Thursday, May 25, 2023

 कुछ कहानियाँ कुछ कवितायें आपके अकेलेपन में साथ होती है 

उस वक्त़ जब आप भीड़ से परे अपने साथ होते है ...

किसीके दूर जाने से पता चलता है पास होने का सही अर्थ,

तब तब वो कविता कहानियाँ उस पुरे खालीपन को भर देती है…. 

मेरे लिए वो कविता, कहानी, वो नज़्म और गझ़ल कुछ खास है 

क्यो की उसमें छिपी मासुमियत किसी के होने का सबूत है...

लोग केहेते है गझल में दिल की बात छिपी होती है, 

मेरी छोटी सी ये नज़्म जिंदगी की खुबसुरती बयाँ करती है !!


- कविता सहस्रबुद्धे

 पोस्टकार्ड 

दहावी बारावीच्या परीक्षा​ सुरु आहेत. एकूणच बारावीचं ते टेन्शन पाहून आपण आणि आपली मुलं यातून सुटल्याचा आनंद ​​फार म्हणजे फारच अवर्णनीय असल्याचा फील येतोय सध्या.आता घरातली चिमणी पाखरं मोठी झाली आणि घरट्यातून उडून गेली आपलं जग शोधायला .. सतत आपल्या आजूबाजूला लुडबुड करणारी, मध्ये मध्ये घुटमळणारी त्यांची आपल्याला झालेली सवय आता आठवत राहते. तरी आठवण आली की फोन मुळे ही अंतरं काही प्रमाणात का होईना लहान होतात. 'जेवलास का? काय जेवलास आज ? लवकर झोपावं रे रात्री, वेळेवर पोचतोस ना कॉलेजला', अशा सूचना, चौकशांनी सुरू झालेला फोन मग रंगत जातो. 'you need to work on this mom, किती टोकत असतेस', असं appraisal चं फील देणारं वाक्य सुद्धा ऐकावं लागतं कधी कधी. त्यावर माझं ठरलेलं वाक्य, 'अरे आईच आहे जिला हा जन्मसिद्ध अधिकार आहे टोकण्याचा'.. 

आता कालचीच मजा, चक्क चक्क एक पोस्ट कार्ड आलंफोटो पोस्ट कार्ड आणि ते सुद्धा कोची वरून. पाहिलं कोणाचं आहे आणि कोणासाठी लिहिलंय तर दोन्हीही मिसिंग होतं. एवढंच नाही, पत्यावर तर नाव कोणाचंच नाही अन फक्त प्लॅट नंबर होता सोबत सोसायटीचं नाव. आमच्या पोस्टमन काकांचंच कौतुक कि आडनाव नसूनही फक्त फ्लॅट नंबर वरून त्यांनी ते आणून दिलं आम्हाला. आई बाबा आहोत ना त्यामुळे अक्षरावरून ओळखलं कोणी पाठवलं आहे .. आणि ते सुद्धा कोची वरून, study tour वर असतांना  .. क्या बात है ! भारी वाटलं .. 

हावरटासारखं वाचायला सुरुवात केली तर, 'हे बघा एक फोटो पोस्ट कार्ड. मागच्या चित्रात एक fishing net आहे, त्या मागे जहाज आहे. कोचीवरून हॅलो म्हणायचं होतं आणि काहीतरी पाठवायचं होतं मग काय, पत्र पाठवलं. बाय बाय' आणि शेवटी 'मराठी मध्ये चुका अस्तील माफ करा',असं लिहिलं होतं तेही मुद्दाम चूक लिहून.मग काय पत्र मिळताच त्याची पोच देण्यासाठी तात्काळ फोन केला 'काय भारी वाटलं तुझं पत्र पाहून, पण अरे असं पत्र कोण लिहितं ? पण  मज्जा आली वाचून, तुला तिकडे कोचीत आमची आठवण आली ..' पुढचं माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच तो म्हणाला, 'अग उशिराच मिळालं पत्र तुम्हाला. शिवजयंती तर होऊन गेली, त्या दिवशी मिळायला हवं होतं'.. कारण काय तर कोचीमध्ये दहा रुपयांचा पोस्टल स्टॅम्प छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र असलेला मिळाला होता जो त्या पत्रावर होता. हे ऐकून तर मी निःशब्द झाले..

योगायोग म्हणजे दुसऱ्या दिवशी फिनलँड मधल्या मैत्रिणीचा मेसेज, 'अग इतक्या वर्षांनी मला कोणीतरी पत्र पाठवलंय, माझ्या नावानं आलेलं इथलं पहिलं पत्र, माझ्या भाच्याने पाठवलेले, काय सांगू कित्ती छान वाटलं ते .. आजकाल  कोणीच लिहीत नाही ग पत्र'..आणि असाच मेसेज इथे पुण्यात राहणाऱ्या दुसऱ्या मैत्रिणीचा पण आला कारण तिला सुद्धा कोची वरून एक पत्र आलं होतं. वाटलं , व्हॉटस ऍप आणि ई-मेल च्या जमान्यात पत्र कुठेतरी हरवून गेलंय नाही, लहानपणी आपण खेळायचो ना, 'माझ्या आईचं पत्र हरवलं' अगदी तसं. एक काळ होता जेव्हा पोस्टकार्ड लिहायचं कि अंतर्देशीय पत्र हे मजकूर काय लिहायचा आहे त्यावर ठरायचं. आई बाबांचा पत्र व्यवहार पाहून मग आपणही मावशी,मामा,काका,आत्या,आजोबा,आजी यांना आवर्जून लिहायचो. ​ आज तर मला आठवेचना कि मी शेवटचं पत्र कोणाला लिहिलं होतं ..

