Saturday, September 26, 2015

' प्राजक्ताच् झाड़ '

उमाकाकू आज जरा खुशीतच होत्या,कारणही तसंच होतं म्हणा. त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारा आनंद , आज बरच काही सांगत होता. काका गेल्यावर जवळपास दोन अडीच वर्षांनंतर मनमोकळ हसणाऱ्या उमाकाकू आज सर्वांनीच पाहिल्यादुध टाकणारा गोविंद, कचरा उचलणारा रामदिन, बाजूच्या सुलभा काकुंपासून अगदी कामवाल्या रेणू पर्यंत प्रत्येकाला जाणवल होत कि आज काहीतरी विशेष आहे, पण तरीही कोणीही समोरून काही विचारल नाही त्यांना.

उमा काकूंना तीन मुली, तिघिंचीही लग्न झाली. प्रत्येकीच आयुष्य छान मार्गी लागल्यावर आता थोडा वेळ आपल्यासाठी जगावं असा विचार मनाशी पक्का केला आणि दुर्दैवानं त्याच वेळी काकांनी साथ सोडली. जणू पत्त्यांचा बंगला क्षणांत कोसळावा तस झाल. यातून सावरून आपल्या मुलींकरता काकू परत आयुष्याकडे वळल्या होत्या.

स्वत:ला परत गुंतवून घेण्याकरता उमाकाकू जवळच्याच लायब्ररी मध्ये नुकत्याच चार तास जाऊ लागल्या होत्या. शाळेतून निवृत्त झाल्यावर तशा त्या घरीच असायच्या पण आता परत बाहेरच्या जगांत रमण्याचा प्रयत्न करत होत्या. जोड़ीला देवळातला ग्रुप , हास्य क्लब आणि पुस्तकं यांच्या सोबतीनं त्यांचा दिवस कसा जाई ते समजत नसे पण तिन्हीसांजा होताच एकटेपणा जाणवू लागे. शनिवार आणि रविवार मुली, जावई, नातवंड यांच्यात त्या अगदी रमून जात.

आज त्यांचा एकसष्टावा वाढदिवस होता आणि मुलींनी संध्याकाळी जेवायला बाहेर जाण्याचा बेत कालच रात्री फोन करून सांगितला होता आणि म्हणूनच उमाकाकु आज खुश होत्या. त्यांना ओढ लागली होती सांजवेळेची … ती ओढ व तो आनंद झिरपत होता त्यांच्या चेहऱ्यावरुन.

दिवसभराची काम संपवून नुकताच चहा झाला. मुलींनी आधीच आणून दिलेली नवीन साडी कपाटातून बाहेर काढून ठेवली. काकांनी, ते असताना वाढदिवसाला आणलेल्या मोत्याच्या कुड्या काकुनी घातल्या. तीच साडी नेसण्याचा मुलींचा आग्रह मानून उमाकाकू  तयार  झाल्या. 'सातचे ठोके पडले घड्याळात तरी अजून कस आल नाही कोणी', असा विचार करत त्या खिडकीपाशी गेल्या आणि दारावरची बेल वाजली. 'आले वाटत सगळे', असा विचार करत दार उघडल तर समोर अनिश आणि अतुल, दोघे लाडके जावई. जावई  म्हणणं योग्य होणार नाही, खरं तर मुलच. "हे काय ? तुम्ही दोघच ?" काकूंचा प्रश्न अपेक्षितच होता दोघांना. अतुल म्हणाला, "आई सगळे जण परस्पर येतायेत हॉटेल मध्ये, आम्ही तुम्हाला घ्यायला आलो आहोत, चला".  काकू म्हणाल्या, "अरे मी कधीपासून वाट पाहतेय सर्वांची , हे काय मी तयारच आहे, " असं म्हणत त्या निघाल्या. " संध्याकाळी घरात अंधार नको म्हणून एक दिवा चालू ठेव" अशी सूचना करून अनिशला त्यांनी कुलूप लावायला दिल. सर्वाना भेटण्याच्या ओढीने अनिश आणि अतुल बरोबर उमाकाकू गाडीतून निघाल्या.

