Monday, August 31, 2020



माहेरवाशीण ..

गणपती गौरी म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा, मांगल्याचा, सर्वांनी एकत्र येवून साजरा करावयाचा सण ! आमच्याकडे दरवर्षी केयुर घरीच गणपतीची मूर्ती साकारतो आणि ती आम्ही माझ्या भावाकडे बसवतो. सासर आणि माहेर यांना जोडणारा हा एक रेशमी धागा आहे माझ्याकरता..

काही वर्षांपूर्वीची आई आजारी पडली व मनाने खूप खचली. 'Why me' या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी खूप धडपडली. देवाचं खूप करायची ती. आमच्या जुन्या घराजवळचं  म्हातोबा मंदिर, कोथरूडचं मृत्युंजयेश्वर, तुळजाभवानी मंदिर,दशभुजा मंदिर, तुळशीबागेतलं श्रीगजानन महाराजांचे देऊळ, श्रीदगडूशेठ गणपती मंदिर या सर्व देवळांत नियमित जायची आई .. नवरात्रांत सुद्धा देवीचं रोज एक देऊळ हे ठरलेलं. पुण्यांत असं एकही देऊळ नसावं जिथे आई तिच्या मैत्रिणींसोबत गेली नाही. तिच्या या नियमांत ती असेपर्यंत कधीच खंड नाही पडला. आमच्या सर्वांच्या वतीनं देवाकडे तीच सारं काही मागायची.पण ती आजारी पडल्यावर चित्र बदललं. तिने अबोला धरला.. तिच्याच या देवाशी ! मग काय हा अबोला सोडवण्यातं यश आलं तिच्या लाडक्या जावयाला आणि मदतीला आले गणपती बाप्पा !  

"आई, या वर्षी मी घरीच गणपती करतो, मग कराल ना तुम्ही सर्व तयारी, पूजा".. असं त्याने म्हणताच डोळ्यांतून आलेल्या तिच्या अश्रुंनी मूक संमती च दिली जणू.  तेव्हापासून दरवर्षी केयूर घरीच मूर्ती साकारतो आणि आम्ही सगळे एकत्र गणेशोत्सव साजरा करतो. आता आई जाऊन पाच वर्ष झाली पण हि परंपरा आम्ही अजूनही जपली आहे. जणू या परंपरेच्या धाग्यात जोडून गेली जातांना ..

तेव्हा पासून दर वर्षी शाडूची माती घरी आली कि वेध लागतात गणरायाच्या आगमनाचे ! एकदा का त्या मूर्तीच्या चेहऱ्यावर प्रसन्न, गोड भाव दिसले की उत्साह अजूनच वाढतो. आदल्या दिवशी तयार मूर्तीकडे पाहिलं ना की नकळत मनातून संवाद सुरू होतो त्या बाप्पाशी. घरांत त्याच्या असण्याचा आभास खूप काही देऊन जातो. वर्षभराची शिदोरीच म्हणा हवं तर.. ते राजस रूपं डोळ्यांत साठवून डोळे मिटेपर्यंत सकाळ होते.

मग तिकडे दारांत रांगोळी काढून, तोरण लावून सजलेलं माझं ते घर, देव्हाऱ्यांंत फुलं हार निरांजन धूप समई अक्षता हळद कुंकू यांनी सजलेलं पूजेचं तबक, स्वयंपाक घरांत लगबगीनं प्रसादाचा स्वयंपाक करणारी वहिनी, आमची वाट बघत हॉल मध्ये येरझाऱ्या घालणारे बाबा आणि माझ्या पिटुकल्या भाचरांना पारंपारिक कपडे घालून तयार करणारा माझा भाऊ दिसू लागतो. गणपती बाप्पाच्या पायाला कुंकवाच बोट लावून ते भाळी लावतांना डोळे भरून येतांत. तबकात मूर्ती घेऊन मग आम्ही त्या घरी जाण्याकरता निघतो..

या वर्षी सुद्धा रिमझिम पावसांतून आमच्या गणरायाला घेऊन आम्ही घरी पोहोचलो. गाडी पार्क करून झाली आणि 'मूर्तीचं तबक तू घे' असं मी केयुरला म्हटलं पण त्यानी ते मला माझ्याच हातांत ठेवायला सांगितलं. लिफ्टनी वर पोहचलो. दारांत गणपतीबाप्पाला घेऊन आम्हाला पाहताच 'थांब, बोलावतो उषाला औक्षणासाठी' असं म्हणत केदार आत गेला. इकडे मी केयुरला व कांतेयला म्हटलं 'अरे कोणीतरी या पुढे आणि घ्या बाप्पाला' पण त्यांनी मलाच उभं केलं... इतक्यात केदार स्वतःच औक्षणाचं ताम्हन घेऊन पुढे आला आणि मागे उषा. "अरे तू नको ...." इतकेच शब्द तोंडातून बाहेर पडले तोवर खाली वाकून त्यानी माझ्या पावलांवर दूध आणि पाणी घातलं सुद्धा.. भाकर तुकडा ओवाळून टाकला, औक्षण केलं, सगळं एकदम सागरसंगीत ! बाबा आणि उषा सारं काही कौतुकाने पाहत होते. मी काहीच बोलू शकले नाही, फक्त डोळे भरून आले... पुढे दोन दिवसांनी येणाऱ्या गौरींच्या दिवशी असलेला माहेरवाशीणीचा मान मला मात्र आजचं मिळाला होता, बाप्पाच्या साक्षीनं !


