Wednesday, January 4, 2023

मोहम्मद ज़हूर खय्याम हाशमी असं लांबलचक नाव असलेले 'खय्याम' म्हणजे एकदम उसुलवाला बंदा! ' मेरा संगीत मेरी इबादत है', म्हणणाऱ्या खय्याम यांनी त्यांच्या साठ वर्षांच्या कारकीर्दीत ७१ चित्रपट आणि नऊ दूरदर्शन मालिकांना संगीत दिलं. त्यांनी अशा सिनेमांना संगीत देणं पसंत केलं ज्यांत गीतांचा दर्जा खुप वरचा होता. 


प्रत्येक गाण्यावर त्या संगीतकाराची एक अमीट छाप असते. गाण्याची सुरावट, गाण्याच्या सुरवातीला वाजणारे म्युझिक व त्यामुळे होणारी वातावरण निर्मिती, दोन ओळींमधले छोटे छोटे म्युझिकचे पीसेस व एकूण वाद्यमेळ हे सर्व ऐकताच त्या गाण्याचं संगीत कुणाचं असेल, हे जाणकार रसिक क्षणात ओळखतात. संगीतकार खय्याम यांच्या बाबतीत तर हे विशेषत्वाने म्हणता येईल. ‘बहारों मेरा जीवन भी संवारो..’ (‘आखरी खत’), ‘कभी कभी मेरे दिल में..’ (‘कभी कभी’), ‘हजार राहें मूड के देखी..’ (‘थोडीसी बेवफाई’), ‘ये मुलाकात इक बहाना है..’ (‘खानदान’), ‘फिर छिडी बात बात फूलों की..’ (‘बाज़ार’) ही गाणी ऐकली तर लक्षात येईल, की त्यांचं गाणं एकदम सुरू होत नाही.

'शगुन' सिनेमांतील गाणी ऐकून फिदा झालेले कमाल अमरोही खय्यामजींकडे 'रझिया सुलतान' च स्क्रिप्ट घेऊन आले. 'रझिया सुलतान' म्हणजे बाराव्या शतकातील ऐतिहासिक ड्रामा होता. खय्यामजींनी सहा महिने कथेचा नीट अभ्यास केल्यावर लतादीदींना रेकॉर्डिंग साठी बोलावलं आणि सांगितलं, "लताजी, रझिया एक सम्राज्ञी आहे पण तिचा एका गुलामावर जीव जडलाय.रझियाची अवस्था मोठी विचित्र आहे. सम्राज्ञीचा आब पण राखायचा आहे आणि त्याचवेळी विरहाने तिचे मन आर्त झाले आहे. ती कशिश गाण्यात उतरली पाहिजे". लतादीदींनी त्यांच म्हणणं शांतपणे ऐकलं आणि एकाच टेक मध्ये "ए दिले नादान" हे सुपरक्लास गाणं दिलं. "मी हे गाणं गाऊन बाहेर आले पण नंतर दिवसभर ते गाणं माझ्या मनांत निनादत होतं. जणू काही मी ते गाणं माझ्या सोबतच घेऊन घरी आले होते", असं एका मुलाखतीत या गाण्याविषयी लतादीदींनी सांगितलं होतं. 

या गाण्याचं वैशिष्टय म्हणजे खय्यामसाहेबांची आगळीवेगळी मनात दीर्घकाळ रेंगाळणारी चाल व या गाण्यात घेतलेले विशिष्ठ पॉज.. या गाण्यात पहिल्या ओळीनंतर दुसरी ओळ येत नाही, आधी त्या ओळीची सुरावट संतूरवर वाजते आणि मग पुढची ओळ ऐकू येते. व्हायोलिन बरोबर वाजणारे सारंगीचे सूर, वाळवंटात मार्गक्रमण करीत असलेला उंटांचा काफिला व तो संधिप्रकाश कापत जाणारा लतादीदींचा आवाज.. "जिंदगी जैसे खोयी खोयी है, हैरां हैरां है ... (पॉज) ... ये जमी चुप है (पॉज) ... आसमा चूप है(पॉज)... !  हे पॉज वाळवंटात एकट्या भटकणाऱ्या रझियाची घालमेल गडद करतात. 

