Tuesday, August 24, 2021



उमराव जान

दिग्दर्शक मुझफ्फर अली यांचा 'उमराव जान' हा चित्रपट लक्षांत राहिला तो शहरयार यांनी लिहिलेल्या खोल,भावपूर्ण गीतांमुळे, त्याला खय्याम साहेबांनी दिलेल्या लाजवाब संगीतामुळे, त्या गीतांना आपल्या स्वरातून चिरंतन करणाऱ्या आशाताईंमुळे आणि मुख्य म्हणजे चित्रपटात उमराव ची भूमिका जगलेल्या रेखा मुळे !  या चित्रपटातील भूमिकेसाठी रेखाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, आशा ताईंना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका व खय्याम साहेबांना सर्वोत्कृष्ट संगीतकार हे राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. त्या काळांत पडद्यावर नवाबी युग जिवंत करणाऱ्या मुझफ्फर अली यांना सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 

हा चित्रपट मिर्झा हादी रुसवा यांच्या 'उमराव जान अदा' या उर्दू कादंबरीवर आधारित आहे. मुझफ्फर अली या चित्रपटातील उर्दू भाषेच्या सौंदर्याबद्दल बोलताना म्हणतात "सत्यजीत रे से उर्दू का इस्तेमाल फिल्मों में करना सीखा मैने कलकत्ते से, मतलब जो सत्यजीत रे बंगाली में इस्तेमाल करते थे अपनी ज़बान और संस्कृति को दुनिया के सामने रखने के लिए, उसीसे सिख मिली। दूसरा सीखा अलीग़ढ से। दुनिया का सारा दर्द वहाँकी शायरी में है। अलीगढ़ ने मुझे बहोत बड़ा तोहफा दिया है उर्दू के माध्यम से, उर्दू की सरजमींन है अलीग़ढ।"

या सिनेमाची त्यांच्या डोक्यात असलेली कल्पना म्हणजे, 'स्क्रीन प्ले को गझल के फॉर्म में लिखना'.. थोडक्यात गाण्यांमधून पटकथा लिहिणं आणि या करता त्यांच्या समोर एकचं नाव होतं, शहरयार !

या स्वप्नाला मूर्त रूप देण्यासाठी त्यांनी शहरयार यांना आपल्याच घरी राहायला आणलं. पुढे तब्बल दिड ते दोन वर्ष ते एकत्र राहिले या चित्रपटाच्या गाण्यावर काम करण्यासाठी. योगायोगाने समोर खय्याम राहायचे. मग काय 'हर शाम, शाम ए शहरयार और शाम ए खय्याम'....यातूनच लिहिली गेली एक से बढकर एक गाणी !!

खय्याम सांगतात, मुझफ्फर अलींच्या 'उमराव जान' साठी काम करतांना त्यांना खूप दडपण आलं होतं. कमाल अमरोही यांच्या पाकिजा नंतर तीच पार्श्वभूमी असलेला चित्रपट करणं हे एक आव्हान होतं. त्यांनी खूप मेहनत घेतली. नर्तकी उमरावजान शायरा होती, कथ्थक नृत्य शास्त्रीय संगीताचं तिनं शिक्षण घेतलं होतं. हे महत्त्वाचे संदर्भ खय्यामजींनी गीतं संगीतबद्ध करताना लक्षात ठेवले. आपल्या गाण्यांसाठी आशाताईं शिवाय दुसरं कोणतच नाव त्यांच्या समोर नव्हतं. खय्यामजींनी आशाताईंना पहिल्याच मिटिंग मध्ये सांगितलं, "हमे आशा नही, उमराव जान चाहिये". पडद्यावर साक्षात रेखा आणि आशाताईंच्या आवाजातील बहारदार गाणी यामुळे सिनेमा सुपरहिट ठरला.   

सर्वोत्कृष्ट संगीतकार हा राष्ट्रीय फ़िल्म पुरस्कार खय्याम साहेबांना याच चित्रपटाने दिला. खय्याम म्हणायचे, "रेखा ने मेरे संगीत में जान डाल दी, उनके अभिनय को देखकर लगता है कि रेखा पिछले जन्म में उमराव जान ही थी"... एका चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ते म्हणाले होते,'रेखा ना होती तो उमराव जान का संगीत कभी हिट नहीं होता'....

© कविता सहस्रबुद्धे

No comments:

Post a Comment