Thursday, August 27, 2020

थोडा है थोडे कि जरुरत है ...

वाढदिवसानिमित्त सकाळी सकाळी मी माझ्या सासऱ्यांना शुभेच्छा द्यायला फोन केला. काही वर्षांपूर्वी पडलेल्या प्रथेप्रमाणे सिनेमाची ऑनलाईन तिकीट बुक करून त्यांना नागपूरला पाठवणं यावर्षी काही जमलं नाही या लॉक डाउन मुळे.नाहीतर सकाळचा वेळ फोनवर शुभेच्छा घेण्यांत, दुपारी थोडा आराम, मग सिनेमा आणि परत घरी येतांना आवडत्या रेस्टॉरंट मध्ये इडली डोसा व रात्री गप्पा मारत मस्त कॉफी असा भरगच्च कार्यक्रम असतो त्या दोघांचा ! पण या वर्षी सर्वकाही घरातंच..

'कसा गेला आजचा दिवस', हे विचारायला मी रात्री फोन केला. सहज बोलता बोलता सासरे बोलून गेले कि 'उद्या साजरा करणार आहे वाढदिवस, गिरीपेठेत' ! मी म्हटलं 'उद्या , ते कसं ?' तर म्हणाले, 'काकाजी काकीजीचा लग्नाचा वाढदिवस आहे ना उद्या, मग सगळे तिकडेच भेटणार आहोत आम्ही, माझा वाढदिवस आणि Anniversary साजरी करायला , चहा नाश्ता असा छोटासा प्लॅन आहे '!  यावर बेबी आत्या आमच्याबरोबर, मोहन काकाच्या गाडीत कोण, मग नलू आत्या कोणाच्या गाडीत, कोण कोण काय काय आणणार आहे हे पण सांगून झालं. थोडक्यात काय एकदम जबरदस्त planning झालं होतं ! तब्बल डझन भर मंडळी सहस्रबुद्धे लेआऊट मधून गिरीपेठेत जाणार होती तर ! आमच्या पिढीच्या WA ग्रुप वर तर कोणालाच याची भनक सुद्धा नव्हती आणि आम्ही म्हणायचो आमचं नेटवर्क स्ट्रॉंग !

सहस्रबुद्धे ले-आउट म्हणजे जवळपास एक दिड डझनभर टुमदार बंगल्यांची सोसायटी, माझे सासरे आणि त्यांच्या भावंडांची ! जवळच असलेल्या गिरीपेठेत मोठ्या घरी काकाजी राहतात बाकी सारी भावंडं सहस्रबुद्धे ले आउट मध्ये,एकमेकांच्या शेजारी ! त्यामुळे एकदम HAPPENING जागा आहे आमचं सहस्रबुद्धे ले आउट ! इथल्या जवळपास सर्वच घरातील मुलं पुणे, मुंबई आणि अमेरिकेत स्थायिक झालेली त्यामुळे हे सर्वजण इथे एकत्र राहून एकमेकांचे खऱ्या अर्थाने सवंगडी झाले होते, एकमेकांचं जगच जणू ! हो, आणि त्यांचा उत्साह आपल्याला सुद्धा लाजवेल असा. 'कारण मिळालं कि मनसोक्त साजरं करायचं, आणि नाही मिळालं कि शोधायचं',हाच इथला नियम ! संपूर्ण लॉकडाऊन मध्ये आम्ही सर्व भावंडं या सर्वांवर फोन वरून लक्ष ठेवून होतो. म्हणजे हे सगळे घरीच थांबतायेत ना , उगीच बाहेर कोठे जात तर नाहीयेत ना असं ! Landline नाही उचलला कि मोबाईल वर फोन करून 'कुठे आहात' हा प्रश्न ठरलेला, तेव्हा 'अंगणात बसलोय' असं उत्तर मिळायचं !

