Friday, February 21, 2020

व्यक्ती कि वल्ली


मराठी माणसाला पुलं आणि वपु यांनी व्यक्तीनिरीक्षण शिकवलं. त्यांच्या लेखणीतून आपणापर्यंत पोहोचलेल्या  त्या व्यकितेखा आजही आपल्या मनांत घर करून आहेत आणि हेच त्यांच्या लेखनाचं मोठं वैशिष्ट्य. आपल्या रोजच्या आयुष्यात अशी कोणी व्यक्तीरेखा आजूबाजूला आढळते आहे का हे जरा डोळे उघडे ठेवून शोधण्याचं माझं वेड आणि सवय मला त्यातूनच लागली. राधिका हे असंच मला गवसलेले एक पात्र, माझ्या या लेखाचं स्फुर्तिस्थान.

राधिका गोखले, मी राहते त्याच इमारतीत तिसऱ्या मजल्यावर राहते. नोकरीच्या निमित्ताने काही वर्षांपूर्वी पुण्यात आली, इथे एकटीच राहते. नागपूरला तिचे आई वडील असतात. अधून मधून जात असते आई वडिलांना भेटायला कारण वयानुसार आता तिच्या आई बाबांना प्रवास झेपत नाही. मूळची नागपूरची असल्याने नागपूर हा विषय कायम तिच्या बोलण्यात असतो. माझं सासर नागपूरचं असल्याने माझ्याबद्दल तिला तसूभर जास्त प्रेम आहे. पुण्याविषयी काही विशेष टिपण्णी ती माझ्यासमोर करत नाही कारण मी पक्की पुणेकर आहे व  पुण्याबद्दलचा माझा 'जाज्वल्य' अभिमान ती जाणून आहे. बाकी नागपूरकर आणि पुणेकर या तिच्या अत्यंत  जिव्हाळ्याच्या विषयावर ती पोटभर कायमच बोलत असते, तेव्हा 'ज्यांच्या पुढे कर जोडावेत अशा तिसऱ्या स्थळाचे मुंबईकर' आजूबाजूला नाही याची रुखरुख वाटते. एकूण काय तर नागपूरकर म्हणून एक वेगळाच डौल ती मिरवते. पुलं नी सांगितल्याप्रमाणे 'नागपूरकर म्हणजे ज्या कुठल्या गावी राहत असाल त्याच्या तुलनेनी नागपूर प्रशस्ती चालू ठेवायची', तसाच कारभार आहे हा. एकूण काय तर अशी हि गप्पिष्ट, बडबडी, धांदरट, सतत घोळ घालणारी, मिश्किल अशी आमची राधिका. तिची खास गोष्ट म्हणजे अतिशय शांतपणे पुष्कळ मोठे घोळ घालते आणि ते आपणहून कौतुकाने सर्वांना सांगते सुद्धा.

इजाजत मध्ये एक संवाद होता रेखाला , "इस पगली पे प्यार भी आता है और तरस भी". मी मात्र याच संवादात "और गुस्सा भी " हे जोडलंय आणि कायम तिच्यासाठी हा संवाद मी म्हणत असते जे तिलाही माहित आहे. मी गुलजारजींची फॅन म्हणून इजाजत मधला संवाद मला पटकन सुचला होता तिच्यासाठी. राधिका अमिताभ बच्चन यांची एक निस्सीम फॅन आहे.अकरा ऑक्टोबर तिच्यासाठी एकदम खास दिवस आहे. अमिताभजींचा वाढदिवस मनापासून साजरा करते ती आणि आम्हाला चक्क पार्टी सुद्धा देते. येता जाता सिनेमातील त्यांचे संवाद म्हणत असतेच, कधी कधी साभिनय करून सुद्धा दाखवते. त्यांचा विषय निघायचा अवकाश कि भरभरून बोलते त्यांच्याविषयी. इतकी वेडी फॅन आहे त्यांची.

कधी ऑफिस मधून उशिरा येतांना दिसली, पार्किंग मध्ये भेटली आणि आपण विचारलं, "का ग , आज इतका उशीर " तर म्हणते " कोण आहे घरी वाट पाहणारं , लवकर काय आणि उशिरा काय".. तेव्हा मात्र चर्र होतं. केर फरशी आणि स्वयंपाकासाठी दोन वेगवेगळ्या बायका काम करतात तिच्याकडे आणि यामागे तिचं लॉजिक असं  कि तेवढीच घरांत चेहेलपेहेल वाटते, नाहीतर रोज कोण येतंय बोलायला माझ्याशी. एकदम बरोबर वाटतं तिचं हे लॉजिक.  एकटेपण अनुभवणं , त्याची सवय करून घेणं सोपं नक्कीच नाही. पण म्हणून काही ती गंभीर, दुःखी अशी कधी दिसतं नाही. शब्दांमधून कधीतरी तिची दुखरी सल जाणवते तरीही चेहेरा मात्र कायम आनंदी असतो  तिचा. नागपूरला खरेदी केलेले ड्रेस आणि साड्या याबद्दल भरभरून बोलते. इतवारी,बर्डी हे शब्द एव्हाना इथल्या सर्व मैत्रिणींना पण ओळखीचे झाले आहेत.नुकत्याच झालेल्या व्हॅलेंटाईन डे ला 'मी काय करू ग संध्याकाळी', असा प्रश्न तिने हसत हसत विचारला यावर मी तिला तू 'दिल तो पागल है' हा सिनेमा पाहिला आहेस का ? हा प्रति प्रश्न केला. त्यावर तिचं हो उत्तर आलं. मग मी सुचवलं "अग त्यात नाही का माधुरी जाते बाहेर आणि स्वतःसाठी मस्त शॉपिंग करते तसं कर शॉपिंग स्वतःसाठी". माझा हा सल्ला तिने फारच मनावर घेतला आणि चक्क दुसऱ्या दिवशी बोलावलं मला शॉपिंग पाहायला.