आजकाल शिक्षणासाठी बरीच मुलं घरापासून दूर राहतांत, स्वतः अनुभव घेऊन शिकतात. त्यांची धडपड, त्यांचा संघर्ष वेगळा आहे. नवी नाती जोडतांना जुन्या नात्याला जपण्याची जाण आहे त्यांना. सोबत मजा, मस्ती, खोडसाळपणा सुद्धा आहे, स्वतः मधलं निरागस लहान मूल ते बखुबी जपतात. आपल्याला सुद्धा आपल्यातील हरवत चाललेलं ते लहान मूल जपता आलं पाहिजे .. हे शिकायला पाहिजे या मुलांकडून !

 ऑडिट 


मार्च महिना संपला कि ऑडिटचे वारे वाहू लागतात. फायनान्स डिपार्टमेंट सगळं सांभाळत म्हणून बरं आहे. माझ्यासाठी हे सगळं फार बोअर काम आहे म्हणून मी फारशी पडत नाही त्यात. 'अरे किती कापता तो इनकम टॅक्स' यावरून सुरु झालेले आणि रंगलेले हेड ऑफिस सोबतचे माझे संवाद आणि असा प्रश्न विचारला म्हणून तिथल्या सरांनी दिलेली झाप..  एवढंच काय ते मला माझ्या स्वतःच्या टॅक्स बद्दल कळवळा वाटणारे व त्यांतून फुललेले संवाद असतात माझे फायनान्स डिपार्टमेंट सोबत. झालं काय, गेले काही दिवस आमच्या ऑफिस मध्ये ऑडिट सुरु होतं. गरज लागेल तशी माझी involvement होती. आज संपलं एकदाचं ते ऑडिट म्हणून हुश्श केलं. जुनिअर ऑडिटरची तीन जणांची टीम त्यांचं ऑडिट observation घेऊन अकाउंटंट सॊबत माझ्याकडे आली. ते पाहून पोटात गोळा आला. बहुदा ऑडिटरचे चेहरे पाहून तो येतोच. त्यांनी काय खोदून काढलं असेल याचं टेन्शन इतकं नसतं कारण काम केलं आहे तर काहीतरी तर चुका होणार ना पण त्या खरंच इतक्या गंभीर स्वरूपाच्या असतील का हा प्रश्न टु बी ऑर नॉट टू बी सारखा असतो. तसाच प्रश्न घेऊन ते आज समोर आले. 
Taxation च्या काही शंका दूर केल्यावर ADMISTRATION पॉईंट नी एकच QUERY होती. PAINTING केलेला PROPOSED एरिया आणि ACTUAL एरिया यातला फरक. हो का, फरक आहे का ? .. का बरं असेल हा फरक ? मनातल्या मनात विचार केला आणि उत्तर सापडलं. 'वो क्या हुआ, एक हात मारा, देखा तो अच्छा नाही लग राहा था फिर और एक बार मारा, फिर ऐसे देखा तो लगा फिर भी ठीक न्हाई हुआ है क्यो कि LEAKAGE का बहुत बडा प्रॉब्लेम था पेहेले, तो और एक हात मारा तो ठीक हुआ. तो इस तरच एक सौ Sq feet का कितना हुआ तीन सौ sq ft बरोबर ना, इसी तरह बढ़ गया सब एरिया'..  त्या ऑडिटर नि एकमेकांकडे पाहिलं आणि समोर कागद ठेवला माझ्या, 'इस पर भी लिख दिजीए मॅडम' ..  मग काय कविता मॅडम नि दिलं लिहून. आता ते वाचून हेडऑफिस मधून मेल येते, का फोन येतो कि भेटायला बोलावणं त्याची वाट बघते आहे :)

#ऑडिटर जोमात बाकीचे कोमात #
११६ चाँद कि राते...  

'एक सौ सोला चाँद कि राते'.. गुलज़ार साहेबांच्या एक से एक कमाल गाण्यांनी आपल्याला बांधून ठेवणारा हा कार्यक्रम .. या सहा शब्दांमध्येच कार्यक्रमाला आकर्षित करायचं जबरदस्त सामर्थ्य आहे, 'बस नाम हि काफी है'.. आज दोन दिवस झाले तरी या कार्यक्रमाची रंगत मनात अजूनही ताजी आहे, मोगऱ्याच्या नुकत्याच उमललेल्या नाजूक कळ्यांसारखी. मला आठवतंय शाळेत असतांना मराठी विषय शिकवायला आम्हाला कानडे बाई होत्या. मराठी भाषेतलं सौन्दर्य,तिची नजाकत, तिची ताकत बाईंनी दाखवली. त्यांचं भाषेवरचे प्रभुत्व इतकं मोहित करणारं होतं कि त्या शिकवत असतांना फक्त ऐकत राहावं, त्यांचे शब्द कानात साठवून ठेवावेत असं वाटायचं. शाळेनंतर असा अनुभव फार कमी वेळा आला. परवा या कार्यक्रमाने नेमका तोच अनुभव दिला !

कधी कधी प्रत्यक्ष भेट झाली नसली तरी काही नाती आपण मनातल्या मनांत जपत असतो. असंच एक नातं आहे आपल्या सर्वांचं.. शब्दांच्या जादूगाराशी, गुलजार साहेबांशी ! कवी, गीतकार, दिग्दर्शक, पटकथा लेखक या सर्वांमध्ये 'गीतकार' म्हणून तसूभर जास्त प्रेम करतो आपण त्यांच्यावर. आयुष्यातील वेगवेगळ्या वळणांवर त्यांनी लिहिलेली गाणी नेहमीच आपल्याला जवळची वाटली. आपण आपल्या अनेक भावनांचं प्रतिबिंब कायम त्यांच्या गाण्यांमध्ये पाहिलं. कधी त्यांच्या गाण्यांनी प्रेमात पाडलं तर कधी एकटं असतांना सोबत केली. 'कभी जिंदगी का एक पल नहीं गुजरता , कभी जिंदगी एक पल में गुजर जाती है', हे त्यांनीच त्यांच्या शब्दांमधून सांगितलं. त्यांच्या गाण्यांतून आपण मुसाफिर म्हणून जगलो, प्रेम करायला शिकलो.. 'आनेवाला पल जाने वाला है , हो सके तो इसमें जिंदगी बिता दो, पल जो ये जानेवाला है', म्हणत जगणं शिकलो ! 

