Friday, July 28, 2023

 कारगिल विजय दिवस


अचानक एक दिन कलह हुआ पंचमहाभूतों का,
श्रेष्ठत्व के विवाद पर
साथ छोडा एक दूसरे का..
'इन पाँचो से भी शक्तिशाली 
है कोई इस दुनिया में?'
ब्रह्मदेवने चिंतित होकर पूछा हमें,
"हे भगवन्, इन पाँचो के सामने 
हमारा एकमात्र हि काफी है;
वह आगसे भी प्रखर है,
तुफ़ानोंसे भी तेज है,
पानीसे गतिमान, धरती से सहिष्णु 
और व्योम से भी उंचा है...
वह हमारी आन है , हमारी शान है
सऱहदपर खडा भारत माँ का जवान है !"
सर्वश्रेष्ठ होकर भी 
वह किसी विवाद में नहीं उलझता,
हमारे सुनहरे 'कल' के लिए 
वह हमारा 'आज' है गवाँता,
गर्व है तुम पर, नाज है तुम पर, 
तुम पर है अभिमान ,
लज्जित पंचमहाभूतों सहित 
हमारा कोटी कोटी प्रणाम !!
- अनुराधा प्रभुदेसाई

देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणारा, ५० डिग्री ते -६० (कारगिल जवळ द्रास येथे १९९५ मध्ये नोंद आहे) डिग्री तापमानात कोठेही उभा राहणारा आपला सैनिक..केवळ अशक्य वाटणाऱ्या गोष्टी "सिर्फ दिमाग में डाल देना है,  बाकी आसान है " इतक्या सोप्या करून लढणारा सैनिक... समुद्र सपाटीपासून ८ हजार फूट ते १८ हजार फुटांवर विरळ ऑक्सिजन मधे या देशासाठी पाय रोवून उभा असणारा सैनिक..
कोणत्याही गोष्टीसाठी 'रिटेक' ची अनुमती नसलेला सैनिक....

आकाशात उंच भरारी मारणाऱ्या त्या गरुडाला सुद्धा वाऱ्यापेक्षा आपल्या पंखांवर जास्त विश्वास असतो. डोक्याला जखम, हात प्लास्टर मध्ये, पोटावर नुकतीच झालेली शस्त्रक्रिया, डावा पाय मिसिंग असणारा कॅप्टन शौर्य जेव्हा "मी एकदम मस्त आहे, पण माझ्या बडीसाठी प्रार्थना करा", असं म्हणतो तेव्हा समजतं कि हा सैनिक आपल्याला कळलेलाच नाही. मिशन वर जायच्या आधी, "जर मी धारातीर्थी पडलो तर माझी मेडल्स माझ्या छातीवर लावून मग मला घरी पाठवा आणि मी सर्वोत्तम कामगिरी बजावली हे माझ्या आईला सांगा "असं लिहून ठेवणारा सैनिक मन अस्वस्थ करतो. 

"एकतर तिरंगा फडकावून येईन किंवा तिरंग्यात लपेटून" असं म्हणणारा कॅप्टन विक्रम बात्रा , "माझ्यावर सोपवलेली जबाबदारी पूर्ण होण्याआधी जर मृत्यूनं मला कवटाळल तर मी आधी मृत्यूचा खात्मा करेन", असं म्हणणारा कॅप्टन मनोज पांडे; तर, "आई, आत्ताच मी ट्रेनिंग वरून आलो. खूप अवघड आणि कष्टप्रद आहे सारं. इथे पेपर नाही, पुस्तक नाही, बरंच काही नाही.. प्रचंड बोचरी थंडी आहे सोबतीला. पण आई, तरीही अत्यंत अवघड परिस्थितीत सियाचीन सैनिक म्हणवून घेण्यात मला खूप अभिमान आहे", असं उणे ३० तापमानात लिहिणारा मेजर कुणाल... कारगिलच्या युद्धातील अजूनही बऱ्याच जणांना माहित नसलेला पहिला योद्धा, कॅप्टन सौरभ कालिया ..."जिंदगी ना मिलेगी दोबारा ", याचा खरा अर्थ बहुदा यांनाच समजला असावा.