आता नियम थोडे शिथिल होत नाहीत तर लगेच हा प्लॅन ऐकून मी दचकले ! "अहो दादा .." अशी वाक्याची सुरवात करेपर्यंत मला थांबवत दादा म्हणाले,"अग सकाळी सकाळी जाणार आहे आम्ही,सहा वाजता".. "कायsss दादा, अहो अजून संचारबंदी चालू आहे सात ते सात. मग कसं जाणार सहा वाजता "? यावर ते म्हणाले " पोलीस यायच्या आधी जाणार आहोत आणि तसंही अंधार असतो सहा वाजता"...मला निःशब्द केलं दादांनी ! दिलीप प्रभावळकर हे वाक्य डोळे मिचकावून कसं म्हणतील तसं म्हणतांना साक्षांत दादा दिसले मला , आता काय बोलू पुढे. बरं सिनियर सहस्रबुद्धे सरांचं हे वाक्य ऐकून माझ्याच बाजूला बसलेले जुनिअर सहस्रबुद्धे सर यावर काही बोलायचं सोडून फक्त हसत होते. तरी शब्दांची जुळवाजुळव करून मी म्हटलं, "दादा, पोलिसांनी तुम्हाला सगळयांना पकडलं तर आम्ही पण नाहीये बरं का तुम्हाला सोडवायला तिथे".असं म्हणताच दादा हसतं म्हणाले,"अगं,नाही पकडणार.." तरीही माझ्या डोळयांपुढे चित्र उभं राहीलं..पोलिसांनी शिटी मारली थांबवलं तर एका मागोमाग एक गाड्या थांबतील. बरं आत मध्ये सगळे सिनियर सिटीझन. सगळे एकदम तयार होऊन, जॅकेट टोपी, जरी काठाची साडी, हातात फुलं, गजरे, केक,थर्मास, खाऊ आणि घड्याळांत सकाळचे सहा .. ओह माय गॉड ! आजचं झोपेतलं स्वप्न समोर दिसू लागलं मला !

दुसऱ्या दिवशी सकाळी डायरेक्ट त्यांच्या Celebration च्या फोटोंनी सकाळ झाली आमची ! झोपेतून उठतं, डोळे चोळून जागं होईपर्यंत सहस्रबुद्धे लेआऊट टीम नऊ वाजेपर्यंत आपल्या साम्राज्यात परतली देखील होती, पार्टी करून ती सुद्धा भल्या पहाटे ... ग्रुप वर लिक झालेले हे फोटो पाहांत आमची जनरेशन हे नक्की आज गेले होते कि हे जुने फोटो आहेत यावर चर्चा करत होती इतकं सिक्रेट ठेवलं होतं हे मिशन सेलीब्रेशन आमच्या मोठ्या पिढीनी !!

मला खूप गंमत वाटली सर्वांची ! वयानुसार जास्त वेळ झोप लागत नाही म्हणून सकाळी सकाळी लवकर भेटायचं काय ठरवलं, कोणा एकाला भार नको म्हणून प्रत्येकानं जमेल ते काहीतरी करून नेलं अगदी केक सकट, कोणी बागेतली फुलं नेली, कोणी गजरा करून घेतला आणि anniversary couple ला फक्त चहा कॉफीची जबाबदारी सोपवली..भल्या मोठ्या अंगणात हिरवळीवर लांब लांब खुर्च्या टाकून ( social distancing follow करत ) किती दिवसांची साठलेली गप्पांची पोतडी उघडून मस्त धमाल केली  !

त्यांनी पाठवलेले फोटो पाहून वाटलं,भावंडांच हे प्रेम,भेटण्यातली हि ओढ, प्रेमाने एकमेकांसाठी करून नेलेला खाऊ, छोट्या छोट्या गोष्टींमधून गोळा केलेलं हे समाधान, एकमेकांसोबत घालवलेले हे अमूल्य क्षण, एकमेकांच्या चेहऱ्यावर पसरवलेलं हसू, सहवासातील सुख , पोटभर गप्पा, डोळे पाणावून जातील इतकं हसू आणि या क्षणांना कॅमेऱ्यात बंद करण्यातली मजा हेच तर आयुष्य आहे ना.. आणि हा आनंद सतत टिपत राहण्यात एक वेगळचं सुख आहे, समाधान आहे !

या विचारांच्या तंद्रीत मी हरवले होते इतक्यात landline वर रिंग वाजली. फोटोंमधून जे पोहचलं नव्हतं ते  सांगायला आणि 'पोलिसांनी आम्हाला पकडलं नाही' हे सांगायला दादांचाच आवर्जून फोन आला असणार हे मी ओळखलं व फोन घ्यायला उठले. मागे गाणं चालू होतं, 'थोडा है थोडे की जरूरत है , जिंदगी फिर भी यहाँ खूबसूरत है '....



बाराखडी


कांतेय लहान असतांना त्याला 'र' हे अक्षर म्हणता येत नव्हतं, अगदी शाळेत जायला लागला तरी सुद्धा ! 'बोबड कांदा' तर तो होताच आणि र ऐवजी ल म्हणून अजूनच धमाल उडवून दयायचा. माझ्या सासऱ्यांनी त्याला " अरे रे रे रे, मी काय करू रे , मला र म्हणता येत नाही रे , अरे रे रे रे ".. हा कानमंत्र दिला होता. त्यामुळे त्याचे "अले ले ले ले, मी काय कलू ले "...  हे सतत ऐकून काय करावं असा प्रश्न मला खूपदा पडायचा.