संवेदनशीलता,तरल भाव, आपल्या भावभावनांना वेगवेगळ्या रुपकांच्या कोंदणात सजवून त्यातील अर्थ अधिक गहिरा करण्याची त्यांची आगळी वेगळी शैली हे त्यांच्या गीतांचे खास वैशिष्ट्य. 'इन रेशमी राहोंमें, इक राह तो वो होगी, तुम तक जो पहुंचती है' यातला हळुवारपणा मनाला स्पर्श करतो. माचिस मधलं ‘पानी पानी रे’ किंवा ‘राझी’मधलं ‘मुडके ना देखो दिलबरो’ ऐकताना डोळ्यात टचकन् पाणी येतं. 'रुके रुके से कदम, रुक के बार-बार चले, क़रार लेके तेरे दर से बेक़रार चले', सारखी गाणी मन कासावीस करतात. 'मैने तेरे लिए ही सात रंग के सपने चुने', सारखा आशावाद , 'थोडा है थोडे की जरुरत है', मधलं समाधान, 'वो शाम कुछ अजीब थी', मधलं गहिरेपण, 'भुले हुए नामों से कोई तो बुलाए' मधील आर्तता, 'आँखो में हमने आपके सपने सजाये है' मधलं प्रेम,'हजार राहे मुडके देखी', मधली बेवफाई, 'जाने क्या सोचकर नही गुजरा, एक पल रात भर नही गुजरा', मधलं एकटेपण, 'जीना तो सिखा है मरके, मरना सिखा दो तुम', या गाण्यांमध्ये मनाची नेमकी अवस्था गुलजार साहेबांनी सहज टिपून शब्दांमध्ये बांधली आहे. 

एखादी देखणी कलाकृती बाह्यांगाने पाहून तिचं मोठेपण लक्षात येतं पण त्या कलाकृतीच्या मुळाशी जाण्याकरता, तिचा अभ्यास करण्याकरिता, त्यामागचा इतिहास उमजून घेण्याकरता, तिचं आंतरिक सौन्दर्य, गाभा समजून घेण्याकरता सोबत गाढा अभ्यासक लागतो. तसंच गुलजार साहेबांच्या शब्दांच्या जादूई दुनियेची अनोखी सफर घडवून आणायला, आपलं बोट धरून सोबत घेऊन जाणारा आश्वस्थ हात हवा. मला वाटतं ते काम वैभव जोशी बखुबी करतात. 

तुम्हारे होंठ बहुत ख़ुश्क ख़ुश्क रहते हैं
इन्हीं लबों पे कभी ताज़ा शे’र मिलते थे
ये तुमने होंठों पे अफ़साने रख लिए कब से?

या त्रिवेणी मधलं सौन्दर्य असो किंवा,

दिल ढूंढता है, फिर वही फुर्सत के रात दिन.. बैठे रहें, तसव्वुर-ए-जाना किये हुए..
दिल ढूंढता है, फिर वही फुर्सत के रात दिन..
या ओळींमधील 'तसव्वुर-इ-जाना' चा अर्थ असो तो ऐकावा खास वैभव जोशींकडून !

प्रत्येक वळणावर स्वतःलाच नवं वळण देत जाणारा किमयागार गुलज़ार यांचं वेगळेपण समजायला 'मै मुडा तो साथ साथ राह मूड गई', हि एक ओळच कशी पुरेशी आहे हे वैभव जोशी अलवारपणे उलगडून सांगतात.  अनेकांसारखं लिहिलं तर गुलज़ार कसे हे सांगताना अंगूर मधल्या गाण्याचा दाखला ते देतात.   
'बिते हुए मौसम कि कोई निशानी होगी' आणि त्यानंतर येणारी सरगम .. 'प म प म ग म ग रे ग नि रे न नि म ग रे प्'... हि जागा पंचमदांनी अचूक हेरली आणि आशा ताईंना तिथे सरगम दिली .. म्हणजेच तो मौसम बिता हुआ आहे तर आठवायला वेळ तर लागणार ना.. ती वेळ म्हणजे हि सरगम ..  एखादं गाणं प्राणांत ऐकू येणं, गात्रात वाजत असूनही चटकन ओठांवर न येणं हि खूण अधोरेखित करणारी हि गोष्ट, एक दास्ता ...'दर्द पुराना कोई याद पुरानी होगी, बिते हुए मौसम कि कोई निशानी होगी'.. 

रात्रीची वेळ.. फक्त दोघांची. बाहेर कोसळणारा पाऊस. खिडकीबाहेर पाहणारा तो, आपल्याच विचारात हरवलेला. त्याच वेळी ती येते, त्याला पाहते आणि अलगत त्याच्या जवळ जाऊन गुणगुणते "मेरी जाँ ..मुझे जाँ न कहो मेरी जाँ "... हे ऐकून आपण प्रेमात पडतो, ते गाणं आपलं होतं. बाहेरचा रिमझिम पाऊस, खिडकीतून दिसणारा पाऊस.. अंगणातील फुलांना भिजवणारा पाऊस, त्या दोघांचा पाऊस आणि न भिजताही आपल्याला चिंब भिजवणारा पाऊस.. श्रुती चितळे यांनी व्हायोलिन वर सादर केलेल्या या चिरतरुण गाण्याने हीच अनुभूती मिळाली. 