आपल्या भारतीय संरक्षण दलातील या वीरांच्या गोष्टी  ऐकल्यावर काही ओळी आठवल्या, जावेद अख्तर यांनी लिहिलेल्या .. 
" दिलोंमें तुम अपनी बेताबिया लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम, 
नजर में ख़्वाबोंकि बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम "...

मिशन वर जायच्या आधी हा सैनिक पत्र लिहून आपल्या पेटीमध्ये ठेवतो. जर परत आलोच नाही तर तेच पत्र त्याच्या घरच्यांकरता शेवटच पत्र, निरोप असतो..  असं म्हणतात एका सैनिकाच पार्थिव ठेवलेलं कॉफिन खूप जड असतं, ते का याचा अर्थ कारगिलच्या वीरभूमीवर उभं असताना उलगडत होता.  

कर्नल धर्मदत्त गोयल ... एलओसी पासून १०० मीटर अंतर, दर २८ सेकंदांनी होत असलेला गोळीबार तरीही मिशन फत्ते करताना डोळयांदेखत बुटासकट उडालेला स्वतःचा डावा पाय , त्यानंतर बर्फाची बरसात, दगडधोंडे, दरी, शत्रूने पेरलेले भूसुरुंग यातून सोबतच्या दोन बडींनी खांद्यावर टाकून,पाठीवर घेऊन, हाताला धरून तब्बल १२ तास चालून कॅम्पवर आणलं. प्रतिकूल परिथितीमुळे तब्बल २३ तासांनी मिळालेल्या वैद्यकीय मदतीनंतर तो पाय कापावा लागला.. अशा वेळी बुद्धी 'एक पाय नाही तर काय' ? असा प्रश्न विचारत होती तर मन मात्र 'सो व्हॉट , दुसरा पाय आहे अजून', हे ठणकावून सांगत होतं." When people doubted my ability to walk , I decided to fly... हे त्यांचं वाक्य आणि त्यांचा आत्मविश्वास,पराकोटीचा सकारात्मक दृष्टिकोन खूप काही शिकवून जातो.

मेजर गौरव आणि त्याचे तीन जवान ... सियाचीन ग्लेशियर, १५००० फूट उंचीवर, बर्फात गाडल्या गेलेल्या चार जणांना शोधून त्या चार डेड बॉडीज हेलिकॉप्टरमधे ठेवायला हवामान व उंचीवरील जागेमुळे हातात असलेले फक्त चार सेकंद..... "आपले बडी त्यांच्या घरी पोहोचले पाहिजेत", या एकाच उद्देशाने जिथे स्वतःच वजन सांभाळणं अवघड आहे, श्वास घ्यायला त्रास होतोय, वजन उचलायला त्रास होतोय अशा ठिकाणी या चौघांनी मात्र हे मिशन फत्ते केलं. त्या पांढऱ्याशुभ्र बर्फावर उभं राहून त्या पायलटच्या धाडसाला दाद देत आपल्या बडींना शेवटचा सॅल्यूट ठोकला ...'व्हेन गोइंग गेट्स टफ, द टफ गेट्स गोइंग'...

सैनिकाची खरी ओळख करून देणाऱ्या या गोष्टी.. आपल्यासारखाच तो सुद्धा कोणाचा तरी मुलगा, भाऊ, नवरा, बाबा असतो पण सर्वात आधी तो एक सैनिक असतो. 

"I only regret that I have but one life to lay down for my country ", या भावनेने काम करणाऱ्या या सैनिकाच्या अत्युच्य बलिदानाला, उच्च मनोबलाला, दैदिप्यमान त्यागाला त्रिवार सलाम !

© कविता सहस्रबुद्धे

No comments:

Post a Comment