आज जरा गारच होती हवा. खिडकीतून येणारा वारा क्षणांत त्यांना मागे घेऊन गेला.… मुलगा नाही म्हणून सहन केलेला त्रास कुठेतरी सलत होता आत. कोणालाही हेवा वाटावा अशा मुली, जावई, नातवंड अजून काय हवं, यापेक्षा वेगळी का असते आयुष्याची कमाई ? नवऱ्याच्या मागे राहिलेल्या स्त्रीला अवघड असतं एकट राहण पण याच खऱ्या कमाईमुळे आज आयुष्य अगदी हळुवार झालं होत. आकाशात रंगांची सूर्यास्ताला झालेली उधळण जणू आपलीशी वाटू लागली त्यांना… कारण त्या रंगांत आनंद, समाधान, अभिमान अशा कितीतरी छटा होत्या.

एका क्षणांत मागच आयुष्य सामोर आलं. नवीन लग्न झाल तेव्हा पाहिलेली स्वप्न केव्हांच मावळली. नवा  सासुरवास, घराला हातभार म्हणून सुरु केलेली शाळेतील नोकरी, मुलींच्या जन्मानंतर आई म्हणून आलेली  जबाबदारी, सासू सासऱ्यांच आजारपण, मुलींची लग्न, बाळंतपण , नवऱ्याच आजारपण यातच आयुष्य वाटल गेल. नको असलेला एकटेपणा आला आणि जणू जगण्याची उमेद संपली, असं वाटू लागल.  मुलींनी,  मैत्रिणींनी यातून बाहेर काढलं. आयुष्याकडे पहायला नवी दृष्टी दिली.

इतक्यात गाडीचा ब्रेक लागला आणि उमाकाकू दचकल्यां. "आई आलो आपण ", या वाक्याने त्यांची तंद्री मोडली आणि डोळयांच्या कडा टिपत हॉटेल आलं म्हणून ऊमाकाकू गाडीतून खाली उतरल्या अन् धक्काच बसला त्यांना, एक सुखद  आणि अविस्मरणीय !!!

गोखल्यांच्या गणेश सभागृहासमोर गाडी थांबली होती आणि समोर होत्या त्यांच्या लाडक्या लेकी… पैठणी, नथ, मोगऱ्याचे गजरे, दागिने अन् प्रत्येकीच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणार कौतुक. काहीही बोलण्या करता उमा काकुंच्या तोंडून शब्दच बाहेर पडेनात. आईचा हात धरून काकूंच्या मुली त्यांना आत घेवून जाऊ लागल्या. दोन्ही बाजूला काढलेल्या फुलांच्या सुंदर  रांगोळ्या आणि समोर दरवाज्यात आजीची वाट पहात उभी असलेली नातवंड.  चिमुरड्या हातांनी आजीसाठी फुलांच्या पायघड्या घालून केलेल ते स्वागत पाहून त्यांची आजी अगदी भारावून गेली. हॉलमध्ये पाऊल टाकताच उमा काकूंचा समोरच्या दृश्यावर विश्वासच  बसेना, आपण स्वप्नात तर नाही ना असा भयानक विचार मनाला शिवून गेला कारण समोर होत्या त्यांच्या बालपणीच्या व कॉलेजच्या मैत्रिणी, सोसायटी मधील जिवलग मैत्रिणी आणि हास्यक्लब चे सवंगडी. सारेजण उमा काकूंचा ६१ वा वाढदिवस साजरा करायला खूप कौतुकाने आले होते. त्यांची आयुष्य भराची पुंजी एका क्षणांत आज समोर एकवटली होती.

६१ दिवे लाऊन आईच औक्षण करताना मुलींचे डोळे भरून आले. आजवर वाढदिवस, कोजागिरी, श्रावणी शुक्रवार अशा कितीतरी प्रसंगी जीने त्यांना ओवाळल होत त्या आईला आज तिच्या मुली ओवाळत होत्या. एका क्षणांत खूप काही मिळाल होत, त्या माऊलीला आणि तिच्या मुलींनाही….नातवंडांच्या घोळक्यांत आजी आज अगदी भरून पावली होती. प्राजक्ताच झाड आज खऱ्या अर्थाने बहरले होते....