'आप कि आँखों में कुछ मेहके हुए से राज है' ... हे अजून एक अजरामर गीत. 'आपकी खामोशियाँ भी आप कि आवाज है' .. या गाण्यातील गंमत, ती शरारत, तो खट्याळ अंदाज, ते मेहेके राज, प्रदीप्तो सेनगुप्तां यांच्या मेंडोलिन वर आणि त्यांना साथ देणाऱ्या श्रुती चितळे यांच्या व्हायोलिन मुळे अजून साजिरे वाटतात. 'आप की आँखों में कुछ मेहेके हुए से राज़ हैं ', या ओळीतील 'मेहेके' या शब्दावर श्रुती यांची व्हायोलिन वरची हरकत सिलसिला मधल्या 'ये कहांँ आ गये हम' या गाण्यातील दीदींच्या 'मुलायम' शब्दाच्या जवळ घेऊन जाते.  'तुम आ गये हो नूर आ गया है' ..  हे अजून एक विलक्षण गीत. 'तू येताना स्वतःची अशी एक आभा घेऊन आलीस कि मला त्या उजेडात माझं अंधारलेले अस्थित्व, त्याच रूप स्पष्ट दिसू लागतं' हा छुपा अर्थ उलगडून सांगताना वैभव जोशींनी सांगितलेल्या 'नूर' शब्दाची छटा खरंच कमाल होती.  

चांदनी चौक मध्ये घडणारं गीत म्हणून 'ऐसी नज़र से देखा उस जालिम ने चौक पर, हमनें कलेजा रख दिया चाकू की नौक पर', या ओळी लिहिणारे गुलजार साहेब या गाण्यात एक वेगळीच छटा दाखवून..'हो तेरी बातों में किमाम की खुशबू हैं, हो तेरा आना भी गर्मियों की लू हैं'.. म्हणत 'आँखें भी कमाल करती हैं, पर्सनल से सवाल करती है'...असं लिहून जातात आणि या गाण्यातील हे सगळे रंग हार्मोनियम आणि हार्मोनिकाच्या सुरांमधून सादर करतात निनाद सोलापूरकर ..आणि तिथेच वन्स मोअर ची दाद मिळते !  प्रत्येक माणसात आयुष्यभर निरागस राहण्याची इच्छा असते. म्हणूनच 'दिल तो बच्चा है जी', लिहिणाऱ्या गुलजार साहेबांमधले एक नितळ पारदर्शक लहान मूल गाण्याच्या या एका ओळीतच दिसतं. 

'घेता किती घेशील दो कराने' अशी काहीशी अवस्था होऊन जाते जेव्हा कार्यक्रम शेवटाकडे जातो. मग मात्र उत्सुकता असते '११६ चाँद कि राते' या ओळींची... 'मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है'.. कितीही वेळा ऐकलं तरी मन भरणार नाही असे शब्द, ती कशिश, ते प्रेम, तो विरह... प्रत्येक वेळी ऐकताना तितकंच आतवर पोहोचतं हे गाणं. एकमेकांपासून दूर जाणं सुद्धा इतक्या रोमँटिक शब्दांत सांगता येतं.. कमाल आहे ! 
या कार्यक्रमाच्या निमित्ताने वैभव जोशींच्या नजरेतून गुलजार साहेबांना बघता आलं, शिकता आलं .. तीन तासांच्या या जादुई अनुभवानंतर  'जिंदगी गुलजा़र है' म्हणता म्हणता 'गुलजा़रही जिंदगी है' कधी झालं हे समजलंच नाही ...

© कविता सहस्रबुद्धे
हॅरी पॉटर

कधी कधी काही चित्रपटांची जादू इतकी कमाल असते कि त्याच्या आठवणी मनाच्या कोपऱ्यात सदैव जाग्या असतात. 'हरी पुत्तर कितनी बारा देखेगा तू ये फिल्म', असं कितीतरी वेळा कित्येक आयांनी म्हटलं असेल आपल्या मुलांना आणि नंतर 'काय आहे एवढं या सिनेमात' म्हणून मग स्वतः पाहिला असेल हा चित्रपट. आणि मग मात्र मुलांच्या सोबतीने या चित्रपटाच्या series ची कितीतरी पारायणं घडली असावीत. मी याच कॅटेगरीतली म्हणून तर छान आठवणी आहेत या चित्रपटाच्या सोबत. 

