम्मद रफी ना होता तो ओ. पी. नय्यर ना होता.. काय भारी ना !! दोघांच्या दोस्तीला सलाम !!!

आयुष्यातील कित्येक क्षणांत, कितीतरी प्रसंगात या आवाजाची सोबत होती.. कित्येकदा डोळे मिटून बसले असतांना मागे त्याचा आवाज रेडिओवर होता....

हि गाणी सोबत असतांना प्रेमात पडलेल्या त्या जुन्या पिढीबरोबर आपल्याला सुद्धा हि गाणी ऐकायला मिळाली , enjoy करता आली म्हणून खरं तर आपणही नशिबवान आहोत.

रफी साहेबांची हि आवाजाची जादू अशीच सोबत राहो ....

आजही प्रेमात पाडणारा चित्रपट म्हणजे गाईड. व्यावसायिक असूनही कलात्मक असणारा, जितक्या वेळा पाहावा तितका नव्याने उलगडत जाणारा. त्या वर्षी सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्तम संवाद, सर्वोत्कृष्ट कथा आणि सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार असे तब्बल सात फिल्मफेअर पुरस्कार या चित्रपटाला मिळाले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे संगीतकार एस.डी. बर्मन यांना या चित्रपटाच्या संगीतासाठी साधं नामांकन सुद्धा मिळालं नव्हतं.याचं दुःख दिग्दर्शक विजय आनंद यांना कायमच राहिलं. खरं तर कोणत्याही पुरस्काराच्या पलीकडचं संगीत होतं ते ..त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम अशा काही चित्रपटांपैकी एक ! 

2012 मध्ये, टाइम मासिकाने 'सर्वोत्कृष्ट बॉलिवूड क्लासिक्स' च्या यादीत नंबर चार वर या चित्रपटाला स्थान दिलं होते. त्या काळी मेहबूब खान, बिमल रॉय, राजकपूर सारख्या काही दिग्दर्शकांनी गाण्यांना ग्लॅमर दिलं परंतु गाण्याच्या चित्रीकरणाला एका वेगळ्या उंचीवर खऱ्या अर्थानं नेलं ते 'गोल्डी' म्हणजेच दिग्दर्शक 'विजय आनंद' यांनी. त्यांच्या ज्वेलथीफ, तेरे घर के सामने, तिसरी मंझिल आणि गाईड चित्रपटांतील प्रत्येक गाणं म्हणजे absolutely एक व्हिजुअल ट्रीट आहे ! 

गाईड चित्रपटाचं संगीताचं काम सुरु होण्यापूर्वीच सचिनदांची प्रकृती बिघडली. त्यांना हृदयविकाराचा झटका आला व पुढचे काही दिवस ते हॉस्पिटल मधेच होते. तेव्हा देवसाहेब आणि गोल्डी यांनी 'कितीही थांबावं लागलं तरी आम्ही थांबू पण गाईड चे संगीतकार तुम्हीच असाल', असं सचिनदांना सांगितलं. गाईड च्या यशामध्ये त्यांच्या संगीताचा आणि शैलेंद्र यांच्या गीतलेखनाचा खूप मोठा वाटा आहे. 

चित्रपटांतील प्रत्येक प्रसंगात एक भाव असतो. कथा, त्यातील प्रसंग, कलाकारांचे संवाद तसंच त्यांच्या अभिनयातून पुढे साकारणाऱ्या गोष्टीमधून हा भाव अजूनच गहिरा होत जातो. जेव्हा हाच भाव संवाद पेलू शकत नाहीत तेव्हा तो भाव गाण्यांतून साकारतो. गाण्यांतून​ ​गोष्ट पुढे नेण्याचं कसब गोल्डी कडे होतं. त्यांनी साकारलेली बरीच गाणी 'Director's Song' म्हणून ओळखली जातात. नायक नायिकेचा संवाद सुरु असतांनाच शॉट कट न होता त्या शॉटचं एक्सटेंशन वाटावं असं गाणं सुरु होण्याचं एक झळाळतं उदाहरण म्हणजे ,' ​​तेरे मेरे सपने अब एक रंग है .... '

उदयपूर जवळ दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या एका सरोवराजवळ हे गाणं चित्रित केलं गेलं. सूर्यास्ताच्या वेळी असलेला प्रकाश केवळ दहा ते पंधरा मिनिटं टिकत असल्याने तेवढ्याच वेळेत  हे गाणं हवं तसं चित्रित करणं हि एक परीक्षा होती. शेवटी गोल्डी व या चित्रपटाचे कला दिग्दर्शक राम येडेकर यांनी हवा तो परिणाम साधता यावा म्हणून एका झाडाच्या आडून ते चित्रीत केलं, फक्त चार शॉट्स मध्ये !  या गाण्याचं लोकेशन, ती सूर्यास्ताची वेळ, मागील तळ्यातील संध्याकाळचा हलका प्रकाश, आकाशातील ते रंग, कातरवेळचा मंद अंधार, लयदार फिरणारा कॅमेरा, शैलेंद्र यांचे शब्द, सचिनदांचं संगीत आणि पडद्यावर रोझी आणि राजू गाईड .. सारंच जादुई .. एक असीम काव्यमय चित्र​​च जणू​, ​'तेरे मेरे सपने अब एक रंग है​'​ ​.....​

Wednesday, August 25, 2021

 बायांनो जगणं सोडू नका ...


मनातलं बोलून उपयोग झाला नाही  
तरी व्यक्त होणं थांबवू नका 
बायांनो बोलणं सोडू नका.. 
एखादी खपली दुखरी असते 
म्हणून कोणी फुंकर घालेल,
याची वाट पाहू नका 
चंद्रावरती सुद्धा एक डाग आहे,
बायांनो, हे अजिबात विसरू नका !
रिमझिम कधी धुवाँधार 
अवेळी मनांतच बरसतो पाऊस 
पण म्हणून श्रावणांतलं
मनसोक्त भिजणं थांबवू नका
बायांनो जगणं थांबवू नका..
प्रवास एकटीचा आहे, 
कधीतरी अवचित उमगेल  
पायांतील सारी शक्तीच जणू संपली
कदाचित असंही वाटेल,
तरी बायांनो, तुमचं चालणं सोडू नका ..
शांत नदीसारखं झुळूझुळू वाहत रहा, 
कोणी नाकारलं, म्हणून खचू नका 
त्या अढळ ध्रुव ताऱ्याकडे
पाहणं सोडू नका..
आयुष्य सुंदर आहे, कमाल आहे 
सुखदुःखाच्या रंगांनी सजलं आहे 
त्या रंगामध्ये रंगून जाणं सोडू नका 
बायांनो जगणं सोडू नका, बायांनो जगणं सोडू नका !!

 दादा..


अगदी निवांत वेळी, जूना फोटोंचा अल्बम घेवून बसाव आणि प्रत्येक फ़ोटो मधे साठवलेली आठवण अगदी परत परत पाहावी तसंच काहीसं झालंय, दादांबद्दल लिहितांना...

जून महिना सुरु झाला आणि तीन वर्षांपूर्वी झालेला दादांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा आठवला. नखशिखांत नटलेलं नागपुरचे घर, नातेवाईक मित्र मंडळींनी आलेली बहार, सनईचे सूर, फुलांचे तोरण, दारातील रांगोळी,पंचपक्वान्नांचा दरवळ, कार्यक्रमाची तयारी करतांना घरातल्या मंडळींची चाललेली लगबग आणि हा कौतुक सोहळा पाहून,अनुभवून समाधानानं भरून पावलेले दादांचं ते प्रसन्न रूप .. 'सुवास' नी डोळेभरून पाहिलेला दादांसोबतचा तोच शेवटचा सोहळा !