नक्कल करणे हा तिचा अजून एक छंद. आमच्या सोसायटीत राहणाऱ्या सर्वांची डिट्टो नक्कल करते राधिका, अगदी आवाजासकट. हसणं, चालणं, बोलणं अगदी हुबेहूब टिपते आणि करते. काही खास मंडळींची नक्कल आम्ही परत परत करायला लावतो तिला आणि ती ते अगदी मनापासून करते. परवा तिच्याकडे काम करणाऱ्या बाईंना घरात लॉक करून ऑफिसला गेली होती. बाई घरांत काम करतायेत हेच विसरली जातांना. मग काय बाईंनी घातला गोंधळ. बाजूच्या मुग्धा कडे किल्ली होती म्हणून बरं. संध्याकाळी परत आली ऑफिस मधून तेव्हा सगळा प्रकार सांगितला तिला तर जो गोंधळ घातला तो राहिलाच बाजूला वर बाईंचीच नक्कल करून दाखवली कि त्यांनी काय केलं असेल जेव्हा त्यांना समजलं कि त्या घरांत असतांना मी लॉक करून गेले. काय बोलणार यावर.

मागच्याच महिन्यात दुबईला जाते म्हणून अगदी सागर संगीत सगळं आवरून तयारीनिशी निघाली. तिकडे मुंबई विमानतळावर पोचल्यावर तिला साक्षात्कार झाला कि पासपोर्ट घरीच राहिला. मग काय, ऑफिस मध्ये फोन, इकडे आम्हाला फोन, कोणीतरी आलं ऑफिस मधून धापा टाकत आणि आम्ही तिचं घर उघडून पासपोर्ट दिला काढून. नशीब ती खूप आधी मुंबईला पोहोचली होती त्यामुळे ऑफिस मधून तिचा सहकारी पोचू शकला वेळेत तिला पासपोर्ट द्यायला नाहीतर तिथूनच परत यावं लागलं असतं. हे कमी होतं कि काय परत येतांना मुंबई विमानतळावरून आपली समजून दुसरीच सुटकेस घेऊन निघाली आणि त्यामुळे झालेला गोंधळ सुद्धा निस्तरला. या सगळ्या प्रकारामुळे इथे सोसायटीत आणि तिकडे ऑफिस मध्ये परत एकदा तिची खिल्ली उडवायला सर्वांना आयतं कारण मिळालं ते वेगळंच.

परवाच सांगत होती, तिच्या ऑफिस मधला कॅन्टीन मध्ये घडलेला किस्सा. चहा प्यायला ती कॅन्टीन मध्ये गेली होती. चहा पिऊन झाला म्हणून निघाली तर गरमागरम बटाटेवड्याचा वास आला. काउंटर वर एक बटाटा वडा प्लेट ठेवली होती.त्यातील ते दोन वडे जणू तिला खुणावतच होते. मग काय एक वडा उचलला तिने आणि चालू लागली खात खात, बिनधास्त. कोणीच बहुदा तिला पाहिलं नसावं कारण ज्याची ऑर्डर होती तो बाजूलाच पाठमोरा फोन वर बोलत होता. फोन वरील संभाषण संपवून तो आला प्लेट घ्यायला तर एकच वडा प्लेट मध्ये म्हणून त्याची व काउंटर वरच्या मुलाची चांगलीच जुंपली. कॅन्टीनचा मुलगा 'मी दोन वडे दिले होते' यावर ठाम होता. एक वडा गेला कुठे हा उलगडा काही झाला नाही पण बातमी मात्र सर्वत्र पसरली. ऑफिस मध्ये जेव्हा हि चर्चा रंगली तेव्हा या मॅडम म्हणाल्या 'अरे हो का ,असं झालं ,पण तो वडा तर मी घेतला होता', त्याक्षणी त्याची दूसरी बातमी झाली. घरी आल्यावर आमच्या सोसायटीच्या कट्ट्यावर हा किस्सा तिनेच आम्हाला सांगितला म्हणजे आपणच करामत करायची आणि आपणच बातमी द्यायची असं आहे तिचं.

