Friday, July 28, 2023

 फिर वही रात है..


किशोरदांचा आवाज, पंचमदांचं संगीत व गुलझारसाहेबांचे शब्द .. या त्रिकुटाने दिलेल्या अनेक चिरतरुण गाण्यांपैकी एक. हे गाणं ज्या situation वर चित्रपटांत येतं तेव्हाचे भाव, अगदी नेमकेपणानं आपल्यापर्यंत पोहोचतात या गाण्यातून. 'घर' या चित्रपटातील हे गीत पडद्यावर साकारलंय विनोद मेहेरा व रेखा यांनी. हे गाणं ऐकतांना पाणवणारे डोळे, पडद्यावर ते बघतांना कधी झरझर वाहू लागतात कळतंच नाही. 

एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे, आपल्याच विश्वात हरवलेले, रमलेले विकास आणि आरती. एक दिवस रात्री चित्रपट पाहून परत येत असतांना त्यांच्या आयुष्यात एक दुर्दैवी घटना घडते आणि त्या आघाताने आरती मुळापासून कोसळते. शरीरावर आणि मनावर झालेल्या जखमा तिचं जगणं अवघड करतात. आरतीची भूमिका प्रचंड ताकतीने साकारणारी रेखा आपल्याला ही अस्वस्थ करते. मनोमन उध्वस्त झालेलं, खचलेलं तिचं रूप विकास पाहू शकत नाही आणि मग सुरू होते त्याची केविलवाणी धडपड, तिला परत आपल्या जगात आणण्याची. जिच्यावर प्रेम केलं ती आरती त्याला परत हवी आहे. आपण तिला वाचवू शकलो नाही हि अपराधीपणाची भावना त्यालाही पोखरते आहे पण आरतीला सावरणं जास्त महत्वाचं आहे. विकासची हि भूमिका समर्थपणे साकारली आहे विनोद मेहरा यांनी. पडद्यावर त्यांनी साकारलेल्या सर्व गाण्यांमधलं हे सर्वोत्तम गाणं असावं. 

हजारो छटा घेऊन येतात गाण्यातील हे शब्द. आरतीला समजावत, थोपटून झोपवणारा, तिला पांघरूण घालणारा 'तो' अजूनच देखणा वाटतो. त्याच्या डोळ्यांत, त्याच्या स्पर्शात ती काळजी दिसते. अजूनही मी तुझ्या सोबतच आहे असं आश्वस्त करणारा भाव आणि शब्द .. गुलजार आणि ख्वाब हि कमाल chemistry दिसते या गाण्यात. इथे प्रसंगानुरूप स्वप्नांना त्यांनी 'काच के ख्वाब' म्हटलं आहे. गुलजा साहेबांचं हेच वैशिष्ठ्य आहे, कमी शब्दांत प्रचंड काही तरी सांगून जातात. किशोरदांचा आवाज कमालीचा उत्कट होतो.. एका विलक्षण प्रेमाची हळुवार गोष्ट आहे या गाण्यात... "फिर वही रात है, फिर वही रात है ख्वाब कि .. रात भर ख्वाब में देखा करेंगे तुम्हे , फिर वही, रात है "... 

 The Land of high passes – लडाख


कारगिल युद्धाच्या वेळी पहिल्यांदा कारगिल, द्रास या भागाविषयी ऐकलं होतं. तेव्हा भौगोलिक दृष्ट्या हा भाग कसा महत्वाचा आहे ते समजलं. मग कितीतरी वेळा अनेकांच्या शब्दांतून, गोष्टींमधून, डोळ्यातून कारगिल चं रूप नजरेसमोर उभं राहात गेलं. प्रत्येक वर्षी जुलै महिन्यात 'कारगिल विजय दिवस' साजरा करतांना तिथे प्रत्यक्ष जाण्याची इच्छा दृढ होत गेली. अत्युच्य बलिदानाचा, उच्च मनोबलाचा आणि दैदिप्यमान त्यागाचा इतिहास ज्या भूमीवर लिहिला गेला त्या वीर भूमीवर, नतमस्तक होताना जाणवलं, "जिंदगी ना मिलेगी दोबारा" चा खरा अर्थ फक्त या वीरांनाच समजला होता म्हणून तर "I only regret that I have but one life to lay down for my country" असं ते म्हणू शकले. 