दादांना जाऊन आता वर्ष होईल पण अजूनही ते नाहीयेत हे खरंच वाटत नाही .. 'माणिकss ' म्हणून त्यांनी आईंना मारलेली हाक आजही तितकीच ताजी आहे, सकाळी उठल्यावर दादांच्या हातच्या चहाची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे तर वर्ध्यावरून येताना आम्हाला आवडतो म्हणून आठवणीने आमच्यासाठी आणलेला तो गोरसपाक सुद्धा तितकाच आठवतोय ! आजही पार्ले जी बिस्कीट पाहिलं कि आठवण होते दादांची. खरंच .. खूप छोट्या छोट्या गोष्टींमधून दादा अजूनही सोबत आहेत.

दादांचा आणि माझा बावीस वर्षांचा सहवास .. या सहवासांत दादांनी खूप काही दिलं, खूप काही शिकवलं .. प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ! अशी खूप कमी माणसं आहेत आजुबाजूला जी खऱ्या अर्थाने श्रीमंत आहेत आणि दादा या बाबतीत खरंच खूप खूप श्रीमंत होते. नात्याचे मैत्रीचे अनेक धागे त्यांनी जपले, जोपासले. बहीण भावंडं असोत, मित्रपरिवार असो, नातवंड असोत किंवा नातवंडांचे मित्र मैत्रिणी, प्रत्येकाशी त्यांच एक सुरेख नातं होतं; निस्वार्थ, प्रेमळ, आपुलकीचं आणि मुख्य म्हणजे मैत्रीचं ! कारण कोणत्याही नात्यांत जेव्हा मैत्री असते ना तेव्हाच ते नातं बहरतं !! अगदी इथे पुण्यात माझ्या शेजारी राहणाऱ्या पटवर्धन काकूंकडे सुद्धा आई दादा आले कि कॉफी पार्टी ही ठरलेली .. प्रत्येकाशी त्याच्या वयाप्रमाणे लहान , मोठं होऊन संवादातून वयातली दरी मिटवण्याचे कसब त्यांच्याजवळ होतं. एक वडील म्हणून,नवरा म्हणून,आजोबा म्हणून,सासरे म्हणून,शिक्षक म्हणून, भाऊ म्हणून, एक मित्र म्हणून बहुतेक या साऱ्याच भूमिकांमध्ये मी त्यांना खूप जवळून पाहिलंय आणि मला वाटतं त्यांनी जगलेली प्रत्येक भूमिका ते भरभरून जगले व म्हणूनच आज प्रत्येकाला त्यांची उणीव भासते. केयुरला अनेक वेळा फोन उचलून आत्ता हि गोष्ट दादांना सांगावी असं वाटतं तर कधी छान sketch जमलं कि 'आजोबांना हे नक्की आवडलं असतं', हि भावना कांतेयला स्पर्शून जाते. आजही दादांच्या आवडीचा पदार्थ केला कि त्यांची आठवण आल्यावाचून राहत नाही...

दादांचं अनपेक्षितपणे जाणं मनाला अगदी चटका लावून गेलं. खूप काही बोलायचं होतं त्यांच्याशी.. मनातलं कधी बोलून दाखवलं नाही ते कधीतरी व्यक्त करायचं होतं. त्यांच्यासोबत आनंदाचे अजून खूप सारे क्षण गोळा करायचे होते, त्यांना त्यांच्या सर्व नातवंडांचं कौतुक करतांना पाहायचं होतं. आजही त्याच उत्साहाने आईंसोबत वेगवेगळ्या देशांमध्ये फिरायला जातांना त्यांना पाहायचं होतं आणि हो ,आम्हाला पण त्यांच्याकडून अजून थोडं कौतुक करून घ्यायचं होतं.. हक्कानं कौतुक करणारी, पाठीवर शाबासकीची थाप आणि आशीर्वादाचा हात डोक्यावर ठेवणारी आपलीच माणसं अशा प्रकारे निघून गेली ना कि अगदी पोरकं वाटायला लागतं ..

दादा गेले पण जातांना एक शिकवण देऊन गेले. मला आठवतंय, दादा आजारी पडायच्या अगदी एक दिवस आधी मी दादांना एक गोष्ट लिहून पाठवली होती, तो गोष्ट होती दादा आणि त्यांच्या भावंडांबद्दल. ती वाचुन दादांनी लगेच मला मेसेज तर केलाच पण लगोलग फोन सुद्धा केला आणि म्हणाले 'तुम्ही सगळे जण सुद्धा कायम असंच एकत्र राहावं हि माझी इच्छा आहे'. खरं तर असं बोलण्याचा,सांगण्याचा त्यांचा स्वभाव नाही त्यामुळे मला वाटलं आज असं का बोलतायत दादा ? पण मग मीच विचार केला काही हक्कानं, प्रेमानं सांगतायत..थोडे हळवे झालेत ! मी म्हटलं त्यांना 'हो दादा नक्कीच प्रयत्न करू' आणि तेच माझं त्यांच्या सोबतचं शेवटचं संभाषण ठरलं. आता ती गोष्ट आठवली कि वाटतं, जाता जाता जणू संस्कारांची एक शिदोरी देऊन गेले दादा .. आता ते संस्कार जपणं, रुजवणं आपल्याच हातात आहे, नाही का !!!


Tuesday, August 24, 2021

 कॅमेऱ्यामागचा 'चेहरा'..


ठराविक दिवशी विशिष्ट व्यक्तीची आठवण आवर्जून येते. आज जागतिक छायाचित्र दिवस.. मग गौतम सरांची आठवण येणार नाही असं कसं होईल !  

'कॅमेऱ्यामागचे जादूगार' अशी ओळख असलेलं नाव,म्हणजे गौतम राजाध्यक्ष ! कमालीचे जिवंत भासणारे व आपल्याशी संवाद साधणारे ‘चेहरे’ हि त्यांनी काढलेल्या छायाचित्रांची खासियत. लिंटास इंडिया सारख्या ख्यातनाम जाहिरात कंपनीत काम करत असतानाआपल्या लेखनात आलेला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी ते कॅमेऱ्याची मदत घेत. पुढे १९७४ सालापासून त्यांनी आपला फोटोग्राफीचा छंद व्यवसाय रुपात आकारास नेला. १९८० मध्ये शबाना आझमी, टीना मुनीम, जॅकी श्रॉफ या हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांची त्यांनी काढलेली व्यक्तिचित्रे प्रकाशझोतात आल्यापासून त्यांच्या व्यक्तिचित्रात्मक छायाचित्रणास प्रसिद्धी लाभली. स्टारडस्ट, फिल्मफेअर सारख्या मासिकांसाठी त्यांनी फोटोग्राफी केली. 

१९९७ मध्ये प्रकाशित झालेले 'चेहेरे' हे त्यांचे पुस्तक खूप गाजले. माधुरी दीक्षित, ऐश्वर्या राय पासून दुर्गा खोटे, स्मिता पाटील, शांताबाई शेळके, जे.आर.डी. टाटा, सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर, लता मंगेशकर, आशा भोसले, गुलजारजी, पंडित भीमसेन जोशी,जावेद अख्तर, कैफी आझमी अशा तमाम मंडळींची प्रतिबिंब त्यांच्या छायाचित्रांमधून उमटली ! कसबी छायाचित्रकार, प्रभावी व्यक्तिमत्त्व, तल्लख बुद्धी, अभिजात रसिकमन, उत्तम वक्ता या गुणवैशिष्टयांमुळे गौतम राजाध्यक्ष केवळ ‘स्टार फोटोग्राफर’ न राहता स्वत:च ‘स्टार सेलिब्रेटी’ बनले.

बरोबर दहा वर्षांपूर्वीची गोष्ट. आमच्या विद्यापीठात School of Photography या नवीन कॉलेजचं काम सुरू झालं. या करता गौतम सरांचं मार्गदर्शन तर मिळणार होतंच शिवाय चेअर प्रोफेसर म्हणून ते इथल्या विद्यार्थ्यांना शिकवणार सुद्धा होते. त्यामुळे हा प्रोजेक्ट खूप special होता. केयुरचा फोटोग्राफी हाच विषय असल्यामुळे तो अगदी सुरवातीपासून गौतम राजाध्यक्ष सरांसोबत काम करत होता. त्याच्यासाठी तर हि एक फार मोठी सुवर्ण संधी होती. 

