Friday, April 27, 2018

ऑक्टोबर

खूप मिक्स Review ऐकून हा सिनेमा पाहावा कि नाही असा विचार केला पण सहसा कोणताही वेगळा विषय असाच न पाहाता सोडून देणं जमत नाही म्हणून मग आवर्जून पहिला आणि वाटलं पाहीला नसता तर खूप काही miss केलं असतं. दिग्दर्शक शूजित सरकार आणि वरून धवन हे जे काही कॉम्बिनेशन आहे ते एकदम जादू करतं आणि ते वेगळेपण आपल्याला पूर्ण वेळ बांधून ठेवतं ...

वनिता संधू ने साकारलेली शिउली,गीतांजली राव ने साकारलेली तिची आई आणि वरून धवनने साकारलेला  डॅन यांच्यातील वीण , एकमेकांबरोबर निर्माण होत जाणारं नातं आपल्याला निरपेक्ष प्रेम म्हणजे काय हे सांगत राहतं ...

फाईव्ह स्टार हॉटेल , हॉटेल मॅनॅजमेन्टच्या अभ्यासातील भाग म्हणून तिथे काम करणाऱ्या काही जणांचा ग्रुप.. त्यांच्या कामाच स्वरूप, पद्धत , तेथील प्रत्येकाची जबाबदारी, ती निभावताना त्यांना येणारे रोजचे वेगवेगळे अनुभव आणि आपल्या टीम मेंबर ला सावरण्यासाठी धडपडणारे टीम मधील मित्र मैत्रिणी.... अशा एकदम हलक्या फुलक्या वातावरणांत या सिनेमाची सुरवात होते. याच टीम मध्ये असतात शिउली आणि डॅन. दोघंही भिन्न स्वभावाचे..एकमेकांबरोबर खुपसा संवाद नसणारे, जवळची मैत्री नसलेले तरीही टीम मुळे एकत्र आलेले.

३१ डिसेंबर च्या पार्टीत अपघाताने शिउली तिसऱ्या मजल्यावरून खाली पडते आणि कोमात जाते आणि याच वळणावर चित्रपट खऱ्या अर्थाने सुरु होतो... हॉस्पिटल मध्ये शिउली कोमात असतांना, तिची ट्रीटमेंट सुरु असतांना दुसरीकडे बाकीच्यांच आयुष्य हळूहळू नॉर्मल होतं. शिउलीचे शेवटचे शब्द 'Where is dan ?' डॅनला अस्वस्थ करतात आणि तिथेच एक नातं जन्म घेत.. आणि याच निःशब्द नात्याची गोष्ट आहे ऑक्टोबर ....

'Where is Dan ?' हे शब्द त्याला स्वस्थ बसू देत नाहीत .. या प्रश्नाच्या मागचं कारण आणि तिला त्या प्रश्नाचं  द्यायचं असलेलं उत्तर यासाठी सुरु होते त्याची धडपड. अगदी छोट्या छोट्या संवादातून त्याच मन उलगडत जातं. पहिल्यांदा तिला ICU मध्ये पाहून आल्यापासून त्याची होणारी घालमेल आपल्यालाही अस्वस्थ करते.

शिउलीच्या आईची प्रचंड ताकदीची भूमिका गीतांजली रावने साकारली आहे. कमी संवाद असूनही त्या मोजक्या संवादात, नजरेतून व्यक्त होणारी कणखर आई.. शिउलीने प्रथम अम्मा म्हटल्यावर कोसळणारी आई .. आणि शिउली गेल्यावर तिच्यासाठी लावलेलं प्राजक्ताच झाड एकटं कसं ठेवणार म्हणून ते डॅनला देणारी आई .. आपल्याला सुन्न करते.

शब्दांत काहीही न बोलू शकणारी, फक्त डोळ्यांनी बोलणारी शिउली आणि तिच्या संवेदना जाणून घेणारा डॅन खूप काही सांगून जातात आणि आपण त्या नात्याच्या प्रेमात पडतो...