दरवेळी डॉक्टरांकडे गेले कि मी त्यांना विचारायचे कि 'काय केलं म्हणजे याला र म्हणता येईल?',  तेव्हा त्या हसून 'येईल ग', इतकंच उत्तर द्यायच्या. एकीकडे मी त्यांच्या त्या उत्तरावर निर्धास्त होते मात्र दुसरीकडे सगळं घर र हे अक्षर गिरवीत होतं. त्याची आजी वरचेवर त्याच्यासाठी तोंडल्याची भाजी करायची, त्याची पणजीआजी 'अथर्वशीर्ष शिकव ग त्याला', असं सांगायची आणि त्याचे आजोबा अथर्वशीर्ष शिकवायचे. आणि हो त्याचा बाबा, तेव्हापासूनच कूल डॅड या भूमिकेत असल्याने र या एका अक्षराने आपलं काहीही अडणार नाही असं मला सांगत राहायचा...

आता पंधरा वर्षांनंतर पात्र बदलली, अक्षर सुद्धा बदललं पण बाराखडी मधली मजा मात्र अजूनही तीच आहे याची काल प्रचिती आली जेव्हा इतिहासाची पुनरावृत्ती झाली. केदारनी सांगितलं कि माझा भाचा ऋषित याला ळ हे अक्षर म्हणता येत नाही ! मग काय आतां आजोबांना अथर्वशीर्ष शिकवायला आणि आत्याला तोंडल्याची भाजी करायला एकदम स्कोप आहे तर, मग काय लागले सगळे कामाला !

आजकाल मुलांना, आपण घरी मराठी बोलत असल्यामुळे आणि शाळेतील इंग्रजी माध्यमामुळे या दोन्ही भाषांची ओळख लहानपणापासूनच होते. ऋषित या बाबतीत जरा Lucky आहे कारण त्याच्या नाना नानींमुळे त्याला हिंदी या अजून एका भाषेची ओळख लहानपणापासून झाली आहे. 'ससा ससा तो कापूस जसा' , 'Twinkle Twinkle' बरोबरच तो 'आहा टमाटर बडे मजेदार आहा टमाटर बडे मजेदार' हे गाणं सुद्धा तितकंच छान म्हणतो ! एकूण काय मातृभाषा, राष्ट्रभाषा आणि जागतिक भाषा माझ्या माहेरी अगदी गुण्या गोविंदाने नांदतातेय !

अशा तीन तीन भाषा आजूबाजूला बागडत असतांना त्यांतील ळ अक्षर हरवलंय हे समजताच काल मात्र एकदम धमाल उडाली घरी. ऋषित कडून काळा, निळा, पिवळा हि रंगांची नावं म्हणून घेता घेता केदारच्या मदतीला एकदम गदिमांच गाणं आलं कारण 'ळ' या अक्षराचं सौन्दर्य दाखवण्याकरता गदिमांनी या गाण्यांत ते तब्बल तेरा वेळा वापरलं आहे !

'घननीळा लडिवाळा झुलवू नको हिंदोळा ..'  मग काय केदारच्या तोंडी हे शब्द ऐकताच ऋषितची प्रतिक्रिया एकदम बोलकी होती. छान मराठी बोलणाऱ्या माझ्या भाच्याने डायरेक्ट हिंदी लहेजामध्ये त्याला, 'ये कौनसी भाषा में बोल रहे हो ?' .. असं विचारून अक्षरशः निःशब्द केलं !

त्यामुळे सध्या या गाण्यावरून प्रेरित होऊन आमचं घर ऋषित सोबत त्याचं हरवलेलं ळ अक्षर शोधण्यात व्यस्त आहे ! पुढच्या गणपती पर्यंत आपच्या कृष्णाला त्याच्या गोकुळांत ळ हे अक्षर मिळो याच सदिच्छा !!!!

Wednesday, August 26, 2020

कंपौंडर, डॉक्टर आणि बरंच काही ...

बारावी झाल्यानंतर मी डेक्कन वर डॉक्टर देवधरांकडे काम करत होते. B. Com करत असतांना कॉलेज सांभाळून सहज शक्य होतं ते. फोन वरून पेशंटना अपॉइंटमेंट देणं, डॉक्टर असतांना क्लिनिक मधली  पेशंटची गर्दी सांभाळणं, पेशंटकडून पैसे घेणं, त्यांना पावती बनवून देणं आणि निघतांना सर्व हिशोब व्यवस्थित करून डॉक्टरांकडे पैसे जमा करणं हे काम होतं. सर लहान मुलांचे व मॅडम डोळ्यांच्या डॉक्टर असल्याने साहजिकच अगदी तान्ह्या बाळापासून ते आजी आजोबांपर्यंत दिवसभर वर्दळ असायची रोज. अनुसूया , तिथे असलेली सिस्टर एकदम प्रेमळ होती. घरी काही खास बनवलं कि डब्यातून घेऊन यायची माझ्याकरता आणि समोर बसवून खायला लावायची. पेशंटची खूप मनापासून काळजी घ्यायची. मला खूप कौतुक वाटायचं तिचं. तिच्या वैयक्तिक प्रश्नांना तिच्या बोलण्यांत आणि तिच्या चेहऱ्यावर तसूभरसुद्धा जागा नसायची कधी ! आपलं कर्तव्य अगदी चोख पार पाडायची, सतत हसतमुख आणि शांत राहून. ऑपरेशन नंतर घरी जातांना प्रत्येक पेशंट अनुसूया सिस्टरच कौतुक करायचा ! सणवार असो, काहीही असो कधीही सुट्टी नाही मागायची ती. घरचं सर्व काम करून वेळेत कामाला हजर ! आपल्या कामावर खूप प्रेम करायची, म्हणायची "इतकं पुण्य मला दुसरीकडे कुठलंच काम करून मिळणार नाही !"... माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा आपल्या कामावर इतकं जीवापाड प्रेम करणारी व्यक्ती प्रत्यक्ष समोर पाहिली होती !  