गौतम सरांचा स्वभाव अतिशय मृदू होता त्यामुळे विभिन्न क्षेत्रातील, विविध वयोगटातील, विविध विचारांची माणसं त्यांच्याशी अगदी सहजपणे जोडली जात. समोरच्या व्यक्तीच्या कार्य क्षेत्राविषयी जाणून घेत, गप्पा मारत ते समोरील व्यक्तीचा स्वभाव खुलवत व त्याच्याशी मनमोकळ्या गप्पा मारत. त्यामुळे केयुरची खूप पटकन मैत्री झाली त्यांच्याशी. हो मैत्रीच, कारण दोघांच्या वयामधली दरी कॅमेऱ्यामुळे कधीच पुसली गेली होती. फोटोग्राफी या विषयावर किती बोलावं, किती शिकावं आणि त्यांना किती ऐकावं असं झालं होतं त्याला. या विषयावरील चर्चा, त्यांचे अनुभव यातून खूप शिकता आलं. फोटोग्राफीच्या तीन वर्षाच्या डिग्री प्रोग्रॅम करता कोणता अभ्यासक्रम असला पाहिजे हे ठरवणं व तो कोर्स सुरु करणं हे सुरवातीचं मूळ उद्दिष्टय होतं  कामाचं. सोबत या अभ्यासक्रमासाठी लागणाऱ्या लॅब कशा असाव्यात, उपकरणे कोणती हवीत, शिकवण्याची पद्धत कशी असावी, या सारख्या अनेक गोष्टींवरती सुद्धा काम सुरु होतं. मुंबई पुणे अशा त्यांच्या चकरा वाढल्या होत्या. गौतम सर आठवडा आठवडा कॅम्पस मधील गेस्ट हाऊस मध्ये राहायचे. केयुरच्या मोबाईल वर 'गौतम राजाध्यक्ष calling' असं पाहायची हळूहळू सवय झाली. एकत्र काम करता करता फॉर्मल बोलणं मागे पडून एक सहजता आली होती या नात्यात.. 

मला आठवतंय, माझ्या कॉलेजच्या दिवसांमध्ये स्टारडस्ट, फिल्मफेअर सारख्या मासिकांमधले त्यांनी काढलेले माधुरी, जुही, रेखा यांचे फोटो पाहून असं वाटायचं कसले भारी आहेत हे फोटो. तेव्हा फोटोग्राफी बद्दल फारसं ज्ञान नव्हतं पण एवढं नक्की समजायचं कि खूप खास , वेगळे फोटो असायचे ते. एकदा कुतूहलाने, हे फोटो कोणी काढले आहेत हे बघितलं आणि समजलं, तेव्हा ओळख झाली 'गौतम राजाध्यक्ष' या नावाशी. त्यांनी काढलेला फोटो एकदा पाहिला कि तो फोटो VISUAL MEMORY मध्ये एकदम फिट बसायचा, अशी जादू होती त्यांनी काढलेल्या फोटोंमध्ये. केयुरला एकदा मी सांगितलं होतं, कि कॉलेज मध्ये असतांना एक स्वप्न होतं माझं एकदा तरी आपला फोटो काढून घ्यावा, गौतम राजाध्यक्ष यांच्याकडून ! 

एक दिवस संध्याकाळी सरांचा फोन आला ते पुण्यात पोचले हे सांगायला कारण दुसऱ्या दिवशी सकाळी एक मिटिंग होती. सरांनी केयुरला 'उद्या ब्रेकफास्टला ये, मग एकत्र जाऊ', असं सांगितलं कारण त्यांचा तिथीने वाढदिवस होता, त्या दिवशी. फोन झाल्यावर सरांकरता काय घेऊन जावं, असा प्रश्न केयुरला पडला. खरं तर इतक्या मोठ्या स्टार सेलिब्रेटी ला वाढदिवसाला काय द्यायचं हा आमच्यासाठी तसा गंभीर प्रश्न होता. खूप विचार करून मी सुचवलं, 'केयुर मी घरीच केक बनवते, तू घेऊन जा उद्या. आवडेल सरांना, काय वाटतं '.. त्याला माझा विचार आवडला. मग काय प्रचंड उत्साहाने मी लगेच लागले तयारीला, मस्त केक बनवला. घरभर पसरलेला केकचा तो टिपिकल सुवास 'केक छानच झाला आहे' जणू हेच सांगत होता. सकाळी उठल्यावर मस्त पॅकिंग केलं. केयुर ठरलेल्या वेळी केक घेऊन गेला. 

गौतम सर खातील का केक मी बनवलेला, आवडेल का त्यांना आपण असा केक पाठवला आहे ते .. असे अनेक प्रश्न मनांत येत होते.  एकीकडे ऑफिस करता तयार होता होता मन मात्र प्रश्नांमध्ये अडकलं होतं. केयूर ला जाऊन जवळपास अर्धा पाऊण तास झाला होता. इतक्यात केयुरचाच फोन आला, ' अग गौतम सरांना बोलायचं आहे'.. आणि त्यानी फोन सरांना दिला. मी पुरती गोंधळून गेले, पहिल्यांदाच बोलणार होते त्यांच्याशी. बोलायला सुरवात करताच काही क्षणांत मग ते दडपण निघून गेलं. मी त्यांच्यासाठी स्वतः केक बनवून पाठवला या गोष्टीचं त्यांना खूप कौतुक वाटलं. फोनवर माझं पोटभर कौतुक तर त्यांनी केलंच शिवाय केक खूप आवडलाय आणि तो मी कोणाबरोबरही SHARE करणार नाही व एकटा संपवणार असंही सांगितलं. 'आज मिटिंग झाली कि परत जायचंय मुंबईला पण परत आलो कि केयुर नी सांगितलंय मला, ते तुझं कॉलेज मधलं ड्रीम पूर्ण करू, काढूया तुझा फोटो. इतके दिवस का नाही बोललीस'.. असं म्हणाले. मी इतकी खुश झाले कि 'और क्या चाहिये' असं झालं मला !

दोन सप्टेंबरला आमचं हे फोन वर बोलणं झालं व नंतर ते मुंबईला गेले. तेरा तारखेला संध्याकाळी केयुरशी बोलले फोनवर, दुसऱ्या दिवशी सकाळी ते मुंबईवरून येणार होते. पण दुसऱ्या दिवशी सकाळी 'हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने ते काल रात्री गेले' असा फोन आला. त्या फोनवर तर अजिबात विश्वासच बसला नाही, विश्वास ठेवावा असं वाटलंच नाही. पण जेव्हा त्यांच्या घरी फोन केला तेव्हा समजलं, बातमी खरी होती. हे समजताच केयुर मुंबईकरता निघाला. त्यांच शेवटचं दर्शन घेतलं. तिथून परत निघतांना त्यांच्या सेक्रेटरीने केयुर ला थांबवलं आणि तो म्हणाला, 'सरांनी काही फोटो ठेवले आहेत पॅक करून, त्यांनी काढलेले, कॉलेजमध्ये लावण्याकरता, तुमचं बोलणं झालं होतं ना' .. आणि तो वरती त्यांच्या रूममध्ये गेला. जिन्यावरून खाली उतरतांना त्याच्या हातांत ब्राउन रंगाच्या कागदात पॅक केलेल्या आठ दहा फ्रेम होत्या आणि त्यावर केयुरचं नाव लिहिलं होतं, त्यांच्याच अक्षरांत ...

रात्री केयुर घरी आला तेव्हा कितीतरी वेळ आम्ही त्या फोटोंकडे पाहात राहिलो. मी केयुर ला म्हटलं सुद्धा एक फोटो आपण ठेवू यांत का आपल्याकडे, सरांची आठवण म्हणून .. पण तो नाही म्हणाला. सरांनी कॉलेज करता दिले आहेत ना हे फोटो मग ते तिथेच हवेत. आजही कॉलेज मध्ये त्या फोटोंकडे पाहिलं की गौतम सरांची आठवण येते ! 

 Happy World Photography Day !!!! 


 जिंदगी 'गुलज़ार' है .....