'Travel changes you. As you move through this life and this world, you change things slightly, you leave marks behind, however small. And in return life and travel leaves marks on you'.. its so true .. 
इथे फिरताना आम्हाला भेटलेले ड्रायव्हर, हॉटेल मध्ये काम करणारी मंडळी, लोकल मार्केट मधले दुकानदार यांच्याशी बोलतांना समजलं या सामान्य लोकांच्या रोजच्या आयुष्यातील अडचणी खूप वेगळ्या आहेत तरी सुद्धा त्यांचं जगण्यातलं समाधान, आनंद, कष्टाची तयारी, माणुसकी आणि कामाबद्दल असणारा प्रचंड आदर खरंच कौतुकास्पद आहे. Border Road Organisation ची इतक्या प्रतिकूल हवामानात अविरत काम करणारी माणसं व स्त्रिया पाहून थक्क व्हायला होतं. जोजिला टनेल या ११५७५ ft उंचीवरील, साधारण १४ किलोमीटर लांबीच्या, U  आकारातील, काश्मीर मधील गंदरबाल ते कारगिल जवळील द्रास ला जोडणाऱ्या दुहेरी रस्त्याचे सुरू असलेले काम पाहून खरंच अभिमान वाटतो (थंडीत बर्फ वृष्टीमुळे सध्याचे रस्ते पाच/ सहा महिने बंद असतात) 

Three idiots चित्रपटात आपण लेह लडाखचं नितळ, पारदर्शी, देखणं, लोभस रूप पाहिलं ज्याने कितीतरी जणांना इथं येण्यासाठी प्रवृत्त केलं, हळूहळू पर्यटनाला चालना मिळाली. येथील निसर्गाची किमया पाहून अक्षरशः वेड लागतं, किती आणि काय काय नजरेत साठवावं असं होतं.. सोबत, इथली माणसं कळत नकळत आपल्याला प्रतिकूल परिस्थितीत कसं जगायचं याचा धडा देतात. 

लेह शहराच्या पश्चिमेला सूर्यास्ताच्या वेळी खुणावणारा; उंच डोंगरावरील शांती स्तूप, पूर्वेकडील माती आणि दगडापासून उभा असलेला ५०० वर्षांपूर्वीचा भव्य नऊ मजली राजवाडा, चहू बाजूला चमकणाऱ्या बर्फाच्छादित पर्वत रांगा, रंगबिरंगी वस्तुंनी, आकर्षक रंगामध्ये सजलेलं शहरातील मार्केट, hot spring, रँचो school ही येथील खास आकर्षणं. हिमालयाची बर्फाच्छादित पर्वतशिखरे, सर्वकडे सोबत करणारे नद्यांचे खळाळणारे प्रवाह, त्या भोवतालची हिरवाई, तलावांचे पारदर्शी निळे पाणी, खोल दर्‍या, रोमांचकारी अनुभव देणारे वळणावळणांचे रस्ते, वेगवेगळ्या रंगांमधले उंचच उंच पहाड, आणि सभोवतालचा बर्फ बघतांना आपण एका वेगळ्याच विश्वात हरवून जातो. एक विलक्षण शांतीचा अनुभव मिळतो इथे. बौध्द धर्माच्या पगड्यामुळे या प्रदेशाला अध्यात्मिक पार्श्वभूमी आहे. इथल्या monestry पाहणं हा अजून एक खास अनुभव. सिंधू आणि झंस्कार नदीचा संगम, पँगोंग लेक, नुब्रा vally, Changla pass, Khardungla pass, Zoji la pass या ठिकाणी कमालीच्या बोचऱ्या थंडीची झलक मिळते. 'पुणेकर थंडीने गारठले'अशी आठ /दहा डिग्रीत बातमी वाचणारे आपण इथल्या थंडीचे आकडे वाचून थक्क होतो. इथलं आजवरचं सर्वात कमी temp -६० होतं, १९९५ मध्ये !

आपल्या सीमेवरील तुरतुक तसेच हुंदरमान गावातील भेटीचा अनुभव एकदम वेगळा होता. १९७१ च्या युद्धानंतर पलीकडे गेलेल्या लोकांचं रिकामं गाव.. आजही त्यांची ओस घरं, तेथील सामान तसंच आहे. पन्नास वर्षे होऊन गेली तरी तिथल्या खुणा, आजही गोष्ट सांगतात एका रात्रीत बदललेल्या कित्येक आयुष्यांची !
 
निसर्गाची अनमोल देणगी असलेला हा प्रदेश भौगोलिक, राजकीय, ऐतिहासिक दृष्ट्या कितीतरी महत्वाचा आहे. इथली श्रीमंती अनुभवणं आणि डोळ्यांत साठवणं याकरता इथे एकदा तरी नक्की यायलाच पाहिजे. पण आल्यावर वाटतं, एका भेटीत मन भरलंच नाही !