फोटो काढून घेण्याचा नवीन छंद आजकाल राधिकाला लागला होता. सेल्फी काढून समाधान झालं कि 'एक फोटो काढ ना प्लीज, ताईला पाठवायचाय', असं सांगून आवर्जून फोटो काढून घ्यायची माझ्याकडून. बरं फोटो माझ्याकडूनच का ? याला पण एक कारण होतं माझा नवरा उत्तम फोटोग्राफर आहे म्हणून मी पण छान फोटो काढते हा तिचाच दावा. ताईने प्रेमाने घेतलेली साडी, ड्रेस घातल्यावर तो तिला किती छान दिसतोय हे फोटोतून ताईला सांगायचं असायचं. मग मी सुद्धा तिचा फोटो काढून पाठवताना काहीतरी शायरी लिहून पाठवते तिला त्या फोटोसोबत . एकदम खुश होते. काही बोलत नाही पण एक मस्त हसू पसरतं तिच्या चेहऱ्यावर, डोळे एकदम लखलखतात तिचे.

चांगलं किंवा वाईट माणूस म्हणून शिक्का देणं सोपं असतं. भाबडं वाटलं तरी थोडं न्याहाळलं कि खोलवर काहीतरी दिसतं हेच खरं. वेगवेगळ्या वृत्तीची आणि स्वभावाची माणसं, व्यक्ती आजूबाजूला असतातच पण काही वल्ली म्हणून भावतात हे मात्र नक्की !!

आज पुलंचे चितळे मास्तर,सखाराम गटणे,नामू परीट,पेस्तनकाका या साऱ्या व्यक्तीरेखा आठवल्या आणि वाटलं आज पुलं हवे होते...


- कविता सहस्रबुद्धे






Saturday, February 15, 2020

इजाजत

एक चिरतरुण काव्य, कितीही वेळा बघितला तरी तितकाच आवडतो, जवळचा वाटतो आणि प्रत्येक वेळी काहीतरी नविन देवून जातो. सिनेमा पाहतांना 'पावसाच्या बरसणाऱ्या सरींच्या सोबत गुलजारजींची कविता त्यांच्याच आवाजात आपण ऐकतोय' असं वाटतं राहतं. या सिनेमाच्या प्रेमात पडल्यापासून असा एकही पावसाळा गेला नाही कि मी 'इजाजत' पाहिला नाही, इतकी जादू या सिनेमाने केली आहे मनावर. इजाजत म्हणजे महेंद्र,  माया आणि सुधा यांची एक अलवार प्रेमकहाणी. यांत नक्की कोण बरोबर किंवा कोण चूक याचा विचार न करता फक्त नजरेत आणि कानांत साठवून ठेवावी अशी हि निखळ प्रेमकविता !!

एकीकडे रेखा ,नसिरुद्दीन शहा, अनुराधा पटेल हे तीन जबरदस्त कलाकार तर दुसरीकडे गुलजार ,पंचम आणि आशाताई यांनी अजरामर करून ठेवलेली एक से बढकर एक जबरदस्त गाणी ! कधी गीतकार म्हणून तर कधी दिग्दर्शक म्हणून तर कधी संवाद लेखक म्हणून प्रत्येक भूमिकेत आपण प्रेमात पडतो गुलजारजींच्या. यातला प्रत्येक संवाद म्हणजे एक खास कविता आहे, मनाला भिडणारी, प्रत्येकाला आपली वाटणारी.. 'मेरी मानिये जिंदगी को लगाम मत डालिये, आपके मुड़ने से ये नहीं मुड़ेगी' किंवा 'देखिये जो सच है सही है वही कीजिये' तसंच 'आदते तो छुट जाती है पर अधिकार नहीं छुटते'.. काय अप्रतिम लिहिलंय ना !!

रेल्वे स्टेशन वर वेटिंग रूम मध्ये सुरु होणारा हा सिनेमा. योगायोगाने भेटणाऱ्या महेंद्र आणि सुधाची हि गोष्ट इथूनच भूतकाळात नेते आपल्याला. दोघांच्याही मनांत खूप काही आहे सांगायला. ती अबोल तगमग त्या संपूर्ण वातावरणांत भरून उरलीए. आयुष्यात दोघे बरेच पुढे निघून गेलेत, लग्न होऊन वेगळे झालेत, पण तरीही एकमेकांच्या आठवणींमध्ये अजूनही सोबत आहेत.

वेटिंग रूम मधल्या महेंद्र आणि सुधाच्या संभाषणातून आपण त्यांच्या गोष्टीकडे वळतो. "आप यहाँ कैसे ?" या तिच्या प्रश्नाला "दार्जिलिंग कैम्पेन के लिए गया था वापस जा रहा हूँ, घर " असं उत्तर देतो. यावर ती विचारते , "घर..  वहीं, वही रहते है आप" यावर,"हाँ वही, वही शेहेर है, वही गली है,वही घर, सबकुछss ... सबकुछ वही तो नहीं है, लेकिन है वही उसी जग़ह"... असं जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्यालाही अस्वस्थ करतो.

फ्लॅशबॅक मध्ये महेंद्र आणि सुधाच्या या गोष्टीमधल्या मायाची ओळख होते. आरशावर तिने महेंद्र करता लिहिलेल्या निरोपातून ती प्रथम भेटते आपल्याला." बिना बताये तुम जाते हो, जाकर बताऊ कैसे लगता है ?" आणि नंतर तिने लिहिलेल्या चिट्ठीतून "चलते चलते मेरा साया कभी कभी यूँ करता है, जमीं से उठकर यूँ हात पकड़कर केहेता है, अब की बार मै आगे आगे चलता हूँ और तू मेरा पीछा करके देख जरा क्या होता है"... तेव्हा माया नक्की काय आहे हे कुतूहल वाढतं. तिची मैत्रीण जेव्हा, "ढूँढने से नहीं मिलेगी, वो चीज ही कुछ ऐसी है'.. असं तिच्याबद्दल म्हणते तेव्हा समजतं माया नक्की काय आहे. ती बेधडक आहे , बिनधास्त आहे पण तरीही हळवी आहे, महेंनवर जिवापाड प्रेम करणारी आहे !

