Wednesday, January 17, 2018


निरोपाची होती तेव्हा
तिन्हीसांज वेळ
सुटला तो हातातून
माझ्या तुझा हात
काय उरे काय रिते
कसला हिशोब
हुरहूर तीच उरी
पून्हा सारे तेच....
आठवण येता तुझी
लख्ख तो काळोख
दिसेनासे होई सारे
डोळ्यांत पाऊस....
 

Tuesday, January 9, 2018

जसा 'माहोल' आहे तशी गाणी ऐकावी, असं मला नेहमी वाटतं. कधी तो माहोल मनाचा असतो तर कधी आजूबाजूच्या वातावरणाचा.. आज दोन्हीही माहोल जमून आले होते. अस्ताला जाणाऱ्या त्याला पाहताना  माझ्याच मैफिलीत रमलेली मी आणि माझी गाणी ...

'फिर वही शाम वही गम वही तनहाई हें , दिल को समझाने तेरी याद चली आई हें , फिर वही शाम' .... तलत मेहमूद यांचा आवाज आणि मदन मोहनजींचे शब्द. ' जाने अब तुझसे मुलाकात कभी हो के न हो , जो अधुरी रही वो बात कभी हो के न हो ' ....  आयुष्यात निसटून गेलेल्या त्या क्षणांत, ती  'अधुरी' गोष्ट आज परत नव्याने दिसू लागली. आता परत कधीच भेट होणार नाही आणि मनातलं तुझ्याशी बोलताही येणार नाही.....

'आए तुम याद मुझे , गाने लगी हर धडकन '... साहिरजींचे शब्द आणि किशोरजींचा आवाज...
आठवणी ...  नेहमीच हुरहूर लावणाऱ्या. दिवसा पुसट होऊन संध्याकाळी गहिऱ्या होणाऱ्या. 'जब में रातोमें तारे गिनता हूँ , और तेरे कदमों कि आहट सुनता हूँ , लगे मुझे हर तारा, तेरा हि दर्पण '...... आजही तुझाच भास होतोय , त्या प्रत्येक ताऱ्यात मला फक्त तूच दिसतेयस ....

'किसका रस्ता देखे , ए दिल ए सौदाई , मीलों हें खामोशी बरसों हें तनहाई'... त्या अस्ताला जाणाऱ्या सूर्याला पाहून नकळत बाहेर पडणारा हळवेपणा ... तू परत फिरून येणार नाही तरीही पाहिलेली तुझी वाट . कित्येक दिवस सूर्यास्ताच्या वेळी , क्षितिजाकडे पाहून तुला घातलेली साद ... मीलों हें खामोशी बरसों हें तनहाई...

'बिती ना बिताई रैना , बिऱहा कि जाई रैना , भिगी हुई अखियोंने लाख बुझाई रैना '.. गुलजारजींचे  शब्द आणि लताजींचा आवाज. ' भुले हुए नामोंसे कोई तो बुलाए ' हि आर्तता खरंच आठवण करून देते 'तुझी' .. आजही त्या नावाने , त्या आवाजाने कोणीतरी हाक मारावी असं वाटतं. 'चाँद कि बिंदीवाली बिंदीवाली रतिया '... पाहून फक्त तू आठवतेस ....

'कहीं दूर जब दिन ढल जाए, सांझ कि दुल्हन बदन चुराए , चुपके से आए ... मेरे खयालों के आंगन में कोई सपनों के दीप जलाये'... दिवसांना सुख दुःखाचे सोयर सुतक नसते. आपल्या आयुष्यातुन जाणाऱ्या कोणासाठीच ते थांबत नाहीत. विस्मरणात गेलेल्या आठवणी मग कित्येकदा डोळ्यातून बाहेर पडतात.. " भर आई बैठे बैठे जब युं ही आँखे"... आपल्या मनातील ती सल फक्त आपल्यालाच ठाऊक असते ... "दिल जाने मेरे सारे भेद ये गेहेरे' ... हे सार काही आत कुठंतरी लपवून ठेवावंसं वाटतं...

'आपकी याद आती रही, रातभर ... चश्म-ए-नम , मुस्कुराती रही रातभर'.... किती आठवू आणि किती विसरू तुला.. प्रत्येक आठवणीत तू नव्याने भेटत राहतेस ....

'तुझसे नाराज नही जिंदगी हैरान हूँ मैं , हैरान हूँ मैं '... हेच आहे वास्तव, जे स्वीकाराव लागत. ' जीने के लिए , सोचा हि नहीं , दर्द संभालने  होंगे , मुस्कुराये तो मुस्कुराने के कर्ज उतारने होंगे'....

आणि तरी सुद्धा, कितीही उदास वाटलं तरी मनांत एक आशा नक्कीच असते "जब भी ये दिल उदास होता हें , जाने कौन आसपास होता हें '.....  ती नाही तरीही ती आहे .. तिचा भास आहे .. ती इथेच आहे.

प्रत्येकाला कवितेत , गाण्यात आपापला अर्थ शोधायचा असतो..  मलाही आज , या माझ्या मैफिलीत तो सापडला ... वेगळा तरीही माझा ..