तर झालं काय आज ऑफिस मध्ये गेल्यावर सकाळच्या प्रहरी मस्टर सही करून रोजच्या सारखी आमची मेहेफील जमली होती. दुसरीकडे हाऊस कीपिंग स्टाफ साफ सफाई करत होते. त्यांच काम संपेपर्यंत मिळणारा पाच दहा मिनिटांचा वेळ म्हणजे आमचा बुस्टर डोस असतो दिवसाची सुरवात करायला. तिथेच बाजूला साफसफाई करणाऱ्या मंडळींचं सामान होतं. त्यात कोपऱ्यात उभा असलेला तो ब्रूम पाहून मला हॅरी पॉटर ची आठवण झाली आणि मी म्हटलं 'मला हा ब्रूम पाहिला ना कि हॅरी पॉटर आठवतो'.  यावर वालावलकर सर म्हणाले, 'मॅडम, ब्रूम पाहून हॅरी पॉटर आठवला तरी ऑफिसच्या बसला विसरू नका'. ' काय'? माझी reaction ऐकून सरांनी परत तेच वाक्य ऐकवलं.  'अहो सर, आपलं काय हॉग्वर्ट्स स्कूल आहे का आपण ब्रूम वरून कॉलेज ला यायला', आणि हो कसं दिसेल ते, मी, कुलकर्णी सर, अय्यर मॅडम, नेहा मॅडम असं ब्रूम वरून येतोय ते'.. माझं हे वाक्य पूर्ण व्हायच्या आत सरांनी चक्क नक्कल करून दाखवली ब्रूम वरून अगदी उजवीकडचं आणि डावीकडचं वळणं कसं घ्यावं लागेल याच्या सकट. मी म्हटलं, 'अहो नेहा मॅडम झोपतात बस मध्ये त्यांना नाही जमणार हे. तुम्हाला माहित नाही मॅडम किती गाढ झोपतात. परवा बसच्या ड्राइव्हर ने PMT बस ला कट मारला तर त्या ड्राइवर ने ओव्हरटेक करून बस आडवी घातली आणि तो खाली उतरला. ते पाहून आमचा ड्राइवर पण उतरला आणि दोघांची चांगलीच जुंपली. ते भांडण सोडवायला अहो भिडे सर उतरले खाली, भिडे सर ...  तरी मॅडम ना पत्ता नाही'..  त्यावर मॅडम म्हणाल्या, 'हो हो , मी इतकी गाढ झोपले होते. म्हणजे भिडे सर उतरले तरी पत्ता नाही म्हणजे पहा; म्हणून सांगते मला नाही जमणार ब्रूम, मी पडून जाईन मध्येच येता येता'.. कुलकर्णी सर, अय्यर मॅडम, राव सर सगळे हसत होते. बहुदा समोर चित्र उभं राहिलं असावं त्यांच्या. यावर वालावलकर सरांनी मॅडमला त्याला 'पॉवर ऑफ कॉन्सन्ट्रेशन' म्हणतात असं सांगितलं. तरी ब्रूम काही त्यांच्या डोक्यातून जात नव्हता. मग त्यांनी एक उपाय शोधला. ते म्हणाले, 'कविता मॅडम आणि तुम्ही डबल सीट या म्हणजे तुम्ही पडणार नाही. मॅडम मागे बसतील आणि तुम्ही पुढे बसा म्हणजे झालं'.. कांतेय लहान असतांना आम्ही स्कुटीवरून जेव्हा जायचो ना तेव्हा तो पुढे उभा राहायचा व मी त्याला ओढणीने माझ्या पोटाला बांधायचे, अचानक तो सिन डोळ्यासमोर आला. मी त्याचा दाखला देत म्हटलं, 'कांतेय नंतर तुम्हीच मॅडम' .. यावर जोरदार हशा पिकला. इतक्यात या सर्वाशी आपला काहीही संबंध नाही असं दाखवत गोखले मॅडम मस्टर वर सही करून चष्मा सावरत म्हणाल्या, 'you all are talking like school going kids'.. पुढचं वाक्य मनातल्या मनात पुटपुटलं असावं बहुदा त्यांनी. तरी मी म्हटलं त्यांना,' Yes madam we are coming to school, its a B-school that's it'..  पण यावर सुद्धा हसल्या नाहीत बिचाऱ्या..असं थोडंस वय विसरून वागण्यात, time travel करून क्षणभर लहान होण्यात काय मजा असते ते बहुधा माहीत नसावं त्यांना. त्यामुळे लवकरच आमच्या 'बी स्कूल' मध्ये त्यांना ऍडमिशन देऊन थोडं बिघडवायचं आम्ही ठरवलं आहे :)