हॉस्पिटल मध्ये ट्रीटमेंट देणारे डॉक्टर खरंच जिनियस आहेत ना याची खात्री reception वरच्या माणसाशी बोलून करून घेणारा डॅन, रात्री हॉस्पिटल मध्ये एन्ट्री साठी पास नाही म्हणून security ला convince करणारा  डॅन, रोज हॉस्पिटल मध्ये जावून शिउलीला भेटणारा आणि मनातलं बोलणारा डॅन, तिच्यासाठी तिची आवडती  प्राजक्ताची फुलं वेचून तिच्या उशाशी ठेवणारा डॅन, सिस्टरच आयुष्य जवळून जाणून घ्यायचा प्रयत्न करणारा डॅन, शिउलीच्या काकांपासून व्हेंटिलेटरच स्वीच लांब ठेवण्याची काळजी घेणारा डॅन, तिचा मृत्यूबरोबरचा संघर्ष थांबावा आणि परत तिचं आयुष्य सुरु व्हावं म्हणून झटणारा डॅन आणि तिच्या आई समोर खूप positive energy घेऊन उभा असलेला डॅन .....  डॅन या व्यक्तिरेखेत खुप काही आहे. अतिशय हळुवार पणे उलगडत जाणारी त्याची व्यक्तिरेखा..  तो माणूस म्हणून किती प्रगल्भ आहे, याचा प्रवास मनाला खूप भिडतो.

प्राजक्ताची इवलीशी फुलं .. कमी आयुष्य असणारी . झाडावरून ओघळून पडणारी .. त्यांचा आणि शिउलीच्या आयुष्याचा संदर्भ नेमकेपणाने इथे टिपला जातो...

करियर चा विचार सोडून, रेस्टॉरंटच स्वप्न विसरून तो शिउली मध्ये गुंतत जातो. तिच्या कोमातून बाहेर आल्यावर होणाऱ्या छोट्या छोट्या प्रगतीमध्ये खुश होतो. तिच्या डोळ्यांच्या हालचालीत स्वतःला शोधतो. तिच्या पासून दूर जावून राहू शकत नाही तेव्हा परत येवून तिचं आणि त्याचं असलेलं निःशब्द नातं परत जपतो...

शिउलीच जाणं स्वीकारून तिच्या घरातील प्राजक्ताच झाड आठवण म्हणून घेऊन जाणारा डॅन , या फ्रॅम वर सिनेमा संपतो...

नक्की पाहावा असा 'ऑक्टोबर ' ....
 

Wednesday, April 4, 2018

बालभारती

बालभारती या शब्दाशी आपली पहिली ओळख झाली आपण शाळेत असतांना आणि तेव्हापासूनच या शब्दाभोवती आपल्या कितीतरी छान आठवणी गोळा होतं गेल्या.

जून महिना आला कि शाळा सुरु होण्याचे वेध लागतात. नवीन वह्या, नवीन दप्तर आणि नवीन पुस्तकं !हि नवीन पुस्तकं आली कि त्या कोऱ्या पुस्तकाच्या वासाबरोबर त्यातील अनेक सुंदर सुंदर गोष्टी आणि कविता वाचतांना मिळणारा आनंद प्रत्येकानेच अनुभवलाय. शाळेचे ते छान दिवस आणि तेवढ्याच अमूल्य त्या  आठवणी आज आपल्या प्रत्येकाच्याच मनांत अजूनही ताज्या आहेत. बालभारतीच्या पुस्तकांतील याच आठवणी पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी माझ्या मुलामुळे मला मिळत गेली.

दोन वर्षांपूर्वी इयत्ता नववीचा अभ्यासक्रम बदलला. शाळा सुरु होऊन महिना झाला तोवर एका पाठोपाठ एक नवीन अभ्यासक्रमाची पुस्तकं बाजारात येत होती. त्याच वेळी पुढच्या वर्षी दहावीचा अभ्यासक्रम बदलणार असं समजलं. पुढच्या वर्षी दहावीची पुस्तकं वेळेत येतील कि नाही म्हणून चर्चाही झाली. त्या वर्षीचा अनुभव बघता पुढ्च्या वर्षीच्या पुस्तकांचं थोडं जास्तच टेन्शन होतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

नववीच्या दिवाळीपासूनच १० वीच्या क्लासेसच्या ऍडमिशन सुरु झाल्या आणि परत एकदा दहावीची पुस्तकं हा विषय चर्चेकरता बाहेर आला. ९ वी ची परीक्षा झाली कि लगेच १० वी चा क्लास सूरु होणार, शाळा सुरु होणार पण मग पुस्तकांचं काय ? आम्हा मैत्रिणींच्या ग्रुप मध्ये तर हमखास या विषयावर बोलणं व्हायचच. शेवटी ठरलं कि आपण बालभारतीच्या ऑफिस मधेच फोन करू आणि विचारू , म्हणजे नक्की काय ते समजेल.