सुधा आणि महेंद्रच लग्न झाल्यावर सुधाला घरामध्ये सतत जाणवणारं मायाच अस्थित्व अतिशय अस्वस्थ करतं.  महेंद्र तिची समजुत घालतो. "बुरा मत मानो सुधा मै जानता हूँ माया बहोत ज्यादा बसी हुई थी इस घर मै, अब हर जगह से तो निकाल दिया है उसे, अब किसी कोने कुदरे मे बच गई हो, तो वहाँ से भी हट जाएगी," त्यावेळी तिचा बांध फुटतो, "सबकुछ ही बटा हुआ लग रहा है इस घर मैं।  जिस चीज को भी छूने जाती हूँ लगता है किसी और की चीज छू रही हूँ, पूरापूरा अपना कुछ भी नहीं लगता यहाँ।" ..पण नंतर हिच सुधा कपाटामध्ये दागिन्यांच्या डब्यांतले आपले दागिने काढून तेथे मायाची पत्रं ठेवते. "मैने अपने जेवर निकालकर आपके रख दिये ".. तेव्हा मात्र डोळ्यांत टचकन पाणी आल्याशिवाय राहात नाही.

महेंद्र प्रामाणिक आहे. लग्नाच्या आधी सुधाला मायाबद्दल सर्व काही सांगितलंय त्यानी पण त्याला थोडा वेळ हवा आहे, जे पसरलय ते सावरायला. तो जितका प्रयत्न करून माया पासून दूर जावू बघतोय तितकंच ते त्याच्यासाठी अवघड होत जातंय. तो सुधाची समजुत काढतो , "मै माया से प्यार करता था ये सच है और असे भूलने को कोशिश कर रहा हूँ ये सही है ", आणि तिला जाणीव पण करून देतो, 'मुझसे जादा वो तुम्हे याद रेहेती है' ...

महेंन वर निर्व्याज प्रेम करणारी माया. "मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है.. सावन के कुछ  भिगे भिगे दिन रक्खे है और मेरे एक खत मै लिपटी रात पडी है'..  अस लिहून तिच्या किती आठवणी मागे राहिल्या आहेत हे महेंनला सांगताना '११६ चाँद कि राते और एक तुम्हारे कांधे का तील , गिली मेहेंदी कि खुशबू, झूठ मूठ के शिकवे कूछ, झूठ मूठ के वादे सब', तू का पाठवले नाहीस हि गोड तक्रार सुद्धा करते. महेंन आणि मायाच हे नातं या गाण्यामधून अलगत उलगडतं. एकमेकांपासून दूर जाणं सुद्धा इतक्या रोमँटिक शब्दांत सांगता येतं हि जादुई कमाल हे गाणं करतं !

नात्यांचा हा हळुवार उलगडणारा पदर बघतांना आपण हरवून जातो. दुसरीकडे महेंद्र आणि सुधा यांच लग्नानंतर नव्यानं बहरणारं नातं "कतरा कतरा मिलती है कतरा कतरा जिने दो , जिंदगी है, बेहेने दो, प्यासी हूँ मै प्यासी रेहेने दो '... या गाण्यातून आपल्या पर्यंत पोहोचतं. सुधाचं महेंद्र करता व्याकुळ होणं "खाली हात शाम आई है खाली हात जाएगी, आज भी न आया कोई खाली लौट जाएगी".. संध्याकाळची कातरता आणि तिच्या मनाची तगमग यांची विलक्षण गुंफण आहे या गाण्यांत.

हा संपूर्ण सिनेमा म्हणजे गोष्ट आहे वेटिंग रूम मधल्या त्या रात्रीची, जी रात्र आठवणीत भिजून जाते आणि भिजवूनही. सकाळची चाहूल लागलीए, पाऊस थांबलाय, पाघोळ्यांवरून थेंब थेंब पडणाऱ्या पाण्याचा आवाज सगळं मळभ दूर झालंय याची ग्वाही देतोय. आपण मनातलं सगळं काही सांगितलं, आपणच बोलत राहिलो याची महेंद्रला जाणीव होते. "सारी रात मै ही केहता रहा तुमने कुछ नहीं कहा', या महेंद्रच्या वाक्यावर  "मेरे पास तो केहेने को था ही क्या", हे रितेपण सुधा बोलून दाखवते. मायाने केलेला आत्महत्येचा प्रयत्न सुधाला सांगताना महेंद्र कबूल करतो, "शायद मुझे तुम्हे सब कुछ बताना चाहिए था मगर मुझे समझ मे नहीं आ रहा था, डर गया था मै ,समझने की कोशिश कर ही रहा था तो वो भाग गई, तुम भी जा चुकी थी, उस दिन पेहेली बार दिल का दौरा पड़ा, तुम्हारा जाना बुरा लगा"...