माझा भाऊ, केदार बी. जे.  वैद्यकीय महाविद्यालयांत होता. १२ वी झाल्यावर सुरु झालेला त्याचा डॉक्टर या पदवीपर्यंतचा प्रवास मी खूप  जवळून बघितलाय. केवळ त्याचाच नाही तर माझी वहिनी, माझ्या भावाचे जिवलग मित्रमैत्रिणी, माझ्या भाच्या ..  सारेच डॉक्टर त्यामुळे एका डॉक्टरचं वैयक्तिक आयुष्य काय असतं याची एक नाही तर डझनभर उदाहरणं घरातलीच..

आई गेल्यावर काही तासांतच डिलिव्हरी करता आलेल्या पेशंटच्या सर्जरी करता आपलं दुःख बाजूला ठेवून जाणारी डॉक्टर, स्वतःची डिलिव्हरी झाल्यावर जेमतेम चार दिवस विश्रांती घेऊन पाचव्या दिवशी इमरजन्सी मध्ये आलेल्या आपल्या पेशंट करता हॉस्पिटल मध्ये जाणारी डॉक्टर, मुलं लहान असतांना त्यांच्या वेळा सांभाळून आपल्या पेशंट करता कायम हजर असणारी डॉक्टर  मी पाहिली आहे, माझ्या वहिनीत !!

कोविड १९ मुळे LOCKDOWN असतांना आपण घरी सुरक्षित होतो तेव्हा डॉक्टर दररोज हॉस्पिटल मध्ये जात होते ! आई वडील म्हातारे आहेत किंवा मुलं खूप लहान आहेत हि कारणं नव्हती ना त्यांच्याकडे ! आज त्यांची मुलं सुद्धा इतकी तयार झाली आहेत कि संध्याकाळी दिवसभरानंतर हॉस्पिटल मधून आलेले आई बाबा समोर दिसले तरी आनंदाने धावत जाऊन इवल्या हातांनी त्यांना पकडून त्यांच्या गळ्यांत पडायचं सोडून, ते थांबतात , वाट बघतात कि आई बाबा आत जाऊन फ्रेश होऊन कधी बाहेर येतील आणि आपल्याला घेतील याची ! कारण त्यांना सुद्धा माहिती झालं आहे सध्याच्या दिवसात 'न्यू नॉर्मल' काय आहे ते ...  कोणी तयार केलं या दोन, चार वर्षांच्या मुलांना इतका धीर दाखवण्याकरता, डॉक्टर असणाऱ्या त्यांच्या आई वडिलांनीच ना .. एवढ्या लहान वयांत केवढी हि समज ! थोड्या फार फरकाने प्रत्येक डॉक्टरांच्या घरांत हेच चित्र आहे, असेल !!

मध्यंतरी डॉक्टर धनंजय केळकर सरांचा एक व्हिडिओ पाहिला, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने त्यांनी सांगितलेल्या डॉक्टर मेहता बाईंची गोष्ट ऐकून डोळ्यांत पाणी आलं.. दररोज सकाळी 7 ते रात्री 10 काम करणाऱ्या डॉक्टर मेहता बाईंपुढे सरांसोबत आपणही नतमस्तक व्हावंस वाटलं !आपल्या कामाला वाहून घेतलेल्या या दैवी लोकांबद्दल ऐकलं की वाटतं धन्य ते शिक्षक आणि धन्य ते विदयार्थी !!

मागील एका लेखांत मी लिहिलं होतं,'हॉस्पिटलच्या आवारातील देऊळ मी खिडकीतून रोज पाहायचे पण देव मात्र मला इथे भेटायचा, डॉक्टरांच्या रूपांत'...

या थोर profession बद्दल कायमच उत्सुकता, कुतूहल, प्रचंड आदर आणि अभिमान वाटणाऱ्या माझ्या सारख्या कितीतरी जणांना मागील आठवड्यात ऐकाव्या लागलेल्या शब्दांच्या कोट्या म्हणजे कित्येक जणांच्या भावनांची उडवलेली विकृत थट्टा होती ...

कोणतंही काम कमी दर्जाचं नाही याची शिकवण देणारी आपली थोर परंपरा कोणत्याही profession ची अशी थट्टा करण्याची मुभा सुद्धा कोणालाच देत नाही.. हो ना !