©कविता सहस्रबुद्धे

 शुक्रवारी किंवा शनिवारी डिनर डेट वर गेलं कीच रोमँटिक couple's दिसतात असं नाही तर रविवारी भाजी मंडईत सुद्धा गोड जोड्यांची व्हरायटी बघायला मिळते. अर्थात इथला गोडवा वेगळा असतो. रविवारी आम्ही दोघं भाजी आणायला गेलो होतो, नेहमीपेक्षा थोडं लवकर. फारशी गर्दी नव्हती. बरं जोडीनं गेलो म्हणजे भाजीच्या पिशव्या पकडायला किंवा 'बरेच दिवसांत ही भाजी नाही बनवलीस ही घे' असं म्हणायला किंवा 'तू भाजी घेई पर्यंत मी फळं घेतो' असं म्हणायला हा सोबत नसतोच. माझी आठवडाभर लागणारी भाजी, फळं, अंडी, तर कधीतरी पॅटिस घेऊन होईपर्यंत तो आपला 'फोटोग्राफी' मध्ये रमलेला असतो. बरं, इथे subject ची तशीही काही कमी नसते, मस्त variety असते .. टोपलीभर छान रचून ठेवलेले लाल बुंद टोमॅटो, काकडी, फ्लॉवर, कोबी, पावटा, गवार, श्रावण घेवडा, पालक, मेथी, पुदिना, माठ, नवलकोल, चवळई अशा वेगवेगळ्या भाज्यांनी ओसंडून वाहणारे भाजीचे ठेले चहुबाजूनी खुणावत असतात. हिरवी लाल पिवळी ढोबळी मिरची, लेट्युस, ब्रोकोली, कॉर्न च्या सोबतीला सध्यातर कर्टुली सारख्या रानभाज्या पण आहेत. मग काय, कॅमेऱ्यातील मोड बदलून, लॉन्ग शॉर्ट, close up असे बहुढंगी बहुरंगी फोटो काढण्यात आमचे 'अहो' हरवून जातात. बरं एकाच ठेल्या वरच्या वेगवेगळ्या भाज्यांचा फोटो काढला तर बाकीच्यांवर अन्याय नाही का होणार मग काय इकडचे टोमॅटो, बाजूची वेगवेगळ्या कडधान्यांची मोडावलेली रूपं, तिकडच्या भुईमुगाच्या शेंगा, समोरच्या जर्द जांभळाच्या टोपल्या, काश्मीर वरून आलेली लाल चुटुक सफरचंद पटापट कॅमेऱ्यात कैद होत असतात. जिथे फोटो घेताना थोडं जास्त घुटमळायला होतं तिथे ते दुकान सांभाळणाऱ्या चार टाळक्यातला एक जण काम सोडून फोटो बघायला येतो आणि 'माझी भाजी किती छान दिसते आहे ना फोटोत', या आविर्भावात कमालीचा सुखावतो. बरं इतकंच नाही तर 'सर, मी काढतो ना फोटो तो असा नाही येत', असं कोणी म्हटलं कि त्याला solution पण मिळतं. त्यामुळे मी तिथे 'एक सामान्य ग्राहक' असते आणि त्याचा तर भावच वेगळा असतो. आज काल तर सोमवार ते शुक्रवार भाजीचे फोटो WA वर येतात .. आमचा भाजीवाला पाठवतो, का तर म्हणे रोज काय काय available आहे ते समजायला आणि यातलं काही हवं आहे का ते विचारायला. बरं रविवारी इतकी भाजी घेतलीये मग कशाला लागतंय काही अधे मध्ये पण नाही. असं वाटतं त्याला WA वर सांगावं, 'अरे साहेबांचा नंबर देते, त्यांना पाठव फोटो, ते सांगतील काय हवं ते'..