समज गैरसमज यांच मळभ आता कुठे दूर होतंय. हातातून ते क्षण तर निसटून गेलेत पण नियतीने जे समोर आणलंय त्या क्षणांशी तरी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न आता हे दोघे करतायेत.सुधा त्याला सांगते, तिच्या मनातलं जे तिने त्याच्या आयुष्यातून निघून जातांना जाणलं होतं आणि पत्रातूनही जे व्यक्त केलं होतं. "सच तो ये है की आपकी ईमानदारी ने मोह लिया था, पेहेली बार जब हात छुड़ाने आये थे और दूसरी बार जब हात माँगने। माया इस दुनिया से बहोत अलग है, मै बहोत ही साधारण औरत हूँ, जिद्दी हूँ, जल भी जाती हूँ, पिघल भी जाती हूँ। दादू को मैने समझा दिया है।  आप माया से शादी कर लीजिये।  मै अपनी मरजी से जा रही हूँ।".. आपण या दोघांच्या मध्ये आलो हि सल तिला त्रास देते आणि म्हणूनच ती तो निर्णय घेते, निघून जाते.

"माया कैसी है  ?" या तिच्या प्रश्नाने महेंद्र कोलमडून जातो, एका अपघातात माया जाते हे सांगताना भावुक होतो. त्याला सुधाची माफी मागायची आहे. ' जो हुआ उसे कुछ बदला तो नहीं जा सकता, पछता सकता है माफी मांग सकता है'.. इतकं बोलून सुधाला पुढे काही तो विचारणार इतक्यात अनपेक्षित पणे येणारा तिचा नवरा पाहून महेंद्र परत एकदा नियती समोर हार मानतो. जाताना सुधा म्हणते, "मै चलूँ , पिछली बार बिना पूछे चली गई थी इस बार इजाजत दे दो,  पिछले साल मैंने शादी कर ली".. इथे इजाजत या शब्दाचा अर्थ खऱ्या अर्थाने स्पष्ट होतो.
"जीती रहो सुखी रहो खुश रहो.. बहोत अच्छे पति मिले है तुम्हे , बहोत प्यार करते है,  वो सब जो मै नहीं कर सका भगवान करे तुम्हे भरपूर मिले, हो सके तो एक बार मन से माफ़ कर दो "... सुधा त्याचा निरोप घेऊन निघणार इतक्यात तिचा नवरा येतो " अरे, पिछे क्या रेह गया भाई', आणि समजून जातॊ सुधा नक्की काय मागे सोडून त्याच्या सोबत निघालीए ..

सुधा तिच्या नवऱ्याबरोबर जाते आणि महेंद्र सुद्धा त्या वेटिंग रूम च्या बाहेर येतो.आजवर जीची वाट तो आतुरतेने पाहात होता ते वाट बघणंच आता संपून जातं. याच वळणावर महेंद्र सुधा आणि माया यांची हि हळूवार गोष्ट आपल्या मनांत खोल रुतून बसते..


-कविता सहस्रबुद्धे


Saturday, February 1, 2020



खरं तर प्रेमाच्या कित्येक गोष्टी, किस्से आपण ऐकले आहेत, ऐकतो. प्रत्येक गोष्ट वेगळी, त्याच्यातील पात्रं वेगवेगळी पण धागा मात्र एकचं , प्रेमाचा ! याच धाग्यामध्ये गुरफटलेली प्रत्येकाची एक खास अशी प्रेमाची गोष्ट असते आणि प्रत्येकाला आपली गोष्ट खूप जवळची असते. 'प्रेमाची गोष्ट' हा शब्द ऐकतांच मला माझ्या आयुष्यात घडलेल्या 'त्या' गोष्टीची आठवण झाली. मी प्रेमात पडतांना अनुभवलेल्या त्या सुरेख क्षणांची गोष्ट, माझी 'प्रेमाची गोष्ट' !!

मोरपंखी दिवस होते ते, १९९७ साल. नुकतंच शिक्षण संपवून एका मोठ्या कंपनीमध्ये चांगल्या पदावर मला नोकरी मिळाली होती. बाविसावं संपून तेविसावं लागलं होतं.सर्वसामान्य घरांत जे होतं त्याहून वेगळं आमच्या  घरांतही झालं नाही, अहो म्हणजे आमच्या घरांत माझ्या लग्नाची कुजबुज सुरु झाली. शिक्षण नोकरी नंतर लग्न; साधारण असंच असतं नाही का ? 'ओळखीचं माहितीचं चांगलं स्थळ हवं 'या जुजबी अपेक्षेने आई बाबांकडून विषयाचा नारळ फुटला. माझा जन्म पुण्यातला. शिक्षण सुद्धा इथंच झालेलं त्यामुळे २२ वर्ष पुण्यात राहिल्यावर पुणे सोडायची माझी अजिबात तयारी नव्हती. अर्थात, त्यांत मला काही चूक वाटतं नव्हतं पण उगाच आगाऊ पणा नको म्हणून मी हा विचार आई बाबांकडे कधी बोलून नाही दाखवला. तसंही लगेच थोडं लग्न ठरणार होतं, म्हटलं बघू पुढचं पुढे. मी निर्धास्त होते, माझ्याच विश्वात होते !