आजूबाजूला घडणाऱ्या अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करत, डॉक्टर हा व्यवसाय नाही तर आपला ध्यास मानून आपलं कर्तव्य चोख बजावणाऱ्या आपल्या कुटुंबातील, आपल्या समाजातील सर्व डॉक्टरांना व त्यांच्या परिवाराला श्रीगणेशाचे अनेक मंगल आशीर्वाद मिळोत, हीच त्याच्या चरणी प्रार्थना !!!

©कविता सहस्रबुद्धे

Wednesday, August 19, 2020

दो नैना .. एक कहानी
थोडा सा बादल , थोडा सा पानी और एक कहानी ...

शब्द गुलज़ारजी,आवाज आरती मुखर्जी आणि पडद्यावर साकारलं आहे शबाना, नसीरुद्दिन शाह आणि छोटा जुगल हंसराज यांनी ! या गाण्याची खासियत म्हणजे या तिघांची गोष्ट एका धाग्यांत बांधली आहे या संपूर्ण गाण्याने ! प्रत्येक वेळी ऐकतांना डोळ्यांच्या कडा भिजवून जातं हे गाणं ...

आपल्या दोन लहान मुलींना झोपवताना शबानाजींच्या तोंडी असलेलं हे गीत .. मनांत विचारांच, भावनांच वादळ असतांना रात्रीच्या अंधारात गहिवरुन आलेलं मन आणि डोळ्यांमधून डोकावणारं तिचं दुःख...

छोटी सी दो झिलों में वो बेहेती रेहेती है
कोई सुने या ना सुने केहेती रेहेती है ..
कुछ लिखके और कुछ जुबानी ,
थोडा सा बदल थोडासा पानी और एक कहानी ...

आयुष्यातल्या ता विचित्र वळणांवर येऊन ठेपल्यावर पुढचा धूसर अंधुक झालेला रस्ता, आपल्या सुखी संसारात आलेलं हे वादळं आपल्याला कोठे घेऊन जाणार या विचाराने हादरलेली ती .. एका क्षणांत सर्व काही बदलून गेलं हे स्वीकारणं अवघड आहे हे जाणून स्वतःला सावरणारी ती ...

दुसरीकडे छोट्या जुगलला कर्तव्य जपण्यासाठी घरी आणल्यामुळे निर्माण झालेलं वादळ आपल्यामुळेच आलंय हे जाणणारा तो .. एकीकडे स्वतःच सुखी चौकोनी कुटुंब तर दुसरीकडे एक निरागस भाबडं सत्य .. त्याची अबोल व्यथा !  त्या लहान जीवाची काहीच चूक नसतांना होणारी फरफट त्याला सहन न होणारी पण हात बांधलेले .. चूक मान्य करणं तर दूर पण ती चूक शक्य तेवढी दुरुस्त करणं सुद्धा जमेल कि नाही याची शाश्वती नसलेला .. सभोवताल दाट काळोख असतांना त्यांत धडपडणारा,वाट शोधणारा एक पिता , एक नवरा .. 

थोडीसी है जानी हुई थोडीसी नई
जहाँ रुके आंसू वही पुरी हो गयी
है तो नयी फिर भी हैं पुरानी ... थोडा सा बादल, थोडासा पानी और एक कहानी ..

'तिला' मायेनं मुलींना जवळ घेतांना, जोजवतांना पाहून त्याला आठवणारी त्याची आई .. कितीही आठवली, भेटावंस वाटलं तरी आतां कधीही न भेटणारी आपली आई .. तिच्या आठवणीने कासावीस झालेला तो इवला जीव .... त्याच्या जगातून ती दूर गेली असली तरीही तिचा स्पर्श , तिची माया, तिचं त्याच्या सभोवताल असणं त्याला अजूनही आठवतंय आणि म्हणूनच तो नकळत त्याच्या आठवणीत ओढला जातो .. त्याच जागी जिथे त्याच्या सुंदर आठवणी मागे सोडून आलाय तो ! पण त्याच आठवणीत एक वेदना सुद्धा आहे, तिला गमावल्याची !

एक ख़त्म हो तो दूसरी रात आ जाती है, होठों पे फिर भुली हुई बात याद आ जाती है 
दो नैनों कि हैं यह कहानी .. थोडा सा बादल , थोडा सा पानी और एक कहानी .. 

वेदनेचं , अश्रूंच हे लेणं .. तिघांचं दुःख एकाच वेळी मांडणारं , आपल्याला सांगणारं हे गाणं विलक्षण आर्त स्वरांत काळजाला भिडतं .. अपराधीपणाची सल मनांत घेऊन आयुष्यात त्या क्षणी, त्या जागी थबकलेला तो .. आईच्या आठवणींत हरवलेला ; आभाळाएवढं मनांत न मावणारं दुःख पेलणारा जुगल आणि आपले अश्रू सर्वांपासून लपवणारी, मनांतच कुढणारी कोलमडून पडलेली ती... प्रत्येकाची वेगळी गोष्ट .. भावनांचे इतके कंगोरे हाच या गाण्याचा आत्मा आहे , एक धागा आहे ज्याने या तिघांना एकत्र बांधलं आहे !!