'पॉज कि आयडिया तो अमरोही साब की थी', हे खय्याम साहेब  प्रांजळपणे सांगतात हा त्यांचा मोठेपणा !!!



नवीन वर्ष, नवीन संकल्प, नवी सुरवात ..  
पण मी मात्र एक Pause घेऊन blank होते, दरवर्षी अशीच..
झगमगत्या दिव्यांमधे काही अंधारे कोपरे नव्याने सलू लागतात..
माझ्या कवितांमधून, माझ्या डायरीमधून डोकावणारी 'ती' अगदी आतून मग आठवत राहते..
याच दिवशी तर माझा हात सोडला होता तिने.. 
तिला वाटलं, जमतंय सगळं मला; 
अडणार नाही काही, तिच्यावाचून आता.. 
पण त्या दिवसापासून अस्वस्थतेशी लढा सुरूच आहे माझा..
आजही वाटतं म्हणावं देवाला,पाठव ना काही वेळा करता तरी तिला..
घरातल्या साडीतलं तिचं देखणं रूप डोळ्यात साठवू दे, 
देव्हाऱ्यातल्या दिव्याच्या उजेडात तिला डोळेभरून पाहू दे, 
आमची दृष्ट काढताना तिला पाहून मन जरा आश्वस्थ होऊ दे,
तिच्या मांडीवर डोकं ठेवून गाढ निजताना मायेचा स्पर्श होऊ दे..
फार काही मागत नाही देवा पण 
तिच्या हातचा मऊ आमटी भात परत एकदा चाखू दे, 
रव्याचा नारळ घालून तिने केलेला खमंग लाडू डोळे मिटून खाऊ दे..
इवले इवले आनंदाचे हे क्षण 
दूरवर कधीच हरवलेत.. 
'जगायास तेव्हा खरा अर्थ होता
मनाला किती शुभ्र वाटायचे'.. 
अगदी सौमित्रच्या कवितेसारखं झालंय..'निरार्थास ही अर्थ भेटायचे' ! 

सारंगा तेरी याद में..

पार्श्वगायनाची आयुष्यात मिळालेली पहिली संधी .. गाण्याच्या इतक्या रिहर्सल नंतर मुखोद्गत झालेलं गीत.. त्याच गीताच्या रेकॉर्डिंग करता दिल्लीहून पहिल्यांदा मुंबईला आल्यावर नेमकं रेकॉर्डिंगच्या दिवशी चुकलेला स्टुडिओचा रस्ता आणि तो तरुण गायक.. तर तिकडे स्टुडिओ मध्ये वाट बघणारे संगीतकार अनिल विश्वास.. 'कोणत्या पोराच्या नादी लागता, दुसरा गायक बोलावून गाणं रेकॉर्ड करा'..असा त्यांच्यावर दबाव आणणारे निर्माते..
या पार्श्वभूमीवर त्या तरुण गायकाची स्टुडिओ मध्ये उशिरा एन्ट्री होते.रागाचा पारा मस्तकापर्यंत पोहचलेले अनिल विश्वास त्याला बघताच खाडकन त्याच्या श्रीमुखात लगावतात आणि या पहिल्याच स्वागताने तो तरुण गायक नखशिखांत हादरतो... तरीही सगळा अपमान, सगळं दुःख हृदयात साठवून, डोळ्यातील पाणी कडांवर थोपवून रेकॉर्डिंगला उभा राहातो आणि तो दर्द त्याच्या गाण्यातून बाहेर पडतो..
'दिल जलता है तो जलने दे, 
आसू न बहा फरीयाद न कर'...
पार्श्वगायक मुकेश यांनी गायलेलं हे पहिलं गीत !

