Thursday, July 26, 2018

सलाम मृत्युन्जयांना ... कॅप्टन सौरभ कालिया , कॅप्टन विक्रम बात्रा , कॅप्टन मनोजकुमार पांडे , ग्रेनेडीयर योगेंद्रसिंग यादव , रायफलमन संजयकुमार , मेजर आचार्य, कॅप्टन अनुजकुमार नय्यर, कॅप्टन निकेझाकुओ केंगुरुसे , मेजर सोनम वांगचुक , कॅप्टन विजयंत थापर , कॅप्टन सचिन  निंबाळकर,मेजर गौतम खोत, कॅप्टन राजेश अढाऊ आणि कारगिल युद्धातील सर्व वीर योद्धे !!!!

१९९९... कारगिल युद्ध ..... ऑपरेशन विजय ... कारगिल विजय दिवस ...

या शब्दांच्या पलीकडे जावून काही माहिती करून घेण्याचा प्रयत्न आपण कधी केलाय ?

काही वर्षांपूर्वी अनुराधा प्रभुदेसाई यांना ' सैनिक ' या विषयावर बोलताना ऐकलं, पाहिलं तेंव्हा हा सैनिक, खरंच आपल्याला कळलाय का ? हा प्रश्न सतावू लागला. खूप अस्वस्थ व्हायला झालं .

पुस्तकाच्या नावांतच माझ्या प्रश्नाच्या उत्तराची झलक मिळाली म्हणून 'सैनिक.. तुमच्या उद्यासाठी आपला आज देणारा ' आणि 'सलाम मृतुन्जयांना ' हि अनुमावशीने लिहिलेली पुस्तकं वाचली..... ती वाचून काय वाटलं ते शब्दांत व्यक्त करण्याच्या खूप पलीकडचं होतं... 

कारगिल युद्धांत  पॉईंट  ४८७५ ताब्यात घेऊन शेवटचा श्वास घेणारे कॅप्टन विक्रम बात्रा यांना मरणोत्तर 'परमवीरचक्र' हा शौर्याचा सर्वोच्च सन्मान वयाच्या २५व्या वर्षी देण्यात आला तसेच पॉईंट ४८७५ चे नाव 'कॅप्टन बात्रा टॉप' अस करण्यात आल. कॅप्टन मनोज पांडे यांचा वयाच्या २४ व्या वर्षी मरणोत्तर परमवीरचक्र, कॅप्टन विजयंत थापर यांना वयाच्या २३ व्या वर्षी मरणोत्तर वीरचक्र, कॅप्टन निकेझाकुओ केंगुरसे यांना वयाच्या २५ व्या वर्षी मरणोत्तर महावीर चक्र तर कॅप्टन अनुजकुमार नायर यांना वयाच्या २५ व्या वर्षी मरणोत्तर  महावीरचक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं ... वयाच्या २३ / २४ व्या वर्षी देशासाठी आपलं सर्वस्व अर्पण करणाऱ्या या वीरांच्या ऋणांत आपण कायम राहू !!!

मेजर गौतम खोत यांना ऑपरेशन विजय मध्ये दाखवलेल्या शौर्याबद्दल वीरचक्र मिळालं. निसर्ग आणि शत्रूच्या विरोधात लढणाऱ्या या योध्याने, शत्रूच्या तोफगोळ्यांचा सामना करत , प्रचंड आत्मविश्वास आणि अलौकिक इच्छाशक्ती च्या बळावर संपूर्ण युद्ध काळात १७ हजार फुटांवरील पहाडांवर तब्बल ७०तास उड्डाण केले .शत्रास्त्र दारुगोळा अशी सामग्री जवानांपर्यंत पोहोचवायची आणि परत येतांना जखमी जवानांना घेऊन यायचं .. जणू हेलिकॉप्टर हेच त्यांच शस्त्र होतं !!

वर्धा जिल्यातील तळेगाव येथे राहणारा मुलगा गावातील पहिला डॉक्टर होणार म्हणून गावकऱयांनी त्याची पहिल्या फीची रक्कम  भरली . हे स्मरणात ठेवून गावकऱ्यांची सेवा करण्याचं स्वप्न पाहणारा तो देशाच्या सेवेत रुजू झाला. वयाच्या २६ व्या वर्षी कारगिल युद्धभूमीवर एकशेआठ सैनिकांना वाचवून अनेकांच्या आशीर्वादाचा मानकरी ठरला. या शौर्याबद्दल सेनामेडल देऊन त्यांना गौरविण्यात आलं ते कॅप्टन डॉक्टर राजेश अढाऊ....