कधी कधी प्रत्यक्ष भेट झाली नसली तरी काही नाती आपण मनातल्या मनांत जपत असतो. असंच एक नातं आहे आपल्या सर्वांचं.. शब्दांच्या जादूगाराशी, गुलजा़र साहेबांशी ! 
कवी, गीतकार, दिग्दर्शक, पटकथा लेखक या सर्वांमध्ये 'गीतकार' म्हणून ते कायमच जास्त आवडले.

किशोर कदम, अर्थात कवी सौमित्र यांनी एका कार्यक्रमांत त्यांची एक आठवण सांगितली होती. नदीच्या काठावर गुलजार साहेबांबरोबर उभे असताना पाण्याचा प्रवाह बघत त्यांनी गुलज़ारजींना प्रश्न केला, ''आपको तैरना आता है?'' गुलजार साहेबांनी शांतपणे उत्तर दिलं, ''नही, सिर्फ डूबना आता है.'' तेव्हा 'गुलजार' या व्यक्तिमत्वाच्या कैफात आकंठ बुडालेल्या मला 'डूबना' ही कल्पना नव्याने उमगली, असं ते म्हणाले होते. 

त्यांच्या गाण्यांमधील नायिका खूप जवळच्या वाटतात. नायिकेच्या मनातलं जसंच्या तसं शब्दांत मांडता येणं खरं तर किती अवघड आहे. स्वतः अनुभव घेऊन ती आर्तता शब्दात उतरवणं हे एक वेळ समजू शकतो पण एका स्त्रीचं मन, तिच्या भावना समजून त्या त्याच ताकतीने कागदावर उतरवणं किती अवघड असेल एका गीतकारासाठी ! गुलजारजी म्हणतात,''चाल लावून गीत तयार होत नाही तर स्वतःच्या शब्दांत त्याला भिजवावं लागतं, त्यातील आर्तता समजून घ्यावी लागते, जगावी लागते."

प्रियकराला भेटण्यासाठी निघालेली त्यांची नायिका 'मोरा गोरा रंग लैले, मोहें शाम रंग दैदे ', म्हणते तेव्हा शाम रंग मागणारी त्यांची नायिका किती वेगळी आहे ते जाणवतं. प्रेमात पडल्यावर तिला, ' जीने की तुमसे, वजह मिल गयी है, बड़ी बेवजह जिन्दगी जा रही थी'.. असं म्हणावसं वाटतं... "आपकी बातों में फिर कोई शरारत तों नही,बेवजह तारीफ करना आपकी आदत तो नहीं", असं म्हणत ती त्याच्या डोळ्यातील भाव वाचते तर कधी " तेरे बिना जिंदगी से शिकवा तो नहीं" म्हणत " काश ऐसा हो, तेरे कदमों से, चुन के मंज़िल चले और कहीं, दूर कहीं".. असं स्वप्न सुद्धा पाहते. "कतरा कतरा मिलती हें.. जिंदगी हें..  बेहेने दो".. गात तिला प्रत्येक क्षण जगायचा आहे. एक सौ सोला चांँद कि राते आठवून "मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा हें, सावन के कुछ भीगे भीगे दिन रखे है" ते परत पाठव असं सांगताना, ती पतझड, तिचं 'मेरा वो सामान लौटा दो' हे आर्जव खूप खोलवर रुततं. ' दो नैनो में आसूंँ भरे है, निंदिया कैसे समाए", असं गात "जिंदगी तो काटी ये रात कट जाए" या शब्दांतून तिची तगमग व्यक्त होते. 'खाली हात शाम आई है, खाली हात जायेगी', ऐकतांना ते शब्द आरपार अस्वस्थ करतात .... प्रत्येक गाण्यात तिचं एक वेगळं रूपं दिसतं !

गुलजार साहेबांची गाणी म्हणजे प्रत्येक गाण्यात एक गोष्ट असते, आपली .. आपण अनुभवलेली, आपलीच वाटणारी इतक्या चपखलपणे शब्दांमध्ये मिसळून जाणारी ! प्रत्येक गाणं त्यांचं वेगळेपण दाखवून जातं. 

'तुझसे नाराज नही जिंदगी हैरान हूँ मैं , हैरान हूँ मैं '... हेच वास्तव आहे, जे स्वीकारावं लागतं. ' जीने के लिए , सोचा हि नहीं , दर्द संभालने  होंगे , मुस्कुराये तो मुस्कुराने के कर्ज उतारने होंगे'....हे प्रत्येकाला स्वतः अनुभवावं लागतं. 

'जब तारे जमीन पर जलते हें , आकाश जमीन हो जाता हें, उस रात नहीं फिर घर जाता, वो चाँद यहीं सो जाता हें.. पलभर के लिए इन आँखो में , हम एक जमाना ढुंढते है' .... हि आपलीच गोष्ट.  'इन भूलभुलैया गलियों में अपना भी कोई घर होगा, अंबर पे खुलेगी खिडकी या खिडकी पे खुला अंबर होगा ' आणि हे आपल्या सर्वांच्या डोळ्यांतील, आपण प्रत्येकाने कधी ना कधी पाहिलेलं एक गोड स्वप्न.. शब्दांमधून कागदावर उतरलेलं !  

रात्रीची वेळ.. फक्त दोघांची. बाहेर कोसळणारा पाऊस. खिडकीबाहेर पाहणारा तो, आपल्याच विचारात हरवलेला. त्याच वेळी ती येते, त्याला पाहते आणि अलगत त्याच्या जवळ जाऊन गुणगुणते "मेरी जाँ .. मुझे जाँ न कहो मेरी जाँ "... हे ऐकून आपण प्रेमात पडतो, ते गाणं आपलं होतं. बाहेरचा रिमझिम पाऊस, खिडकीतून दिसणारा पाऊस.. अंगणातील फुलांना भिजवणारा पाऊस, त्या दोघांचा पाऊस आणि न भिजताही आपल्याला चिंब भिजवणारा पाऊस...

इजाजत.. एक चिरतरुण काव्य ! कितीही वेळा बघितला तरी प्रत्येक वेळी तेवढाच आवडणारा आणि प्रत्येक वेळी काहीतरी नविन देवून जाणारा. तो पाहतांना 'पावसाच्या बरसणाऱ्या सरींच्या सोबत गुलजारजींची कविता त्यांच्याच आवाजात आपण ऐकतोय' असंच वाटत राहतं. या चित्रपटाच्या प्रेमात पडल्यापासून असा एकही पावसाळा गेला नाही कि 'इजाजत' पाहिला नाही, इतकी जादू या सिनेमाने केली आहे मनावर. इजाजत म्हणजे एक अलवार प्रेमकहाणी, नजरेत आणि कानांत साठवून ठेवावी अशी !

लहानपणी आई गेली, तिचा चेहराही आठवत नाही, जवळ तिचा साधा फोटोसुद्धा नाही. तरीही 'दो नैना और एक कहानी , थोडा सा बादल थोडा सा पानी' आणि 'सुरमई अंखियों में नन्हा मुन्हा एक सपना दे जा रे' सारखं गीत ते लिहितात. या भावना मांडताना इतक्या बखुबी भाषा वळवण्याचं त्याचं कसब थक्क करणारं आहे.

