Friday, July 28, 2023

 The Land of high passes – लडाख


कारगिल युद्धाच्या वेळी पहिल्यांदा कारगिल, द्रास या भागाविषयी ऐकलं होतं. तेव्हा भौगोलिक दृष्ट्या हा भाग कसा महत्वाचा आहे ते समजलं. मग कितीतरी वेळा अनेकांच्या शब्दांतून, गोष्टींमधून, डोळ्यातून कारगिल चं रूप नजरेसमोर उभं राहात गेलं. प्रत्येक वर्षी जुलै महिन्यात 'कारगिल विजय दिवस' साजरा करतांना तिथे प्रत्यक्ष जाण्याची इच्छा दृढ होत गेली. अत्युच्य बलिदानाचा, उच्च मनोबलाचा आणि दैदिप्यमान त्यागाचा इतिहास ज्या भूमीवर लिहिला गेला त्या वीर भूमीवर, नतमस्तक होताना जाणवलं, "जिंदगी ना मिलेगी दोबारा" चा खरा अर्थ फक्त या वीरांनाच समजला होता म्हणून तर "I only regret that I have but one life to lay down for my country" असं ते म्हणू शकले. 

'Travel changes you. As you move through this life and this world, you change things slightly, you leave marks behind, however small. And in return life and travel leaves marks on you'.. its so true .. 
इथे फिरताना आम्हाला भेटलेले ड्रायव्हर, हॉटेल मध्ये काम करणारी मंडळी, लोकल मार्केट मधले दुकानदार यांच्याशी बोलतांना समजलं या सामान्य लोकांच्या रोजच्या आयुष्यातील अडचणी खूप वेगळ्या आहेत तरी सुद्धा त्यांचं जगण्यातलं समाधान, आनंद, कष्टाची तयारी, माणुसकी आणि कामाबद्दल असणारा प्रचंड आदर खरंच कौतुकास्पद आहे. Border Road Organisation ची इतक्या प्रतिकूल हवामानात अविरत काम करणारी माणसं व स्त्रिया पाहून थक्क व्हायला होतं. जोजिला टनेल या ११५७५ ft उंचीवरील, साधारण १४ किलोमीटर लांबीच्या, U  आकारातील, काश्मीर मधील गंदरबाल ते कारगिल जवळील द्रास ला जोडणाऱ्या दुहेरी रस्त्याचे सुरू असलेले काम पाहून खरंच अभिमान वाटतो (थंडीत बर्फ वृष्टीमुळे सध्याचे रस्ते पाच/ सहा महिने बंद असतात) 

Three idiots चित्रपटात आपण लेह लडाखचं नितळ, पारदर्शी, देखणं, लोभस रूप पाहिलं ज्याने कितीतरी जणांना इथं येण्यासाठी प्रवृत्त केलं, हळूहळू पर्यटनाला चालना मिळाली. येथील निसर्गाची किमया पाहून अक्षरशः वेड लागतं, किती आणि काय काय नजरेत साठवावं असं होतं.. सोबत, इथली माणसं कळत नकळत आपल्याला प्रतिकूल परिस्थितीत कसं जगायचं याचा धडा देतात. 

लेह शहराच्या पश्चिमेला सूर्यास्ताच्या वेळी खुणावणारा; उंच डोंगरावरील शांती स्तूप, पूर्वेकडील माती आणि दगडापासून उभा असलेला ५०० वर्षांपूर्वीचा भव्य नऊ मजली राजवाडा, चहू बाजूला चमकणाऱ्या बर्फाच्छादित पर्वत रांगा, रंगबिरंगी वस्तुंनी, आकर्षक रंगामध्ये सजलेलं शहरातील मार्केट, hot spring, रँचो school ही येथील खास आकर्षणं. हिमालयाची बर्फाच्छादित पर्वतशिखरे, सर्वकडे सोबत करणारे नद्यांचे खळाळणारे प्रवाह, त्या भोवतालची हिरवाई, तलावांचे पारदर्शी निळे पाणी, खोल दर्‍या, रोमांचकारी अनुभव देणारे वळणावळणांचे रस्ते, वेगवेगळ्या रंगांमधले उंचच उंच पहाड, आणि सभोवतालचा बर्फ बघतांना आपण एका वेगळ्याच विश्वात हरवून जातो. एक विलक्षण शांतीचा अनुभव मिळतो इथे. बौध्द धर्माच्या पगड्यामुळे या प्रदेशाला अध्यात्मिक पार्श्वभूमी आहे. इथल्या monestry पाहणं हा अजून एक खास अनुभव. सिंधू आणि झंस्कार नदीचा संगम, पँगोंग लेक, नुब्रा vally, Changla pass, Khardungla pass, Zoji la pass या ठिकाणी कमालीच्या बोचऱ्या थंडीची झलक मिळते. 'पुणेकर थंडीने गारठले'अशी आठ /दहा डिग्रीत बातमी वाचणारे आपण इथल्या थंडीचे आकडे वाचून थक्क होतो. इथलं आजवरचं सर्वात कमी temp -६० होतं, १९९५ मध्ये !

आपल्या सीमेवरील तुरतुक तसेच हुंदरमान गावातील भेटीचा अनुभव एकदम वेगळा होता. १९७१ च्या युद्धानंतर पलीकडे गेलेल्या लोकांचं रिकामं गाव.. आजही त्यांची ओस घरं, तेथील सामान तसंच आहे. पन्नास वर्षे होऊन गेली तरी तिथल्या खुणा, आजही गोष्ट सांगतात एका रात्रीत बदललेल्या कित्येक आयुष्यांची !
 
निसर्गाची अनमोल देणगी असलेला हा प्रदेश भौगोलिक, राजकीय, ऐतिहासिक दृष्ट्या कितीतरी महत्वाचा आहे. इथली श्रीमंती अनुभवणं आणि डोळ्यांत साठवणं याकरता इथे एकदा तरी नक्की यायलाच पाहिजे. पण आल्यावर वाटतं, एका भेटीत मन भरलंच नाही !

©कविता सहस्रबुद्धे

No comments:

Post a Comment