वीरचक्र विजेते कॅप्टन सचिन निंबाळकर .. स्वतः पहाडीवरच्या उतारावर लटकत असतांना त्याच टायगर हिल टॉप वर बोफोर्स गन्सचा मारा करण्याचा धडाडीचा निर्णय घेऊन अतुलनीय साहस दाखवणारे व आत्यंतिक महत्वाचे हे शिखर सर करून त्यावर ग्रेनेडीयर्सच्या यशाची मोहोर उमटवणारे ..

कॅप्टन विजयंत थापर ... कुपवाडा येथे पोस्टिंग असतांना रुकसाना या पाच वर्षाच्या मुलीशी यांची भेट झाली. तिच्या डोळ्यांदेखत तिच्या वडिलांची हत्या एका दहशतवादी हल्ल्यात झाली होती त्यामुळे हि मुलगी तिथे एका अनाथाश्रमात राहात होती. हा ऑफिसर आपल्या पगारातुन दरमहा ठराविक रक्कम तिच्या शिक्षणाकरता देत होता. कारगिल युद्धांत शेवटच्या ऑपरेशन वर जातांना सुद्धा याची जाणीव ठेवून त्यांनी आपल्या आई वडिलांना लिहिलेल्या शेवटच्या पत्रात तिची जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली. त्यांच्या लष्करी वर्दीतील या ओलावा खूप काही सांगून गेला, शिकवून गेला....

"I only regret that I have but one life to lay down for my country "... या ओळी वाचताना कायमच  निःशब्द व्हायला होतं. 'कारगिल' या शब्दांत बांधल्या गेलेल्या अशा अनेक शौर्य कथा आहेत. प्रत्येकाची गोष्ट वेगळी पण ध्येय मात्र एक .. आपल्या तिरंग्यासाठी लढण्याचं !!!

एकीकडे सामान्य नागरिक म्हणून जगतांना आपल्या आजूबाजूला सुरु असणाऱ्या अनेक गोष्टी पाहून चीड येते ,मन व्याकुळ होतं, हतबल होतं. तर दुसरीकडे आपली जात, धर्म, पंथ विसरून देशाच्या सीमेवर फक्त भारतीय म्हणून उभ्या असलेल्या या प्रत्येक वीराकडे पाहून उर अभिमानानं भरून येतं, प्रेरणा मिळते, त्यांच्या बलिदानाची जाणीव होते ...

२६ जुलै ... आजच्या दिवशी या वीर योध्यांची आठवण येणार नाही असं कसं होईल. त्यांच्या अत्युच्य बलिदानाचा, उच्च मनोबलाचा आणि दैदिप्यमान त्यागाचा इतिहास आपण नक्कीच विसरता कामा नये .. या खऱ्या हिरोंची गोष्ट आपण पुढच्या पिढीपर्यंत नक्कीच न्यायला हवी ...


प्रत्येक भारतीय सैनिकाला आणि त्याच्या मागे उभ्या असलेल्या याच्या कुटुंबाला त्रिवार सलाम !!!


 

Friday, July 20, 2018


" और हम खडे खडे बहार देखते रहें, कारवाँ गुजर गया गुबार देखते रहें .... "

कवी नीरज यांच्या याच ओळी आठवल्या, ते गेल्याची बातमी वाचतांना.

'वयाच्या १४ व्या वर्षी कविसंमेलनात आपली पहिली कविता सादर करून टाळ्यांच्या कडकडाटात मिळालेलं पाच रुपयांचं बक्षीस आणि त्यातील आनंद नंतर मिळालेल्या दोन्ही पद्म पुरस्कारांत नव्हता', असं एकदा तेच  म्हणाले होते.

लहानपणी बिडी सिगारेट विकल्या , रिक्षा ओढली , औषधाच्या जाहिरातीचं काम मिळालं म्हणून भिंतीही रंगवल्या, यमुना नदीत उडी घेऊन नाणी वेचली.. अशा आयुष्याने भरभरून अनुभव दिले आणि परीक्षेत एका मार्काने नापास झाल्यावर जिद्द हि दिली... पुढे टायपिस्ट , इन्फॉरमेशन ऑफिसर ते हिंदी चे प्राध्यापक हा प्रवास होत गेला आणि सोबत एक कवी बहरत गेला...

आर. चंद्रानी एका काव्य संमेलनात त्यांच्या कविता ऐकल्या आणि आपल्या 'नई उमर कि नई फसल' या पुढच्या चित्रपटांत त्यांच्या एक , दोन नाही तर तब्बल आठ कविता घेतल्या. "कारवाँ गुजर गया गुबार देखते रहें" .... हि त्यातीलच एक कविता.