'दिलवाले दुल्हनिया ......' ची जादूई पकड माझ्या पिढीवर अजून तशीच होती " मेरे ख्वाबों में जो आए, आके मुझे छेड जाए" गाणं गुणगुणत भटकायचं. आरशासमोर उभं राहून " ऐसा पेहेली बार हुआ हैं सतरा अठरा सालों में, अनदेखा अनजाना कोई आने लगा खयालों में" म्हणत लाजायचं. प्रेमांत पडणार याची इतकी पक्की खात्री होती कि आमिर माधुरी सारखं  "छत प्यार कि दिलकी जमीन सपनोंकी ऊँची दिवारे, कलियां मोहोब्बत कि खिलने लगी आई मिलन कि बहारें", म्हणतं स्वप्नांमध्ये हरवायचं. असे ते जादुई मोरपंखी दिवस होते !

एकीकडे नोकरी आणि दुसरीकडे माझं हे छोटंसं विश्व ! लग्नाचा विषय निघाला आणि महिन्याभरातच एक स्थळ आलं तेही अतिशय जवळच्या नातेवाईकांच्या ओळखीने. मग काय, स्टुडिओ मध्ये साडी नेसून जाणं, फोटो काढणं हे पारंपारिक सोपस्कार झाले कारण पत्रिका आणि फोटो पाठवायचा होता त्यांच्याकडे. 'रीतीप्रमाणे आपण मुलाचा फोटो मागायचा नसतो', हे ऐकून ज्ञानांत भर पडली आणि आश्चर्य वाटलं. माझा फोटो बघणार मग मी का नाही पाहायचा, मागायचा मुलाचा फोटो? पण या माझ्या प्रश्नांना उत्तरंच नव्हती. मुलाची जी माहिती मिळाली त्यावरून मुलाचं नाव 'केयूर' आहे हे समजलं. मला नाव आवडलं. तो पुण्यात व्यवसाय करतो, शिक्षण छान होतं, नोकरीचा अनुभव पण होता आणि एकूणच समजलेली त्याच्या घरची, घरच्यांची माहिती सुद्धा उत्तम होती त्यामुळे आपसूकच गोष्टी जुळत गेल्या. पत्रिका फोटो पाठवून काही दिवस झाले होते. तिकडून काय उत्तर येतंय हि उत्सुकता होतीच.अशातच एक दिवस 'पत्रिका जुळते आहे आणि फोटो आवडला त्यामुळे आता मुलगी पाहण्याचा कार्यक्रम ठरवू ', असा निरोप आला. आता मात्र मला खरंच धस्स झालं.

इतक्या झटपट हि सगळी चक्र इतक्या वेगाने फिरतील असं वाटलं नव्हतं. आता काय करायचं ? हा प्रश्न समोर होताच. तडक उठले आणि हे सगळं सांगायला दीपाकडे गेले. दीपा म्हणजे माझी अगदी जवळची मैत्रीण.  बी.कॉम नंतर तिचं लग्न झालं होत शैलेशशी. त्याचा प्रिंटिंगचा व्यवसाय आणि शनिवारपेठेजवळ त्याचं ऑफिस होतं. दीपाला हि बातमी सांगताना आमच्या दोघींच्या एक गोष्ट लक्षांत आली ; म्हणजे जवळजवळ उशिरा का होईना ट्यूबच पेटली म्हणा हवं तर कि केयूर पण तर शनिवार पेठेतच राहतो आणि त्याचं ऑफिस पण तिथेच आहे. 'हम्म ssss म्हणजे आता शैलेशला सांगायला पाहिजे,'असं एकदम डिटेक्टिव्ह टोन मध्ये म्हणत  आम्ही दोघी एकमेकींकडे पाहून मनसोक्त हसलो. आलेलं दडपण कुठल्या कुठे पळून गेलं. मग काय, लावलं आम्ही शैलेशला कामाला.

दुसऱ्या दिवशी ऑफिस मधून आल्यावर मी तडक दीपा शैलेशचं घर गाठलं कारण शैलेश कामगिरी फत्ते करून आला होता त्यामुळे त्याच्याकडून सविस्तर बातमी काढायची होती. तो चक्क क्लायंट बनून गेला होता केयूरकडे. त्याच्याशी बोलून काही वेळ त्याच्या ऑफिस मध्ये काढून त्याचं फोटो व्हिजीटींग कार्ड घेऊन आला होता पठ्ठा. म्हणजे छोटा का होईना कार्ड वरचा फोटो मिळाला होता केयूरचा. शैलेशकडून समजलेली माहिती उत्तम होती आणि तिथेच शैलेशनी ग्रीन सिग्नल दिला मला, ' मस्त आहे मुलगा , गो अहेड !' ... मग अजून काय हवं !