तो जमाना सैगल साहेबांचा होता त्यामुळे प्रत्येक गायक त्यांचाच आदर्श डोळयांसमोर ठेवायचा. मुकेश जेव्हा गात तेव्हा सैगल साहेबांचा भास व्हायचा त्यामुळेच दिल्लीतील पंचकोशीत मुकेश यांना 'दुसरा सैगल' म्हणून लोक ओळखायचे.त्या काळातील अभिनेते मोतीलाल हे मुकेश यांचे जवळचे नातेवाईक; त्यांचाच हात धरून मुकेश या क्षेत्रात आले.
एकदा मोतीलाल यांच्या घरी पार्टी होती आणि त्यात मुकेश सर्वांच्या आग्रहाखातर सैगल साहेबांची गाणी गात होते. नेमकं त्याच वेळी सैगल साहेब तिथे आले. मुकेशचं गाणं ऐकून ते स्तंभित झाले. गाणं संपताच त्यांनी मुकेशला घट्ट मिठी मारली व म्हणाले 'लोकांना आता दुसरा सैगल मिळाला आहे, त्यामुळे मी आता मरायला मोकळा. असाच तन्मयतेने गात राहा', असा आशीर्वाद देऊन त्यांनी आपली हार्मोनियम मुकेश यांना भेट दिली.
राजकपूर व मुकेश हे गुरुबंधू. दोघांनीही पंडित जगन्नाथ प्रसाद यांच्याकडे संगीत साधना केलेली. पुढे मुकेश हाच 'राजकपूरचा आवाज' बनला.भावनेने आणि भाविकतेने गीत गाणाऱ्या या गायकाने पार्श्वगायनाकडे, गाण्याकडे कायम परमेश्वराचं स्तवन म्हणून पाहिलं. पार्श्वगायनासाठी गीत हाती आलं की ते सर्वप्रथम आपल्या हस्ताक्षरात लिहून काढत व नंतरच त्यावर काम सुरू करत.

असं म्हणतात, मुकेश यांना सैगल ढंगातून बाहेर काढलं व त्यांना त्यांची शैली प्राप्त करून दिली ते संगीतकार नौशादजींनी. मेला चित्रपटात दिलीपकुमार यांच्यासाठी त्यांनी मुकेशचा आवाज वापरला. 'मेला', 'अनोखी अदा',यातील गाण्यांमुळे ते लोकप्रिय झाले.

मुकेश यांच्या आवाजाला मर्यादा होत्या.त्यामुळे सी. रामचंद्र म्हणत, 'मुकेशचं पारशी माणसासारखं आहे. पारशी माणुस खूप दूरवर पायी फिरावयास जात नाहीत, तिथल्या तिथेच फिरत राहतो, मुकेश सुद्धा त्याच चाकोरीत फिरत राहतो'..
संगीतकार सलील चौधरी यांच खरं प्रेम मुकेश होतं. कई बार यूँ ही देखा है, मैने तेरे लिए ही सात रंग के सपने चुने, कही दूर जब दिन ढल जाए सारखी चिरतरुण गाणी म्हणजे नजाकतीनं घडवलेली काव्यशिल्प आहेत. 
'यहुदी' चित्रपटांतील 'ये मेरा दिवानापन है', हे गाणं तलत मेहमूद यांनी गावं हा हट्ट दिलीपकुमार यांनी तर हे गाणं रफी साहेबांनी गावं हा हट्ट दिग्दर्शक बिमल रॉय यांनी धरला होता. पण संगीतकार शंकर जयकिशन यांना या गाण्यासाठी मुकेशचं हवा होता कारण चाल बांधताना कोण या गाण्याला न्याय देईल याचा आराखडा त्यांच्या मनांत स्पष्ट होता. शेवटी रफी, मुकेश, तलत या तिघांच्या चिठ्या टाकल्या गेल्या व मुकेश यांच्या अविस्मरणीय गीतांच्या यादीत या गाण्याने भर पडली.
 
असं म्हणतात, मुकेशच्या आवाजाचा जास्तीत जास्त उपयोग करून घेण्यात आघाडीवर असणारे संगीतकार होते, कल्याणजी आनंदजी. करूण रसातील मुकेश यांच्या आवाजातील गाणी हे या त्रयीचं एक खास वैशिष्टय !
मन्ना डे मुकेशजींच्या आवाजाबद्दल म्हणायचे,'मुकेशचा आवाज म्हणजे घन मेघांनी व्यापलेलं,खाली झुकलेलं शोकमग्न आकाश'.. म्हणून तर त्यांनी गायलेल्या गीतांचा सुगंध पारिजातकाच्या फुलांसारखा आजही दरवळतो आहे...