गाणं शेवटाकडे जातं तेव्हा दिसते वर खिडकीत उभी असलेली डबडबलेले डोळे लपवणारी शबाना , आपल्या आईच्या आठवणीत घराबाहेरील लॉन मध्ये जातांना मधेच मागे वळून बघणारा जुगल आणि त्याच्या पाठीमागे चालत येणारा पण दारातच एक क्षण थबकलेला नसीर ... तीन वेगवेगळ्या जागी उभं राहून नियतीने आपल्या समोर मांडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधणारे हे तिघे .... प्रत्येकाची एक वेगळी 'कहानी' ...

एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातात गुलज़ार साहेब !!

Tuesday, August 11, 2020

#मान्सून डायरी #

पाच वाजले की ऑफिसमधून लगबगीनं निघायचं,ऑफिसच्या बसमधे बसलं की हुश्श करायचं. त्या क्षणी ऑफिस तिथेच मागे सोडून मग पुढचा अर्धा तास मनसोक्त गाणी ऐकायची हे रोजचं ठरलेलं.. सध्या जोडीला बरसणारा मुसळधार पाऊस आहेच, मग काय एकदम माहोल.....कानांत आवडीचा दागिना अडकवून मोबाईल वर लता किशोरचं रिमझिम गिरे सावन back to back ऐकत पावसाचा आनंद घेत, पावसातं मुक्त विहार करत बागडत घरी जायचं ! संध्याकाळची हि सुरेल सुरवात दिवसभराचा सगळा शीण घालवते !

सध्या आमचं कॉलेज कॅम्पस म्हणजे आमच्यासाठी महाबळेश्वर, पाचगणी तर कधी कोडाईकॅनाल अगदी  माउंट अबू सुद्धा आहे. गार बोचरी हवा, अविरत कोसळणाऱ्या सरी, खाली उतरलेल्या पांढऱ्या शुभ्र ढगांमध्ये पावसांत चिंब भिजून डोलणारी हिरवीगार झाडं, वेगवेगळ्या रंगांची फुलझाडं, दिवसभर बागडून सुद्धा न थकलेल्या विविध पक्षांचे आवाज, तो किलबिलाट, मधूनच डोकावणारे तर कधी पावसांत पिसारा फुलवून नाचणारे मोर सारंच अदभूत ! सध्याच्या वातावरणातील मरगळ झटकून रोज नवी उभारी देणारं हे वातावरण !!! 

काल सुद्धा अशाच धुवांधार पावसांत आमची बस निघाली.. 

काही वेळांतच आमचं कॅम्पस सोडून आणि आम्ही हायवेला लागलो. रस्त्यावर बऱ्यापैकी कमी गर्दी व त्यातही  एकमेकांना मागे टाकण्याची गाड्यांची स्पर्धा .. चांदणी चौक ओलांडून बस आता वारजेच्या दिशेने जात होती. इथे ट्रॅफिक थोडं जास्त होतं त्यामुळे बसचा स्पीड जरा कमी होता. इतक्यात नक्की काय झालं हे  समजायच्या आत आमच्या बसच्या पुढे असलेल्या दुसऱ्या बसने एका रिक्षाला जोरदार कट दिला आणि ती रिक्षा जागेवरचं १८० कोनात फिरतांना आमच्या बसवर येऊन अक्षरशः धडकली. नशीब बसचा स्पीड कमी होता. ती रिक्षा आमच्या बसला धडकून परत बाजूला होतांना मला खिडकीतून दिसली आणि "ओह्ह गॉड "असे शब्द माझ्या तोंडातून फुटता फुटता त्या रिक्षांत ड्रायव्हर आणि पेसेंजर कोणीच नाहीये हे मला दिसलं आणि "अरे कोणीच नाहीये रिक्षांत".. हे शब्द सुद्धा एकदम उत्फुर्तपणे बाहेर पडले. 

"असं कसं होईल कि कोणीच नाही रिक्षांत, काही काय ?".... " अरे रिक्षाला पहिला कट बसला ना तेंव्हाच बाहेर पडले कि काय सगळे, बापरे "...  " अग सगळे कसे पडतील बाहेर, कोणी तर राहील रिक्षांत ".. "पण समजा  बाहेर पडले असते तर दिसले असते ना, रस्त्यावर तर कोणीच नाही पडलेलं ".. अशी अनेक वाक्य माझ्या कानांवर आदळत होती. प्रत्येक जण बसमधून बाहेर पाहात अंदाज बांधत होता. काय झालं असेल या विचाराने मी पण जरा घाबरले होते. पुढची बस थांबली, आमचीही बस थांबली आणि आजुबाजूची सर्व रहदारी सुद्धा थांबली. नक्की काय झालं असावं हे तर्क वितर्क करत निम्मी बस खाली उतरली. आमच्या बाजूलाच थांबलेली गाडी ऑफिस मधल्या माझ्या मित्राची होती. आपलीच ऑफिसची गाडी पाहून तो सुद्धा काळजीपोटी थांबला.  त्याचा चेहरा एकदम प्रश्नार्थक, "काय झालं " ? असं त्याने विचारताच, "अरे ती रिक्षा धडकली आपल्या  बसला पण रिक्षांत कोणीच नव्हतं " असं मी म्हटलं तर तो, " काय " असं सर्वांना ऐकू जाईल इतक्या मोठ्यांदा जवळपास ओरडलाच .. "अरे हो ".. इतकंच उत्तर मी दिलं कसंबसं.  " काही तरी झालं हे कळलं , त्यामुळॆ मी स्पीड कमी केला. गाडीसमोर कोणी येत नाहीये ना हे बघत बघत कशी बशी गाडी थांबवली" असं तो सांगत होता....साधारण हाच भाव आजूबाजूला थांबलेल्या प्रत्येक गाडीचालकाचा होता. गाडी बंद करून, उतरून,  मागे जाऊन, नक्की काय झालं हे पाहायला सगळेच जण बसच्या मागे जात होते. 

