नौदल ....
आज बऱ्याच दिवसांनी रविवारची सकाळ निवांत होती.आम्हा दोघांना ऑफिसला आणि कांतेयला शाळेला सुट्टी, त्यामुळे बाबा कालच इकडे आले होते राहायला. या मस्त हवेत, टेरेस मध्ये येणार कोवळ ऊन अंगावर घेत ; आमच्या चौघांच्या रंगलेल्या गप्पा आणि सोबत कांदे पोहे व मस्त वाफाळलेला आल्याचा चहा...सुट्टीच्या दिवसाची अशी एकदम परफेक्ट सुरवात होती.
बोलता बोलता सहज विषय निघाला आणि बाबांच्या जुन्या आठवणींमध्ये आम्ही सारेच रमलो. वयाच्या १९ व्या वर्षी बाबा भारतीय नौसेनेत कसे गेले इथपासून, तेव्हाची प्रवेश परीक्षा, सुरवातीचे प्रशिक्षण, वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंग झाल्यावरती घरापासून दूर राहतानाचे अनुभव,पुण्यात NDA मध्ये असतानाच्या आठवणी, ६२ आणि ६५ च्या युद्धातील अविस्मरणीय क्षण,सिंगापूरला जाऊन त्यांनी घेतलेले सबमरीनचे प्रशिक्षण तसेच INS राजपूत , INS ब्रह्मपुत्रा , INS जमुना आणि INS विक्रांत या वेगवेगळ्या जहाजांवरचा अनोखा अनुभव आणि INS विक्रांत वर असलेल त्यांच विशेष प्रेम ... सार काही थक्क करणार होतं. आज कांतेय साठी आठवणींचा खजिना परत उलगडत होता.
१९६१ साली माल्टाला ( फ्रान्स / ब्रिटन ) भारतीय नौदलाची विशेष तुकडी पाठवण्यात आली होती. विक्रांत जहाजाची भारतीय नौदलाशी झालेली ती पहिली ओळख. तेथे ते जहाज कमीशन झाले म्हणजॆ आपल्या ताब्यात आले. नौदलाच्या त्याच तुकडीत बाबा होते. INS विक्रांत वरून माल्टा ते मुंबई हा त्यांनी केलेला विक्रांतवरचा पहिला अविस्मरणीय प्रवास.......आयुष्यात इतक्या सुंदर आठवणी बाबांना भारतीय नौसेनेने दिल्या होत्या ज्याची झलक आजची त्यांच्या डोळ्यांत दिसत होती.
तेव्हा काळाची गरज म्हणून कमावणं गरजेचं होत, कुळकायद्यात शेत जमीन गेलेली, नोकरी नाही, भावंडांत मोठं असल्याने कुटुंबाची जबाबदारी होती. अशा परिस्थितीत समोर दिसला एकच मार्ग.. अर्ज केला. परीक्षा दिली आणि निवड सुद्धा झाली. एका लहान गावातून अनवाणी निघालेला 'तो' नौदलात दाखलहि झाला. पहिल्याच दिवशी मिळाले तीन प्रकारचे युनिफॉर्म आणि प्रत्येक युनिफॉर्म बरोबर घालायचे वेगवेगळे बुटांचे तीन जोड .... ते पाहून 'त्याच्या' डोळ्यांत टचकन पाणी आलं. अनवाणी पायानी इथवर येऊन , जणू सर्व प्रश्नाची उत्तर 'त्याला' इथेच मिळाली. आता सोबत होती ती निळ्या आकाशाची , अथांग सागराची आणि त्या बोटींची. क्षितिजावर खूप सारी स्वप्न होती आणि मनात ती पूर्ण करण्याची धडपड. एक एक पाऊल पुढे टाकत खुप लांबचा पल्ला गाठला पण सुरवात कोठून केली हे 'तो' कधीच नाही विसरला.
योगायोगाने भारतीय नौसेना सप्ताह सुरु होता. NDA मध्ये बाबा १९५८ साली होते म्हणजेच ५८ वर्ष झाली होती NDA सोडून. काय हा योगायोग ... हाच धागा पकडून आम्ही बाबांना त्याच जागी घेऊन जायचे ठरवले जिथे त्यांच्या आयुष्यातील अनेक सुंदर आठवणी होत्या. घरापासून अर्ध्या तासाचे अंतर होते आणि त्या अर्ध्या तासांत बाबा मात्र अठ्ठावन्न वर्ष मागे जावून पोहचले होते.तेव्हाच चित्र आणि आजच चित्र यांत खूप बदल झाले होते आणि बाबा तेच बदल डोळ्यांत साठवत होते.
इतका जुना ऑफिसर आलाय हे समजल्यावर त्यांना भेटायला साहजिकच तेथील काही ऑफिसर आले आणि पाहता पाहता काही क्षणात तेथील वातावरण एकदमच बदलून गेले. बाबांच्या काळातील गोष्टी विचारण्यात ते ऑफिसर आणि त्या सांगण्यात बाबा अगदी रमून गेले. शरीराने थकलेला जीव पण अजूनही तीच ऊर्जा , तोच अभिमान आणि तोच गर्व. जणू आज खऱ्या अर्थाने बाबा त्यांच्या 'फील्ड' वरती होते. त्या सर्वांचे हावभाव, बोलण्यातील जोश , चेहऱ्यावरचा आनंद मी डोळ्यांत साठवत होते. त्या सर्वांच्या गप्पा अशाच रंगत गेल्या. त्या काही वेळात बाबा जणू 'ते' आयुष्य परत जगले.
अखेर निघायची वेळ झाली. सर्वांशी हस्तांदोलन करून बाबा निघाले. आम्हाला सोडायला गाडीपर्यंत एक ऑफिसर आवर्जून आले. गाडीत बसतांना एक क्षण थांबून बाबा मागे वळले आणि म्हणाले,'कभी जरुरत पडे तो बुला लेना,आ जायेंगे,' तेव्हा मात्र तो ऑफिसर एकदम भारावून गेला. एक कडक सॅल्यूट मारून पुढे आला आणि बाबांना त्यांनी नमस्कार केला . नि:शब्द होवून आम्ही फक्त पाहत राहिलो. खूप विलक्षण, खूप वेगळा अनुभव होता तो. आजच्या दिवसानं बाबांसारखच मला पण खूप काही दिल. नक्की काय, हे शब्दांत मांडता येण्याच्या खरंच पलीकडचं होत....