संवेदनशीलता आणि तरल भाव हे गुलजार साहेबांच्या गाण्याचं खास वैशिष्ट्य ! आपल्या भावभावनांना वेगवेगळ्या रुपकांच्या कोंदणात सजवून त्यातील अर्थ अधिक गहिरा करण्याची त्यांची आगळी वेगळी शैली हे त्यांच्या गीतांचे अजून एक वैशिष्ट्य. आपल्या कल्पनांना शब्दरूप देऊन त्यांनी अजूनच मोहक बनवलं.  'इन रेशमी राहोंमें, इक राह तो वो होगी, तुम तक जो पहुंचती है' यातला हळुवारपणा मनाला स्पर्शून जातो. माचिस मधलं ‘पानी पानी रे’ किंवा ‘राझी’मधलं ‘मुडके ना देखो दिलबरो’ ऐकताना डोळ्यात टचकन् पाणी येतं. 'रुके रुके से कदम, रुक के बार-बार चले, क़रार लेके तेरे दर से बेक़रार चले' , सारखी गाणी मन कासावीस करतात. 'मैने तेरे लिए ही सात रंग के सपने चुने', सारखा आशावाद , 'थोडा है थोडे कि जरुरत है', मधलं समाधान, 'वो शाम कुछ अजीब थी', मधलं गहिरेपण, 'भुले हुए नामोंसे कोई तो बुलाए' मधील आर्तता, 'आँखो में हमने आपके सपने सजाये है' मधलं प्रेम,'हजार राहे मुडके देखी', मधली बेवफाई, 'जाने क्या सोचकर नही गुजरा, एक पल रात भर नही गुजरा', मधलं एकटेपण, 'जीना तो सिखा है मरके, मरना सिखा दो तुम', यातील मनाची अवस्था टिपायला फक्त आणि फक्त गुलजारचं हवेत.

आयुष्यातील वेगवेगळ्या वळणांवर त्यांनी लिहिलेली गाणी नेहमीच आपल्याला जवळची वाटली. आपण आपल्या अनेक भावनांचं प्रतिबिंब त्यांच्या गाण्यांमध्ये पाहिलं. कधी त्यांच्या गाण्यांनी प्रेमात पाडलं तरी कधी एकटं असतांना सोबत केली. 'कभी जिंदगी का एक पल नहीं गुजरता , कभी जिंदगी एक पल में गुजर जाती है', हे त्यांनीच त्यांच्या शब्दांमधून सांगितलं. त्यांच्या गाण्यांतून आपण मुसाफिर म्हणून जगलो, प्रेम करायला शिकलो.. 'आनेवाला पल जाने वाला है , हो सके तो इसमें जिंदगी बिता दो, पल जो ये जानेवाला है', म्हणत जगणं शिकलो ! 

त्यामुळे 'जिंदगी गुलजा़र है' म्हणता म्हणता 'गुलजा़रही जिंदगी है' कधी झालं हे समजलंच नाही ...

आज त्यांचा वाढदिवस ! गुलजा़र जी, तुम्हाला आभाळभर शुभेच्छा ! तुमच्या गाण्यांसोबत आमचा हा प्रवास असाच सुरु राहो !!!

© कविता सहस्रबुद्धे
(18 August 2021)



उमराव जान

दिग्दर्शक मुझफ्फर अली यांचा 'उमराव जान' हा चित्रपट लक्षांत राहिला तो शहरयार यांनी लिहिलेल्या खोल,भावपूर्ण गीतांमुळे, त्याला खय्याम साहेबांनी दिलेल्या लाजवाब संगीतामुळे, त्या गीतांना आपल्या स्वरातून चिरंतन करणाऱ्या आशाताईंमुळे आणि मुख्य म्हणजे चित्रपटात उमराव ची भूमिका जगलेल्या रेखा मुळे !  या चित्रपटातील भूमिकेसाठी रेखाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, आशा ताईंना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका व खय्याम साहेबांना सर्वोत्कृष्ट संगीतकार हे राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. त्या काळांत पडद्यावर नवाबी युग जिवंत करणाऱ्या मुझफ्फर अली यांना सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 

हा चित्रपट मिर्झा हादी रुसवा यांच्या 'उमराव जान अदा' या उर्दू कादंबरीवर आधारित आहे. मुझफ्फर अली या चित्रपटातील उर्दू भाषेच्या सौंदर्याबद्दल बोलताना म्हणतात "सत्यजीत रे से उर्दू का इस्तेमाल फिल्मों में करना सीखा मैने कलकत्ते से, मतलब जो सत्यजीत रे बंगाली में इस्तेमाल करते थे अपनी ज़बान और संस्कृति को दुनिया के सामने रखने के लिए, उसीसे सिख मिली। दूसरा सीखा अलीग़ढ से। दुनिया का सारा दर्द वहाँकी शायरी में है। अलीगढ़ ने मुझे बहोत बड़ा तोहफा दिया है उर्दू के माध्यम से, उर्दू की सरजमींन है अलीग़ढ।"

या सिनेमाची त्यांच्या डोक्यात असलेली कल्पना म्हणजे, 'स्क्रीन प्ले को गझल के फॉर्म में लिखना'.. थोडक्यात गाण्यांमधून पटकथा लिहिणं आणि या करता त्यांच्या समोर एकचं नाव होतं, शहरयार !

या स्वप्नाला मूर्त रूप देण्यासाठी त्यांनी शहरयार यांना आपल्याच घरी राहायला आणलं. पुढे तब्बल दिड ते दोन वर्ष ते एकत्र राहिले या चित्रपटाच्या गाण्यावर काम करण्यासाठी. योगायोगाने समोर खय्याम राहायचे. मग काय 'हर शाम, शाम ए शहरयार और शाम ए खय्याम'....यातूनच लिहिली गेली एक से बढकर एक गाणी !!

खय्याम सांगतात, मुझफ्फर अलींच्या 'उमराव जान' साठी काम करतांना त्यांना खूप दडपण आलं होतं. कमाल अमरोही यांच्या पाकिजा नंतर तीच पार्श्वभूमी असलेला चित्रपट करणं हे एक आव्हान होतं. त्यांनी खूप मेहनत घेतली. नर्तकी उमरावजान शायरा होती, कथ्थक नृत्य शास्त्रीय संगीताचं तिनं शिक्षण घेतलं होतं. हे महत्त्वाचे संदर्भ खय्यामजींनी गीतं संगीतबद्ध करताना लक्षात ठेवले. आपल्या गाण्यांसाठी आशाताईं शिवाय दुसरं कोणतच नाव त्यांच्या समोर नव्हतं. खय्यामजींनी आशाताईंना पहिल्याच मिटिंग मध्ये सांगितलं, "हमे आशा नही, उमराव जान चाहिये". पडद्यावर साक्षात रेखा आणि आशाताईंच्या आवाजातील बहारदार गाणी यामुळे सिनेमा सुपरहिट ठरला.   

सर्वोत्कृष्ट संगीतकार हा राष्ट्रीय फ़िल्म पुरस्कार खय्याम साहेबांना याच चित्रपटाने दिला. खय्याम म्हणायचे, "रेखा ने मेरे संगीत में जान डाल दी, उनके अभिनय को देखकर लगता है कि रेखा पिछले जन्म में उमराव जान ही थी"... एका चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ते म्हणाले होते,'रेखा ना होती तो उमराव जान का संगीत कभी हिट नहीं होता'....

© कविता सहस्रबुद्धे

Thursday, July 1, 2021

Cheerful stories of Lockdown !


पहिलटकरीण असल्यासारखं मागच्या लॉकडाऊन ला फारच गडबड झाली होती पण या वेळा अनुभवाची शिदोरी कामी आली. घरी पुरेसं गरजेचं सामान भरून ठेवल्यामुळे बाहेर जायचा तसा फारसा प्रश्न येत नाहीये तरी अंडी, फळं, ब्रेड आणि भाजी करता अधून मधून बाहेर जावं लागतंच ना .. त्यातही नक्की सकाळी ९ ते १ वेळ आहे कि ७ ते ११  हा गोंधळ आहेच. दुधाचं दुकान ७ ला उघडतं पण भाजीवाला ८ शिवाय उगवत नाही आणि ब्रेड अंडी बटर वाला पूर्ण झोप झाल्याशिवाय ९ पर्यंत दुकानच उघडत नाही. कशी सांगड घालणार मग एका फेरीत सर्वाची आणि ती घातली व ठरवलं कि ९ वाजता जावं म्हणजे एकाच फेरीत सर्व कामं होतील तर बरोबर पावणेनऊला ९.१५ च्या मिटिंगचा मेसेज येतो. अरे काय हे .... 