सुदैवाने रिक्षाचं जास्त नुकसान झालं नव्हतं. एवढ्या गोंधळात ती दोन चार वेळा जागेवरच गोल गोल फिरली असावी आणि डिव्हायडर वर थोडी कलंडली होती. सर्वानी ती रिक्षा सरळ केली तरी रिक्षा कोण चालवत होतं हे कोडं काही उलगडत नव्हतं. कोणीतरी डिव्हायडरच्या पलीकडच्या रस्त्यावर पण पाहिलं कोणी तिकडे तर नाही पडलं.. तर तिथेही कोणी नव्हतं. इतक्यात कोणीतरी बोललं सुद्धा, "अरे हि काय रोहित शेट्टी ची फिल्म चालू आहे का ?".. "अहो, प्रसंग काय , बोलताय काय " असं एकाने त्याला टोकलं सुद्धा. बघता बघता काही क्षणांत आजूबाजूच्या सर्व गाड्या थांबल्या. रिकामी रिक्षा अशी रस्त्यावर कशी काय आली या विचाराने सर्व जण चक्रावले होते.  "अरे कोणाची हाय रं हि रिक्षा ?" अशी आरोळी तेवढ्यात बाजूच्या टेम्पोवाल्याने ठोकली. "अरं माझी हाय , माझी "... असं उत्तर ऐकू येताच, त्या आलेल्या आवाजाच्या दिशेने सारेजण एकदम वळून पाहायला लागले तर पांढरा शर्ट , पांढरा पायजमा आणि टोपी घातलेला एक माणूस लगबगीने येतांना दिसला. त्याच्या एका हातांत मक्याचं अर्धवट खाल्लेलं कणीस होतं. रस्त्याच्या बाजूलाच निखाऱ्यावर कणसं भाजून विकणाऱ्याची एक गाडी लागलेली होती. हा पठ्ठा बहुदा तिथेच पावसांत कणीस खात बसलेला होता हे हेरायला क्षणाचाही विलंब लागला नाही...  

कणीस खाण्यात तो इतका मश्गुल असावा कि थोडी पुढे उभी केलेली रिक्षा रस्त्यावर आली, बसला धडकली याची त्याला तिळमात्र कल्पना नव्हती. काहीतरी गोंधळ झाला तेव्हा त्याने पाहिलं तर समजलं रिक्षाची भानगड आहे काहीतरी म्हणून मग त्याने स्वतःची रिक्षा पाहिली जी जागेवर नव्हती आणि म्हणून त्याला उलगडा झाला कि ती त्याचीच रिक्षा आहे.. या अर्थाचं त्याचं स्पष्टीकरण ऐकून आता त्याला रागवावं कि बदडावं असं झालं लोकांना... "हा काय रस्ता आहे का बे बाजूला रिक्षा लावून कणीस खायचा"... " सांभाळता येत नाही रिक्षा तर चालवतो कशाला".."अरे रिक्षात कोणी असतं तर काय झालं असतं, विचार कर जरा,".. "कणीस खायला खडकवासल्याला जायचं ना इथे का कडमडला"..  असं प्रत्येकाने खरपूस तोंडसुख घेतलं .. कोणीतरी, "हि कणसं विकायची जागा आहे का रे " म्हणून त्या कणसं विकणाऱ्याला पण झापलं ... 

तो रिक्षावाला मात्र एक कणीस काय भावाला पडलं असा विचार करत, ते अर्धवट खाल्लेलं कणीस खावं कि आता फेकावं असा विचार करत त्याच्या रिक्षामध्ये आरूढ झाला ... 

हुश्श .. कोणाला काही झालं नाही हे समाधान सर्वांत जास्त होतं. पाच मिनिटांपूर्वी एका वेगळ्याच टेन्शन मध्ये आलेली इतकी सारी माणसं आता चेहऱ्यावर एक हसू आणि मनांत मात्र पावसांत कणीस खाणाऱ्या रिक्षावाल्याचे चित्रं घेऊन आपापल्या गाड्यांमधून पुढच्या प्रवासाला निघाली..