©कविता सहस्रबुद्धे
लव स्टोरी

आई आणि मुलाचं नातं भारी भन्नाट असतं. आपल्या लग्नानंतर आपण आईच्या रोल मध्ये शिरेपर्यंत सासरच्या घरात असलेलं हेच नातं 'याची देही याची डोळा' तीच भन्नाट अनुभूती देत असतं. मग आपण जेव्हा आईच्या रोल मध्ये जातो ना तेव्हा तीच 'भन्नाट अनुभूती' आपण दुसऱ्यांना देतो इतकंच.आईच्या भूमिकेत शिरलं कि प्रत्येक वर्षी आपले प्रॉब्लेम बदलत जातात, त्यांची लांबी रुंदी खोली बदलत राहते. लहान असतांना रात्री झोपत नाही, किती रडतो, उशीरा बोलणार बहुतेक, चालणं पण उशिराच दिसतंय, किती बोबडं बोलतो इथपासून सुरुवात होते. एकदा का शाळेची ऍडमिशन झाली कि मग अभ्यास, दंगा मस्ती, भांडणं, शाळेतून येणारे रिमार्क, टीनएज प्रॉब्लेम अशा वळणा वळणांवरून आपली गाडी इतरांसारखीच हळूहळू पुढे जायला लागते. बायकोपेक्षा 'आई' या नात्यामधलं आपलं गुंतणं फार वेगळं असतं. हळूहळू ते दिवस भुर्रकन उडून जातात आणि बघता बघता इवलीशी पिल्लं कधी मोठी होऊन शिकायला घरट्याबाहेर उडून जातात ते कळतंच नाही. 'empty nest' चा खरा अर्थ मग समजतो तेव्हा. 
इतर वेळी ठाई ठाई मुलांची मदत घेणारी आई, मग बाबा पेक्षा जास्त techno savy बनून WA , iNSTA ,Video call याचा पुरेपूर वापर करत सगळी अंतरं पार करायची धडपड करते. आणि ज्यांच्याकडे डबल धमाका असतो त्यांच्याकडे तर बघायलाच नको. आमच्या ऑफिस मध्ये थोड्या फार फरकाने बऱ्याच जणांची हिच गोष्ट आहे त्यामुळे बहुतांश वेळा आमचे बोलायचे विषय, टेन्शनची कारणं कमी अधिक प्रमाणात सारखीच असतात. अगदी लोणी काळभोर पासून बंगलोर, दिल्ली, आसाम, ऑस्ट्रेलिया, लंडन ते अमेरिका इथल्या खबरा रोज आम्हाला जेवतांना मिळत असतात. मुलं बाहेर गेली मग आता कशात जीव गुंतवायचा हा प्रश्न 'बाबा' पेक्षा 'आई' कॅटेगरीला जास्त असतो. 
नेमकं हेच ओळखून ऑफिसमधल्या माझ्या एका मैत्रिणीच्या घरी तिच्या मुलांनी शिकायला बाहेर जायच्या आधी एक भूभू आणलं. थोडे दिवस त्यांनी पण मजा केली त्याच्याबरोबर आणि महिना दोन महिन्यात शिकायला ते बाहेर गेले, मुलगी पूर्वेच्या देशात आणि मुलगा पार पश्चिमेच्या देशात. ऑफिसचं काम सांभाळून तिकडच्या वेळेप्रमाणे मुलांना फोन करण्याची कसरत माझी मैत्रीण करत असते.शिवाय ऑफिस नंतर तिचा भूभू 'रॉबर्ट' तिला बिझी ठेवतो. तिचा नवरा sports मध्ये एकदम active असल्याने तो खेळायला पुण्याबाहेर गेला की भुभू ला दोन चार दिवस पाळणाघरात ठेवायचं व तिथून परत घेऊन यायचं हे अजून एक काम वाढतं तिचं. आमच्या कॅम्पस मध्ये इतके प्राणी आहेत की घरचे प्राणी ऑफिस मध्ये आणायची अजूनतरी परवानगी नाहीये  नाहीतर अजून सोपं होतं तिला. 
तर झालं काय, सध्या ऑफिसमध्ये आमचा गप्पांचा विषय 'रॉबर्ट' भोवती घुटमळतोय कारण काय तर तो सध्या पाळणाघरात गेलाय काही दिवसांकरता. बरं रॉबर्ट पाळणाघरात काय काय करतो हि उत्सुकता आम्हाला पण असते, खरं तर 'भोचकपणा' हा योग्य शब्द आहे. मग साहजिकच आमच्या चौकशा सुरु होतात. बरं पाळणाघरातील ती care taker इतकी छान आहे कि ती माझ्या मैत्रिणीला दिवसभरात अधून मधून रोबर्टचे व्हिडिओ पाठवत असते, अगदी सहज, तो ठीक आहे, छान खेळतोय हे कळवण्यासाठी. ते व्हिडीओ पाहून आम्हाला नुकतंच समजलंय कि रॉबर्टला पाळणाघरात एक मैत्रीण मिळाली आहे 'लूसी' नावाची. त्यामुळे व्हिडिओ रॉबर्टचा येत असला तरी प्रत्येक व्हिडिओ मध्ये त्याच्या सोबत लूसीला पाहून या discussion मधला आमचा 'इंटरेस्ट' सध्या फारच वाढलाय आणि दुसरीकडे रॉबर्ट च्या 'आईचं' टेन्शन ! 'लुसीचा possessive ness पाहून तिच्या समोर रॉबर्ट किती शांत आहे नाही', 'अगदी स्त्री दाक्षिण्य दाखवणारा आहे', असं बोलून आम्ही तो माहोल अजून रंगीन करतो. 'आपलं ते बाळ दुसऱ्याचं ते xx' या उक्तीप्रमाणे रॉबर्टच्या 'आईला' तो जास्त handsome वाटतोय लुसी पेक्षा त्यामुळे अजूनच गंमत आहे या स्टोरीत. 'पहा बरं लुसी यायची सून म्हणून' असं चिडवताना, लूसीच्या आई बाबांची चौकशी कर,ते कुठे राहतात वगैरे म्हणजे तुला date वर पाठवता येईल रॉबर्टला असंही सुचवतोय तिला. एकूण काय आमच्या मुलांच्या GF आणि BF च्या चर्चांमध्ये आता अचानक रॉबर्टच्या GF ची एन्ट्री झालीये त्यामुळे येणारे काही दिवस 'रॉबर्ट लूसी कि लव्ह स्टोरी' मय होणार हे नक्की ! 

©कविता सहस्रबुद्धे 

 वर्ल्ड कप


उन्हाळा आला कि कैरीची डाळ, पन्हं याची चाहूल लागते. चैत्रागौरीचं हळदी कुंकू होतं आणि वेध लागतात अक्षय तृतीयेचे,आंब्याचा सिझन झोकात सुरु होतो. रविवारी दुपारी आमरस पुरीचं मनसोक्त जेवण करून गाढ झोपण्यातलं सुख सांगताच येत नाही, ते अनुभवावं लागतं. मग काय, बाकी आठवडा दुपारचा उन्हाळा सुसह्य करण्यासाठी ऑफिस मध्ये लिंबू सरबत, कोकम सरबत असतंच. आता जून महिन्यात पाऊस सुरु होईपर्यंत आमचं कॉलेज कॅम्पस काहीसं भकास वाटत राहतं,मग काय अधून मधून वातावरण आल्हाददायक ठेवायची जबाबदारी आमच्यावरच असते.  