Friday, September 11, 2015

' गोड बातमी '

'अभी ना जाओ छोडकर, ये दिल अभी भरा नही' रेडीओवरती गाण चालू होतं. गाण ऐकतां ऐकतां नकळत सावनीच लक्ष आजोबांकडे गेलं. डोळे मिटून आरामखुर्चीत बसून गाण ऐकता ऐकता, डोळ्यांमधून वाहणारे अश्रू पाहून तिला खूप वाईट वाटले. त्या गाण्याने जणू त्यांना परत त्याच वळणावर नेऊन ठेवले होते. आजीला जाऊन जेमतेम दोन महिने झाले होते. थोडा बदल होईल म्हणून आदित्य सावनी नुकतेच आजोबांना इथे पुण्याला घेऊन आले होते. ५0 वर्षांची आजीची सोबत आतां फक्त आठवण होऊन त्यांच्या बरोबर होती. आजोबा म्हणायचे, ' हि पैज जिंकली तुझी आजी, माझ्या आधी जायची आणि जातांना मला मात्र अगदी एकट करून गेली.' 

खरंच, अवती भोवती सारेजण असूनही आजोबा एकटे होते. प्रत्येकाला काही न काही व्याप होते, आयुष्य होते पण आजोबांच काय ?  अगदी रित रित झाल होत त्यांच आयुष्य. आजीचा फोटो उशाशी घेऊन झोपायचे, जुनी गाणी ऐकतांना हळवे व्हायचे. एके काळी काय रुबाब होतां आजोबांचा, आदित्य सांगायचा ना सावनीला. त्यांची कडक शिस्त, वेळ पाळण्याची सवय, रोखठोक स्वभाव, आदरयुक्त भीती वाटायची. आतां मात्र त्यांच्याकडे पाहून केवळ  सहानभूती वाटायची. आजी बरोबर आदित्य चे आजोबा सुधा हरवले होते जणू. 

माणूस आपल्या आयुष्यात अनेक नाती जोडतो. या अनेक नात्यांत आई वडील, बायको, मुलं हि नातीच खरं तर त्याच आयुष्य बनतं आणि शेवटी आलेलं हे असं रिकामपण अगदी मोडून टाकत त्याला. आजोबा हि असेच मोडले होते, 'आतून' पण तरीही 'मी ठीक आहे', असं दाखवत होते जगाला. कोणावरती अवलंबून नको राहायला म्हणून आपण आपली सगळी काम स्वत: करायचे. पेपर वाचणे , फिरायला जाणे इतकच काय पण T.V. सुधा आजकाल पाहायला लागले होते, नाहीतर TV हे एक कारण असे आजी आजोबांच्या लुटुपुटू च्या भांडणाचे. पण आजकाल म्हणायचे, ' हिला कस समजणार, पुढे काय झाल ते म्हणून पाहतो मी सिरियल आणि झोपेत तिला सांगतो, ' असं म्हणून आजी पहायची त्या सर्व सिरियल पहायचे आजोबा. 

सावनी आणि आदित्य खूप जपायचे आजोबांना. दोन वर्षांपूर्वी लग्न झाल दोघांच आणि नोकरी करता पुण्यात स्थाईक झाले दोघे. ऑफिस मधून आल्यावर आजोबांबरोबर चहा पिताना गप्पा आणि रात्री जेवण झाल्यावर सोसायटीत आजोबांना घेऊन चक्कर मारणे, हा जणू रोजचाच पायंडा पडला होता.  आजीची जागा आपण नाही घेऊ शकणार पण आजोबांना एकट वाटू नये, याकरता दोघांची धडपड सुरु असायची. 