अखेर तो रविवार आला. संध्याकाळी मुलाकडची मंडळी येणार म्हणून घरी जोरदार तयारी सुरु होती. मी मात्र आईला, 'मी संध्याकाळी साडी नेसणार नाही, एखादा छानसा ड्रेस घालीन आणि तू पोहे सोडून काहीही दुसरं कर', हे आधीच सांगितलं होतं. इतक्यात फोन आला आणि समजलं कि केयूर एकटाच येणार आहे संध्याकाळी कारण त्याच्या आई बाबांचा नागपूरला छोटासा अपघात झाला होता व  ते पुण्यात येऊ शकले नव्हते पण 'ठरलेला कार्यक्रम रद्द न करता तुम्ही भेटून घ्या आम्ही लवकरच येऊ तेव्हा भेटू', असा त्यांचा निरोप होता. केयूर एकटा येणार म्हटल्यावर माझं टेन्शन थोडं कमी झालं. आधी त्याला भेटता येईल आणि मग त्याच्या घरच्यांना त्यामुळे पुरेसा वेळ मिळेल असा एक विचार मनांत डोकावला.

"अरे रे अरे ये क्या हुआ मैने नहीं जाना, अरे रे अरे बन जाये ना कहीं कोई अफसाना ".. सकाळपासून हेच गाणं गुणगुणत होते मी. महिन्याभरापूर्वी 'लग्न' या शब्दाने आठ्या आल्या होत्या कपाळावर माझ्या आणि आज मात्र मी वाट बघत होते संध्याकाळ होण्याची, त्याला भेटण्याची. काय कमाल आहे नाही.. मी मलाच हसत होते.

संध्याकाळ झाली, तो आला. गच्चीतून पाहिलं, पाठमोरा दिसला. चेक्सचा शर्ट, निळी जीन्स हा पेहेराव, छान उंचापुरा. मग खिडकीतून घरांत येतांना पाहिलं, दिसायला गोरा, एकदम हँडसम लुक. म्हणतात ना ते 'Love at first sight' तो विलक्षण अनुभव मिळालाच. त्याला पाहता क्षणी चक्क प्रेमात पडले होते मी त्याच्या. 'बासsss , याच्याशीच लग्न करायचं', हे मी ठरवून सुद्धा टाकलं. आई, बाबा,काका, काकू माझी भावंडं सगळे त्याच्याशी गप्पा मारत होते आणि मी त्याला पाहात होते.त्याची बोलायची पद्धत, भाषेचा लहेजा, बोलतांना थोडे हिंदी शब्द जास्त वापरत होता पण प्रत्येकाशी अदबीने बोलत होता. त्याचा मनमोकळा लाघवी स्वभाव,समजूतदारपणा,साधं सरळ व्यक्तिमत्व सगळ्यांनाच भावलं. वयातील दरी मिटवून तो मोठ्यांशी ज्या पद्धतीने बोलत होता ते पाहून खूप छान वाटलं. सगळे खुश होते त्याला भेटून, पहिल्याच भेटीत आवडला सगळयांना तो. त्याच्या "बढिया " शब्दावर तर आई भलतीच खुश होती. तिच्या हातच्या रवा नारळाच्या लाडूंची तारीफ त्याच्या त्या एका शब्दांत काठोकाठ भरली होती. सर्वांबरोबर एकत्र छान गप्पा झाल्या. एकमेकांची माहिती समजली, आवडी निवडी कळल्या, मैत्रीची छान सुरवात झाली. एकूण काय तर मस्त झाला कार्यक्रम. मी तर "आज मैं उपर आसमान नीचे"... अशी आकाशांत उडत होते.

आठवडा झाला आणि मग हळूहळू उतरले मी जमिनीवर. समोरून काहीच उत्तर नव्हतं, निरोप नव्हता. तो मला  नकार तर देणार नाही ना अशी भीती वाटू लागली. काय करायचं ? कसं समजेल त्याच्या मनांत काय आहे ते ? का अजून काही नाही कळवलं त्यानी ? हे प्रश्न फेर धरून नाचत होते आजूबाजूला. त्याला फोन करण्याची हिम्मत तर नव्हतीच आणि आपण कसा फोन करायचा हा पण एक प्रश्न होताच. माझे आई बाबा मात्र निवांत होते. "अग , त्याचे आई बाबा येतील आपल्याकडे तेव्हा समजेल, आता कसं सांगेल तो. त्याच्या आई बाबांनी अजून तुला पाहिलं नाहीए ते भेटले नाहीयेत'.. माझी अशी समजूत ते घालत होते पण मला काहीच पटत नव्हतं. मला त्याच्या मनांत काय आहे ते हवं होतं. म्हणतात ना , 'नशा ये प्यार का नशा है '...तसं झालं होतं काहीसं.

शेवटी मी मधुराला म्हणजे माझ्या लहान चुलत बहिणीला बोलावलं. आता काय करायचं ?  या विषयावर आम्ही खोल चर्चा केली आणि उपाय शोधला. मी केयूर ला डायरेक्ट फोन करणं बरोबर नाही म्हणून आवाज बदलून 'मी काकू बोलते आहे', असं सांगून केयूरशी फोन वर बोलायचा आम्ही प्लॅन केला. मग घरून फोन नको करायला, टेलिफोन बूथ मधून करू असं ठरवलं. तेव्हा बूथच्या बाहेर फोन करणाऱ्यांची रांग लागायची म्हणून आरपार दिसणार नाही म्हणजेच दारावर फिल्म लावलेली असेल असं दार असलेला बूथ शोधला कारण आवाज बदलून बोलायचं म्हणजे फोन वर रुमाल टाकून बोलायला हवं हे ज्ञान आम्हाला सिनेमांमधून मिळालं होतंच. मग काय, गणपतीबाप्पाचं नाव घेऊन लावला एकदाचा फोन. 'नमस्कार, काकू बोलते आहे', असं सांगून विचारपूस केली. तुम्ही येऊन गेल्यावर परत काही बोलणं नाही झालं म्हणून फोन केला असंही सांगितलं. पण तरीही त्याच्या मनाचा थांग काही लागत नव्हता.आता अजून किती स्पष्ट विचारणार शेवटी आई बाबा नागपुर वरून पुढच्या आठवड्यात आले कि भेटू या निरोपावर फोन ठेवला.

