' जोशी काकु '
आज काही केल्या घड्याळाचे काटे पुढे सरकतच नव्हते. 'आपल्याला हवं तेव्हा वेळ थांबत नाही' आणि 'वेळ थांबू नये असं वाटत तेव्हा ती जात नाही', या समीकरणाचा प्रत्यय येत होता आज, या डायलिसिस सेंटर च्या Waiting Area मध्ये बसून. आईला नुकतंच आत नेल होत आणि आतां पाच ते सहा तास असच बसायच होत.. हो डॉक्टर आताच सांगून गेले होते तसं. 'डायलिसिस म्हणजे नक्की काय करणार', हा केविलवाणा प्रश्न मनातच रेंगाळला कारण आता कशाचीच माहिती करून घेण्याची मनाची तयारीच नव्हती. मागच्या महिन्याभरांत बऱ्याच गोष्टींची झालेली अर्धवट,पूर्ण माहितीच पुरेशी होती. आता अजून नवीन काही नको होते.
खिडकीतुन बाहेर पाहिलं तर गणपतीच देऊळ दिसत होत, हॉस्पिटलच्याच आवारातल. मी रोज येतां जातां बाहेरूनच ते देऊळ पाहत होते आणि आश्चर्य म्हणजे तरीही देव मला रोज भेटत होता…वेगवेगळ्या डॉक्टरांच्या रुपात. प्रत्येकावर तेवढाच विश्वास होता आणि अपेक्षाही. फरक इतकाच होता कि मंदिरात मिळते तशी शांतता, नव्हती इथे मनाला… होती फक्त भीती !!!
इतक्यात अचानक एक बाई समोर आल्या. अगदी सोज्वळ आणि सात्विक रूप. पिवळ्या रंगाची लाल काठाची साडी, डोक्यात घातलेले पिवळ चाफ्याच फुल, हातभर भरलेल्या हिरव्या बांगड्या, त्यात चमकणाऱ्या पाटल्या, मणी मंगळसूत्र आणि कपाळावर लावलेल कोरड ठसठशीत कुंकू… एकदम लाघवी सौंदर्य. मी काही बोलायच्या आधीच त्या म्हणाल्या, ' हि तीळ गुळाची वडी घे, चिक्कीच्या गुळाची आहे. घरी बनवलेली. तिळगुळ घे आणि गोड बोल'. काही बोलण्याच्या आधीच हातावर वडी ठेवून त्या गेल्यासुधा. खूप वेळ मी त्या वडीकडे एकटक पाहत राहिले.या वर्षी संक्रांत अशी भेटली मला, इथे .
काउंटर वरच्या काकांच्या आवाजामुळे मी दचकले आणि पाहिले तर त्याच काकू त्यांना तिळगुळ देत होत्या, 'तुमच्यासाठी मुद्दाम मऊ वडी आणली आहे.' काका म्हणाले ' का ? माझे दात तर अजून शाबूत आहेत, ती चिक्कीची वडी द्या मला '. ' घ्या हो', अस म्हणून त्यांनी दोन्ही वड्य़ा काकांना दिल्या. त्या नंतर येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला, डॉक्टर्स ना , सिस्टर्स ना, तिथे बसलेल्या पेशंटच्या सर्व नातेवाईकांना त्यांनी तिळगुळ वाटला. शेवटी 'झाल माझ हळदी कुंकू ' असं म्हणत समाधानाने अगदी समोरच बसल्या. इतका वेळ चालू असणारा त्यांचा तोंडाचा पट्टा आता तरी थांबेल, अस वाटत असतानाच बाजूला बसलेल्या इतर चार चौघींबरोबर गुळाची पोळी व वड्यांची रेसिपी, साड्यांचा सेल पासून सुरु झालेली त्यांची चर्चा आता इतर पेशंटच्या चौकशी पर्यंत येउन पोचली होती.
मला खरं तर खूप त्रास होत होता या सर्वाचा. आपण कोठे आहोत आणि हे काय चालू आहे ? वाटत होत, त्यांना सांगाव कि, 'प्लीज थोड गप्प बसा हो, खूप त्रास होतोय', पण काहीच बोलू शकले नाही. मुक्याने सर्व पाहत राहिले … जणू काही दिवसांपासून मुक्यानेच जगायला शिकले होते.
इतक्यांत समोरून येणाऱ्या डॉक्टरांना पाहून थोडा धीर आला. त्या वातावरणाची सवय त्यांना होती पण माझ काय ? माझा चेहरा पाहून त्यांना अंदाज आला असावा. ' अग बसं , बसं ' अस म्हणंत बाजूलाच बसले ते. त्यांना पाहून त्या काकू परत आल्या आणि डॉक्टरांना तिळगुळ देवून त्यांचीच चौकशी करून गेल्या.
आता मात्र मी खूपच अस्वस्थ झाले. माझी ती अवस्था पाहून डॉक्टर म्हणाले, 'या जोशी काकू. मागच्या जवळपास दोन अडीच वर्षांपासून दर दोन दिवसाआड इथे येतात, काकांना घेऊन. पाच ते सहा तास मग इथेच असतात. बाकी सर्वांची पण परिस्थिती काही वेगळी नाही, कोणी मागचे सहा महिने कोणी वर्षभर कोणी दोन वर्षांपासून येताएत इथे आपापल्या पेशंटना घेऊन … गणपती , दसरा , दिवाळी , राखी सगळे सण इथेच होतात त्यांचे. किती दिवस भांडतील त्या वरच्याशी. शेवटी आपापला आनंद शोधलाय त्यांनी , परिस्थितीशी जुळवून घेतलंय. आम्हीच राखीला भाऊ होतो त्यांचे, तर दिवाळीतील पहिला फराळ सुधा इथेच करतात हे, आम्हा सर्वांबरोबर. इथे येणारा प्रत्येक जण ओळखतो या जोशी काकुंना, सध्याच्या सिनियर पेशंट रिलेटीव आहेत त्या.' हे ऐकून मी थक्कच झाले. त्या इतक्या सहजपणे वावरणाऱ्या चेहऱ्यामागे इतक काही दाटलं होत आणि मला मात्र स्वत:च दुःख कुरवाळताना समोरच जग दिसतच नव्हत. परिस्थिती माणसाला बदलवते आणि इथे तर या सर्वांनी त्यांच्या प्रयत्नांनी परिस्थितीच बदलवली होती पण हार नव्हती मानली. कोणाचे किती क्षण उरलेत याचा हिशोब न मांडता हे सगळे लोक आल्या क्षणाला आनंदाने सामोरे जात होते.
इतक्यात डॉक्टर माझा निरोप घेऊन गेले हि आणि मी मात्र ….