आज सकाळ पासून सावनी झोपूनच होती, जरा बरं वाटत नव्हतं तिला. आदित्य सुधा घरीच होता. आजोबा थोडेसे अस्वस्थ होते. ' तुम्हा मुलांना तब्येतीची काही काळजी घेता येत नाही. वेळेवारी खाण नाही, दुध प्यायला नको. एकसारख कॉम्पुटर समोर बसून काय ते काम आणि काय ती कॉफी सारखी', आजोबा आपल्या परीने बोलत होते. आदित्य म्हणाला, ' काय हे. कशाचा कशाशी संबंध जोडताय आजोबा. मी सांगीतल ना तुम्ही काळजी करू नका, डॉक्टरकडे जातोय ना आम्ही. बर वाटेल औषध घेऊन.' असं बोलून आदित्य सावनी ला घेऊन गेला हि डॉक्टरांकडे आणि इकडे आजोबा मात्र येरझाऱ्या घालू लागले. दोन तीन वेळा भास झाला म्हणून दार सुधा उघडून झालं, तास दिड तास झाला होता त्या दोघांना जावून. आता मात्र आजोबा थकून आराम खुर्चीत बसले आणि त्या fan च्या गार वाऱ्यांत त्यांचा डोळा लागला.

'अहो, झोपलात का, बसल्या बसल्या?' आजीचा आवाज ऐकून आजोबा जागे झाले. 'नाही गं, थोडा पडलो होतो इतकच. मुलांची वाट पाहतोय'. आजी म्हणाली, ' मी काय म्हणते, नका काळजी करु. गोड बातमी घेऊन येतील पहा आपले अदु आणि सावनी'. ' गोड बातमी'? आजोबा जरां गडबडले. आजी नेहमीच्या सवयीने म्हणाली,'अहो, अस काय करताय ? गोड बातमी हो, गोडSSs बातमी ….'. हे ऐकताच आजोबांचा चेहरा एकदम खुलला, ' हं… हं समजल, समजल मला. अरे माझ्या लक्षातच नाही आलं. उगीच ओरडलो सकाळी मुलांना, तू पणजी आणि मी पणजोबा …हा हा हा '. आजी हे ऐकून गालातच हसली. त्या सुरकुतल्या चेहऱ्यावरती खळ्या अजूनच खुलून दिसत होत्या. समजुतीच्या स्वरात आजी म्हणाली , ' आतां तुम्हालाच काळजी घ्यायला हवी मुलांची, थोडी मदत करायला हवी घरात त्यांना , मी असते तर …. ' 'हो गं , करीन मी मदत, तू नको काळजी करू,' आजोबा बोलून गेले आणि इतक्यात दारावरची बेल वाजली. एकदा … दोनदा … तिसर्यांदा… आजोबा दचकून जागे झाले. 'आलो रे आलो ', म्हणत दरवाज्यापाशी गेले, कधी एकदा दार उघडीन असं झाल होतं त्यांना. 

दारात सावनी आणि आदित्य ला पाहून म्हणाले, 'काय झाल बाळा, काय म्हणाले डॉक्टर ?' आदित्य म्हणाला , 'काही नाही आजोबा, सगळ ठीक आहे. आजोबांचे कान काहीतरी वेगळं ऐकण्यासाठी आतूर होते. ' अरे बोल राजा, आनंदाची बातमी आहे ना, ते सांग ना आधी.' आजोबांच्या या वाक्याने दोघेंही गडबडले. आदित्य म्हणाला, 'आजोबा तुम्हाला कसं माहित ?' हे ऐकून आजोबा अजूनच खुश झाले, 'म्हणजे खर आहे तर…वा वा वा, अरे हेच तर ऐकायच होत मला. आताच हि सांगून गेली मला कि मी पणजोबा होणार आहे '  आणि असं  म्हणत आजोबांनी आदित्यचा हात हातांत घेतला. डोळ्यांच्याकडा नकळत ओल्या झाल्या होत्या, त्या पुसत म्हणाले ' सावनी आदित्य, खुश राहा बेटां'.  अस म्हणून ते देवघराकडे गेले. 

आजीचा आनंदी चेहरा सारखा समोर येत होता. देवाचे मनापासून आतून आभार मानायचे होते त्यांना कारण पुढे चालण्याकरता एक आशेचा किरण दिला होता त्यानी, येणाऱ्या चिमुकल्या पिलाच्या ओढीने जगायला नवीन उमेद मिळाली होती. कालपर्यंत जगण्याची इच्छा नसलेले आजोबा आज मात्र उद्याच्या स्वप्नांत केव्हांच हरवून गेले होते ….