तर मी काय सांगत होते हां, मंडईत रविवारी सकाळी दिसणाऱ्या गोड जोड्यांबद्दल.. तर झालं काय, रविवारी मी ठरलेल्या दुकानांत गेले भाजी घ्यायला तर तिथे एक आजी आजोबा भाजी घेत होते.आजी एकदम टिपिकल, कॉटनची छान काठा पदराची साडी, मानेवर छोटासा आंबाडा, त्यावर चाफ्याची दोन फुलं, एका हातात काठी .. तर आजोबा पांढरा स्वच्छ कुर्ता पायजमा, सोनेरी काड्यांचा चष्मा अशा पेहेरावात होते. त्यांच्या एका हातात भाजी घ्यायला पसरट बास्केट होती आणि त्यात ते निवडून निवडून काकडी टाकत होते. मी एक क्षण बघितलं, मनांत म्हटलं 'वाह यार, किती गोड, या वयात सुद्धा किती उत्साहाने भाजी घेतायेत दोघं'….. मग दुसऱ्या क्षणी दिसलं आजोबा एक एक काकडी निवडून ती बास्केट मध्ये ठेवत होते आणि आजी, आजोबांनी निवडलेली ती काकडी कशी बरोबर नाही हे सांगत ती काकडी परत टोपलीत टाकत होत्या. तीच गत पुढे टोमॅटोची .. 'अहो, हा पहा, हा कसा आहे टोमॅटो तसे घ्यायचे. हा नको'... ओह गॉड, म्हणजे पंचवीस वर्षात जे आमच्याकडे जमलं नाहीये ते इथे पन्नास वर्षांनंतर सुद्धा जमलं नव्हतं तर.. एकूण काय हे नातं कितीही गोड असलं, मुरलेलं असलं तरी काही front वरती मात्र हा गोडवा सारखाच असतो हे मात्र खरं !

© कविता सहस्रबुद्धे

 कारगिल विजय दिवस


अचानक एक दिन कलह हुआ पंचमहाभूतों का,
श्रेष्ठत्व के विवाद पर
साथ छोडा एक दूसरे का..
'इन पाँचो से भी शक्तिशाली 
है कोई इस दुनिया में?'
ब्रह्मदेवने चिंतित होकर पूछा हमें,
"हे भगवन्, इन पाँचो के सामने 
हमारा एकमात्र हि काफी है;
वह आगसे भी प्रखर है,
तुफ़ानोंसे भी तेज है,
पानीसे गतिमान, धरती से सहिष्णु 
और व्योम से भी उंचा है...
वह हमारी आन है , हमारी शान है
सऱहदपर खडा भारत माँ का जवान है !"
सर्वश्रेष्ठ होकर भी 
वह किसी विवाद में नहीं उलझता,
हमारे सुनहरे 'कल' के लिए 
वह हमारा 'आज' है गवाँता,
गर्व है तुम पर, नाज है तुम पर, 
तुम पर है अभिमान ,
लज्जित पंचमहाभूतों सहित 
हमारा कोटी कोटी प्रणाम !!
- अनुराधा प्रभुदेसाई

देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणारा, ५० डिग्री ते -६० (कारगिल जवळ द्रास येथे १९९५ मध्ये नोंद आहे) डिग्री तापमानात कोठेही उभा राहणारा आपला सैनिक..केवळ अशक्य वाटणाऱ्या गोष्टी "सिर्फ दिमाग में डाल देना है,  बाकी आसान है " इतक्या सोप्या करून लढणारा सैनिक... समुद्र सपाटीपासून ८ हजार फूट ते १८ हजार फुटांवर विरळ ऑक्सिजन मधे या देशासाठी पाय रोवून उभा असणारा सैनिक..
कोणत्याही गोष्टीसाठी 'रिटेक' ची अनुमती नसलेला सैनिक....

आकाशात उंच भरारी मारणाऱ्या त्या गरुडाला सुद्धा वाऱ्यापेक्षा आपल्या पंखांवर जास्त विश्वास असतो. डोक्याला जखम, हात प्लास्टर मध्ये, पोटावर नुकतीच झालेली शस्त्रक्रिया, डावा पाय मिसिंग असणारा कॅप्टन शौर्य जेव्हा "मी एकदम मस्त आहे, पण माझ्या बडीसाठी प्रार्थना करा", असं म्हणतो तेव्हा समजतं कि हा सैनिक आपल्याला कळलेलाच नाही. मिशन वर जायच्या आधी, "जर मी धारातीर्थी पडलो तर माझी मेडल्स माझ्या छातीवर लावून मग मला घरी पाठवा आणि मी सर्वोत्तम कामगिरी बजावली हे माझ्या आईला सांगा "असं लिहून ठेवणारा सैनिक मन अस्वस्थ करतो. 