साधारण जानेवारी महिन्यामध्ये मी फोन केला कि, 'मला १० वी च्या नवीन अभ्यासक्रमाच्या पुस्तकांची चौकशी करायची आहे कि ती पुस्तकं साधारण केव्हापर्यंत बाजारात येतील ?'. पलीकडून अतिशय जबाबदारीने उत्तर आलं कि "अजिबात काळजी करू नका, आम्हाला सुद्धा मुलांची चिंता आहे. आम्ही शनिवार रविवार सुटी न घेता काम करतो आहोत. सर्व शिफ्ट मध्ये काम सुरु आहे. ताई , तुम्हाला तुमच्या एका मुलाची चिंता आहे पण अहो आम्हाला सर्व मुलांची चिंता आहे , नका काळजी करू. आम्हाला सांगितलंय ना वेळेत करायचं ते  आम्ही करू". हे ऐकून मला सुखद धक्का बसला. 'खूप खुप धन्यवाद' इतकंच बोलू शकले मी तेव्हा. आजकाल आपण किमान नीट उत्तर मिळावं इतकीच अपेक्षा करतो पण इथे मिळालेल्या उत्तरात तर खूप काही होतं. एक जबाबदारी, ठामपणा, वेळेचं बंधन पाळण्याची जिद्द आणि आपल्या कामावरची श्रद्धा. आजकाल दुर्मिळ होत चाललेल्या अशा अनुभवाने मी मात्र भारावून गेले.

मग हाच निरोप पुढे मैत्रिणींना सांगितला आणि प्रत्येकीचा जीव थोडा का होईना पण भांड्यात पडला. फेब्रुवारी महिना गेला, मार्च महिन्यात एप्रिल महिन्याचं शाळेचं वेळापत्रक मिळालं. पंधरा एप्रिल पासून १० वी ची शाळा सुरु होणार होती. झालं , परत एकदा सर्व चर्चा पुस्तकांवरच येऊन थांबली .

मी परत एकदा बालभारती मध्ये फोन केला आणि चौकशी केली. तेव्हा पलीकडून मिळालेला प्रतिसाद सुद्धा पहिल्या इतकाच छान होता. "ताई, प्रुफ चेकिंग झालंय , पुस्तकं प्रिंटिंग मध्ये आहेत. अहो मुंबईला जावं लागतं प्रूफ चेकिंगला . आठवडा आठवडा लागतो तिथं थांबायला. प्रूफ चेकिंग मोठं काम असतं, प्रिंटिंग काय आमच्या हातात आहे, ते मशीनवर करायचं, ते आम्ही करू आता. तुम्हाला शाळा सुरु होईपर्यंत पुस्तकं नक्की मिळणार साधारण एप्रिल च्या पहिल्या आठवड्यात हे नक्की आणि हो तुम्हाला अजून खात्री करायची असेल तर साहेबांशी बोला कि, त्यांना पण खूप फोन येतायेत खात्री करण्यासाठी, " मी त्यांचे आभार मानून फोन ठेवला.

मला जे ऐकायचे होतं तेच उत्तर मिळालं म्हणून मी हा प्रतिसाद किंवा अनुभव सुखद होता असं नाही म्हणत तर माझ्यासारखेच शंका असणारे अनेक पालक फोन करतच असतील त्यांना पण प्रत्येकाला न कंटाळता उत्तर देणं , तो विश्वास दाखवणं खूप महत्वाचं आणि बालभारतीची टीम हे सर्व करत होती.

सांगितल्याप्रमाणे ३ एप्रिल २०१८ ला बालभारती ने दहावीची सर्व पुस्तकं उपलब्ध करून देऊन दहावीच्या सर्व मुलांना , पालकांना आणि शिक्षकांना एक सुखद धक्का दिला.

या वर्षी दहावीची पुस्तकं , परीक्षेचं स्वरूप सर्वच बदललेलं. त्यामुळे साहजिकच मागच्या कोणत्याही परीक्षेचे पेपर तसे उपयोगी पडणारे नव्हते. सराव करण्याकरता काहीच उपलब्ध नव्हतं. हि नेमकी अडचण ओळखून बालभारतीने प्रत्येक विषयाचे ३ / ४ पेपर आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले . इतकंच नाही तर ते पेपर तपासण्यासाठी त्यांची उत्तर पत्रिका सुद्धा दिली यामुळे सर्व पालकांना खूप खूप मदत झाली.

वेळेवर पुस्तकं आली नाहीत कि आपण अगदी उघडपणे बालभारतीला दोष देतो; त्या मागची कारणं सुद्धा शोधायचा प्रयत्न करत नाही परंतु यावर्षी वेळेवर किंवा वेळेआधी पुस्तकं तयार करण्यात बालभारती टीमने जो पुढाकार घेतला, जे कष्ट घेतले त्याच खरंच खूप खूप कौतुक आहे.

