Thursday, May 25, 2023

 पोस्टकार्ड 

दहावी बारावीच्या परीक्षा​ सुरु आहेत. एकूणच बारावीचं ते टेन्शन पाहून आपण आणि आपली मुलं यातून सुटल्याचा आनंद ​​फार म्हणजे फारच अवर्णनीय असल्याचा फील येतोय सध्या.आता घरातली चिमणी पाखरं मोठी झाली आणि घरट्यातून उडून गेली आपलं जग शोधायला .. सतत आपल्या आजूबाजूला लुडबुड करणारी, मध्ये मध्ये घुटमळणारी त्यांची आपल्याला झालेली सवय आता आठवत राहते. तरी आठवण आली की फोन मुळे ही अंतरं काही प्रमाणात का होईना लहान होतात. 'जेवलास का? काय जेवलास आज ? लवकर झोपावं रे रात्री, वेळेवर पोचतोस ना कॉलेजला', अशा सूचना, चौकशांनी सुरू झालेला फोन मग रंगत जातो. 'you need to work on this mom, किती टोकत असतेस', असं appraisal चं फील देणारं वाक्य सुद्धा ऐकावं लागतं कधी कधी. त्यावर माझं ठरलेलं वाक्य, 'अरे आईच आहे जिला हा जन्मसिद्ध अधिकार आहे टोकण्याचा'.. 

आता कालचीच मजा, चक्क चक्क एक पोस्ट कार्ड आलंफोटो पोस्ट कार्ड आणि ते सुद्धा कोची वरून. पाहिलं कोणाचं आहे आणि कोणासाठी लिहिलंय तर दोन्हीही मिसिंग होतं. एवढंच नाही, पत्यावर तर नाव कोणाचंच नाही अन फक्त प्लॅट नंबर होता सोबत सोसायटीचं नाव. आमच्या पोस्टमन काकांचंच कौतुक कि आडनाव नसूनही फक्त फ्लॅट नंबर वरून त्यांनी ते आणून दिलं आम्हाला. आई बाबा आहोत ना त्यामुळे अक्षरावरून ओळखलं कोणी पाठवलं आहे .. आणि ते सुद्धा कोची वरून, study tour वर असतांना  .. क्या बात है ! भारी वाटलं .. 

हावरटासारखं वाचायला सुरुवात केली तर, 'हे बघा एक फोटो पोस्ट कार्ड. मागच्या चित्रात एक fishing net आहे, त्या मागे जहाज आहे. कोचीवरून हॅलो म्हणायचं होतं आणि काहीतरी पाठवायचं होतं मग काय, पत्र पाठवलं. बाय बाय' आणि शेवटी 'मराठी मध्ये चुका अस्तील माफ करा',असं लिहिलं होतं तेही मुद्दाम चूक लिहून.मग काय पत्र मिळताच त्याची पोच देण्यासाठी तात्काळ फोन केला 'काय भारी वाटलं तुझं पत्र पाहून, पण अरे असं पत्र कोण लिहितं ? पण  मज्जा आली वाचून, तुला तिकडे कोचीत आमची आठवण आली ..' पुढचं माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच तो म्हणाला, 'अग उशिराच मिळालं पत्र तुम्हाला. शिवजयंती तर होऊन गेली, त्या दिवशी मिळायला हवं होतं'.. कारण काय तर कोचीमध्ये दहा रुपयांचा पोस्टल स्टॅम्प छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र असलेला मिळाला होता जो त्या पत्रावर होता. हे ऐकून तर मी निःशब्द झाले..

योगायोग म्हणजे दुसऱ्या दिवशी फिनलँड मधल्या मैत्रिणीचा मेसेज, 'अग इतक्या वर्षांनी मला कोणीतरी पत्र पाठवलंय, माझ्या नावानं आलेलं इथलं पहिलं पत्र, माझ्या भाच्याने पाठवलेले, काय सांगू कित्ती छान वाटलं ते .. आजकाल  कोणीच लिहीत नाही ग पत्र'..आणि असाच मेसेज इथे पुण्यात राहणाऱ्या दुसऱ्या मैत्रिणीचा पण आला कारण तिला सुद्धा कोची वरून एक पत्र आलं होतं. वाटलं , व्हॉटस ऍप आणि ई-मेल च्या जमान्यात पत्र कुठेतरी हरवून गेलंय नाही, लहानपणी आपण खेळायचो ना, 'माझ्या आईचं पत्र हरवलं' अगदी तसं. एक काळ होता जेव्हा पोस्टकार्ड लिहायचं कि अंतर्देशीय पत्र हे मजकूर काय लिहायचा आहे त्यावर ठरायचं. आई बाबांचा पत्र व्यवहार पाहून मग आपणही मावशी,मामा,काका,आत्या,आजोबा,आजी यांना आवर्जून लिहायचो. ​ आज तर मला आठवेचना कि मी शेवटचं पत्र कोणाला लिहिलं होतं ..

आजकाल शिक्षणासाठी बरीच मुलं घरापासून दूर राहतांत, स्वतः अनुभव घेऊन शिकतात. त्यांची धडपड, त्यांचा संघर्ष वेगळा आहे. नवी नाती जोडतांना जुन्या नात्याला जपण्याची जाण आहे त्यांना. सोबत मजा, मस्ती, खोडसाळपणा सुद्धा आहे, स्वतः मधलं निरागस लहान मूल ते बखुबी जपतात. आपल्याला सुद्धा आपल्यातील हरवत चाललेलं ते लहान मूल जपता आलं पाहिजे .. हे शिकायला पाहिजे या मुलांकडून !

No comments:

Post a Comment