"एकतर तिरंगा फडकावून येईन किंवा तिरंग्यात लपेटून" असं म्हणणारा कॅप्टन विक्रम बात्रा , "माझ्यावर सोपवलेली जबाबदारी पूर्ण होण्याआधी जर मृत्यूनं मला कवटाळल तर मी आधी मृत्यूचा खात्मा करेन", असं म्हणणारा कॅप्टन मनोज पांडे; तर, "आई, आत्ताच मी ट्रेनिंग वरून आलो. खूप अवघड आणि कष्टप्रद आहे सारं. इथे पेपर नाही, पुस्तक नाही, बरंच काही नाही.. प्रचंड बोचरी थंडी आहे सोबतीला. पण आई, तरीही अत्यंत अवघड परिस्थितीत सियाचीन सैनिक म्हणवून घेण्यात मला खूप अभिमान आहे", असं उणे ३० तापमानात लिहिणारा मेजर कुणाल... कारगिलच्या युद्धातील अजूनही बऱ्याच जणांना माहित नसलेला पहिला योद्धा, कॅप्टन सौरभ कालिया ..."जिंदगी ना मिलेगी दोबारा ", याचा खरा अर्थ बहुदा यांनाच समजला असावा.

आपल्या भारतीय संरक्षण दलातील या वीरांच्या गोष्टी  ऐकल्यावर काही ओळी आठवल्या, जावेद अख्तर यांनी लिहिलेल्या .. 
" दिलोंमें तुम अपनी बेताबिया लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम, 
नजर में ख़्वाबोंकि बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम "...

मिशन वर जायच्या आधी हा सैनिक पत्र लिहून आपल्या पेटीमध्ये ठेवतो. जर परत आलोच नाही तर तेच पत्र त्याच्या घरच्यांकरता शेवटच पत्र, निरोप असतो..  असं म्हणतात एका सैनिकाच पार्थिव ठेवलेलं कॉफिन खूप जड असतं, ते का याचा अर्थ कारगिलच्या वीरभूमीवर उभं असताना उलगडत होता.  

कर्नल धर्मदत्त गोयल ... एलओसी पासून १०० मीटर अंतर, दर २८ सेकंदांनी होत असलेला गोळीबार तरीही मिशन फत्ते करताना डोळयांदेखत बुटासकट उडालेला स्वतःचा डावा पाय , त्यानंतर बर्फाची बरसात, दगडधोंडे, दरी, शत्रूने पेरलेले भूसुरुंग यातून सोबतच्या दोन बडींनी खांद्यावर टाकून,पाठीवर घेऊन, हाताला धरून तब्बल १२ तास चालून कॅम्पवर आणलं. प्रतिकूल परिथितीमुळे तब्बल २३ तासांनी मिळालेल्या वैद्यकीय मदतीनंतर तो पाय कापावा लागला.. अशा वेळी बुद्धी 'एक पाय नाही तर काय' ? असा प्रश्न विचारत होती तर मन मात्र 'सो व्हॉट , दुसरा पाय आहे अजून', हे ठणकावून सांगत होतं." When people doubted my ability to walk , I decided to fly... हे त्यांचं वाक्य आणि त्यांचा आत्मविश्वास,पराकोटीचा सकारात्मक दृष्टिकोन खूप काही शिकवून जातो.

मेजर गौरव आणि त्याचे तीन जवान ... सियाचीन ग्लेशियर, १५००० फूट उंचीवर, बर्फात गाडल्या गेलेल्या चार जणांना शोधून त्या चार डेड बॉडीज हेलिकॉप्टरमधे ठेवायला हवामान व उंचीवरील जागेमुळे हातात असलेले फक्त चार सेकंद..... "आपले बडी त्यांच्या घरी पोहोचले पाहिजेत", या एकाच उद्देशाने जिथे स्वतःच वजन सांभाळणं अवघड आहे, श्वास घ्यायला त्रास होतोय, वजन उचलायला त्रास होतोय अशा ठिकाणी या चौघांनी मात्र हे मिशन फत्ते केलं. त्या पांढऱ्याशुभ्र बर्फावर उभं राहून त्या पायलटच्या धाडसाला दाद देत आपल्या बडींना शेवटचा सॅल्यूट ठोकला ...'व्हेन गोइंग गेट्स टफ, द टफ गेट्स गोइंग'...

सैनिकाची खरी ओळख करून देणाऱ्या या गोष्टी.. आपल्यासारखाच तो सुद्धा कोणाचा तरी मुलगा, भाऊ, नवरा, बाबा असतो पण सर्वात आधी तो एक सैनिक असतो. 

"I only regret that I have but one life to lay down for my country ", या भावनेने काम करणाऱ्या या सैनिकाच्या अत्युच्य बलिदानाला, उच्च मनोबलाला, दैदिप्यमान त्यागाला त्रिवार सलाम !

© कविता सहस्रबुद्धे