 दंतस्य कथा रम्या 


साहसकथा मनुष्याला कायमच आवडतात त्यामुळे ‘युद्धस्य कथा रम्या’ असं म्हटलं जातं. युद्धाशी आपला संबंध म्हणजे रोजच्या जगण्यात असते तेवढी लढाई पुरेशी असते आपल्याला. कधीतरी लुटुपुटुची लढाई तर कधी गनिमी कावा वापरून जिंकलेलं युद्ध आणि हार पत्करायची वेळ आलीच तर तह करता येतो, मग अजून काय हवं ! पण तरीही रोजच्या लढाईत कधी कधी परीक्षेचा क्षण येतोच.दंतशल्यचिकित्सकाकडे जाण्यास केवढं साहस लागतं ते जायची वेळ आली कि आपसूकच समजतं.
तो दंतशल्यचिकित्सक मग कितीही हॅंडसम असला, त्याच्याकडची पेशंटचेअर कितीही गुबगुबीत व आलिशान असली तरीही तिथल्या छिन्नी हातोडीचा आभास निर्माण करणाऱ्या इवल्या इवल्या शस्त्र सामग्रीला पाहून धडकी भरते. सोबत वेगवेगळा आवाज काढण्याचं त्या शस्त्र सामग्रीच्या अंगी असलेलं कसब नुसतं त्यांना पाहून सुद्धा कानांत तो आभास निर्माण करतं. त्यामुळे तिथे जायला लागणं म्हणजेच एक महायुद्ध असतं, स्वतःशी, मनातल्या भीतीशी !
एक दात जरी दुखत असला तरी तो सर्व दात तपासतो. मग फिलिंग रूट कॅनॉल सिरॅमिक कॅप असे शब्द कानावर पडू लागतात. हे सारं वरून गेलं कि काय असा संभ्रम पडतो आणि मग तो सुरवात cleaning सारख्या सोप्या सुटसुटीत शब्दाने करतो. बरं यात गंमत अशी आहे कि हा शब्द कितीही सोपा साधा वाटला तरी तो अनुभव मात्र श्वास रोखून धरण्यासारखा असतो. अहो खरंच , कारण cleaning करता करता मध्येच डॉक्टर थांबतात आणि सांगतात 'अहो श्वास घ्या'.....पुढच्या 'फुल्या फुल्या फुल्या' ऐकू येत नाहीत म्हणजे पुढचे भाव आपोआप त्यांच्या मनांत प्रकट होत राहतात. 
सध्या माझ्या राशीला 'साहसी आणि धाडसी कामे कराल' असं भविष्य लिहिलं असल्याने हा योग जुळून आला आहे. दंतशल्यचिकित्सकाकडे साधारण आपण कोणाच्या तरी रेफरन्सनी जातो तसं माझ्या ref नी माझ्या ऑफिसमधल्या डझनभर मैत्रिणी ऑलरेडी त्याच्याकडे जातात. त्याचे आई बाबा आम्ही लहान असतांना आमचे फॅमिली डॉक्टर होते शिवाय माझ्या भावाचं आणि त्याचं नाव एकच त्यामुळे त्याच्याकडे जाण्याचा माझा emotional connect त्याला सांगून त्याची जबाबदारी मी सुरवातीलाच वाढवली आहे. एकतर माझ्या मनात असलेली भीती इतकी खोल आहे की ते पाहून दुसऱ्या डॉक्टरांवर तो माझी जबाबदारी देऊच शकत नाहीत. शिवाय क्लिनिक मधल्या इतर चेअरवर न बसता एका ठराविक चेअरवरच मी बसणार ही माझी अट त्याच्या सपोर्ट स्टाफला पण ऎकावी लागते. एकूण काय तर लाखांत एखादा माझ्यासारखा दुर्मिळ पेशंट सध्या त्याच्या नशिबात आणि क्लिनिकच्या खुर्चीत आहे.