असं प्रेमात पडणं, कोणाचीतरी इतकी वाट बघणं, त्याच काय उत्तर आहे हे माहित नसूनही त्याची इतकी ओढ असणं, त्याला भेटण्यासाठी इतकं आतुर होणं, 'ए मेरे हमसफर एक जरा इंतजार' या गाण्याची पारायणं करणं, अचानक कुठेतरी तो भेटेल म्हणून आजूबाजूला त्याला शोधणं, त्याच्यासाठी रोज एक कविता करणं हे खूपss  आवडायला लागलं होतं मला. मी हे सगळं पहिल्यांदाच अनुभवत होते. प्रेमात पडणं इतकं सुंदर असतं हे मला तेव्हा समजलं आणि प्रेमात पडल्यावर किती हिम्मत वाढते आणि काय काय करायला लागतं ते सुद्धा !

पुढच्याच महिन्यांत त्याचे आई बाबा, दादा वहिनी घरी येऊन गेले. लग्न ठरलं, साखरपुड्याची तारीख ठरली. इथवर सगळं छान सुरळीत पार पडलं होतं. मुख्य म्हणजे माझं 'त्या' फोन चं भांड फुटलं नव्हतं आणि क्लायंट बनून गेलेल्या शैलेशला आता तो विसरून गेला असेल इतक्या दिवसांत या विचाराने मी निर्धास्त होते. तेव्हा आमची दोन्ही भांडी लवकरचं कशी फुटणार आहेत याची मला पुसटशी कल्पना पण नव्हती.

साखरपुड्याकरता हॉल बुक झाला, अंगठ्यांची,कपड्यांची खरेदी झाली. नातेवाईकांना आमंत्रण गेली. मी तर 'आपण स्वप्नांत तर नाही ना' याची अधूनमधून खात्री करत होते स्वतःशी कारण इतकं सगळं मनासारखं जुळून आलंय यावर माझा विश्वासच बसत नव्हता.ऑफिस मध्ये दोन दिवस सुट्टी मागितली होती मी साखरपुड्याकरता तर बॉस नि चार दिवस सुट्टी दिली. एकूण काय तर त्या वेळचा प्रत्येक क्षण मी साजरा करत होते. या एका नात्याने मी अनेक नवीन नाती जोडणार होते म्हणून थोडं दडपण आलं होतं खरं पण त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक आनंद मला मी प्रेमात पडण्याचा होता. इतरांकरता आमचं लग्न 'अरेंज मॅरेज' होतं पण माझ्याकरता मात्र माझं 'लव्ह मॅरेज' होतं  !

साखरपुड्याचा समारंभ अतिशय सुरेख झाला. दीपा शैलेश जेव्हा स्टेजवर आम्हाला शुभेच्छा द्यायला आले तेव्हा शैलेश ला पाहताच केयूर हसला आणि मला म्हणाला 'अरे हा क्लायंट म्हणून आला होता पण नंतर परत आलाच नाही ' तेव्हा केयुरला सगळं समजलं आहे याची खात्री पटली. 'काय काय पापड बेलले आहेत अरे तुझ्यासाठी ', असं मी म्हणताच केयूर मला म्हणाला, "आता अगदी खरं सांग, त्या दिवशी फोन कोणी केला होता "? बापरे याला हे पण समजलंssss कि तो फोन मी केला होता,माय गॉड मला इतकं लाजल्यासारखं झालं कि बस. 'कोणाला प्लीज सांगू नकोस ना', एवढंच कसंबसं बोलू शकले मी !

आतां बावीस वर्ष झाली लग्नाला पण आजही ते सगळं काही लख्ख आठवतंय. आपण किती वेडेपणा केला याचं नवल वाटतं कधीकधी कारण मुळांत असं काही करणं माझ्या स्वभावात नाहीए पण प्रेमात पडल्यावर दुसरं काहीच सूचत नाही, दिसत नाही हेच खरं ! खूप गोड आठवणीं आहेत या सगळ्या. आजही प्रेमाचा, लग्नाचा विषय निघाला कि मला माझी हि ' प्रेमाची गोष्ट ' नक्कीच आठवते आणि मग ओठांवर आपसूकच या ओळी येतांत,

"दोहराये जायेंगे ना ये लम्हात अब कभी, सपनोंमे भी ना छुटेगा ये साथ अब कभी 
मिलती है जिंदगी जब आप मुस्कुराये हैं, आखों में हमने आपके सपने सजाये हैं ".....