निरोप
वर्ष अखेर परीक्षा संपली कि घरी जातांना मुलं आवर्जून भेटायला येतांत. वर्गात प्राध्यापकांशी आणि वर्गाबाहेर माझ्याशी गाठ असते त्यांची, मग काय. बरेचदा प्रत्यक्ष तर अधूनमधून ईमेल वर झाप खाणारी माझी हि मुलं माझ्या भीतीने वर्षभर 'ड्रेस कोड' फॉलो करतात, आखून दिलेलं नियम पाळतात, सगळं काही ऐकतात. मधेच 'मॅडम हम क्या स्कुल मे है क्या', असे उगीच प्रश्न पण विचारतात. आमच्या हिरव्यागार कॅम्पस मध्ये झाडांची काही कमी आहे का घरटं बांधायला, नाही ना, तरीही आमची मुलं अधूनमधून आपल्या डोक्यावर पक्षांसाठी घरटी बांधतात आणि मी विचारलं, 'केस का वाढवलेत एवढे' तर 'पॉकेट मनी संपला' हे नेहमीचं कारण देऊन, वर माझ्याकडूनच पैसे घेऊन नाईलाज म्हणून कटिंग करून येतात. अहो, दुसऱ्या दिवशी मी पण ओळखू शकत नाही इतकी शहाणी, गुणी दिसतात. नाईट आऊट फॉर्म वर सही घ्यायला आले कि 'आई बाबांना सांगितलंय का' ? 'फोन नंबर द्या आईचा, फोन करून विचारते मी' असं म्हणताच गुमान नंतर देतात. 'आज परत late आऊट permission, सारखं कुठे जायचं असतं रे तुम्हाला', हे विचारून ना मी थकत, ना त्यावर उत्तर देऊन ते.
कालच दोन मुलं आणि एक मुलगी फॉर्म वर सही घ्यायला आले होते. तिघांची कारणं same, 'Going to Goa'... इथे आमच्या शाळेच्या ग्रुपची ट्रिप ठरत नाहीये महिना झाला, आणि हे पोट्टे पहा काल परीक्षा संपली आणि आज चालले GOA ला. मी विचारलं 'you all are going together' तर म्हणाले,'Yes ma'am'. त्यांना काय माहित मॅमना काही जमना सही करायला. 'you just wait outside' असं म्हणून मी त्यांना बाहेर पाठवलं आणि फोन लावला माझ्या collegue ला,बाजूच्याच केबिनमध्ये. 'अरे first year ची दोन मुलं आणि एक मुलगी गोव्याला चाललेत' .. तर तो म्हणाला 'जावू दे कि'.. इतकं छोटंसं उत्तर... so cool .... मला माझ्या मैत्रिणीचे बाबा आठवले, कॉलेजच्या ट्रिपला जाऊ का विचारलं तर तिला 'तंगड तोडुन हातात देईन', म्हणणारे... वेगळेच दिवस होते ते. बराच काळ लोटलाय ..खूप काही बदललंय आता, तरी तो बदल accept करतांना अजूनही जरा वेळ लागतो.कुठेतरी या मुलांची जबाबदारी आहे आपल्यावर असं वाटतं. शेवटी मुलंच ती आपल्याच विश्वात रमलेली आणि हरवलेली. मग काय थोडं 'आंजारून गोंजारून', दिली permission.
बरं सुट्टी लागली तरी लगेच घरी जायचं नसतं. आठवडाभर मनसोक्त भटकून, मजा मस्ती करून घरी जातात. आणि जायच्या आधी आवर्जून येतात भेटायला. छोटसं का होईना पण काहीतरी आणतात माझ्यासाठी. मग चॉकलेट्स,पेन, पुस्तकं,ओरिगामीची फुलं पक्षी यांनी टेबल अगदी भरून जातं. काही जण तर स्वतःच्या शेतातली फळं सुद्धा आवर्जून आणून देतात. माझं रागावणं, शिस्त लावणं माझ्या कामाचा भाग आहे. पण त्या पलीकडे आई बाबांपासून लांब हॉस्टेल मध्ये राहणाऱ्या या मुलांचं कौतूक करतांना, त्यांचे वाढदिवस साजरे करताना, त्यांचे हट्ट पुरवतांना, वेळेला मदत करून, गरजेला त्यांची काळजी घेताना मिळणारा आनंद निराळाच आहे. सतरा अठरा वर्षांपासून इथून शिकून बाहेर पडणारी मुलं जेव्हा आजही फोन करतात, भेटायला येतात, पत्र पाठवतात तेव्हा त्यातून वेगळीच ऊर्जा मिळते ..
मार्च महिना संपत आला की कॅम्पस मधलं वर्षभर किलबिलणारं आमचं घरटं दोन महिने रिकामं होणार म्हणून चुटपुट लागते. मुलांशिवाय घराला घरपण नाही असं म्हणतो आपण तसंच आहे, या मुलांशिवाय कॅम्पस अगदी भकास वाटतं .. त्यामुळे जून महिना व त्या सोबत येणाऱ्या मस्त पावसात कॅम्पस मध्ये मुलं जेव्हा परत येतील तेव्हाच खऱ्या अर्थाने नवीन वर्षाची सुरवात होईल !
- कविता सहस्रबुद्धे
No comments:
Post a Comment