एकूण काय तर या दहावीच्या निमित्ताने बालभारती कार्यालयातील फोनवरचा माझा प्रवास मला अनेक सुखद अनुभव देऊन गेला !


 

Tuesday, April 3, 2018

' चिऊताई '


आज वर्ल्ड sparrow डे ... सकाळी फेसबुकनीच  सांगितलं. लगेच कांतेयनी काढलेल्या या फोटोंच कोलाज सुद्धा बनवलं. राहून राहून एक मात्र जाणवलं या sparrow पेक्षा 'चिऊताई' शब्दातच जास्त गोडवा आहे नाही. कितीतरी वेळ चिऊताई या शब्दाभॊवती मन असंच रेंगाळलं आज.

आपली लहानपणी पक्षी या शब्दाशी पहिली ओळख बहुदा चिऊताई हा शब्द ऐकून आणि तिला पाहूनच झाली ना .. अंगणात दाणे वेचणारी चिऊताई तेव्हा इतकी दुर्मिळ नक्कीच नव्हती. चिऊ काऊ च्या गोष्टी ऐकतच कितीतरी वेळा आईने मऊ भात भरवला आणि बाबाच्या कडेवर बसून कितीतरी वेळा अंगणातील चिऊताई आपण पाहिली. कितीही मोठे झालो तरी चिमणी पेक्षा 'चिऊताई' शब्दच ओठांतून जास्त बाहेर पडला.

घास भरवताना आई गोष्ट सांगायला सुरवात करायची..  एकदा काय होतं, मोठा पाऊस येतो आणि काऊच घर वाहून जातं . मग तो येतो चिऊताई कडे  'चिऊताई चिऊताई दार उघड'. ती म्हणते 'थांब माझ्या बाळाला आंघोळ घालू दे ' हा चिऊ काऊ चा संवाद प्रत्येक घरी ऐकू येणारा ..

या गोष्टींत चिऊताई पिलू झोपेपर्यंत दार उघडतंच नाही आणि कावळा मात्र दार वाजवत राहतो. पिलाला भात भरवू दे , त्याला अंघोळ घालू दे , त्याला टिटपावडर करू दे, त्याला कपडे घालू दे , त्याला अंगाई गाऊ दे, त्याला झोपवू दे अशी कारणं सांगून दार न उघडणारी चिऊताईच आपल्याला जास्त भावते. तिच्यातील प्रेम, वात्सल्य , माया बहुदा आपल्यातही झिरपते... व म्हणूनच या चिऊताईच्या गोष्टी आपण पुढे आपल्या पिलालाही सांगतो  आणि  चिऊताईच्या गोष्टीचा हा प्रवास पुढे असाच चालू राहतो.

दूर गेलेल्या आपल्या पिलांना साद घालणाऱ्या आईचं मन, अवती भोवती त्यांचा कोलाहल नाही म्हणून खिन्न झालेलं मन  गदिमांनी आपल्या काव्यातून व्यक्त करतांना त्यांना 'चिमण्यांनो' म्हणून आर्त साद घालून काय सुरेख व्यक्त केलंय ...

"या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे अपुल्या,
जाहल्या तिन्ही सांजा जाहल्या
दाही दिशांनी आतां येईल अंधाराला पूर,
अशा अवेळी असू नका रे आई पासून दूर
चूक चूक करिते पाल उगाच, चिंता मज लागल्या
अवतीभवती असल्यावाचून कोलाहल तुमचा
उरक न होतो आम्हा , आमुच्या कधीच कामाचा
या बाळांनो या रे लवकर वाटा अंधारल्या ..... "

खरंच प्रत्येक घरात असणारा हा चिमण्या पाखरांचा चिवचिवाट आपल्या घरट्याला घरपण देत असतो...


एकूण काय तर या चिऊताईनी आपल्याला खरंच खूप आठवणी दिल्या आहेत आणि या निमित्ताने त्या आज परत गोळा झाल्या , इतकंच....

 

Monday, April 2, 2018


प्रत्येकाच्या खिडकीतलं आभाळ तसं वेगळं
निळाई असते तीच तरी क्षितिज मात्र वेगळं

आसमंती गंधाळतो कधी माळलेला मोगरा
केशर शिंपीत जाणारा तो कधी सोबत निळा चांदवा

गाढ एकांतात कधी असतो नजरेचाच आवाज
डोळ्यांमध्ये विस्कटलेली ती काजळ काळी पहाट

निळ्या सावळ्या स्पर्शाचा सतारीचा झंकार
शब्दांविना फुलतो जसा पावरीचाच आवाज ....