मी एक स्टडी केलाय मागच्या लॉकडाऊन पासून .. मागच्या वेळी सगळ्या मिटिंग दुपारी असायच्या. बरोबर.. कामवाल्या बायका नाहीत,सगळं काम घरी त्यामुळे सकाळी सकाळी virtual ऑफिसमध्ये शांतता असायची आणि दुपारनंतर सगळं काही पेटायचं पण या वेळी सकाळीच सगळं काही पेटतं. वेगवेगळ्या मिटिंग वेगवेगळे बॉस सकाळीच का ठरवतात .. एक मिटिंग ९ ला, दुसरी मिटिंग १० ला .. अरे काय चाललंय. नॉर्मल ऑफिस असताना उठतो त्या वेळी उठलं ना तरी आवरत नाही आमचं ९ पर्यंत आणि मिटिंग काय ठरवता यार सकाळी सकाळी ...  

घड्याळांत साडेआठ पावणे नऊ झालेलं असतात तेव्हा मावशी येतात कामाला. 'मी घरी म्हणजे सुट्टीवर' असा ठाम समज झाला आहे त्यांचा तरी मी रोज सांगत असते त्यांना अहो मी घरून काम करते, सुट्टी नाहीये माझी तरी त्यांना काही खरं वाटत नसावं बहुदा . 'ताई घरी हाये तोवर आराम करा थोडा, कशाला दगदग करायची इतकी '.. या वाक्याने सुरू होणारी त्यांची गाडी थांबतच नाही. किती बोलतात त्या.. एरवी मी रोज भेटत नाही त्यामुळे गप्पांचा बॅकलॉग भरून काढतायेत सध्या. एकीकडे पोळ्या, दुसरीकडे भाजीची फोडणी, मध्ये मध्ये लहान मुलासारखं लुडबुड करून 'आज काय आहे ब्रेकफास्टला यम्मी' असे प्रश्न विचारणारी भुणभुण आणि त्यात यांची बडबड. एकदम चुरचुरीत फोडणीत चटपटीत गप्पा आणि हे सगळं कमी म्हणून ऑन टॉप ऑफ इट बॉसनी ठेवलेली सकाळची  ९.३० ची  मिटिंग... बॉसला बायकोला मदत नसते का हो करायची ? रोज प्रश्न पडतो मला. पण विचारताच येत नाही. बरं आमच्या घरी एकीकडे इतकं वातावरण पेटलेलं असताना दुसरीकडे केयुरसर मात्र बाहेर हॉल मध्ये लॅपटॉप घेऊन शांतपणे काम करत असतात. कशाशीच आपला संबंध नसल्यासारखे . टेरेस मधून छान वारं येत असतं , पडदे उडत असतात कसं एकदम कूल .... म्हणजे एकीकडे आमचा डिस्को भांगडा चालू असतो आणि इथे instrumental song .... बॉस साठी राखून ठेवलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं मग मला घरातंच मिळतातं  .. 

आता आजचच उदाहरण घ्या. थोडा उशीर काय झाला उठायला तर सगळया गोंधळात गरमागरम पोहे खायचे राहिले,  परत एकदा आयता चहा हवा होता तो पण राहिला आणि मिटिंग ची वेळ झाली. मग आवरून लॅपटॉप उघडून समोर बसले .. अरे वाह अजून येतायेत मंडळी म्हणजे उशीर नाही झाला आपल्याला हे बघून बरं वाटलं. चेहऱ्यावर उगाचच एक smile आलं. मग उठून खिडकीचे पडदे सारखे केले, खोलीचा दरवाजा लोटला आणि आरामात खुर्चीत बसले मिटिंगसाठी. एक एक करत सर्व मंडळी जमली, गुड मॉर्निंग wish करून झालं, एकमेकांची चौकशी झाली, आठवडाभर न भेटलेले रोजचे सवयीचे चेहेरे दिसले, रोज ऑफिस मध्ये करतो ती मजा नाही यांत पण एकमेकांना बघूनही खूप बरं वाटलं. मिटिंग सुरु झाली. 

अवघ्या काही मिनिटांत मी मिटिंग मध्ये बोलत असतांना खोलीचा दरवाजा उघडून कांतेय आत आला. मला वाटलं काही पुस्तक किंवा अभ्यासाचं काही घ्यायला आला असेल. त्यामुळे मी लक्ष नाही दिलं. मी  हेडफोन्स पण नव्हते लावले आणि बोलत होते. तर हा पठ्ठ्या ट्रे मध्ये ग्लास भरून पाणी घेऊन आला होता. एकदम तो बाजूला आला म्हणून मी pause घेतला आणि तेव्हाच " पाणी आणलंय मालकीणबाई "...असं म्हणून ग्लास माझ्या बाजूला ठेवून पसार झाला. मी अवाक झाले. तो एकच वाक्य बोलला पण ते सर्वांनी ऐकलं होतं. ओह गॉड .. सगळे हसायला लागले. " its ok dear, he is so cute, naughty boy, it 's fine, मुलं असं नाही करणार तर कोण करणारं ".. अशा वेगवेगळ्या प्रतिक्रियांनी त्या क्षणी मला सावरलं. आणि माझ्या लक्षांत आलं आज कितीतरी दिवसांनी मनापासून इतके खळाळून हसणारे चेहेरे आणि तो सर्वांचा हसण्याचा आवाज आम्ही प्रत्येकानेच अनुभवला होता. 








 

 दाटून कंठ येतो...


काही गाणी आयुष्यातील अवघड वळणांवर पुन्हा नव्याने भेटतात..खरं तर शब्द तेच,भाव तोच,तीच आर्तता,चालही तीच तरी प्रसंगानुरूप अर्थ मात्र अजूनच गहिरा होत जातो,  मनाला स्पर्शून जातो आणि डोळ्यांत मळभ भरून यावं असं काहीसं होतं. असंच आहे शांताबाईंनी लिहिलेलं एक अजरामर गाणं. मागच्या काही दिवसांत परत एकदा ओळख झाली या गाण्याशी .. नव्याने ! कारण या वेळी संदर्भ, परिस्थिती सारं काही बदललं होतं... आणि विचित्र योगायोग, तो पण कसा तर माझ्या बाबांच्या सर्वात आवडत्या गायकाने म्हणजेच श्री.वसंतराव देशपांडे यांनी गायलेले हे गीत राहुल देशपांडे या माझ्या आवडत्या गायकाच्या आवाजात त्याच्या YOUTUBE चॅनेल वर रिलीज होणं व ते सुद्धा बाबा गेले त्याच आठवड्यात आणि तेंव्हाच मी ते ऐकणं ..  'दाटून कंठ येतो.....' 

१९७९ पासून आजवर हे गाणं कितीतरी वेळा ऐकलंय, कधी नकळत कानावर पडलंय पण यावेळी ते ऐकतांना जे वाटलं ते खूप खूप वेगळं होतं.. लग्न झालं तरी एकाच शहरात राहताना बाबांपासून दूर असं कधी जावंच लागलं नाही. मनात आलं कि कधीही घरी जायचं आणि बाबांना भेटायचं इतकं सोपं होतं सारं.. पण सध्याच्या परिस्थितीत हेच इवलसं अंतर कधी मोठं होत गेलं, तेही काही क्षणांत ते कळलंच नाही. निरोप न घेताच बाबा निघून गेले,कायमचे... कोरोना या एका शब्दाने हे अंतर इतकं वाढलं की त्यांना एकदा स्पर्श करण्याचं, जवळून डोळे भरून पाहायचं सुख सुद्धा त्याने हिरावून घेतलं.. 

