Tuesday, September 6, 2022

  गाण्यामागची गोष्ट 


पंचमदा असं म्हणायचे कि 'गाणी काही आपोआप घडत नाहीत. त्यासाठी खूप झटावं लागतं. एखादं लहान मूल कसं आपण वाढवतो तशी त्या गाण्याची निगा राखावी लागते. मूळ चाल तयार झाली कि ती शंभरदा गुणगुणली, हळूहळू मग त्या गाण्यात प्राण फुंकले कि मग ते गाणं उभं राहतं, चालू लागतं मग धावतं' ! म्हणून तर कित्येक गीतांना पुरेसा वेळ देऊन, संवेदनशीलता आणि मात्यापित्याचं प्रेमळ वात्सल्य मनांत भरून त्यांनी गीते हाताळली. गुलज़ार जी म्हणतात 'लहान मुलं बागडावीत तशी माझी गीतं पंचमकडे बागडली'. या दोघांनी एकेका गाण्यावर प्रचंड मेहनत घेतली, निर्मितीचा प्रत्येक क्षण अनुभवला त्यामुळे कायम त्यातून निर्माण झालेली सर्वोत्तम कलाकृतीच आपल्यापुढे आली !

खुशबू चित्रपटातील एक गीत आहे, 'दो नैनो में आसू भरे है निंदिया कैसे समाये '.. लताजींच्या आवाजात हे गीत रेकॉर्ड झालं तेव्हा खूप जास्त वाद्यमेळ वापरला गेला. गाणं तर छान झालं होतं पण ते अंगाईगीत वाटेना. त्यामुळे गुलज़ार जी थोडे अस्वस्थ होते. या गाण्यातील वाद्यांचा इतका जास्त उपयोग व उच्च स्वरातील ध्वनी पातळी बरोबर नाही हि शंका त्यांनी पंचमदांना बोलून दाखवली. ते गाणं परत रेकॉर्ड करू यांत का, हेही सुचवलं पण हे सर्व ऐकून घेऊन पंचमदांनी त्यावर कृती मात्र काहीच केली नाही. त्यामुळे गुलज़ार साहेब अजूनच अस्वस्थ झाले. 

त्याच सुमारास दुसऱ्या एका चित्रपटातील गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी लताजी आणि गुलज़ार साहेब भेटले. गुलज़ारजींनी आपल्या मनातील शंका दीदींना बोलावून दाखवली व परत एकदा गाणं रेकॉर्ड करूया अशी विनंती केली. दीदी ताबडतोब तयार झाल्या. मग काय एक व्हायब्रोफोन पार्श्व संगीतासाठी घेऊन 'दो नैनो में आसू भरे है निंदिया कैसे समाये ' हे गाणं परत रेकॉर्ड केलं गेलं. जसं हवं होतं अगदी तसं गाणं finally गुलज़ारजींना मिळालं व तेच गाणं चित्रपटांत घेतलं गेलं. आधी रेकॉर्ड केलेलं गाणं सिडीमध्ये समाविष्ट करण्यात आलं. दोन्ही गाणी ऐकल्यावर आपल्यालाही चित्रपटातीलच गाणं जास्त भावतं !

©कविता सहस्रबुद्धे

No comments:

Post a Comment