जून महिन्यापासून सुरु होणारं नवं शैक्षणिक वर्ष नंतर एप्रिल महिन्यात होणाऱ्या परीक्षांपर्यंत अगदी पॅक असतं, डोकं वर काढायला सुद्धा फुरसत नसते. याच काळांत आम्ही पुढच्या वर्षाचं नियोजन करायला सुरुवात करतो. कोणता event कधी, परीक्षा कधी, study tour कधी, स्टडी leave कधी, सुट्ट्या कधी ते ठरवून त्याप्रमाणे वर्षाचं वेळापत्रक तयार केलं जातं. काल आम्ही हेच काम करत होतो. 'स्पोर्ट्स वीक' कधी ठेवायचा यावर चर्चा सुरु होती. मार्च ऐवजी डिसेंबर मध्ये घेऊ यांत वगैरे वगैरे.. इतक्यात स्पोर्ट्स incharge शर्मा सर म्हणाले, 'मॅडम इस बार ट्रॉफी  हम जितेंगे और आपको वो ट्रॉफी हमे देनी पडेगी, लिख लिजिए'.. यावर्षी स्टाफ क्रिकेट स्पर्धेतला त्यांच्या टीमचा पराभव फारच मनावर घेतला होता त्यांनी हे स्पष्ट दिसत होतं. 'क्यों सर, आप को क्यो दे, इस साल भी हम ही जीतेंगे और ट्रॉफी हमारे पास ही रहेगी'.. मी पण हार मानायला काही तयार नव्हते.'लो, ये क्या बात हुई, एक बार हारे मतलब हम बार बार हारेंगे क्या'.. पराभव पचनी न पडल्याने त्यांची चिडचिड शब्दा शब्दातून बाहेर पडत होती. 'वो नहि पता सर लेकीन ट्रॉफी तो हमारे पास ही रहेगी, वादा है आपसे'.. 'बिलकुल नहीं जी, ट्रॉफी तो हम लेके जायेंगे'... आज काही खरं नव्हतं. मैदानावर मॅचच्या दिवशी झालेली भांडणं आता परत सुरू होण्याच्या मार्गावर होती. 

बरं हे डिस्कशन सुरु असतांना समोर टेबलवर ठेवलेली ट्रॉफी जणू गालातल्या गालात हसते आहे असा भास माझ्याबरोबर शर्मा सरांना पण झाला बहुदा. मी जरा वळून बघितलं, आमच्या आमच्या इन्स्टिटयूट मधल्या स्पर्धेत जिंकलेली ती ट्रॉफी 'वर्ल्ड कप' सारखी तर दिसत नाहीये ना अशी शंका आली आणि हो शर्मा सर, ते किरण मोरे वर चीड चीड करणाऱ्या जावेद मियाँदादसारखे .. नाही नाही, तरी रंगत तीच होती.  

मराठी बरोबर इंग्रजी हिंदी भाषा इथे आनंदाने जरी नांदत असली तरी काही प्रसंगी उत्फुर्तपणे बाहेर पडणारे शब्द मातृभाषेतलेच असतात. 'ट्रॉफी हम हि लेंगे, लेकर हि रहेंगे', ऐकून ऐकून शेवटी मी बोलले, 'सर देखो हम 'भांडीवाले' के पास जाकर हमरा नाम लिखवाएंगे ट्रॉफी पर'.. माझी हि spontaneous reaction ऐकून तर ते पार गडबडले.. बरं ज्यांना समजलं ते खो खो हसायला लागले. शर्मा सर बिचारे 'क्या बोला मॅडमने, किस के पास जाके क्या लिखवाएंगे, बताओ तो सही', म्हणतं बाऊन्सर गेलेला तो शब्द शोधू लागले.अजूनतरी तो शब्द त्यांना सापडला नाहीये, आणि जेव्हा केव्हा सापडेल तेव्हा 'भांडीवाल्याकडे खरंच ट्रॉफी वर नाव लिहून घेण्यासाठी गेलेल्या मला' visualize करतांना त्यांना होणारी चिडचिड कमाल असणार आहे यांत शंका नाही !

©कविता सहस्रबुद्धे

 जब वी मेट


संध्याकाळची आठ वाजताची ट्रेन एक नाही, दोन नाही, तर चक्क चक्क चार तास लेट झाली ते पण पुण्याला जाणारी. बरं हे समजलं कसं तर ट्रॅकर वर गाडीचं live location बघण्याचं सुचलं ते पण जेव्हा मेसेज मिळाला गाडी लेट आहे. बाहेरच्या उन्हाने चाळीशी ओलांडली असतांना आम्ही हॉटेलच्या थंडगार AC रूम मध्ये निवांतपणे दुपारचा चहा घेत होतो तेव्हाच हा सुखद धक्का बसला.बरं आता करायचं काय? ते पण सुचेना. 'रेल्वेचं तिकीट कॅन्सल करून बस ने जावं का' हा विचार आला मनांत पण नवीन शहरात काहीही माहित नसतांना आम्ही दोघी मैत्रिणींनी कोणताही धाडसी निर्णय न घेता क्षणभर PAUSE घेतला. मग दुसऱ्याच क्षणी मी ऑफिसचं ट्रॅव्हल बुकिंग करणाऱ्या सुरेखा मॅडमला फोन लावला. बरं फोन लावला तेव्हा वाटलं, दोन तीन तास आधी कसं काय मिळेल तिकीट कोणत्याही ट्रेनच ते सुद्धा कन्फर्म तिकीट, वेड्यात काढेल यार कोणी पण, तरी वाटलं विचारायला काय हरकत आहे. आणि नशीब कसं असतं पहा, नेमकं त्याच दिवशी सिझन स्पेशल म्हणून चक्क चक्क हमसफर ट्रेन सुरु झाली होती. हे ऐकून तर कानावर विश्वासच बसेना कि आजच एखादी ट्रेन सिझन स्पेशल म्हणून सुरु काय होते आणि आम्हाला त्याच ट्रेनच कन्फर्म तिकीट काय मिळतं. मग काय त्याच आनंदात लेट झालेल्या ट्रेनच तिकीट आम्ही कॅन्सल केलं व नवीन eतिकीट मोबाईलवर झळकताच खुशीत स्टेशन गाठलं.  