आपण आई होतांना पोटांत जाणवणारी बाळाची हालचाल किती सुखद असते नाही. त्या नऊ महिन्यात आपल्या बाळाने ऐकलेला आपला आवाज, आपल्या हृदयाची धडधड व आपला स्पर्श 'आई' म्हणून सर्वात आधी आपल्याला आपल्या बाळाशी जोडतो. बाळाच्या जन्मानंतर त्याला बाबाचा स्पर्श,बाबाचा आवाज आणि सहवास मिळायला सुरवात होते. असं म्हणतात मुलं आईच्या आणि मुली बाबाच्या जास्त लाडक्या असतात. खरं तर आपल्या काळजाचा तुकडाच, मग मुलगा काय किंवा मुलगी काय .. पण तसूभर का होईना मुली बाबाच्या जास्त लाडक्या असतात, हेच खरं.मला अजूनही आठवतंय मी लहान असतांना बाबा ऑफिस मधून यायच्या वेळी घराबाहेर पायरीवर बसून बाबांची वाट पाहण्यात काय मजा यायची. कोपऱ्यावर बाबा येतांना दिसले कि चेहऱ्यावर हसू पसरायचं.कधीही 'काय आणू तुझ्यासाठी?' असं बाबांनी विचारलं तर 'फुटाणे आणा' हे माझं उत्तर ठरलेलं. 'अग तेव्हा फुटाणे आणण जमायचं, पैसे नसायचे फारसे जवळ.पण तू कधी खर्चात नाही टाकलंस पोरी मला' असं ती जुनी आठवण सांगताना कातर होणारा बाबांचा स्वर आजही कानात ताजा आहे !

त्या दिवशी राहुल देशपांडे यांच्या आवाजात हे गाणं ऐकतांना अशा कितीतरी आठवणी डोळ्यांत एकदम तरळल्या. माझ्या जन्मानंतर त्या आनंदात माझ्यावर कविता लिहिणारे बाबा, त्यांच लेखन कौशल्य माझ्या ठायी यावं म्हणून मुद्दाम माझं नाव 'कविता' ठेवणारे माझे बाबा मग परत परत मला दिसत राहिले. या गाण्याच्या पहिल्या कडव्यापासून सुरु झालेला माझा बाबांसोबतच्या आठवणींचा प्रवास,आम्ही एकत्र घालवलेल्या अनेक क्षणांना परत एकदा स्पर्श करून आला आणि शेवटच्या कडव्यावर मात्र पुरता अडखळला.. असं वाटलं जे गमावलंय त्याची सावली या गाण्यात डोकावते आहे. 'घेऊ कसा निरोप तुटतात आत धागे' ... हि ओळ काही क्षणांकरता बाबांजवळ घेऊन गेली. त्यांच जाणं आपल्याला किती पोरकं करून गेलंय हे सांगून गेली... 'आत्मजा' या शब्दांतील गोडवा खऱ्या अर्थाने ज्याला समजला होता आता तोच आपल्याजवळ नाही पण तरीही जातांना त्याने आपल्याकडून सुखानं राहण्याचं वचन घेतलंय.. 

मराठीत या नात्याचं शांताबाईं इतकं सुरेख,अलवार,नाजूक शब्दचित्र दुसरं कोणीच चितारलेलं नाही. अगदी कमीत कमी वाद्यांच्या संगतीत राहुलच्या आवाजात हे गाणं ऐकतांना आपसूकच डोळे मिटले.. अव्यक्त भावनांना शब्द आणि सूर दोन्ही सापडले..वाटलं,हे गाणं जितकं बाबांचं आहे तितकंच ते माझं पण आहे ...  


 करून तर पहा ..


कालच मैत्रिणीकडे गेले होते, नेहाकडे. महिनाभरापूर्वी तिचे वडील गेले. वडिलांना जाऊन आठवडा होत नाही तोच तिच्या मुलाला आणि नवऱ्याला कोरोना झाला त्यामुळे ती खूप टेन्शन मध्ये होती. कोरोना या शब्दाची भीती बसली होती तिच्या मनांत. पण सगळं व्यवस्थित सांभाळलं तिने. आता दोघेही कोरोना मधून बरे झाले म्हणून आवर्जून ठरवून गेले तिच्याकडे, सर्वांना भेटायला आणि तिच्याशी गप्पा मारायला. वाटलं, इतके दिवस कोणी आलं गेलं नसेल, आपण गेलो तर बरं वाटेल सर्वांना. तिला आवडतात म्हणून मटार करंजी, पायनॅपल शिरा आणि केक टोस्ट घेऊन गेले. तिला सांगितलं, 'आलं घालून वाफाळलेला चहा मात्र तुझ्या हातचा हवा'. खूप खूष होती मी आले म्हणून. मग काय गप्पा झाल्या, खाऊची तारीफ झाली. चहाचे कप घेऊन मग आम्ही दोघी टेरेस वर गेलो. मस्त गार हवा, निळ्या काळ्या रंगांनी भरलेले आकाश, पक्षांचा चिवचिवाट आणि खूप दिवसांनी मिळालेला निवांतपणा .. अजून काय हवं !

माझ्या हातावर हात ठेवून नेहा म्हणाली, 'खूप बरं झालं आलीस' ..तिच्या स्पर्शातून खूप काही समजलं, तिने न सांगताच ! तशा दोन / तीन चकरा झाल्या होत्या माझ्या ते सर्व जण घरीच quarantine असतांना पण भेट नव्हती झाली. दारा बाहेर सामान ठेवून फोन केला होता, 'दार उघडून पिशव्या घे ग खाऊच्या आतमध्ये'.. खरं तर असं सांगताना मला आणि ऐकतांना तिला पण नक्कीच कसं तरी झालं असणार, पण नाईलाज होता. सतत भेटणाऱ्या आम्ही मैत्रिणी आजकाल जी काही भेट व्हायची ती फोन वरच त्यामुळे आपल्याच मैत्रिणीला इतके दिवसांनी प्रत्यक्ष पाहून खूप बरं वाटलं.. जवळपास दिड वर्ष झालं आता, आपल्या सर्वांचच पूर्वीचं आयुष्य हरवून. कधीही वाटलं भेटावं तर आमचं नेहमीच्या जागी कॉफी आणि बरंच काही ठरलेलं .. पण हळूहळू सगळंच बदललं तरी जे समोर आहे त्याला स्वीकारून आपण सर्व जण चालतो आहोतच कि. फोन वरून, झूम कॉल वरून दुधाची तहान ताकावर भागवतो इतकंच त्यामुळे असं प्रत्यक्ष भेटण्यातली मजा काही औरच !! एका गोष्टीचं मात्र खूप समाधान आहे आणि अभिमान सुद्धा कि आम्ही मैत्रिणींनी कोणालाही गरज पडली तेव्हा न सांगता हक्कानं एकमेकींना खूप मदत केली... 'न सांगता' हे सर्वात महत्वाचं, कारण समजून उमजून विचार करून कोणासाठी हक्कानं काही करणं यातलं समाधान जो करतो त्याला आणि ज्याच्यासाठी करतो त्याला सुद्धा खूप काही देऊन जातं हे नक्की ! 

या काळात जसं माणसा माणसांमधली अंतरं कमी झाली तशी काही अंतरं वाढली सुद्धा. प्रत्येकाला सुखद अनुभवच आले असं नाही तर अनपेक्षितपणे काही अनुभव डोळ्यांच्या कडा भिजवून सुद्धा गेले. नेहा म्हणाली, 'अग शेजारी राहणाऱ्या आरतीने फक्त फोन वर चौकशी केली ग, आता महिना होऊन गेला तरी आली नाही भेटायला. आपण इतके शिकलेले, सुशिक्षित लोक आणि आपणच असं वागायचं. खूप वाईट वाटलं. अग, माझ्याकडे काम करणाऱ्या राधाबाई रोज बेल वाजवत होत्या, ताई सांगा काय आणून देवू म्हणून  .. काय बोलू, काही जण माणुसकी पार विसरलेत ग'...