नेमकं याच वेळी केयुरच पण एका दाताचं फीलिंगच काम निघालं. मग काय क्लिनिक मध्ये एकदा मी माझ्या खुर्चीत आणि समोरच्या खुर्चीत तो. मी इकडे इतक्या टेंशन मध्ये कधी एकदा हे ड्रीलिंग संपतं आणि बाहेर जाते या मनस्थितीत आणि हा दुसऱ्या डॉक्टरांशी गप्पा मारतोय, दाताच्या कॅपचं designing, त्या कॅप चं थ्री डी measurement  scanning वगैरे बद्दल. जणू product designing वरती एक पॅनल discussion सुरू होतं. मला वाटलं डॉक्टरांना सांगावं, यांना बाहेर काढा  क्लास मधून..किती  बोलतायेत! असं वाटेपर्यंत त्याचं काम झालं. 
पुढच्या आठवड्यात मला ट्रिपला जायचं होतं, त्यामुळे दाताला पैलू पाडण्यात खंड पडणार होता. निघतांना डॉक्टर मला म्हणाले, 'बिनधास्त जा, परत आल्यावर पुढचं काम करू. माझी आठवण अजिबात काढू नका, दात काही दुखणार नाही तुमचा'. हे ऐकून हुश्श करत एक आठवडा सुट्टी मिळावी अशा आनंदात मी बाहेर पडले.
मैत्रिणींबरोबर तिकडे ट्रिपवर असतांना दोन तीन दिवसांनी माझ्या सोबत असलेल्या माझ्या मैत्रिणीच्या मुलीचा दाताची कॅप तुटली म्हणून फोन आला. मैत्रिणीने त्वरित डॉक्टरांना फोन लावला. तिची मुलगी मुंबईत, आमचे डॉक्टर पुण्यात आणि आणि आम्ही कच्छच्या रणात तरी प्रश्न सुटला !
परत आल्यावर दोन दिवसांनी असलेली माझी अपॉइंटमेंट सर्दी झालीये, चार दिवसांनी थोडा खोकला आहे मग काय ऑफिस मध्ये खूप काम आहे या कारणांनी तीन चार वेळा मी कॅन्सल केली. 'काम तर पूर्ण करायला हवं ना, मग जायला पाहिजे', अशी स्वतःची समजून घालून finally मी परवा परत डॉक्टरांकडे गेले.'कशी झाली ट्रिप' या प्रश्नानंतर 'सध्या खूप काम दिसतंय सिंबायोसिस मध्ये,दोन आठवडे आला नाहीत'? असा प्रश्न विचारून डॉक्टरांनी गुगली टाकली. यावर मी त्यांच्याकडे बघायचं टाळत 'हो हो' म्हणत विषय बदलला व चुपचाप खुर्चीत बसले. दाताचं पुढचं काम सुरू करताना, 'आज हा दात काढू यात'?असं डॉक्टरांनी म्हणताच 'नाही नाही आज नको' असं म्हणत मी खुर्चीत खडबडून उठून बसले. हे पाहून ते म्हणाले, 'अहो, नाही दुखणार फार, तासाभराने मस्त मिल्क शेक, ice cream खाऊ शकता, उद्या इडली उपमा खा'.. हे ऐकताना वैशालीची इडली सांबर, आमायाचा उपमा आणि सुजाताची मस्तानी साक्षात समोर दिसू लागली तरीही माझा निश्चय मी सोडला नाही. मी म्हटलं 'तुम्ही म्हणाला होतात रूट कॅनेल केलेल्या दाताच्या कॅपचं measurement घेऊ आधी म्हणून'.. 'आहे लक्षांत माझ्या, ते करायचं आहेच पण आधी हे करू शकतो. पण ठीक आहे, आत्ता तुमचं ऐकतो, तुम्ही सांगाल तो मुहूर्त ठरवू आपण दात काढायचा सध्या कॅपच काम करू'..असं त्यांनी म्हणताच जणू एक लढाई जिंकल्याचा आनंद झाला.
एकूण काय तर एक धारातीर्थी पडलेला दात  आता पुढील मुहूर्ताच्या प्रतीक्षेत आहे तर दुसरा दात नवीन कॅप मिळणार म्हणून आनंदात आहे. आणि मी मात्र हे युद्ध कधी संपणार या प्रतीक्षेत आहे !