आज, या प्रत्येक गाण्यात मला आई दिसली .... आणि अजून एकदा, मी तिला खूप miss केलं ....
डझनभर ...

पहिल्यांदा आई कडून ऐकला हा शब्द, खूपदा वापरायची ती. लहान असतांना तिच्या बरोबर भाजी फळं घ्यायला गेल्यावर अनेकदा कानावर पडलाय हा शब्द. शाळेत असतांना 'डझन' हा शब्द गणितात ऐकला, वापरला. नंतर किती तरी वेळा हा शब्द ऐकत, वापरत मोठे झालो.

खूप सहज पणे ऐकण्यात बोलण्यात येणारा हा शब्द. 'डझनभर कपडे आहेत तरी कमीच पडतात', 'डझनभर जमवायच्या आहेत का चपला ? किती चपला घ्यायच्या ते', 'डझनभर स्थळं पाहिली तेव्हा कुठे जमलं हे स्थळं' , 'एकेका हातात डझनभर बांगड्या घाल','खेळण्यातल्या गाड्या डझनानी आहेत माझ्याकडे',अशा अनेक वाक्यात हा शब्द वारंवार भेटतच राहिला...

पण आयुष्याच्या एका वळणावर या 'डझन' शब्दाशी परत एकदा गाठ पडली आणि त्यात एक वेगळाच गोडवा आहे हे जाणवलं तेव्हा..

नेहमी असं म्हणतात कि जीवाला जीव देणारी मैत्री हवी... खरं तर मित्र मैत्रिणी तर भरपूर असतातच कि  प्रत्येकाकडे पण एकाच सरीत गुंफलेल्या 'एक डझन मैत्रिणी' फक्त आपल्याच प्रत्येकीकडे आहेत. मनापासून जीव लावणाऱ्या, हक्काने काही सांगू आणि मागू शकू अशा, चेहऱ्यावरून मन ओळखणाऱ्या, जसं आवरून येऊ त्यावरून मूड ओळखणाऱ्या, जगातील सारी tensions बाजूला सारून हसायला लावणाऱ्या, अडचणीत धावून येणाऱ्या, ज्यांच्याबरोबर अशक्य वेडेपणा करू शकू अशा आणि जिभेला हाड नसतं हे ज्यांच्याबरोबर अगदी पटत अशा या माझ्या डझनभर मैत्रिणी....

प्रत्येक फुलात असतो वेगळा रंग आणि गंध तसंच प्रत्येकीत लपलेलं एक वेगळं सौंदर्य, प्रत्येकीचं एक वेगळं अस्तित्व. प्रत्येकीकडून काही ना काही शिकण्यासारखं आणि प्रत्येकी कडून निश्चित काही न काही घेण्यासारखं. वेगवेगळ्या परिस्थितीतून एकत्र आलेल्या, वेगवेगळ्या क्षेत्रांत शिक्षण घेतलेल्या, वेगवेगळ्या स्वभावाच्या आणि तरीही एकमेकींशी जोडलेल्या. छोट्या छोट्या गोष्टीत एकमेकींना जपणाऱ्या, हक्कानं भांडणाऱ्या आणि भांडणात सुद्धा प्रेम शोधणाऱ्या ...

खरं सांगू का ... तीन वर्षांपूर्वी आई गेली तेव्हा आयुष्यात जे काही रितं झालं ते कधीच भरून येण्यासारखं नव्हतं आणि नाही.. पण जे काही रितं झालं त्याची सल, त्याची बोच विसरायला तुमच्या सगळ्यांमुळे कुठेतरी मदत झाली असं प्रामाणिकपणे वाटतंय आणि म्हणून सांगावस सुद्धा. २०१५ साली ३ जानेवारी ला सुरु झालेला आईचा शेवटचा प्रवास २२ जानेवारीला संपला.. त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक डिसेंबर महिन्यात सुरु झालेली जीवाची घालमेल, तगमग मी कधीच थांबवू शकले नाही. दिवसागणिक वेळेगणिक अजूनही ते सारं काही रोज नजरेसमोरून जातं आणि मग मी स्वतःला ते विसरायला लावून तिच्या सुंदर आठवणी समोर आणते... 

आपण काल खूप मज्जा केली, वेडेपणा केला , खूप खळखळून , पोट धरून हसलो ... Christmas नंतर लोणावळा ट्रिप केली. आर डी बर्मनदांचा कार्यक्रम पाहिला, शनिवारी हर्षदा वैशाली बरोबर सिनेमा पाहिला आणि कालची धमाल पार्टी .. मला अवघड असणाऱ्या या साऱ्या दिवसात या वर्षी मी खूप खूप वेगळ्या वातावरणात होते. काल रात्री एकदा अपराधीपण आलं .. तीन वर्षांपूर्वी याच दिवसात आईला वाचवायचा प्रयत्न करणारी मी आणि आजची मी यात खूप खूप अंतर होतं ...

कदाचित या तीन वर्षांतील हा संपूर्ण प्रवास माझ्यासाठी सोपा नव्हता पण तुम्हा सर्वांमुळे तो शक्य झाला हे मात्र नक्की....  आई गेली पण जातांना मैत्रिणींचा आशीर्वाद देऊन गेली हे नक्की .....