संध्याकाळची वेळ, अंधार पडायला सुरवात झालेली. सुनसान स्टेशन व तुरळक माणसं हे चित्र तसं विरळच.त्या लहान स्टेशन वर चेन्नई, मुंबई, पुरीला जाणाऱ्या सर्वच गाड्यांची माहिती सांगितली जात होती, जसं कोणत्या प्लॅटफॉर्म वर, किती वाजता वगैरे वगैरे. पण आमच्या गाडीचं काही नावच नाही. मी म्हटलं सुद्धा मैत्रिणीला, 'जाऊन बघून येऊ का जरा कि आपल्या गाडीबद्दल काहीच का सांगत नाहीयेत ? किमान यांना तरी माहिती आहे ना कि आजपासून नवीन गाडी सुरु झालीये म्हणून'... मी खरंच जाईन कि काय म्हणून मैत्रिणीने जरा थांबवलं मला. तिथे बाजूलाच बसलेल्या एक जोडप्याला विचारलं 'त्यांना कुठे जायचंय' म्हणून, त्यांनी 'पुण्याला' म्हणताच आम्हा दोघींच्या जीवात जीव आला, म्हणजे पुण्याची गाडी खरंच येणार होती. इतक्यात आमच्या गाडीची दुरूनच झलक दिसली. तिच्या स्वागतावेळी झालेली ती अनाऊन्समेंट कानांत साठवत आम्ही समोर येणाऱ्या त्या गाडीला डोळे भरून पाहू लागलो. 'इस गाडी कि किमत तुम क्या जानो रमेश बाबू' असं झालं होतं. गाडी थांबताच आम्ही आत चढलो. हा क्षण येईपर्यंत धाकधूक होती की खरंच आहे ना अशी नवीन गाडी नाहीतर 'जे तिकीट होतं ते कॅन्सल केलेलं आणि नवीन गाडीचा पत्ता नाही'असं व्हायचं. फायनली आम्ही गाडीत बसलो होतो,  वाह वाह .. 'सुरेखा सुरेखा अग आमची ही ट्रेन मिस झाली ग,आता अजून कुठली आहे का ग दुसरी ट्रेन' असं मी मुद्दाम हेल काढत फोनवर बोलण्याची नक्कल केली बसल्यावर, ते ऐकून मैत्रिणीने 'गप गss',असं म्हणतं दिलेली चापटी खात आम्ही पोटभर हसलो. एकदाचं हुश्श झालं होतं आणि मग लक्षांत आलं ही नवीन गाडी अगदीच रिकामी आहे. आठ जणांच्या कंपार्टमेंट मध्ये जेमतेम तीन टाळकी होती सगळीकडे त्यामुळे कुपे बुक केल्याचा फील आला. 

थोड्या वेळाने हॉटेल मधल्या कूक नि दिलेली दाल खिचडी खाऊन पोट भरलं आणि जवळचं पाणी संपल्याची जाणीव झाली. मग काय पुढच्या स्टेशन वर गाडी थांबणार होती तिथे पाण्याची बाटली घ्यावी असं ठरवलं. स्टेशन आलं, गाडी थांबली, मी दारातून वाकून पाहिलं तर स्टॉल बराच पुढे होता. उतरण्याशिवाय पर्याय नव्हता. उतरावं की नाही असा क्षणभर विचार करून उतरले एकदाची. जवळपास पळतच गेले स्टॉल वर.अजून चार माणसं उभी होती काही न काही घ्यायला त्यात मी बाजूने एन्ट्री घेतली. 'भैय्या एक पानी की बॉटल देना जल्दी'..असं म्हणत वीस रुपये ठेवले काउंटर वर. 'पंधरा रुपये मॅडम, पाच रुपये change देना'.. 'अरे भैय्या नहीं है पाच रुपये मेरे पास', असं मी म्हणताच त्याने समोर ठेवलेली बाटली परत घेतली. 'अरे भैय्या ये बीस रुपये रखो, बॉटल तो दो'.. 'नही नही, आप पाच रुपए दो छुट्टा'..'अरे भैय्या मेरी ट्रेन छुट जायेगी'.. 'नही जाएगी मॅडम'.. जब वी मेट मधला तो माझा आवडता सिन आठवला. मगाशी जिथे ट्रेन मध्ये बसलो होतो त्या सूनसान स्टेशनचा फोटो मी स्टेटस वर टाकला होता काही वेळापूर्वी आणि लिहिलं होतं, "भटिंडा व्हाया रतलाम".. तर त्या फोटोवर मैत्रिणींच्या कमेंट्स पण आल्या, 'आदित्य कश्यप काही भेटणार नाहीए त्यामुळे पाणी घ्यायला वगैरे अजिबात उतरू नका'.. मी ते आठवून, सारख्या समोर येणाऱ्या त्या शाहिद कपूरला बाजूला करत म्हणाले "अरे भैय्या पानी का बॉटल तो दो, ट्रेन निकल जायेगी मेरी"..  असं म्हणताच भैय्या जागा झाला, म्हणाला "और दस रुपया दो और दो बॉटल ले लो".. अरे राम.. घे बाबा घे, अजून दहा रूपये घे पण पाणी दे.. असं मनातल्या मनात पुटपुटत मी दोन बाटल्या घेतल्या. ती 'गीत' जास्त पैसे घेतले म्हणून भांडत होती सिनेमात आणि इथे मी जास्त पैसे देत होते पण त्याला ते नको होते .. बरं हे सर्व संभाषण होत असताना मी एक सारखं  मागे वळून बघत होते, गाडी सुरू तर होत नाहीये ना... कारण रिस्क कशी घेणार,आमचा राज, आमचा आदित्य कश्यप सोबत थोडीच होता, तो घरीच असल्याने ना ट्रेन चुकवून चालणार होतं ना त्या काउंटर वर पाणी पीत बडबड करताना मागून हळूच निघून गेलेली ट्रेन बघणं.. मग काय त्या बाटल्या सावरत चढले ट्रेन मध्ये .. 

एकूण काय तर प्रत्येक ट्रेन journey मध्ये 'जब वी मेट' सारखी स्टोरी नसते,मी आपली माझी स्टोरी सांगितली !

© कविता सहस्रबुद्धे