पुढे प्रेम पुजारी चित्रपट बनवतांना देव आनंद यांनी नीरज यांची ओळख एस. डी. बर्मन यांच्याशी करून दिली. तेव्हा बर्मनदांनी त्यांना 'रंगीला' शब्दापासून सुरु होणारं गाणं हव आहे  असं सांगितलं. तेव्हा नीरज यांनी लिहिलेलं " रंगीला रे... तेरे रंग में यूं रंगा हें मेरा मन "या गाण्याने बर्मनदा थक्क झाले आणि म्हणाले,' I had given a difficult tune to fail you but you faile me with this gem of a number'.... या जोडीने नंतर शर्मिली, गॅम्बलर, तेरे मेरे सपने अशा एक से बढकर एक सिनेमांमधून आपल्याला अनेक हिट गाणी दिली .

एका मुलाखतीत नीरजजींनी एक आठवण सांगितली होती , बर्मनदांची ...  एकदा बर्मनदांनी सुचवलं होतं कि शमा , परवाना , शराब, तमन्ना , इष्क हे शब्द गाण्यांत परत परत येतांत त्याऐवजी दुसरे वापर . म्ह्णून नीरज साहेबांनी बगिया , मधुर, माला , धागा , गीतांजली असे शब्द वापरले. हे वाचल्यावर मला "सासों कि सरगम , धडकन कि वीणा , सपनोंकी गीतांजली तू '.. तसंच "जीवन कि बगिया मेहेकेगी , लेहेकेगी  ... खुषीयोन्की कलियां झुमेंगी फुलेंगी ".. या ओळी आठवल्या. 
आजही देवानंदला रोमँटिक गाण्यांत पाहतांना नीरज साहेबांची आठवण आली नाही असं होतच नाही. ' चुडी नहीं ये मेरा दिल हें , फुलोंके रंग से दिलकी कलम से, मेरा मन तेरा प्यासा.. मेरा मन तेरा , हां मैने कसम ली हां तुने कसम ली नहि होंगे जुदा , दिल आज शायर हें गम आज नगमा हें '..या प्रत्येक गाण्यांत जीव ओतलाय त्यांनी.

"शोखियों में घोला जाए फुलोंका शबाब, उस में  फिर मिलाई जाए थोडीसी शराब, होगा यूं नशा जो तैयार वो प्यार हें "... हे ऐकतांना तर या शब्दांच्याच प्रेमात पडतो.

"जैसे राधा ने माला जपी शाम कि मैने ओढी चुनरिया तेरे नाम कि ".. ऐकतांना आपणही नकळत हे गाणं गुणगुणू लागतो.

"मेघा छाये आधी रात बैरन बॅन गई निंदिया , बता ए मैं क्या करुं '... ऐकताना तो विरह डोळ्यांतून अलवार बरसू लागतो.

लिखे जो खत तुझे वो तेरे प्यार में हजारों रंग के नजारे बन गए असो अथवा खिलते हें गुल यहां खिलके बिखरने को .. आपल्या गाण्यातून त्यांनी अनेक रंगांच्या छटा उलगडल्या .

आपलं कवितेवरच प्रेम व्यक्त करताना एकदा त्यांनी म्हटलं होतं ,' I love composing poems so much that it has kept me intoxicated throughout my life'...
मला नेहमी वाटतं, आपण खरंच नशीबवान आहोत कि आपल्याला एवढ्या मोठ्या मोठ्या गीतकारांची गाणी मनसोक्त ऐकायला मिळाली , गुणगुणता आली आणि आयुष्यातील अनेक प्रसंगात याच गाण्यांनी आपल्याला सोबतही केली ...

( आजवर गीतकार नीरज यांच्याबद्दल जे काही वाचलं ते संदर्भ वापरून लिहायचा प्रयत्न केला आहे )

 

Monday, July 2, 2018


इवले इवले रूप गोजिरे
कुशीत बिलगून हसायचे
गळ्यांत टाकता हात चिमुकले
सर मोत्यांचे सजायचे

फुटले आतां पंख कोवळे
घरट्यामधूनी उडायचे
सावली अपुली असतांनाही
दूरूनी तूला ते पाहायचे

निसटून गेले क्षण स्पर्शाचे
चिऊकाऊच्या घासाचे
पुन्हा वाटते फिरुनी यावे
क्षण इवल्या त्या नात्याचे ....