Wednesday, August 29, 2018

"मेरी जाँ .. मुझे जाँ न कहो मेरी जाँ , मेरी जाँ "...

अनुभव चित्रपटातील गुलजार साहेबांचे हे शब्द, गीता दत्त यांचा आवाज आणि कनू रॉय यांच संगीत . हे गाणं ऐकलं कि पुढचे कित्येक दिवस फक्त हेच गाणं गुणगुणावंस , ऐकावंस आणि पाहावसं वाटतं, इतकी जादू आहे या गाण्यांत. काल हे गाणं ऐकतांना मला जावेदजींच्या काही ओळी आठवल्या. एका कार्यक्रमांत जावेद अख्तर म्हणाले होते कि कोणत्याही गाण्यांत त्या गाण्याची धून म्हणजे त्या गाण्याचं शरीर , त्या गाण्यातील आवाज म्हणजे त्या शरीराचा आत्मा आणि त्यातील शब्द म्हणजे त्याच चरित्र असतं  !!!

गीतकाराने शब्दांत बांधलेल्या भावना गायकाला आपल्या आवाजातून आपल्यापर्यंत पोहोचवाव्या लागतात.   "घनु वाजे घुणघुणा वारा वाहे रुणझुणा ", या विराणीतील शब्दांत वर्णन केलेला 'बासरी सारखा वाजणारा वारा' लतादींच्या आवाजात खरंच ऐकू येतो. तो आभास ज्ञानेश्वरांचे शब्द निर्माण करतातच आणि त्या चित्रापर्यंत दीदी आपल्याला घेऊन जातात. "रुणु झुणु रुणु झुणु रे भ्रमरा सांडी तू अवगुणु रे भ्रमरा, सुमनसुगंधू रे भ्रमरा परिमळु विद्रदु रे भ्रमरा", या ओळींमधला चंचल मनाला केलेला उपदेश व लपलेला खोल अर्थ लताबाईंच्या आवाजातून अलवार उलगडतो.ज्ञानेश्वरांनी जितके गोड शब्द वापरलेत तितक्याच गोड आवाजात ते गाणं ऐकू येतं आणि खूप जवळचं वाटतं. "मेंदीच्या पानावर मन अजून झुलते गं , जाईच्या पाकळ्यांस दव अजून सलते गं ".. या कवितेत भट साहेबांनी सासरी गेलेल्या मुलीच्या आठवणीने व्याकुळ झालेल्या आईच्या मनाची व्यथा जितक्या हळुवार पणे मांडली आहे  ती तितक्याच ताकतीने लताजींनी आपल्या पर्यंत पोहोचवली आहे आणि म्हणूनच हे गाणं ऐकतांना प्रत्येक आई आणि मुलीचे डोळे भरून येतातं.

या शब्द आणि आवाजाच्या जादूवर आपण सगळेच प्रेम करतो. पण या शब्द आणि आवाजाच्या जादूला जेव्हा पडद्यावर त्याच ताकतीचा चेहेरा मिळतो तेव्हा त्याला आपण Visual Treat म्हणतो.

"मेरी जाँ , मुझे जाँ न कहो मेरी जाँ , मेरी जाँ ".. हे गाणं खऱ्या अर्थाने आपल्यासाठी Treat आहे. गुलजारजींच्या शब्दांना गीता दत्त यांच्या आवाजात ऐकायचं आणि संजीवकुमार व तनुजा यांना ते साकारतांना पाहायचं , क्या बात हें !!!

रात्रीची वेळ.. फक्त दोघांची. बाहेर कोसळणारा पाऊस. खिडकीबाहेर पाहणारा तो.. आपल्याच विचारात हरवलेला. त्याच वेळी ती येते. त्याला पाहते आणि अलगत त्याच्या जवळ जाऊन गुणगुणते "मेरी जाँ .. मुझे जाँ न कहो मेरी जाँ "... हे ऐकून त्याच्या चेहऱ्यावर बदलणारे भाव व क्षणांत पसरलेले ते निखळ हसू .. या फ्रेम मधेच आपण त्याच्या प्रेमात पडतो, ते गाणं आपलं होतं.

बाहेरचा रिमझिम पाऊस, खिडकीतून दिसणारा पाऊस.. अंगणातील फुलांना भिजवणारा पाऊस, त्या दोघांचा पाऊस आणि न भिजताही आपल्याला भिजवणारा पाऊस...

तनुजा यांच्या वर चित्रित झालेलं माझं सर्वांत आवडतं गाणं..संजीवकुमार तर आपल्याला त्यांच्या प्रेमातच पाडतात या गाण्यांत. रोमँटिक गाण्यांच्या यादीत या गाण्याला विशेष जागा मिळावी इतकं खास आहे हे गाणं. जबरदस्त फ्रेम्स, कॅमेऱ्यात पकडलेले उत्कृष्ट close ups, बॅक लाईटची जादू त्या क्लासिक माहोल मध्ये आपल्यालाही घेवून जाते.... आणि मग ओठांवर तेच शब्द येतात," मेरी जाँ, मुझे जाँ ना कहो मेरी जाँ.."

- कविता

No comments:

Post a Comment