Thursday, July 26, 2018

सलाम मृत्युन्जयांना ... कॅप्टन सौरभ कालिया , कॅप्टन विक्रम बात्रा , कॅप्टन मनोजकुमार पांडे , ग्रेनेडीयर योगेंद्रसिंग यादव , रायफलमन संजयकुमार , मेजर आचार्य, कॅप्टन अनुजकुमार नय्यर, कॅप्टन निकेझाकुओ केंगुरुसे , मेजर सोनम वांगचुक , कॅप्टन विजयंत थापर , कॅप्टन सचिन  निंबाळकर,मेजर गौतम खोत, कॅप्टन राजेश अढाऊ आणि कारगिल युद्धातील सर्व वीर योद्धे !!!!

१९९९... कारगिल युद्ध ..... ऑपरेशन विजय ... कारगिल विजय दिवस ...

या शब्दांच्या पलीकडे जावून काही माहिती करून घेण्याचा प्रयत्न आपण कधी केलाय ?

काही वर्षांपूर्वी अनुराधा प्रभुदेसाई यांना ' सैनिक ' या विषयावर बोलताना ऐकलं, पाहिलं तेंव्हा हा सैनिक, खरंच आपल्याला कळलाय का ? हा प्रश्न सतावू लागला. खूप अस्वस्थ व्हायला झालं .

पुस्तकाच्या नावांतच माझ्या प्रश्नाच्या उत्तराची झलक मिळाली म्हणून 'सैनिक.. तुमच्या उद्यासाठी आपला आज देणारा ' आणि 'सलाम मृतुन्जयांना ' हि अनुमावशीने लिहिलेली पुस्तकं वाचली..... ती वाचून काय वाटलं ते शब्दांत व्यक्त करण्याच्या खूप पलीकडचं होतं... 

कारगिल युद्धांत  पॉईंट  ४८७५ ताब्यात घेऊन शेवटचा श्वास घेणारे कॅप्टन विक्रम बात्रा यांना मरणोत्तर 'परमवीरचक्र' हा शौर्याचा सर्वोच्च सन्मान वयाच्या २५व्या वर्षी देण्यात आला तसेच पॉईंट ४८७५ चे नाव 'कॅप्टन बात्रा टॉप' अस करण्यात आल. कॅप्टन मनोज पांडे यांचा वयाच्या २४ व्या वर्षी मरणोत्तर परमवीरचक्र, कॅप्टन विजयंत थापर यांना वयाच्या २३ व्या वर्षी मरणोत्तर वीरचक्र, कॅप्टन निकेझाकुओ केंगुरसे यांना वयाच्या २५ व्या वर्षी मरणोत्तर महावीर चक्र तर कॅप्टन अनुजकुमार नायर यांना वयाच्या २५ व्या वर्षी मरणोत्तर  महावीरचक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं ... वयाच्या २३ / २४ व्या वर्षी देशासाठी आपलं सर्वस्व अर्पण करणाऱ्या या वीरांच्या ऋणांत आपण कायम राहू !!!

मेजर गौतम खोत यांना ऑपरेशन विजय मध्ये दाखवलेल्या शौर्याबद्दल वीरचक्र मिळालं. निसर्ग आणि शत्रूच्या विरोधात लढणाऱ्या या योध्याने, शत्रूच्या तोफगोळ्यांचा सामना करत , प्रचंड आत्मविश्वास आणि अलौकिक इच्छाशक्ती च्या बळावर संपूर्ण युद्ध काळात १७ हजार फुटांवरील पहाडांवर तब्बल ७०तास उड्डाण केले .शत्रास्त्र दारुगोळा अशी सामग्री जवानांपर्यंत पोहोचवायची आणि परत येतांना जखमी जवानांना घेऊन यायचं .. जणू हेलिकॉप्टर हेच त्यांच शस्त्र होतं !!

वर्धा जिल्यातील तळेगाव येथे राहणारा मुलगा गावातील पहिला डॉक्टर होणार म्हणून गावकऱयांनी त्याची पहिल्या फीची रक्कम  भरली . हे स्मरणात ठेवून गावकऱ्यांची सेवा करण्याचं स्वप्न पाहणारा तो देशाच्या सेवेत रुजू झाला. वयाच्या २६ व्या वर्षी कारगिल युद्धभूमीवर एकशेआठ सैनिकांना वाचवून अनेकांच्या आशीर्वादाचा मानकरी ठरला. या शौर्याबद्दल सेनामेडल देऊन त्यांना गौरविण्यात आलं ते कॅप्टन डॉक्टर राजेश अढाऊ....

वीरचक्र विजेते कॅप्टन सचिन निंबाळकर .. स्वतः पहाडीवरच्या उतारावर लटकत असतांना त्याच टायगर हिल टॉप वर बोफोर्स गन्सचा मारा करण्याचा धडाडीचा निर्णय घेऊन अतुलनीय साहस दाखवणारे व आत्यंतिक महत्वाचे हे शिखर सर करून त्यावर ग्रेनेडीयर्सच्या यशाची मोहोर उमटवणारे ..

कॅप्टन विजयंत थापर ... कुपवाडा येथे पोस्टिंग असतांना रुकसाना या पाच वर्षाच्या मुलीशी यांची भेट झाली. तिच्या डोळ्यांदेखत तिच्या वडिलांची हत्या एका दहशतवादी हल्ल्यात झाली होती त्यामुळे हि मुलगी तिथे एका अनाथाश्रमात राहात होती. हा ऑफिसर आपल्या पगारातुन दरमहा ठराविक रक्कम तिच्या शिक्षणाकरता देत होता. कारगिल युद्धांत शेवटच्या ऑपरेशन वर जातांना सुद्धा याची जाणीव ठेवून त्यांनी आपल्या आई वडिलांना लिहिलेल्या शेवटच्या पत्रात तिची जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली. त्यांच्या लष्करी वर्दीतील या ओलावा खूप काही सांगून गेला, शिकवून गेला....

"I only regret that I have but one life to lay down for my country "... या ओळी वाचताना कायमच  निःशब्द व्हायला होतं. 'कारगिल' या शब्दांत बांधल्या गेलेल्या अशा अनेक शौर्य कथा आहेत. प्रत्येकाची गोष्ट वेगळी पण ध्येय मात्र एक .. आपल्या तिरंग्यासाठी लढण्याचं !!!

एकीकडे सामान्य नागरिक म्हणून जगतांना आपल्या आजूबाजूला सुरु असणाऱ्या अनेक गोष्टी पाहून चीड येते ,मन व्याकुळ होतं, हतबल होतं. तर दुसरीकडे आपली जात, धर्म, पंथ विसरून देशाच्या सीमेवर फक्त भारतीय म्हणून उभ्या असलेल्या या प्रत्येक वीराकडे पाहून उर अभिमानानं भरून येतं, प्रेरणा मिळते, त्यांच्या बलिदानाची जाणीव होते ...

२६ जुलै ... आजच्या दिवशी या वीर योध्यांची आठवण येणार नाही असं कसं होईल. त्यांच्या अत्युच्य बलिदानाचा, उच्च मनोबलाचा आणि दैदिप्यमान त्यागाचा इतिहास आपण नक्कीच विसरता कामा नये .. या खऱ्या हिरोंची गोष्ट आपण पुढच्या पिढीपर्यंत नक्कीच न्यायला हवी ...


प्रत्येक भारतीय सैनिकाला आणि त्याच्या मागे उभ्या असलेल्या याच्या कुटुंबाला त्रिवार सलाम !!!


 

No comments:

Post a Comment