आज नेहाने सांगितले तसे कितीक अनुभव आपण सर्वानीच ऐकले आहेत, अनुभवले आहेत. कोरोना मधून बरं होऊन महिना झाला तरी कामाला येणाऱ्या बाईंना 'त्यांच्याकडे गेलीस तर आमच्याकडे येऊ नको', असं सांगणारी, लिफ्ट मध्ये एकत्र जायला नको म्हणून तोंडावर लिफ्टची दारं लावणारी मंडळी खरंच आपल्या समजण्याच्या पलीकडची आहेत .. अरे निगेटिव्ह रिपोर्ट आलाय , घरी व्यवस्थित sanitization करून घेतलंय आणि मुख्य म्हणजे आता बरं होऊनही दोन / तीन आठवडे झाले आहेत असं असतांनाही अशा सुशिक्षित लोकांकडून या दुखण्यातून बरं झालेल्या रुग्णांना,त्यांच्या कुटुंबियांना मिळणारी हि वागणूक पाहून त्यावर काहीही बोलूच नये असं वाटतं. विविध स्तरांवर हे चित्र कमी अधिक प्रमाणात सारखंच आहे. 'डॉक्टरांची मुलं आहेत ती, त्यांच्याबरोबर नका खेळू, त्यांचे आईवडील रोज जातात हॉस्पिटल मध्ये'.. अशी अगदी लहान मुलांपर्यंत पोहोचलेली या मानसिकतेची झळ फार फार वाईट आहे. 

मागच्या वर्षी आपण सगळेच घाबरलेले होतो. फारशी माहिती नव्हती त्यामुळे पुष्कळ भीती होती मनांत. कालांतराने थोडं चित्र बदललं. लस आली आणि थोडा दिलासा मिळाला. वेळोवेळी शासनाकडून जाहीर होणाऱ्या मार्गदर्शक सूचनांमुळे आपल्या सर्वांनाच एक प्रकारची मदत झाली. पण दुसरी लाट तिचं भयानक रूप घेऊन आली जे आपण सर्वांनी खूप जवळून पाहिलंय, अनुभवलंय .. आपला आयुष्याकडे पाहायचा दृष्टिकोन संपूर्णपणे बदलून टाकणारी हि लाट सोबत खूप काही घेऊन गेली आणि खूप काही शिकवून गेली. पण आपण खरंच काही शिकलोय का ? असा प्रश्नच पडतो असे कटू अनुभव ऐकले कि .. 

अजून लढाई नक्कीच संपलेली नाही त्यामुळे आपण प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलू यांत ना ..  योग्य काळजी घेऊन आपण आजूबाजूच्या एका कुटुंबाला जरी मदत करू शकलो ना तर त्यातून मिळणारा आनंद खरंच लाख मोलाचा आहे, करून तर पहा !!!

- कविता सहस्रबुद्धे 

Saturday, February 20, 2021

मागच्या पंधरा दिवसांपासून ऑफिस मध्ये ऍडमिशनचा सोहळा सुरु आहे. नवं वर्ष सुरु झालं कि दरवर्षी वेध लागतात याचे. मग काय जोरदार तयारी सुरु होतेअर्थात या वर्षी हितयारी करतांना भरपूर दमछाक झाली. सर्वच नवीन. मग काय झूम शब्दापासून सुरु होणारी गाणी म्हणत, आठवत, गुणगुणत सर्वांनी कामाला सुरवात केलीकोविडच्या कृपेने या वर्षी मुलांना zoom वर गोळा करून ऍडमिशनचा श्रीगणेशा झाला.पहिला दिवस तर छोट्या छोट्या गोंधळातून सावरत निभावला पण दुसऱ्या दिवसापासून मात्र 'झूम बाबा झूम' म्हणत सर्वांनी कंबर कसली

 

तसा रोजच संध्याकाळी घरी जायला उशीर होतो सध्या तरी दुसऱ्या दिवशी त्याच उत्साहाने, जोमाने मांडवात परतायची ओढ मात्र कायम असते ! सोबत इथल्या वातावरणातील महाबळेश्वरचा फील हि रंगत अजूनच वाढवतो. मग काय चहा कॉफी सोडण्याची स्वप्नं हळुवारपणे हवे मध्येच हरवून जातात. संध्याकाळी वाफाळलेल्या चहाच्या जोडीला गरमा गरम वडापाव, समोसा मनाची पोटाची शांती अबाधित ठेवून सारं वातावरण प्रसन्न ठेवण्याची जबाबदारी बखुबी निभावतात. काम संपवून उशिरा घरी जातांना प्रत्येकाच्या  चेहरयावर पसरलेलं समाधान अनुभवण्यातलं सुख मात्र,कमाल असतं !

 

बरं, या सर्व प्रोसेस मध्ये काहीतरी काड्या सतत करत राहण्याचा विडा उचललेली काही अफलातून व्यक्तिमत्व एकीकडे आमचं काम वाढवतात तर दुसरीकडे वातावरणातला  ताण कमी करत सर्वांना हसायला भाग पाडतात. मग काय बोलावं असा प्रश्न सुद्धा पडतो. या सावळ्या गोंधळात जेवणासाठी मिळणारा वेळ सुद्धा दिक्षितांनी सांगितल्या प्रमाणे ५५ मिनिटे नाही तर फक्त १५ मिनिटांचाच असतो

 

दिवसभर अवतीभवती असणारा कोलाहल कधी कधी शांततेमधल्या सुखाची जाणीव करून देतो. त्यामुळे आज उगाचच वाटलं, कोणाशीही बोलू नयेजरा शांतपणे आपल्याच जागेवर बसून जेवावं. जेवता जेवता गाणं ऐकावं म्हणून एवढ्यातच डाउनलोड केलेल्या SPOTIFY ऍप वर मी गाणी लावली. खरं तर मला माझ्याच selected playlist मधली गाणी ऐकायला आवडतात. पण म्हटलं चला आज काहीतरी वेगळं ऐकू .. 80's ROMANTIC SONGS .. 'जाने क्या बात है , जाने क्या बात है '... आहा .. माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक ! खरं तर प्रत्येक मुलीने अनुभवलेली PHASE या गाण्यांत आनंद बक्षी साहेबांनी इतकी सुरेख चितारली आहे कि हे गाणं कितीही वेळा ऐकलं तरी त्याची जादू, नजाकत आजही तितकीच तरुण आहे. अनदेखा अनजाना चेहरा DDLJ च्या आधी याच गाण्यांतून दिसला होता खरं तर ... हे गाणं ऐकत ऐकत मी माझ्याच तंद्रीत होते. गाणं संपलं.. आता पुढचं गाणं कोणतं असेल असा मी विचार करत होते ...  कसं असतं ना, आपल्या प्ले लिस्ट मधली सगळी गाणी ,त्याचा SEQUENCE पाठ असतो पण अशी ऍप वर गाणी ऐकताना कोणतं गाणं असेल पुढे हि उत्सुकता वेगळी असते... आणि ती धून कानांवर पडली ... ओहो .. आर डी साहेब ,आशाजी आणि जावेदजी यांनी अजरामर केलेलं गीत .. करेक्ट तेच गाणं ... 'जाने दो ना SSS' ...  हे अनपेक्षित गाणं लागलं (म्हणजे हे गाणं लागेल हे मला अपेक्षित नव्हतं असं म्हणायचं आहे) आणि त्याच वेळी माझ्या केबिनच दार धाडकन उघडून माझ्या बॉसची आणि त्याच्या सोबत आमच्या टेक्निकल टिमची धमाकेदार एन्ट्री झाली.. हे पण अनपेक्षित.. सारंच अनपेक्षित !! 

 

आता एकीकडे या आशाजींना थांबवू कि आधी बॉसला 'येस सर' म्हणू काही समजेना.. बरं गाणं सुरु होतं तरी मोबाईलची स्क्रीन झोपली होती त्यामुळे PAUSE चं बटन पण हाताशी नव्हतं .. गाण्याचा आवाज इतकाही कमी नव्हता कि बॉसला ऐकू जाणार नाही किंवा गाण्याचे बोल त्याला समजणार नाहीत. अरे राम असं म्हणत मी मोबाईलशी खाडखूड करत आशा ताईंना कसं थांबवलं ते माझं मला माहित. 'वेळ काय, चाललंय काय आणि या मॅडम ऐकतायेत काय' असा बॉसचा चेहरा होण्याआधीच मी स्वतःला वाचवलं होतं. एकूण काय, तर सध्या तरी जीवाला काही शांतता मिळणार नाही हे पटलं होतंमग कायमनातल्या मनांत हुश्श करतसमोर उभ्या ठाकलेल्या पुढच्या प्रॉब्लेमला सोडवण्याकरता मी तयार होते...